(How to register a domain) डोमेन रजिस्ट्रेशन कसे करावे?

मागच्या भागात आपण मराठीत ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग लिहिण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? याची प्राथमिक माहिती घेतली. स्वतंत्र वेबसाईट तयार करणे ही व्यवसायिक ब्लॉगिंगची पहिली पायरी असते हे आपण शिकलो. अशी साईट तयार करण्यासाठची पहिली पायरी म्हणजेच डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration) आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी होस्टिंग प्लॅन Hosting Plan) कसा निवडायचा हे आपण या भागात पहाणार आहोत.
सर्वप्रथम येथे काही तांत्रिक (technical) शब्द सतत आपल्या कानावर येतील त्याची नीट माहिती घेऊ.

डोमेन (Domain) आणि होस्टिंग (hosting).

डोमेन (Domain) – कोणत्याही वेबसाईवर जाण्यासाठी जो पत्ता तुम्ही टाईप करता त्यातले त्या वेबसाईटचे जे अद्वितीय/वेगळे (Unique) नाव म्हणजे डोमेन (Domain) किंवा डोमेन नेम (Domain Name). उदा. तुम्ही फेसबुक उघडताना www.facebook.com टाईप करता. यातले www आणि .com हे शब्द इंटरनेटशी संबंधीत असतात तर facebook हे त्या वेबसाईटचे डोमेन (Domain) असते.
तुम्ही जेव्हा तुमची नवीन वेबसाईट तयार करणार असता तेव्हा त्याचे नाव किंवा डोमेन (Domain) हा अतिशय महत्वाचा भाग असतो. कारण ती तुमच्या ब्लॉगची ओळख असते. जसे माझ्या ब्लॉगचे नाव ‘शीतलउवाच’ आहे. त्यामुळे वेबसाईट उघडताना www.sheetaluwach.com टाईप करावे लागते. या डोमेन (Domain)वरून साईटचे नाव आणि त्याचा उद्देश लक्षात येतो. फेसबुक, ट्विटर किंवा इतर वेबसाईट्सचेही तसेच आहे.
तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम (Domain Name) नीट ठरवा ते इतरांपेक्षा वेगळे आणि आधीपासून वापरले गेलेले नसावे. या डोमेन नेम (Domain Name)वरून तुमची ओळख बनणार असल्याने ते काळजीपूर्वक आणि विषयाशी संबंधीत निवडा. डोमेन नेम निवडताना (Domain Name)काही संकेत पाळणे आवश्यक आहे.
ते –
१. कमीतकमी अक्षरांचे असावे. २. उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे ३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
हे नाव टाईप करून लोक तुमच्या ब्लॉगला भेट देणार, त्यामुळे वाचकांना ते सहज भावेल असे असावे. २. होस्टिंग (Hosting) – डोमेन (Domain) किंवा तुमच्या वेबसाईटसंबंधित माहिती फाईल्स जेथे स्टोअर होतात त्या जागेला किंवा प्रक्रियेला होस्टिंग (hosting) असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वेबसाईटचा डाटा (Data) ठेवलेला असतो. जसे आधार कार्ड काढून देणारी केंद्रे असतात तसेच तुमचे डोमेन (Domain) रजिस्टर करणाऱ्याही वेबसाईट्स असतात. जसे अनेक पर्यायातून आपण डिश टिव्हीचे पॅकेज निवडतो तसे होस्टिंगचेही अनेक पर्याय या वेबसाईटसवरून निवडता येतात.

डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration)

एकदा तुमच्या वेबसाईटचे बारसं झालं म्हणजे डोमेन नेम (Domain Name) तुम्ही ठरवलंत की मग तुम्ही होस्टिंग पुरवणाऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशनक करु शकता. उदाहरणार्थ . Go Daddy, Bluehost, Hostgator यासाठीचा खर्च हा तुम्ही घेत असलेल्या पॅकेजवर अवलंबून आहे. साधारण सर्वच वेबसाईटवर हे प्लॅन्स खाली दिलेल्या दोन चित्रात दाखवले आहेत त्याप्रमाणे दिसतात.

Hosting Plans
Hosting Plans

यातला इमेलचा पर्याय सोडला तर बाकीचे पर्याय हे ब्लॉगिंगसाठी किमान पहिल्या वर्षात तरी फारसे उपयोगाला येत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला जर स्वतंत्र इमेल नको असेल तर स्वस्तात स्वत प्लॅन निवडा. अधिक चिकित्सा करून हातात फारसं काही पडणार नाहीये!
एकदा प्ल्रॅन निवडल्यावर पुढे जा. आवश्यक माहिती भरताना तुम्हाला तुमच्या डोमेन (Domain) चे नाव रजिस्टर करायचा पर्याय उपलब्ध होईल. तुम्ही ठरवलेले डोमेन नेम (Domain Name) जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा ते नाव उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला कळेल. जर नाव उपलब्ध असेल तर प्रश्नच मिटला. परंतु जर नाव आधीच वापरले असेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता जसे .com ऐवजी .in किंवा co.in इ. डोमेन नेम (Domain Name) वापरात असल्याचा आणि इतर पर्यायांची सूचना खालीलप्रमाणे दिसते.

Domain Name Availability

त्यातील एक निवडून पुढील प्रक्रिया पार पाडली की झालं. जाता जाता काही अधिकच्या तांत्रिक संकल्पना पाहूयात. होस्टिंग प्लॅन निवडताना त्याची माहिती असल्यास मदत होईल.
Shared Hosting शेअर्ड होस्टिंग –
हे शेअर रिक्षासारखे प्रकरण आहे. जसे तुम्ही एका रिक्षातली जागा आणि भाडे दोन्ही शेअर करता तसे एकाच सर्व्हरवर जेव्हा तुमच्या वेबसाइटसह इतर वेबसाइटचाही डाटा (Data) म्हणजेच माहिती साठवली जाते त्याला शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting) म्हणतात. साधारणतः जेव्हा तुम्ही लहान व्यवसाय किवा ब्लॉग चालवता तेव्हा हा पर्याय उपयुक्त असतो कारण हा तुलनेत स्वस्त पर्याय आहे. तुमची वेबसाईट अन्य वेबसाइटसह सर्व्हर स्पेस, साधने इ. शेअर करत असल्याने त्याचा खर्चही वाटून घेतला जातो.
येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे की इतर वेबसाइट्स बरोबर जागेसह इतर साधनेही शेअर करत असल्याने सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर सगळ्यांचा एकत्रित परीणाम होतो. त्यामुळे इतर वेबसाईट्च्या ट्रॅफिकचा तुमच्या वेबसाईटच्या वेगावरही परीणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी होस्टींग प्लॅन (Hosting Plan) नामवंत आणि विश्वसनीय साईटवरूनच निवडा. अशा वेबसाईट एका सर्व्हवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेबसाइटस् लोड करत नाहीत जेणेकरून शेअर्ड होस्टींग असले तरी अडचण येत नाही.
Dedicated Server डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हर – येथे एक संपूर्ण सर्व्हर केवळ तुमची वेबसाईट होस्ट करण्यासाठी वापरला जातो. अर्थातच त्यामुळे हा अत्यंत खर्चिक पर्याय ठरतो. जेव्हा तुमची वेबसाईट उत्तम बिझनेस करत असेल आणि तुम्हाला विना अडथळा ट्रॅफिक हवे असेल तेव्हा हा पर्याय तुम्ही वापरु शकता. डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हरचे प्लॅन काहीसे खालीलप्रमाणे असतात.

Dedicated Hosting Plans

Uptime अपटाईम – वेबसाईट अपटाईम याचा अर्थ तुमच्या वाचकांना किंवा वापरकर्त्यांना ठरावीक काळात तुमची वेबसाईट वापरण्यासाठी किती वेळ उपलब्ध होती याचे गुणोत्तर.
म्हणजेच साध्या भाषेत दिवसभरातील दुकान चालू असण्याची वेळ आणि दिवसाचे एकूण तास याचे प्रमाण. वेबसाईट ऑनलाईन असल्याने ती सतत कार्यरत असणे अपेक्षित असते. म्हणजेच अपटाईम १००% असावा. परंतु हे लक्ष्य झाले. महिना किंवा वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण साधारण ९९% पर्यंत असले तरी चांगले मानले जाते.
बॅकअप (Back Up) – जसे तुम्ही तुमच्या संगणकाचा बॅकअप म्हणजे डाटा इतरत्र स्टोअर करून ठेवता तसेच तुमच्या वेबसाईटच्या संपूर्ण फाईल्स, माहिती इ. सुरक्षित करण्यासाठी त्याचा स्नॅपशॉट (Snap Shot)घेतला जातो याला बॅकअप असे म्हणतात.
यात वेबसाईटच्या प्रणाली (Coding)फाईल्स, माहितीसाठा (Database), चित्रे (Pictures) किंवा मिडीया (Media) आणि इतर तांत्रिक गोष्टी जसे की प्लगइन (Plugin), थिम्स (Themes) डिझाईन इ. गोष्टी साठवल्या जातात. दुर्दैवाने जर तुमची वेबसाईट क्रॅश झाली किंवा काही कारणाने केलेले बदल नको असतील तर तुम्ही जुना बॅकअप पुन्हा इंस्टॉल करू शकता आणि तुमची वेबसाईट पूर्ववत करु शकता.
होस्टिंग प्लॅन निवडताना बॅकअप ची सुविधा मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही. अर्थात यासाठी इतरही पर्याय असतात.
जाता जाता वेब होस्टिंग (Web Hosting) आणि डोमेन (Domain) रजिस्ट्रेशन करतानाच्या प्रमुख टिप्स नीट मनात ठसवा
१. डोमेन नेम (Domain Name) कमीतकमी अक्षरांचे असावे.
२. ते उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे.
३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
४. होस्टींग (Hosting) प्लॅन निवडताना तुमच्या गरजा ध्यानात घेऊन निवड करा.
५. वेबसाईटचा अपटाईम (Up Time) जास्तीत जास्त असावा.
६. होस्टिंग विक्रिपश्चात (Post Sales ), तांत्रिक सेवा (Technical Support) किंवा इतर अडचणी सोडवणारा कस्टमर केअर (Customer Care) विभाग चांगला असावा.
७. वेबसाईचा नियमित बॅकअप (Back Up) घेण्याची सुविधा असलेला प्लॅन निवडा.
८. होस्टिंग प्लॅनमध्येच सुरक्षा (Security), सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इ. सुविधा मिळत असल्यास उत्तमच.
९. या सर्व सूचनांसह तुमच्या बजेटमध्ये बसणारी आणि साधारण योग्य अशी किंमत देणारा प्लॅन निवडा.

एकदा डोमेन नेम (Domain Name) रजिस्टर झाले आणि होस्टिंग प्लॅन (Hosting Plan) निवडला की किमान वर्षभरासाठी तरी तुमची चिंता मिटली. आता तुम्ही वेबसाईटचे डिझाईन आणि लेखनावरती लक्ष केंद्रित करू शकता. वेबसाईट डिझाईनिंग आणि वापराबद्दल पुढील भागात.

ब्लॉग पहावा लिहून!

तुम्हाला लिहायची आवड आहे का? निरनिराळ्या विषयांवर आपले म्हणणे मुद्देसुदपणे मांडणे तुम्हाला जमते का? तसे असेल तर तुम्ही उत्तम ब्लॉग लिहू शकता. याचा अर्थ तुम्ही ब्लॉगर बनू शकता का ? तर त्याचे उत्तर मात्र नाही असे असेल!
केवळ खूप खाणाऱ्याला जसे खवय्या किंवा खूप गाणाऱ्याला गवई म्हणता येत नाही तसेच केवळ खूप लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणता येणार नाही. ब्लॉगर केवळ लिहित नाही. एखाद्या विषयावर उत्तम लेखन करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची कला साध्य करणे म्हणजे ब्लॉगर बनणे. जर सादरीकरण उत्तम नसेल तर ती कला लोकांपर्यंत पोचणे कठीण होते. ब्लॉगचेही तसेच आहे. अनेक उत्तम ब्लॉग्ज वाचकांपर्यंत नीट न पोचल्याने वाचलेच जात नाहीत! त्यासाठी काय करावे आणि कसे करावे हे आपण पाहणार आहोत. आज ब्लॉगिंग हा केवळ छंद राहिला नसून उत्तम लिखाण, माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा यशस्वी व्यवसाय म्हणून ब्लॉगिंगकडे पाहिले जाते.
तुम्ही केवळ छंद म्हणून ब्लॉग लिहित असाल आणि त्याचे वाचन तुमच्याशिवाय इतरांनी करावे किंवा करु नये असा तुमचा बाणा असेल तर तुम्हाला पुढे वाचायची आवश्यकता नाही!! तुमचा छंद हा तुमचा वैयक्तिक मामला आहे. लोकांना वाचायचे असल्यास वाचतील. अर्थात येथेही काही गोष्टी शिकणे क्रमप्राप्त आहे जसे की लेखनाचा मंच (ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) निवडणे, पानाचे सुशोभिकरण (पेज डिझाईन) करणे इ.इ. त्याबद्दल पुढे येईलच.
परंतु जर तुमचा ब्लॉग हा अधिकाधिक लोकांनी पहावा, वाचावा असे वाटत असेल तर त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागतील ज्याची आपण माहिती घेणार आहोत. ब्लॉग लिहायला सुरुवात करतानाच त्यातील खाचाखोचा नीट समजावून घेतल्या पाहिजेत नाही का?
ब्लॉगिंगची पहिली पायरी आहे ब्लॉग लिहिण्यासाठीचा मंच किंवा प्लॅटफॉर्म निवडणे. यात अनेक पर्याय आहेत. तुम्हाला ब्लॉगिंगमधून नक्की काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा हे ठरते.

Blogging Platforms – ऑनलाईन लेखन करण्याची जागा..

सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे लिखाण इंटरनेटवर जाऊन वाचता येईल अशी जागा म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म. यात अनेक पर्याय आहेत. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन फोरम्स (ऑनलाईन लिखाणाची व्यासपीठे, सोशल मिडीया इ.)
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स (खास ब्लॉगिंगसाठी बनवलेल्या वेबसाईट्स)
३) तुमची स्वतंत्र वेबसाईट
१) ऑनलाईन फोरम्स – वर्तमानपत्रात वाचकांनी लिहिलेल्या लेखांचा एक कॉलम येतो. त्यात लोक आपले विचार, अनुभव इ. मांडत असतात. ऑनलाईन फोरम्स तसेच असतात. इंटरनेटवरती अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या केवळ तुम्हाला लेखन करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर चर्चा करण्यासाठी, प्रश्न उत्तर आणि प्रत्युत्तरासाठी जागा उपलब्ध करून देतात. जसे मराठीत मायबोली, मिसळपाव किंवा कोरा यासारख्या वेबसाईटवरून तुम्ही हव्या त्या विषयांवर लिहू वाचू आणि चर्चा करू शकता. यात वेबसाईट्स तुम्हाला लेख लिहिण्यासाठी लागणारी सर्व प्राथमिक तयारी पुरवतात. तुमच्या लिखाणाला जागा पुरवणे, त्याची विषयवार क्रमवारी लावणे, लिखाणात चित्रे, व्हिडिओज, लिंक्स इ. टाकण्यासाठीची सोय करणे वाचकांच्या प्रतिसादाला जागा देणे इ.इ. याचे फायदे तोटे अनेक आहेत.
फायदे –
• अशा फोरम्सवर एकाचवेळी अनेक लोक लिहित आणि असंख्य लोक वाचत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लिखाणासाठी आपसूकच वाचक मिळतात.
• तुमचे लिखाण आवडल्यास लोक तुम्हाला फॉलो करू शकतात आणि तुमचा असा स्वतःचा एक वाचकवर्ग यातून तयार होऊ शकतो.
• हे फोरम्स विनामूल्य (फुकट) वापरता येतात.
तोटे –
• अशा फोरम्सवरील लेखन हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नसते. फोरमचे व्यवस्थापन ते फोरमवरून कधीही हटवू शकते.
• एकाच विषयावर अनेक लोक लिहित वाचत असल्याने तुमचे लिखाण चांगले असूनही गर्दीमुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
• वाचकांशी थेट संपर्क साधण्यावर फोरम्सचे नियंत्रण असते.
तुम्ही जर केवळ आवड म्हणूनच लिहित असाल तर असे फोरम्स उत्तम पर्याय आहेत. फक्त येथे तुम्ही ऑनलाईन लेखकांच्या गर्दीतले एक असल्याने तुम्हाला तुमची ओळख बनवायला बराच काळ जातो.
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स – तुम्हाला जर छंद म्हणून लिहायचे असेल परंतु ते फोरम्सवरच्या गर्दीपेक्षा अधिक स्वतंत्र हवे असल्यास हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही स्वतःचे पान/साईट तयार करू शकता आणि विविध विषयांवर लिहू शकता. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला लेखन, त्याचे व्यवस्थापन, पानाचे डिझाईन, इंटरनेटवर ते पान कसे दिसेल इ. सर्व सोयी पुरवतात. जसे तुम्ही फेसबुकवर लॉगीन करून स्वतःच्या पानावर जाता तसेच फकत खास लेखनासाठी वापरायचे म्हणून बनवलेले असे हे अनेक प्लॅटफॉर्म्स आजघडीला लाखो ब्लॉगर्स वापरतात. तुम्ही जर नव्यानेच ब्लॉगिंग करत असाल तर अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर फायदेशीर ठरतो कारण ब्लॉग तयार करणे, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग इ. साठी हे प्लॅटफॉर्म्स अनेक सुविधा पुरवतात. सध्या अनेक कंपन्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पुरवतात. उदा. वर्डप्रेस(WordPress), ब्लॉगर (Blogger), विक्स (Wix), टम्ब्लर (Tumblr), घोस्ट (Ghost) असे अनेक पर्याय आहेत. हा प्रत्येक पर्याय कमीजास्त प्रमाणात सारख्याच सुविधा पुरवतो. आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा. त्याबद्दल विस्ताराने नंतर लिहिनच.
फायदे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे फोरम्सवरील गर्दी टाळून तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख बनवता येते.
• तुमच्या लिखाणावर तुमचे अधिक नियंत्रण राहते. चित्र, व्हिडिओ इ. च्या वापरावर मर्यादा येत नाहीत.
• वाचक आणि तुम्ही एकमेकांशी थेट संपर्क साधू शकता.
तोटे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या विनामूल्य सुविधा मर्यादित असतात. अधिक सुविधा मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
• स्वातंत्र्य मर्यादित असते. उदा. तुमच्या वेबसाईटची लिंक किंवा इतर गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही.
• प्लॅटफॉर्मच्या फ्री अकाउंटवरून जाहिराती दाखवता येत नाहीत.
एकूणातच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हे हौशी परंतु व्यवासायिक इच्छा नसलेल्या लेखकांसाठी उत्तम पर्याय आहेत. अर्थातच यात पुढे लेखकाच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा फायदा लेखकापेक्षा फोरमप्रमाणेच प्लॅटफॉर्मला अधिक होतो. लिखाणाशिवाय इतर काही उद्देश नसल्यास ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हा एक उत्तम पर्याय आहे.
३. स्वतंत्र वेबसाईट – ब्लॉग लिहिण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट तयार करणे. हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्याचा गैरसमज उगाचच पसरल्याने अनेकजण याचा विचार करत नाहीत. वास्तविक आजकाल स्वतंत्र वेबसाईट रजिस्टर करणे आणि डिझाईन करणे अतिशय सुलभ झाले आहे. अर्ध्या तासाच्या अवधित या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. Go Daddy, Bluehost, Hostgator इ. अनेक वेबसाईटवरून तुम्हाला नवीन वेबसाईट नोंद करता येते. त्यासाठी खूप मोजके तांत्रिक ज्ञान लागते. स्वतंत्र वेबसाईट ही ब्लॉगिंग, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग, व्यवसाय अशी सर्व प्रकारची दारे खुली करते ते ही कोणत्याही बंधनांशिवाय. स्वतंत्र वेबसाईट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता किंवा येथेही तुम्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स वापरु शकता. ते तुम्हाला तुमची वेबसाईट मॅनेज करणे, डिझाईन, लेखन यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात. हा कमी खर्चिक आणि अधिक स्वतंत्र पर्याय आहे. यात वर्डप्रेस (WordPress) अग्रगण्य आहे जो जवळपास सर्वप्रकारची साधने विनामूल्य उपलब्ध करून देतो. त्याबद्दल अर्थातच पुढे स्वतंत्र लेख येईल.
फायदे – • कोणत्याही बंधनांशिवाय लेखन करता येते.
• वेबसाईट व्यवस्थापन, डिझाईन, जाहिराती, वाचकांशी संपर्क या गोष्टींवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण राहते.
• लिखाणाच्या लिंक्स, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन, स्वतंत्र इमेल, चॅट अशा अनेक सुविधा वापरता येतात.
तोटे – या पर्यायाचे कोणतेही दृष्य तोटे नाहीत.
• डिझाईन, व्यवस्थापन, सुरक्षा, अपडेट्स, ऑप्टिमायझेशन इ. तांत्रिक बाबी स्वतःच सांभाळाव्या लागतात. अर्थात यासाठी ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स आणि इतर अनेक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने चालवलेली स्वतंत्र वेबसाईट हा ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्ही लेखनासह डिझाईन, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या सर्व बाजू स्वतःच्या नियंत्रणात ठेऊ शकता आणि उत्तम ब्लॉगर बनू शकता. स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यासाठीचे पर्याय, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सची तुलना इ. विषयी पुढील भागात.

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Tatya Tope’s Operation Red Lotus

Tatya Tope’s Operation Red Lotus 

मुळ लेखक. पराग टोपे

इतिहास हा नेहमी जेत्यांकडून लिहिला जातो. अर्थातच त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा त्या लेखकाला अभिप्रेत असणारा अर्थच त्यातून ध्वनित होतो. काळाच्या ओघात एखाद्या घटनेचे किंवा घटनाक्रमाचा अनुषंगिक विषयांच्या संदर्भात जेव्हा सखोल अभ्यास होतो, तेव्हा अनेकदा लिखित इतिहासाच्या विपरित सत्य पुढे येते. दोन विभिन्न मानसिकतेतून केलेल्या इतिहासाच्या लेखनाचे दोन भिन्न वाचकांवर वेगवेगळे किंवा परस्परविरुद्ध परिणाम होताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांबद्दल केले गेलेले चित्रण- मुघल सम्राटांच्या बखरीत शिवाजीच्या विद्वेषांचे चित्रण आणि त्याच्या कागाळ्यांचे वर्णन येते, तर सभासद इत्यादि एतद्देशीय बखरींत मात्र याच कारवायांकडे ‘हिंदवी स्वराज्यासाठीचा लढा’ म्हणून पाहिले जाते. बारकाईने अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की हिंदवी स्वराज्याचा लढा हा मुघल सम्राटांनी साहजिकच विद्वेषाच्या भावनेतून चित्रित केला होता. ऐतिहासिक घटनांचे हे विविधअंगी चित्रण मोठ्या प्रमाणावर समाजमनावर परिणाम करणारे असते. कारण इतिहासाचा अभ्यास करणारा त्रयस्थ अभ्यासक ज्या संदर्भग्रंथांचा वापर करेल, त्याच अनुषंगाने त्याचे मत तयार होते.

१८५७ चा लढ्याला उद्देशून वापरले गेलेले ‘उठाव’ किंवा ‘स्वातंत्र्यमर’ किंवा ‘बंड’ हे शब्दच या सिद्धांताचे किती समर्पकपणे समर्थन करतात. कोणासाठी हे ‘शिपायांचे बंड’ होते, तर कोणासाठी ‘स्वातंत्र्यसमर’. परंतु यात अतिशय विलक्षण अशी एक गोम आहे. कोणत्याही देशाच्या इतिहासात त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केला गेलेला प्रत्येक लहानमोठा प्रयत्नही लढा असतो आणि साधी पदरमोडसुद्धा ‘त्याग’ म्हणून गौरवली जाते. परंतु देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी म्हणून केला गेलेला पहिला स्वातंत्र्यलढा मात्र बंड म्हणून पाहिला गेला. केवळ ब्रिटिशांनी नव्हे तर ब्रिटिश शिक्षणपद्धतीचे उत्पादन असणा-या भारतीय इतिहासकारांनीही अनेक वर्षं याच दृष्टिकोनातून या लढ्याकडे पाहिले. स्वतःच्याच देशबांधवांनी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याची बंड म्हणून हेटाळणी करणे ही एक शोकांतिका होती. १९०८ मध्ये सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहून असा सिद्धांत मांडला की, १८५७ चा उठाव हा केवळ शिपायांचे बंड नसून ब्रिटिश अमलाखालील हिंदुस्थानाने एकत्रितपणे उभारलेले पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. शेतक-यांपासून कारागिरांपर्यंत, राजे रजवाड्यांपासून ते शिपायांपर्यंत प्रत्येक लहानमोठ्या व्यक्तींनी संस्थांनी उस्फूर्तपणे पारतंत्र्य लादू पहाणा-या ब्रिटिश सत्तेला दिलेली ती एक सणसणीत चपराक होती. स्वातंत्र्यरूपी तेजाचा स्फुल्लिंग जागवणारा तो पहिला समरसूर्य होता. अतिशय अभिमानाने वर्णन करण्याजोगा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला चैतन्य देणारा असा हा लढा होता, हे सावरकरांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले होते.

पराग टोपेंचे ‘तात्या टोपेज् ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक याच धर्तीवर अनेक ऐतिहासिक संदर्भांचा खोलवर जाऊन अभ्यास करते. पूर्वजांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा पट उलगडणे आणि विपरित चित्रण केल्या जाणा-या इतिहासाची ऐतिहासिक संदर्भांसह पुनर्मांडणी करणे हे दोनही उद्देश या पुस्तकातून लेखक साध्य करतो. तात्या टोपे यांचे नेतृत्व आणि रक्तकमल योजना या दोहोंच्या आधारे १८५७ च्या उठावाचे सखोल विवेचन लेखक करतो. परंतु यातही केवळ कथालेखनापेक्षाही समग्र इतिहास अतिशय काटेकोरपणे आणि त्रयस्थ वृत्तीने समोर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न दिसून येतो. लेखकाने अनेक ऐतिहासिक दस्त ऐवजांचा अभ्यास करून आणि संदर्भग्रंथ चाळून या प्रयत्नाला योग्य ती दिशा दिलेली आहे. १८५७ चा उठाव हे केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर एका स्वातंत्र्याच्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहून रक्तकमलाचे प्रतीक वापरून उभारलेले ते एक स्वातंत्र्युद्ध होते, हे मत पुनःपुन्हा दृढ करण्याचा उपक्रम म्हणूनच हे पुस्तक पुढे येते.

ऐतिहासिक संदर्भ आणि घटनाक्रमांची बांधणी अतिशय सुसूत्रपणे या पुस्तकात आढळते. परंतु इतिहासाचा केलेला पाठपुरावा आणि नाट्यमय घटनांची बांधणी या दोहोंच्या जुगलबंदीमध्ये वाचकाचा काहीसा गोंधळ उडतो. केवळ इतिहासाचा अभ्यास किंवा एक उत्कृष्ट पुस्तक यांपैकी वाचकाने या पुस्तकातून काय साध्य करावे, याचा पुरेसा उलगडा होत नाही. उठावाच्या पार्श्वभूमीचे, तयारीचे, प्रत्यक्ष उठावाचे चित्रण आणि तात्या टोपे, या दोन्हीमध्ये पुस्तकाचा केंद्रबिंदू सतत हलताना दिसतो. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी या पुस्तकातील संदर्भ आणि पुरावे निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु तो वाचकवर्ग अतिशय सीमित आहे. सामान्य वाचकासाठी लागणारी रंजकता आणि प्रासादिक शैली कोठेतरी हरवून गेल्यासारखी वाटते. अभ्यासकांसाठी एक संदर्भग्रंथ इतकेच या पुस्तकाचे मर्यादित अस्तित्व राहील की काय अशी भीती वाटते. १८५७ च्या उठावावर आजपर्यंत झालेल्या चर्चा आणि या विषयाचा आवाका, या दोन्हीच्या मानाने पुस्तकाचा आकार काहीसा मोठा भासतो. लेखकही सावरकरांसारखा सिद्धहस्त नसल्याने या पुस्तकाची व्याप्ती वाचकांपर्यंत किती पोहोचेल याची शाश्वती देता येईलसे वाटत नाही.

Copyright sheetaluwach.com 2021 © #sheetaluwach

मला भावलेले पु.ल. १

जपानच्या मुक्कामात मला जो जो जपानी भेटला त्याला भारताविषयी खूप प्रेम आहे असे मला दिसले. त्यांना ही त्यांच्या बुद्धाची पवित्र भूमी वाटते. भारतीय दार्शनिकांनी त्यांना अध्यात्माचा कणा दिला याची त्यांच्या विद्वानांना जाण आहे. दूरच्या रस्त्याने आम्हांला आणल्याबद्दल स्वतःलाच दंड म्हणून आमच्याकडून निम्मे पैसे घेणारा जपामी टॅक्सीवाला त्याच्या देशाविषयी आमच्या मनात आदर निर्माण करून गेला. हॉटेलात, दुकाना, विद्यापीठात, थिएटरात, जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे  आम्हांला जिव्हाळाच मिळाला. हे लोक फार लाघवी. आग्नेय आशियातले प्रमुख देश मी पाहिले पण जपानने अंतःकरणात घर केले. अनेकांना जपानी माणूस हा कोड्यासारखा वाटतो. पाश्चात्य उद्योगतज्ज्ञांनी तर जपानी कारखानदारांची आणि व्यापा-यांची नालस्ती करणारी पुस्तके लिहिली आहेत. जपानी स्वभाव अगम्य आहे असे ते म्हणतात. अगम्य सारा मानवी स्वभावच आहे. ज्या जपानी हॉटेलात आम्ही आमच्या खोल्यांना कधी कुलपे लावली नाहीत, टेबलावर पैसे विसरुन गेलो तर खोली झाडायला येणा-या बाईने एका सुरेख पुरचुंडीत ते बांधून ठेवले, त्याच जपानात गुन्हेगारी आहे. शेवटी मनुष्यस्वभावचे उत्तर सांगणरे गणित कोणी मांडावे ?

ह्यात टोकियोमध्ये एका बसमधून आम्ही प्रेक्षणीय स्थळांची सहल करीत होतो. माझ्या शेजारी एक अमेरिकन प्रवासी बसला होता. पन्नाशीच्या घरातला होता.  इतका खप्पड अमेरिकन पुरुष त्यापूर्वी आणि त्यानंतर मी पाहिला नाही. आमच्याच दाई- इची हॉटेलात उतरला होता. दुपारी दोन अडीचला आम्ही नगरपर्यटनाला निघालो, त्या वेळी तो दाबून प्यालेला होता. अर्धोन्मीलित डोळ्यांनी तो टोकियोत काय पाहणार होता ते कळेना. शुद्धीबेशुद्धीच्या सीमारेषेवर होता. बोलत होता चालत होता. पण अडखळत. मला म्हणाला “तू इंडीयन आहेस की अफ्रिकन ?”  “इंडीयन!” सगळा राग गिळत मी म्हणालो. आता माझा वर्ण गोरा नाही हे कबूल, म्हणून काय इतके खंडांतर व्हायला नको होते. ‘पियेला आदमी है’ म्हणून सोडून दिले. पण त्याने त्या अवस्थेत गप्पा सुरू केल्या. तो काय बोलत होता ते मला मी शुद्धीवर असूनही नीट कळत नव्हते, आम्ही निरनिराळी स्थळे पाहून येत होतो. हा मात्र बसमध्येच बसून राही. तासाभराने डोक्याला गार वाराबिरा लागल्यामुळे की काय कोण जाणे, स्वारी नीट शुद्धीवर आली.

“किती दिवस आहात आपण जपानात ?” त्याने सवाल केला.
“झाला एक महिना.”
“खूप जपानी भेटले का ?”
“भेटले थोडे.”
“नशीबवान आहात ! मी आठ दिवस इथे आहे. मला कुणीच भेटयला, बोलायला मिळाला नाही. मला ह्या जपानी बागा आणि देवळे पाहण्यात गोडी नाही. त्या फिल्ममध्येही पाहू शकलो असतो मी. मला जपानी माणसे भेटायला हवी आहेत. मला जपानी कुटुंबात जायला हवे आहे. मी गेले वर्षभर जगाचा प्रवास करतोय.”
आस्थेवाईक श्रोता मिळाल्याबरोबर त्याने आपले आत्मचरित्र सांगायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचा कोककोला, सोडा, लेमन यांसारखी पेये बाटल्यांत भरायचा व्यापार आहे. लाखो डॉलर्सची कमाई आहे. पण हा पैशाला विटून निघाला होता. पण धंदाच असा की पैसा ह्याच्यामागे धावत होता. आपण आयुष्यभर फक्त पैसेच केले याची खंत वाटून तो सुखाच्या शोधात निघाला होता. चर्चवरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्याने कुठल्याशा चर्चला हजारो डॉलर्स दिले. त्या पाद्र्यांनी ह्याच्या इच्छेविरुद्ध चर्चवर नवा कळस बांधला.
“स्वाईन्स! डुक्कर लेकाचे! इमारती बांधणे एवढाच उद्योग करतात. माणसं माणसाला भेटत नाहीत. मी त्यांना पैसे दिले आणि सांगितले, माणसामाणसांच्या भेटी एकमेकांच्या घरात करा. सभा नको. समारंभ नको. आपल्या गावच्या माणसाला दुस-या घरी पाहुणा म्हणून पाठवा. त्याचा खर्च द्या. ख्रिस्ताचं नाव घ्यायला एवढ्या इमारती कशाला ? पण प्रत्येकाला पब्लिसिटी हवी. ख्रिस्ताच्या घराचा कळस उंच करून त्याची देखील पब्लिसिटी करतात. स्वाइन्स! (हा त्याचा लाडका शब्द होता.) मला जपानी माणूस भेटत नाही. माणूस भेटत नाही, आय वॉंट टु मीट मेन! मेन इन फ्लेश न् ब्लड यू सी!” पुढे वाचा!

Difficulty of Being Good

पुस्तक परीक्षण – Difficulty of Being Good – लेखक – गुरुचरण दास…

Difficulty of Being Good हे एका विचारवंताचे चिंतन आहे. लौकीक आयुष्यात अत्यंत यशस्वी ठरलेल्या व्यक्तीलासुदधा न सुटलेल्या कोड्यांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे. एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असणारे दास हे महाभारताकडे अतिशय विचारपूर्वक व मोठ्या आशेने वळताना दिसतात. मोठ्या पदावर असणारी किंवा समाजात प्रतिष्ठित असणारी माणसेसुद्धा अचानक एखाद्या गुन्ह्यात किंवा आर्थिक घोटाळ्यात सामील होतात तेव्हा त्यामागचा त्यांचा उद्देश काय असू शकतो? सत्यम सारखी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी उभी करून देशापुढे आदर्शवत अशी प्रतिमा उभी करणा-या राजूंसारख्या माणसाचा; आर्थिक घोटाळा करण्यामागे काय उद्देश असू शकतो? यश काय पैसा काय, प्रसिद्धी किंवा सत्ता काय; साध्य करण्यासारखी प्रत्येक गोष्ट तर त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. जागतिक किर्तीची एक कंपनी तर त्यांनी स्वतःच उभी केली होती. अशा असामान्य श्रेयाचा अधिकारी गुन्ह्याकडे का वळावा?
अपरिमित संपत्ती आणि अत्यंत नावजलेल्या कंपनीची मालकी असणा-या अंबानी बंधूंमध्ये असणा-या वादाचेही कारण हे केवळ दुस-या भावाकडे जास्त असणारी संपत्ती इतकेच असू शकते? २००७ च्या फोर्बस् अतिश्रीमंतांच्या यादीत अनिल हे पाचव्या तर मुकेश हे त्यापेक्षा किंचीत वरच्या स्थानावर होते. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३%, सरकारच्या एकूण आयकर उत्पन्नाच्या १०% तसेच भारताच्या एकूण निर्यातीच्या १४% वाटा केवळ अंबानी बंधूंच्या कंपन्यातून येतो. २००९ साली मुकेशने जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत ३-या स्थानावर झेप घेतली तर अनिल ७ व्या स्थानावर घसरले. चक्र फिरुन त्याच प्रश्नावर येउन थांबते यश, पैसा, प्रसिद्धी किंवा सत्ता यापैकी कोणतीही गोष्ट असाध्य नसणा-या दोनही भावंडाचे एकमेकांविरुदध शेकडो खटले कोर्टात चालु असावेत ? कशासाठी? सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन चाळीत दिवस कंठलेल्या एका व्यक्तीने अपार कष्ट आणि जिद्दिच्या जोरावर देशातील्याच नव्हे तर जगातील एक अत्यंत यशस्वी अशा कंपन्यांचे जाळे उभे केले. लाखो करोडो भागधारकांचे हितसंबंध गुंतलेल्या अशा कंपन्यांच्या उत्तराधिका-यांनी मात्र एकमेकांविरुद्ध खटले चालवून याच भारधारकांचे भविष्यही पणाला लावावे हेही एक प्रकारचे कुरुक्षेत्रच नव्हे काय ? भावंडांमध्ये निर्माण होणार दुस्वास केवळ अधिक संपत्ती किंवा सत्ता या कारणांमुळे असू शकतो? प्रथितयश व्यक्तिच काय पण सर्वसामान्य माणूसही आज ज्या संभ्रमित अवस्थेत जगतो त्याचेही कारण काय असू शकते? रोजच्या जीवनात सर्वसामान्य माणूसही कधी स्वतःच स्वतःला फसवतो तर कधी इतरांशी खोटे बोलतो, व्यवसायात बरोबरीच्या व्यक्तिंची कधी पाठराखण करतो तर कधी पाय ओढतो. हे एक प्रकारचे नैतिक आंधळेपण आहे, अस्तीत्वाची लढाई आहे, की टाळता न येणारा परिस्थितीचा फेरा? या संभ्रमावर आपण विजय मिळवू शकतो का ? अर्थात आपल्या या दुरवस्थेला काही प्रमाणात समाज किंवा सरकारही जबाबदार असते. मग आपल्या सर्वच संस्थांची नैतिकदृष्ट्या फेररचना करता येईल का जेणेकरून समाजाप्रति अधिक संवेदनाशील राज्यकर्ता मिळवता येईल?
या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांच्या समाधानकारक निरकरणासाठी लेखक महाभारताकडे वळतो. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ महाभारत आणि अनुषंगित अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लेखक या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांच्या समाधानकारक निरकरणासाठी लेखक महाभारताकडे वळतो. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ महाभारत आणि अनुषंगित अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लेखक या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
महाभारताच्या सखोल अध्ययनानंतर प्रस्तुत समस्यांच्या मुळाशी कारणे काय असू शकतात हेही लेखकाला उमगते आणि पात्रांच्या सद्सद्विवेक बुद्धीचा आंतरीक संघर्ष म्हणजेच Difficulty of Being Good आपल्या समोर येते.
धर्म या महाभारतातील अढळ आणि अविचल अशा संकल्पनेत लेखक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो. महाभारतातील प्रत्येक पात्राचा ‘स्वधर्म’ आणि त्याचा समाजाला अभिप्रेत असणारा ‘समानधर्म’ या दोन्हीचे सखोल विवेचन लेखक करतो. या दोन्हीची सांगड घालत आयुष्य कसे घालवावे हेच या पुस्तकाचे मर्म आहे. युधिष्ठिरासह महाभारतातील सर्व प्रमुख पात्रांचा या अनुषंगाने एक उत्कृष्ट अभ्यास लेखक वाचकांसमोर मांडतो. दुर्योधनाचा टोकाचा मत्सर आणि युधिष्ठिराची कमालीची संयत वृत्ती, भीष्माचा निःस्वार्थ आणि अश्वत्थाम्याचा अघोरी सूड या सर्व घटकांचे सांगोपांग विश्लेषण लेखक करतो. राज्यकर्ता असूनही पुत्रप्रेमासाठी नैतिक अधिष्ठानापासून ढळणारा कुरुसम्राट आणि त्याच भावनेपोटी आर्थिक घोटाळा करणारा सत्यम् सम्राट किंवा मत्सरापोटी कुरुक्षेत्रावरील अपरिमित नरसंहाराला कारणीभूत असणारा राजपूत्र आणि त्याच मत्सरापोटी लाखो भागधारकांचे भविष्य पणाला लावणारे अंबानी बंधू या सर्वच घटनांना एका संघर्षाची पार्श्वभूमी आहे. विवेक आणि अविवेक, धर्म आणि अधर्म यांचा हा सार्वकालिक संघर्ष लेखक निरनिराळ्या विचारवंतांच्या विचारातून, विविध घटनांच्या माध्यमातून आणि महाभारतातील पात्रांच्या मनोभूमिकेतू आपल्यासमोर मांडतो. अंतिमतः सत्याचाच विजय होतो. म्हणूनच विवेकाची कास धरून केलेली चांगली कृतीच परिपूर्ण समाजाचे अधिष्ठान असते. हा विचार Difficult of Being Good मधून प्रकर्षाने पुढे येतो.

* * *

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact