Tatya Tope’s Operation Red Lotus

Tatya Tope’s Operation Red Lotus 

मुळ लेखक. पराग टोपे

इतिहास हा नेहमी जेत्यांकडून लिहिला जातो. अर्थातच त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा त्या लेखकाला अभिप्रेत असणारा अर्थच त्यातून ध्वनित होतो. काळाच्या ओघात एखाद्या घटनेचे किंवा घटनाक्रमाचा अनुषंगिक विषयांच्या संदर्भात जेव्हा सखोल अभ्यास होतो, तेव्हा अनेकदा लिखित इतिहासाच्या विपरित सत्य पुढे येते. दोन विभिन्न मानसिकतेतून केलेल्या इतिहासाच्या लेखनाचे दोन भिन्न वाचकांवर वेगवेगळे किंवा परस्परविरुद्ध परिणाम होताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांबद्दल केले गेलेले चित्रण- मुघल सम्राटांच्या बखरीत शिवाजीच्या विद्वेषांचे चित्रण आणि त्याच्या कागाळ्यांचे वर्णन येते, तर सभासद इत्यादि एतद्देशीय बखरींत मात्र याच कारवायांकडे ‘हिंदवी स्वराज्यासाठीचा लढा’ म्हणून पाहिले जाते. बारकाईने अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की हिंदवी स्वराज्याचा लढा हा मुघल सम्राटांनी साहजिकच विद्वेषाच्या भावनेतून चित्रित केला होता. ऐतिहासिक घटनांचे हे विविधअंगी चित्रण मोठ्या प्रमाणावर समाजमनावर परिणाम करणारे असते. कारण इतिहासाचा अभ्यास करणारा त्रयस्थ अभ्यासक ज्या संदर्भग्रंथांचा वापर करेल, त्याच अनुषंगाने त्याचे मत तयार होते.

१८५७ चा लढ्याला उद्देशून वापरले गेलेले ‘उठाव’ किंवा ‘स्वातंत्र्यमर’ किंवा ‘बंड’ हे शब्दच या सिद्धांताचे किती समर्पकपणे समर्थन करतात. कोणासाठी हे ‘शिपायांचे बंड’ होते, तर कोणासाठी ‘स्वातंत्र्यसमर’. परंतु यात अतिशय विलक्षण अशी एक गोम आहे. कोणत्याही देशाच्या इतिहासात त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केला गेलेला प्रत्येक लहानमोठा प्रयत्नही लढा असतो आणि साधी पदरमोडसुद्धा ‘त्याग’ म्हणून गौरवली जाते. परंतु देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी म्हणून केला गेलेला पहिला स्वातंत्र्यलढा मात्र बंड म्हणून पाहिला गेला. केवळ ब्रिटिशांनी नव्हे तर ब्रिटिश शिक्षणपद्धतीचे उत्पादन असणा-या भारतीय इतिहासकारांनीही अनेक वर्षं याच दृष्टिकोनातून या लढ्याकडे पाहिले. स्वतःच्याच देशबांधवांनी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याची बंड म्हणून हेटाळणी करणे ही एक शोकांतिका होती. १९०८ मध्ये सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहून असा सिद्धांत मांडला की, १८५७ चा उठाव हा केवळ शिपायांचे बंड नसून ब्रिटिश अमलाखालील हिंदुस्थानाने एकत्रितपणे उभारलेले पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. शेतक-यांपासून कारागिरांपर्यंत, राजे रजवाड्यांपासून ते शिपायांपर्यंत प्रत्येक लहानमोठ्या व्यक्तींनी संस्थांनी उस्फूर्तपणे पारतंत्र्य लादू पहाणा-या ब्रिटिश सत्तेला दिलेली ती एक सणसणीत चपराक होती. स्वातंत्र्यरूपी तेजाचा स्फुल्लिंग जागवणारा तो पहिला समरसूर्य होता. अतिशय अभिमानाने वर्णन करण्याजोगा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला चैतन्य देणारा असा हा लढा होता, हे सावरकरांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले होते.

पराग टोपेंचे ‘तात्या टोपेज् ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक याच धर्तीवर अनेक ऐतिहासिक संदर्भांचा खोलवर जाऊन अभ्यास करते. पूर्वजांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा पट उलगडणे आणि विपरित चित्रण केल्या जाणा-या इतिहासाची ऐतिहासिक संदर्भांसह पुनर्मांडणी करणे हे दोनही उद्देश या पुस्तकातून लेखक साध्य करतो. तात्या टोपे यांचे नेतृत्व आणि रक्तकमल योजना या दोहोंच्या आधारे १८५७ च्या उठावाचे सखोल विवेचन लेखक करतो. परंतु यातही केवळ कथालेखनापेक्षाही समग्र इतिहास अतिशय काटेकोरपणे आणि त्रयस्थ वृत्तीने समोर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न दिसून येतो. लेखकाने अनेक ऐतिहासिक दस्त ऐवजांचा अभ्यास करून आणि संदर्भग्रंथ चाळून या प्रयत्नाला योग्य ती दिशा दिलेली आहे. १८५७ चा उठाव हे केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर एका स्वातंत्र्याच्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहून रक्तकमलाचे प्रतीक वापरून उभारलेले ते एक स्वातंत्र्युद्ध होते, हे मत पुनःपुन्हा दृढ करण्याचा उपक्रम म्हणूनच हे पुस्तक पुढे येते.

ऐतिहासिक संदर्भ आणि घटनाक्रमांची बांधणी अतिशय सुसूत्रपणे या पुस्तकात आढळते. परंतु इतिहासाचा केलेला पाठपुरावा आणि नाट्यमय घटनांची बांधणी या दोहोंच्या जुगलबंदीमध्ये वाचकाचा काहीसा गोंधळ उडतो. केवळ इतिहासाचा अभ्यास किंवा एक उत्कृष्ट पुस्तक यांपैकी वाचकाने या पुस्तकातून काय साध्य करावे, याचा पुरेसा उलगडा होत नाही. उठावाच्या पार्श्वभूमीचे, तयारीचे, प्रत्यक्ष उठावाचे चित्रण आणि तात्या टोपे, या दोन्हीमध्ये पुस्तकाचा केंद्रबिंदू सतत हलताना दिसतो. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी या पुस्तकातील संदर्भ आणि पुरावे निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु तो वाचकवर्ग अतिशय सीमित आहे. सामान्य वाचकासाठी लागणारी रंजकता आणि प्रासादिक शैली कोठेतरी हरवून गेल्यासारखी वाटते. अभ्यासकांसाठी एक संदर्भग्रंथ इतकेच या पुस्तकाचे मर्यादित अस्तित्व राहील की काय अशी भीती वाटते. १८५७ च्या उठावावर आजपर्यंत झालेल्या चर्चा आणि या विषयाचा आवाका, या दोन्हीच्या मानाने पुस्तकाचा आकार काहीसा मोठा भासतो. लेखकही सावरकरांसारखा सिद्धहस्त नसल्याने या पुस्तकाची व्याप्ती वाचकांपर्यंत किती पोहोचेल याची शाश्वती देता येईलसे वाटत नाही.

Copyright sheetaluwach.com 2021 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact