भगवद्गीता – अध्याय २ – सांख्ययोग

सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तथा = तशाप्रकारे, कृपया = करुणेने, आविष्टम्‌ = व्याप्त, अश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ = ज्याचे डोळे अश्रूंनी युक्त व व्याकूळ झालेले आहेत, (च) = आणि, विषीदन्तम्‌ = शोकयुक्त (अशा), तम्‌ = त्या(अर्जुना)ला, मधुसूदनः = भगवान मधुसूदन, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वचन, उवाच = म्हणाले
अर्थ
संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥
श्रीभगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥
अन्वय

श्रीभगवान = श्रीभगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अर्जुन = हे अर्जुना, विषमे = अयोग्य वेळी, इदम्‌ = हा, कश्मलम्‌ = मोह, कुतः = कोणत्या कारणाने, त्वा समुपस्थितम्‌ = तुला झाला, (यतः) = कारण, अनार्यजुष्टम्‌ = हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, अस्वर्ग्यम्‌ = स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे, (च) = आणि, अकीर्तिकरम्‌ = कीर्ति देणारा पण नव्हे
अर्थ
श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), क्लैब्यं = नपुंसकपणा, मा स्म गमः = पत्करू नकोस, एतत्‌ = हे, त्वयि = तुला, न उपपद्यते = योग्य नाही, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना), क्षुद्रम्‌ हृदयदौर्बल्यम्‌ = हृदयाचा तुच्छ दुर्बळपणा, त्यक्त्वा = सोडून देऊन, उत्तिष्ठ = युद्धाला उभा ठाक
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
अर्जुन उवाच
कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना, सङ्ख्ये = रणभूमीवर, भीष्मम्‌ = भीष्म, च = व, द्रोणम्‌ = द्रोण यांचेबरोबर, अहम्‌ = मी, इषुभिः = बाणांनी, कथम्‌ = कसा बरे, प्रतियोत्स्यामि = (त्यांच्या) विरुद्ध लढू, (यतः) = कारण, अरिसूदन = हे अरिसूदना, (तौ) = ते दोघेही, पूजार्हौ = पूजनीय (आहेत)
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. ॥ २-४ ॥
गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्‌ रुधिरप्रदिग्धान्‌ ॥ २-५ ॥
अन्वय

महानुभावान्‌ = महानुभाव, गुरून्‌ = गुरुजनांना, अहत्वा = न मारता, इह लोके = या जगात, भैक्ष्यम्‌ = भिक्षेचे अन्न, अपि = सुद्धा, भोक्तुम्‌ = खाणे (हे), श्रेयः = कल्याणकारक (आहे असे मला वाटते), हि = कारण, गुरून्‌ = गुरुजनांना, हत्वा = मारून, (अपि) = सुद्धा, इह = या जगात, रुधिरप्रदिग्धान्‌ = रक्ताने माखलेले, अर्थकामान्‌ = अर्थ व कामरूप, भोगान्‌ एव = भोगच, तु = तर, भुञ्जीय = मी भोगेन
अर्थ
म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ॥ २-५ ॥
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥
अन्वय

एतत्‌ = हे, (च) = सुद्धा, न विद्मः = आम्हाला कळत नाही, यत्‌ = की, कतरत्‌ = (युद्ध करणे वा न करणे यातील) कोणते, नः = आम्हाला, गरीयः = श्रेष्ठ आहे, वा = तसेच, जयेम = आम्ही विजयी होऊ, यदि वा = अथवा, (ते) = ते, नः = आम्हाला, जयेयुः = जिंकतील, यान्‌ = ज्यांना, हत्वा = मारून, न जिजीविषामः = आम्ही जगू इच्छित नाही, ते = ते(हे आत्मीय असणारे), धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, एव = च, प्रमुखे = आमच्या पुढे युद्धाला, अवस्थिताः = उभे आहेत
अर्थ
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥ २-६ ॥
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥
अन्वय

कार्पण्यदोषोपहतस्वभावः = कारुण्यरूपी कातरतेच्या दोषामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे, (च) = आणि, धर्मसम्मूढचेताः = धर्माच्या बाबतीत ज्याचे चित्त मोहित झाले आहे असा मी, त्वाम्‌ = तुम्हाला, पृच्छामि = विचारतो, यत्‌ = जे(साधन), निश्चितम्‌ = निश्चितपणाने, श्रेयः = कल्याणकारक, स्यात्‌ = असेल, तत्‌ = ते, मे = मला, ब्रूहि = (तुम्ही) सांगा, (यत्‌) = कारण, अहम्‌ = मी, ते = तुमचा, शिष्यः = शिष्य (आहे), (अतः) = म्हणून, त्वाम्‌ = तुम्हाला, प्रपन्नम्‌ = शरण आलेल्या (अशा), माम्‌ = मला, शाधि = उपदेश करा
अर्थ
करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्‌ ।
अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ २-८ ॥
अन्वय

हि = कारण, भूमौ = भूमंडळाचे, असपत्‍नम्‌ = निष्कंटक, ऋद्धम्‌ = धनधान्यसंपन्न, राज्यम्‌ = राज्य, च = तसेच, सुराणाम्‌ = देवांचे, आधिपत्यम्‌ = स्वामित्व, अवाप्य = मिळून, अपि = सुद्धा, (यत्‌) = जो (उपाय), मम = माझ्या, इन्द्रियाणाम्‌ = इंद्रियांना, उच्छोषणम्‌ = सुकवून टाकणारा, शोकम्‌ = शोक, अपनुद्यात्‌ = दूर करू शकेल, (तत्‌) = असा उपाय, न प्रपश्यामि = मला दिसत नाही
अर्थ
कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. ॥ २-८ ॥
सञ्जय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, गुडाकेशः = निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाने, हृषीकेशम्‌ = अंतर्यामी श्रीकृष्णांना, एवम्‌ = असे, उक्त्वा = सांगून, न योत्स्ये = मी युद्ध करणार नाही, इति = असे, ह = स्पष्टपणे, गोविन्दम्‌ = गोविंदाला, उक्त्वा = म्हणून (मग तो), तूष्णीम्‌ = गप्प, बभूव = झाला ॥ २-९ ॥
अर्थ
संजय म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥ २-९ ॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २-१० ॥
अन्वय

भारत = हे भरतवंशी धृतराष्ट्रा, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, विषीदन्तम्‌ = शोक करणाऱ्या, तम्‌ = त्या (अर्जुनाला), हृषीकेशः = अंतर्यामी श्रीकृष्ण, प्रहसन्‌ इव = जणू स्मित करून, इदम्‌ = हे, वचः = वचन, उवाच = म्हणाले
अर्थ
हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले ॥ २-१० ॥
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, (अर्जुन) = हे अर्जुना, अशोच्यान्‌ = शोक करण्यास योग्य नसणाऱ्या माणसांसाठी, त्वम्‌ = तू, अन्वशोचः = शोक करीत आहेस, च = आणि, प्रज्ञावादान्‌ = पंडितांच्याप्रमाणे वचने, भाषसे = बोलत आहेस, (परन्तु) = परंतु, गतासून्‌ = ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, च = आणि, अगतासून्‌ = ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी (सुद्धा), पण्डिताः = पंडित लोक, न अनुशोचन्ति = शोक करत नाहीत
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. ॥ २-११ ॥
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्‌ ॥ २-१२ ॥
अन्वय

जातु = कोणत्याही काळी, अहम्‌ = मी, न आसम्‌ = नव्हतो, त्वम्‌ = तू, न (आसीः) = नव्हतास, (अथवा) = अथवा, इमे = हे, जनाधिपाः = राजेलोक, न (आसन्‌) = नव्हते, (इति) = असे, तु = तर, न एव = मुळीच नाही, च = तसेच, अतः परम्‌ = यापुढे, वयम्‌ = आपण, सर्वे = सर्वजण, न भविष्यामः = असणार नाही, (एवम्‌) न एव = असेही नाही
अर्थ
मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥ २-१२ ॥
देहिनोऽस्मिन्‌ यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ २-१३ ॥
अन्वय

यथा = ज्याप्रमाणे, देहिनः = जीवात्म्याला, अस्मिन्‌ देहे = या देहात, कौमारम्‌ = बालपण, यौवनम्‌ = तारुण्य, (च) = आणि, जरा = वार्धक्य (येते), तथा = त्याप्रमाणे, देहान्तरप्राप्तिः = दुसरे शरीर मिळते, तत्र = त्या बाबतीत, धीरः = धीर माणूस, न मुह्यति = मोहित होत नाही
अर्थ
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. ॥ २-१३ ॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २-१४ ॥
अन्वय

कौन्तेय = हे कुंतीपुत्रा, शीतोष्णसुखदुःखदाः = थंडी-उष्णता, व सुख-दुःख देणारे, मात्रास्पर्शाः = इंद्रिये आणि विषयांचे संयोग, तु = तर, आगमापायिनः = उत्पत्ति-विनाश-शील, (च) = आणि, अनित्याः = अनित्य (आहेत), (अतः) = म्हणून, भारत = हे भारता, तान्‌ = त्यांना, तितिक्षस्व = तू सहन कर
अर्थ
हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर. ॥ २-१४ ॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ २-१५ ॥
अन्वय

हि = कारण, पुरुषर्षभ = हे पुरुषश्रेष्ठा, समदुःखसुखम्‌ = सुखदुःखाला समान मानणाऱ्या, यम्‌ = ज्या, धीरम्‌ = धीर, पुरुषम्‌ = पुरुषाला, एते = हे (इंद्रियांचे विषयांशी संयोग), न व्यथयन्ति = व्याकुळ करीत नाहीत, सः = तो (पुरुष), अमृतत्वाय = मोक्षाला, कल्पते = योग्य ठरतो
अर्थ
कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. ॥ २-१५ ॥
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥
अन्वय

असतः = असत्‌ वस्तूला, भावः = अस्तित्व, न विद्यते = नसते, तु = आणि, सतः = सत्‌ वस्तूचा, अभावः = अभाव, न विद्यते = असत नाही, (एवम्‌) = अशाप्रकारे, अनायोः उभोयोः अपि = या दोहोंचेही, अन्तः = तत्त्व, तत्त्वदर्शिभिः = तत्त्वज्ञानी पुरुषांनी, दृष्टः = पाहिलेले आहे
अर्थ
असत्‌ वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्‌ वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ॥ २-१६ ॥
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्‌ ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१७ ॥
अन्वय

येन = ज्याने, इदम्‌ = हे, सर्वम्‌ = संपूर्ण जगत (दृश्य वर्ग), ततम्‌ = व्यापून टाकले आहे, तत्‌ = ते, तु = तर, अविनाशि = अविनाशी, (अस्ति) = आहे, (इति) = असे, विद्धि = तू जाण, अस्य = या, अव्ययस्य = अविनाशीचा, विनाशम्‌ = विनाश, कर्तुम्‌ = करण्यास, कश्चित्‌ = कोणीही, न अर्हति = समर्थ नाही
अर्थ
ज्याने हे सर्व जग-दिसणाऱ्या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. ॥ २-१७ ॥
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत ॥ २-१८ ॥
अन्वय

अस्य = या, अनाशिनः = नाशरहित, अप्रमेयस्य = अप्रमेय, नित्यस्य = नित्यस्वरूप (अशा), शरीरिणः = जीवात्म्यांचे, इमे = हे, देहाः = (सर्व) देह, अन्तवन्तः = नाशवंत आहेत, उक्ताः = (असे) म्हटले गेले आहे, तस्मात्‌ = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, युध्यस्व = तू युद्ध कर
अर्थ
या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. ॥ २-१८॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्‌ ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २-१९ ॥
अन्वय

एनम्‌ = हा, (आत्मानम्‌) = आत्मा, हन्तारम्‌ = मारणारा (आहे), (इति) = असे, यः = जो (कोणी), वेत्ति = समजतो, च = तसेच, एनम्‌ = हा, हतम्‌ = मेला (असे), यः = जो (कोणी), मन्यते = मानतो, तौ = ते, उभौ = दोघे, न विजानीतः = जाणत नाहीत, (यतः) = कारण, अयम्‌ = हा (आत्मा) (वस्तुतः), न हन्ति = (कोणालाही) मारत नाही, च = तसेच, न हन्यते = मारलाही जात नाही
अर्थ
जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच जो हा (आत्मा) मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. ॥ २-१९ ॥
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
अन्वय

अयम्‌ = हा (आत्मा), कदाचित्‌ = कोणत्याही काळी, न जायते = जन्मत नाही, वा = तसेच, न म्रियते = मरतही नाही, वा = तसेच (हा), भूत्वा = उत्पन्न होऊन, भूयः = पुन्हा, न भविता = उत्पन्न होणार नाही, (यतः) = कारण, अयम्‌ = हा (आत्मा), अजः = अजन्मा, नित्यः = नित्य, शाश्वतः = सनातन, पुराणः = पुरातन (आहे), शरीरे = शरीर, हन्यमाने = मारले गेलेले असतानाही, (अयम्‌) = हा (आत्मा), न हन्यते = मारला जात नाही
अर्थ
हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. ॥ २-२० ॥
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्‌ ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्‌ ॥ २-२१ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एनम्‌ = हा (आत्मा), अविनाशम्‌ = नाशरहित, नित्यम्‌ = नित्य, अजम्‌ = अजन्मा, (च) = आणि, अव्ययम्‌ = अव्यय (आहे असे), यः = जो कोणी, पुरुषः = पुरुष, वेद = जाणतो, सः = तो (पुरुष), कम्‌ = कोणाला, कथम्‌ = कसा बरे, घातयति = ठार करवील, (तथा) = तसेच, कम्‌ = कोणाला, (कथम्‌) = कसा बरे, हन्ति = मारील
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे, हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील? ॥ २-२१ ॥
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२२ ॥
अन्वय

यथा = ज्याप्रमाणे, नरः = माणूस, जीर्णानि = जुनी, वासांसि = वस्त्रे, विहाय = टाकून देऊन, अपराणि = दुसरी, नवानि = नवी (वस्त्रे), गृह्णाति = घेतो, तथा = त्याप्रमाणेच, देही = देहात निवास करणारा जीवात्मा, जीर्णानि = जुनी, शरीराणि = शरीरे, विहाय = टाकून देऊन, अन्यानि = दुसऱ्या, नवानि = नवीन शरीरात, संयाति = जातो
अर्थ
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. ॥ २-२२ ॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥
अन्वय

एनम्‌ = या(आत्म्या)ला, शस्त्राणि = शस्त्रे, न छिन्दन्ति = कापू शकत नाहीत, एनम्‌ = या(आत्म्या)ला, पावकः = अग्नी, न दहति = जाळू शकत नाही, एनम्‌ = या(आत्म्या)ला, आपः = पाणी, न क्लेदयन्ति = भिजवू शकत नाही, च = तसेच, (एनम्‌) = या आत्म्याला, मारुतः = वारा, न शोषयति = वाळवू शकत नाही
अर्थ
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ॥ २-२३ ॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २-२४ ॥
अन्वय

(यतः) = कारण, अयम्‌ = हा आत्मा, अच्छेद्यः = अच्छेद्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, अदाह्यः = अदाह्य, अक्लेद्यः = अक्लेद्य, च = आणि, एव = निःसंदेहपणे, अशोष्यः = अशोष्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, नित्यः = नित्य, सर्वगतः = सर्वव्यापी, अचलः = अचल, स्थाणुः = स्थिर राहाणारा, (च) = आणि, सनातनः = सनातन, (अस्ति) = आहे
अर्थ
कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहाणारा आणि सनातन आहे. ॥ २-२४ ॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २-२५ ॥
अन्वय

अयम्‌ = हा (आत्मा), अव्यक्तः = अव्यक्त (आहे), अयम्‌ = हा (आत्मा), अचिन्त्यः = अचिंत्य (आहे), (च) = तसेच, अयम्‌ = हा (आत्मा), अविकार्यः = विकाररहित (आहे असे), उच्यते = म्हटले जाते, तस्मात्‌ = म्हणून, एनम्‌ = या(आत्म्या)ला, एवम्‌ = अशा वरील प्रकारे, विदित्वा = जाणून, अनुशोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, म्हणजे तुला शोक करणे उचित नाही
अर्थ
हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-२५ ॥
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २-२६ ॥
अन्वय

अथ = परंतु, च = जर, एनम्‌ = हा (आत्मा), नित्यजातम्‌ = नेहमी जन्माला येणारा, वा = तसेच, नित्यम्‌ = सदा, मृतम्‌ = मरणारा (आहे असे), त्वम्‌ = तू, मन्यसे = मानत असशील, तथापि = तरीसुद्धा, महाबाहो = हे महाबाहो, एवम्‌ = अशा प्रकारे, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस
अर्थ
परंतु, जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. ॥ २-२६ ॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥
अन्वय

हि = कारण (वरीलप्रमाणे मानल्यास), जातस्य = जन्मास आलेल्याला, मृत्युः = मृत्यू, ध्रुवः = निश्चित (आहे), च = तसेच, मृतस्य = मेलेल्याला, जन्म = जन्म, ध्रुवम्‌ = निश्चित आहे, तस्मात्‌ = म्हणूनही, अपरिहार्ये = उपाय नसलेल्या, अर्थे = त्या गोष्टीच्या बाबतीत, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस
अर्थ
कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-२७ ॥
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २-२८ ॥
अन्वय

भारत = हे भरतवंशी अर्जुना, भूतानि = सर्व प्राणी, अव्यक्तादीनि = जन्मापूर्वी अप्रकट (होते), (च) = आणि, अव्यक्तनिधनानि एव = मेल्यानंतरही अप्रकट होणारे (असतात), (केवलम्‌) = केवळ, व्यक्तमध्यानि = मध्ये प्रकट आहेत, (अथ) = मग, तत्र = अशा स्थितीत, का = काय, परिदेवना = शोक (करायचा आहे)
अर्थ
हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. ॥ २-२८ ॥
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्‌ ॥ २-२९ ॥
अन्वय

कश्चित्‌ = कोणी विरळ महापुरुषच, एनम्‌ = ह्या आत्म्याला, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, पश्यति = पाहातो, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, अन्यः = दुसरा एखादा महापुरुषच, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, (एनम्‌) = याचे, वदति = वर्णन करतो, च = तसेच, अन्यः = दुसरा कोणी अधिकारी पुरुषच, एनम्‌ = याच्याविषयी, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, शृणोति = ऐकतो, च = आणि, कश्चित्‌ = कोणी कोणी तर, श्रुत्वा = ऐकून, अपि = सुद्धा, एनम्‌ = याला, न एव वेद = जाणतच नाही
अर्थ
एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहातो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. ॥ २-२९ ॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-३० ॥
अन्वय

भारत = हे भरतवंशी अर्जुना, सर्वस्य = सर्वांच्या, देहे = देहांमध्ये, अयम्‌ = हा, देही = आत्मा, नित्यम्‌ = नेहमीच, अवध्यः = अवध्य आहे, तस्मात्‌ = म्हणून, सर्वाणि = सर्व, भूतानि = प्राण्यांच्यासाठी, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस
अर्थ
हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-३० ॥
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१ ॥
अन्वय

च = तसेच, स्वधर्मम्‌ = स्वतःचा धर्म, अवेक्ष्य = लक्षात घेऊन, अपि = सुद्धा, विकम्पितुम्‌ = भय बाळगण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, हि = कारण, क्षत्रियस्य = क्षत्रियाच्या बाबतीत, धर्म्यात्‌ = धर्मयुक्त, युद्धात्‌ = युद्धापेक्षा (वरचढ), अन्यत्‌ = दुसरे कोणतेही, श्रेयः = कल्याणकारी कर्तव्य, न विद्यते = नसते
अर्थ
तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥ २-३१ ॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ २-३२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदृच्छया = आपोआप, उपपन्नम्‌ = प्राप्त झालेले, च = आणि, अपावृतम्‌ स्वर्गद्वारम्‌ = उघडलेले स्वर्गाचे द्वार असे, ईदृशम्‌ = अशाप्रकारचे, युद्धम्‌ = युद्ध, सुखिनः = भाग्यवान, क्षत्रियाः = क्षत्रिय लोकांनाच, लभन्ते = प्राप्त होते
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३ ॥
अन्वय

अथ = परंतु, चेत्‌ = जर, त्वम्‌ = तू, इमम्‌ = हे, धर्म्यम्‌ = धर्मयुक्त, सङ्ग्रामम्‌ = युद्ध, न करिष्यसि = न करशील, ततः = तर मग, स्वधर्मम्‌ = स्वतःचा धर्म, च = आणि, कीर्तिम्‌ = कीर्ती (यांना), हित्वा = गमावून, पापम्‌ = पाप, अवाप्स्यसि = तू प्राप्त करून घेशील
अर्थ
परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. ॥ २-३३ ॥
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ २-३४ ॥
अन्वय

च = तसेच, भूतानि = सर्व लोक, अव्ययाम्‌ = पुष्कळ काळ टिकणारी, ते = तुझी, अकीर्तिम्‌ = अपकीर्ती, अपि = सुद्धा, कथयिष्यन्ति = सांगत सुटतील, च = आणि, सम्भावितस्य = माननीय पुरुषांसाठी, अकीर्तिः = अपकीर्ति (ही), मरणात्‌ = मरणापेक्षा, अतिरिच्यते = अधिक दुःसह असते
अर्थ
तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ति सांगत राहातील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुःसह वाटते. ॥ २-३४ ॥
भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ २-३५ ॥
अन्वय

च = आणि, येषाम्‌ = ज्यांच्या (दृष्टीने), त्वम्‌ = तू (पूर्वी), बहुमतः = अतिशय माननीय, भूत्वा = होऊन, (इदानीम्‌) = आता, लाघवम्‌ = क्षुद्रतेप्रत, यास्यसि = जाशील, (ते) = ते, महारथाः = महारथी लोक, त्वाम्‌ = तू, भयात्‌ = भीतीमुळे, रणात्‌ = युद्धातून, उपरतम्‌ = मागे फिरलास, (इति) = असे, मंस्यन्ते = मानतील
अर्थ
शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिऊन युद्धातून काढता पाय घेतला, असे मानतील. ॥ २-३५ ॥
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ २-३६ ॥
अन्वय

तव = तुझे, अहिताः = वैरी लोक, तव = तुझ्या, सामर्थ्यम्‌ = सामर्थ्याची, निन्दन्तः = निंदा करीत, बहून्‌ = पुष्कळ, अवाच्यवादान्‌ = सांगण्यासारखी नसणारी वचने, च = सुद्धा, वदिष्यन्ति = बोलतील, ततः = त्यापेक्षा, दुःखतरम्‌ = अधिक दुःखदायक, नु किम्‌ = आणखी काय असेल (बरे)
अर्थ
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? ॥ २-३६ ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ २-३७ ॥
अन्वय

वा = अथवा, (त्वम्‌) = तू, हतः = (युद्धात) मारला जाऊन, स्वर्गम्‌ = स्वर्ग, प्राप्स्यसि = प्राप्त करून घेशील, वा = अथवा, (युद्धे) = युद्धात, जित्वा = जिंकून, महीम्‌ = पृथ्वीचे राज्य, भोक्ष्यसे = तू भोगशील, तस्मात्‌ = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, युद्धाय = युद्ध करण्याचा, कृतनिश्चयः = निश्चय करून, उत्तिष्ठ = उठून उभा राहा
अर्थ
युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. ॥ २-३७ ॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥
अन्वय

जयाजयौ = जय व पराजय, लाभालाभौ = लाभ-हानि, (च) = आणि, सुखदुःखे = सुख व दुःख (यांना), समे = समान, कृत्वा = मानून, ततः = त्यानंतर, युद्धाय = युद्ध करण्यासाठी, युज्यस्व = तयार हो, एवम्‌ = अशाप्रकारे (युद्ध केल्यामुळे), पापम्‌ = पाप, न अवाप्स्यसि = तुला लागणार नाही
अर्थ
जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. ॥ २-३८ ॥
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २-३९ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा = ही, बुद्धिः = बुद्धी, (मया) = मी, ते = तुझ्यासाठी, साङ्ख्ये = ज्ञानयोगाच्या बाबतीत, अभिहिता = सांगितली, तु = आणि (आता), योगे = कर्मयोगाच्या बाबतीतील, इमाम्‌ = ही (बुद्धी), शृणु = तु ऐक, यया = ज्या, बुद्ध्या = बुद्धीने, युक्तः = युक्त झालेला (असा तू), कर्मबन्धनम्‌ = कर्मांच्या बंधनाला, प्रहास्यसि = चांगल्या प्रकारे टाकशील म्हणजे तू कर्मबंधनाला पूर्णपणे नष्ट करून टाकशील
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक, ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. ॥ २-३९ ॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ २-४० ॥
अन्वय

इह = या कर्मयोगामध्ये, अभिक्रमनाशः = आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश, न अस्ति = होत नाही, (च) = (तसेच), प्रत्यवायः = विपर्यस्त फलरूपी दोष (सुद्धा), न विद्यते = असत नाहीत, अस्य = या कर्मयोगरूपी, धर्मस्य = धर्माचे, स्वल्पम्‌ = थोडे (साधन), अपि = सुद्धा, महतः = महान, भयात्‌ = (जन्ममृत्युरूपी) भयापासून, त्रायते = रक्षण करते
अर्थ
या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे तर, या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥ २-४० ॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ २-४१ ॥
अन्वय

कुरुनन्दन = हे कुरुवंशी अर्जुना, इह = या कर्मयोगामध्ये, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी, एका = एकच, (भवति) = आहे, (परन्तु) = परंतु, अव्यवसायिनाम्‌ = अस्थिर विचार करणाऱ्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या, बुद्धयः = बुद्धी, हि = निश्चितपणे, बहुशाखाः = पुष्कळ भेद असणाऱ्या, च = आणि, अनन्ताः = अनंत, (सन्ति) = असतात
अर्थ
हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते. परंतु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. ॥ २-४१ ॥
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌ ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), कामात्मानः = जे भोगात तन्मय झालेले असतात, वेदवादरताः = कर्मफळाची प्रशंसा करणाऱ्या वेदवाक्यांमध्ये ज्यांची प्रीती आहे, स्वर्गपराः = ज्यांच्या बुद्धीला स्वर्गच परम प्राप्य वस्तू वाटते, (च) = आणि, (स्वर्गात्‌ अधिकम्‌) = स्वर्गापेक्षा अधिक, अन्यत्‌ = दुसरी (कोणतीही वस्तूच), न अस्ति = नाही, इति = असे, वादिनः = जे म्हणतात, (ते) = ते, अविपश्चितः = अविवेकी लोक, इमाम्‌ = अशाप्रकारची, याम्‌ = जी, पुष्पिताम्‌ = पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त, वाचम्‌ = वाणी, प्रवदन्ति = उच्चारतात, (यां वाचम्‌) = जी वाणी, जन्मकर्मफलप्रदाम्‌ = जन्मरूपी कर्मफळ देणारी, भोगैश्वर्यगतिं प्रति = भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी, क्रियाविशेषबहुलाम्‌ = पुष्कळशा क्रियांचे वर्णन करणारी आहे, तया = त्या वाणीमुळे, अपहृतचेतसाम्‌ = ज्यांची मने हरण केली गेली आहेत, भोगैश्वर्यप्रसक्तानाम्‌ = जे भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये अत्यंत आसक्त आहेत, (तेषां पुरुषाणाम्‌) = त्या पुरुषांची, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी (ही), न विधीयते = स्थिर असत नाही
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. ॥ २-४२, २-४३, २-४४ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ २-४५ ॥
अन्वय

अर्जुन = हे अर्जुना, वेदाः = वेद (हे वरीलप्रकाराने), त्रैगुण्यविषयाः = तीन गुणांचे कार्यरूप असे भोग व त्यांची साधने यांचे प्रतिपादन करणारे आहेत, (अतः) = म्हणून, निस्त्रैगुण्यः = ते भोग व त्यांची साधने यांमध्ये आसक्तिरहित, निर्द्वन्द्वः = हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांनी रहित, नित्यसत्त्वस्थः = नित्यवस्तू अशा परमात्म्याचे ठिकाणी स्थित, निर्योगक्षेमः = योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा, (च) = आणि, आत्मवान्‌ = अंतःकरण ज्याचे स्वाधीन आहे असा, भव = तू हो
अर्थ
हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. ॥ २-४५ ॥
यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ २-४६ ॥
अन्वय

सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते
अर्थ
सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
अन्वय

कर्मणि एव = कर्म करण्याविषयीच, ते = तुला, अधिकारः = अधिकार (आहे), फलेषु = (त्यांच्या) फळांवर, कदाचन = कधीही, मा = नाही (म्हणून), कर्मफलहेतुः = कर्मांच्या फळांचा हेतू, मा भूः = तू होऊ नकोस (तसेच), अकर्मणि = कर्म न करण्याबाबत, (ते) = तुझी, सङ्गः = आसक्ती, मा अस्तु = नको असू देऊस
अर्थ
तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. ॥ २-४७ ॥
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८ ॥
अन्वय

धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, सङ्गम्‌ = आसक्ति, त्यक्त्वा = सोडून देऊन, (च) = तसेच, सिद्ध्यसिद्ध्योः = सिद्धी आणि असिद्धी यांचे बाबतीत, समः भूत्वा = समान बुद्धी बाळगून, योगस्थः = योगामध्ये स्थित होऊन, कर्माणि = कर्तव्य कर्मे, कुरु = तू कर, समत्वम्‌ = समत्वालाच, योगः = योग (असे), उच्यते = म्हटले जाते
अर्थ
हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते. ॥ २-४८ ॥
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ २-४९ ॥
अन्वय

बुद्धियोगात्‌ = या समत्वरूपी बुद्धियोगापेक्षा, कर्म = सकाम कर्म (हे), दूरेण अवरम्‌ = अत्यंत खालच्या श्रेणीचे (आहे), (अतः) = म्हणून, धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, बुद्धौ = समत्वबुद्धीमध्येच, शरणम्‌ = रक्षणाचा उपाय, अन्विच्छ = तू शोध (म्हणजे बुद्धीयोगाचा आश्रय घे), हि = कारण, फलहेतवः = फळाचा हेतू बनणारे लोक, कृपणाः = अत्यंत दीन, (सन्ति) = असतात
अर्थ
या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात. ॥ २-४९ ॥
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥
अन्वय

बुद्धियुक्तः = समबुद्धीने युक्त असा पुरुष, इह = याच लोकात, सुकृतदुष्कृते उभे = पुण्य आणि पाप या दोहोंचाही, जहाति = त्याग करतो म्हणजे त्यातून मुक्त होऊन जातो, तस्मात्‌ = म्हणून, योगाय = समत्वरूप योगाला, युज्यस्व = तू लागून राहा, योगः = (हा) समत्वरूप योगच, कर्मसु = कर्मांतील, कौशलम्‌ = कौशल्य आहे म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे
अर्थ
समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ २-५१ ॥
अन्वय

हि = कारण, बुद्धियुक्ताः = समबुद्धीने युक्त (असे), मनीषिणः = ज्ञानी लोक हे, कर्मजम्‌ = कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या, फलम्‌ = फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, जन्मबन्धविनिर्मुक्ताः = जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन, अनायम्‌ = निर्विकार (असे), पदम्‌ = परमपद, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात
अर्थ
कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. ॥ २-५१ ॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ २-५२ ॥
अन्वय

यदा = जेव्हा, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, मोहकलिलम्‌ = मोहरूपी दलदल, व्यतितरिष्यति = चांगल्या प्रकारे पार करून जाईल, तदा = तेव्हा, श्रुतस्य = ऐकलेल्या, च = आणि, श्रोतव्यस्य = ऐकिवात येणाऱ्या (इह-पर लोकातील सर्व भोगांच्या बाबतीत), निर्वेदम्‌ = वैराग्य, गन्तासि = तुला प्राप्त होईल
अर्थ
जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-पर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. ॥ २-५२ ॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ २-५३ ॥
अन्वय

श्रुतिविप्रतिपन्ना = तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, यदा = जेव्हा, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, निश्चला = अचल, (च) = व, अचला = स्थिर, स्थास्यति = राहील, तदा = तेव्हा, योगम्‌ अवाप्स्यसि = योग तुला प्राप्त होईल म्हणजे परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल
अर्थ
तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल. ॥ २-५३ ॥
अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्‌ ॥ २-५४ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, केशव = हे केशवा, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य = परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या स्थिरबुद्धी अशा पुरुषाचे, भाषा = लक्षण, का = काय, स्थितधीः = तो स्थिरबुद्धी पुरुष, किम्‌ = कसा, प्रभाषेत = बोलत असतो, किम्‌ = कसा, आसीत = बसत असतो, (च) = आणि, किम्‌ = कसा, व्रजेत = चालत असतो
अर्थ
अर्जुने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो? ॥ २-५४ ॥
श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्‌ ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ २-५५ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदा = जेव्हा, (अयं पुरुषः) = हा पुरुष, मनोगतान्‌ = मनातील, सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, प्रजहाति = पूर्णपणे त्याग करतो, (च) = आणि, आत्मना = आत्म्याने, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, तुष्टः = संतुष्ट होऊन राहातो, तदा = तेव्हा, स्थितप्रज्ञः = तो पुरुष स्थितप्रज्ञ उच्यते = म्हटला जातो
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहातो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ॥ २-५५ ॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥
अन्वय

दुःखेषु = दुःखांची प्राप्ती झाली असताना, अनुद्विग्नमनाः = ज्याच्या मनात उद्वेग येत नाही, सुखेषु = सुखांच्या प्राप्तीच्या बाबतीत, विगतस्पृहः = जो सर्वथा निस्पृह आहे, (तथा) = तसेच, वीतरागभयक्रोधः = ज्याची आसक्ती, भय व क्रोध हे नष्ट होऊन गेले आहेत असा, मुनिः = मुनी, स्थितधीः = स्थिरबुद्धी, उच्यते = म्हटला जातो
अर्थ
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. ॥ २-५६ ॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्‌ ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५७ ॥
अन्वय

यः = जो पुरुष, सर्वत्र = सर्वत्र, अनभिस्नेहः = स्नेहरहित असून, तत्‌ तत्‌ = त्या त्या, शुभाशुभाम्‌ = शुभ किंवा अशुभ वस्तू, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न अभिनन्दति = प्रसन्न होत नाही, (तथा) = तसेच, न द्वेष्टि = द्वेष करीत नाही, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे
अर्थ
जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते.
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५८ ॥
अन्वय

च = आणि, कूर्मः = कासव, सर्वशः = सर्व बाजूंनी, अङ्गानि = (आपले) अवयव, इव = ज्याप्रमाणे (आत ओढून घेते, त्याप्रमाणे), यदा = जेव्हा, अयम्‌ = हा पुरुष, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, इन्द्रियाणि = (आपली) इंद्रिये, (सर्वशः) = सर्व प्रकाराने, संहरते = आवरून घेतो, (तदा) = तेव्हा, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे (असे समजावे)
अर्थ
कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे. ॥ २-५८ ॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ २-५९ ॥
अन्वय

निराहारस्य = इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणाऱ्या, देहिनः = पुरुषांच्या बाबतीत, विषयाः = (केवळ) विषयच, विनिवर्तन्ते = निवृत्त होतात, (किंतु) = परंतु, रसवर्जम्‌ = विषयातील आसक्ती निवृत्त होत नाही, अस्य = या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर, रसः अपि = आसक्तीसुद्धा, परम्‌ = परमात्म्याचा, दृष्ट्वा = साक्षात्कार झाल्यामुळे, निवर्तते = संपूर्णपणे निवृत्त होऊन जाते
अर्थ
इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ॥ २-५९ ॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥
अन्वय

कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, हि = आसक्तीचा नाश न झाल्यामुळे, प्रमाथीनि = विक्षुब्ध करण्याचा स्वभाव असणारी, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), यततः = प्रयत्‍न करणाऱ्या, विपश्चितः = बुद्धिमान, पुरुषस्य = पुरुषाचे, मनः अपि = मनसुद्धा, प्रसभम्‌ = जबरदस्तीने, हरन्ति = हरण करून घेतात
अर्थ
हे कुंतीपुत्र अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्‍न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ॥ २-६० ॥
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६१ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, तानि सर्वाणि = ती सर्व इंद्रिये, संयम्य = वश करून घेऊन, (साधकः) = साधकाने, युक्तः = चित्त स्थिर करून, मत्परः = माझा आधार घेऊन, आसीत = ध्यानाला बसावे, हि = कारण, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), वशे = त्याला वश असतात, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर होऊन राहाते
अर्थ
म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ॥ २-६१ ॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ २-६२ ॥
अन्वय

विषयान्‌ = विषयांचे, ध्यायतः = चिंतन करणाऱ्या, पुंसः = पुरुषाची, तेषु = त्या विषयांमध्ये, सङ्गः = आसक्ती, उपजायते = उत्पन्न होते, सङ्गात्‌ = त्या आसक्तीमुळे, कामः = (त्या विषयांची) कामना, सञ्जायते = निर्माण होते, (च) = आणि, कामात्‌ = कामनेमध्ये विघ्न आल्यामुळे, क्रोधः = क्रोध, अभिजायते = उत्पन्न होतो
अर्थ
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. ॥ २-६२ ॥
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥
अन्वय

क्रोद्धात्‌ = क्रोधामुळे, सम्मोहः = अत्यंत मूढभाव, भवति = उत्पन्न होतो, सम्मोहात्‌ = मूढभावामुळे, स्मृतिविभ्रमः = स्मृतीमध्ये भ्रम होतो, स्मृतिभ्रंशात्‌ = स्मृतीमध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळे, बुद्धिनाशः = बुद्धीचा नाश म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, (च) = आणि, बुद्धिनाशात्‌ = बुद्धीचा नाश झाल्यामुळे, (सः पुरुषः) = तो पुरुष, प्रणश्यति = आपल्या स्थितीपासून च्युत होतो
अर्थ
रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ॥ २-६३ ॥
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥
अन्वय

तु = परंतु, विधेयात्मा = ज्याने अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा साधक, आत्मवश्यैः = स्वतःला वश असणाऱ्या, रागद्वेषवियुक्तैः = राग व द्वेष यांनी रहित असणाऱ्या अशा, इन्द्रियैः = इंद्रियांच्या द्वारा, विषयान्‌ = विषयांमध्ये, चरन्‌ = वावर करीत, प्रसादम्‌ = अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. ॥ २-६४ ॥
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ २-६५ ॥
अन्वय

प्रसादे = अंतःकरणातील प्रसन्नता आल्यावर, अस्य = याच्या, सर्वदुःखानाम्‌ = संपूर्ण दुःखांचा, हानिः = अभाव, उपजायते = होऊन जातो, (च) = आणि, प्रसन्नचेतसः = प्रसन्नचित्त असणाऱ्या कर्मयोग्याची, बुद्धिः = बुद्धी, आशु हि = लौकरच (सर्व बाजूंनी निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच), पर्यवतिष्ठते = उत्तम प्रकारे स्थिर होऊन जाते
अर्थ
अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥ २-६५ ॥
नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌ ॥ २-६६ ॥
अन्वय

अयुक्तस्य = ज्यांनी मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशा पुरुषांच्या ठिकाणी, बुद्धिः = निश्चयात्मिका बुद्धी, न अस्ति = असत नाही, च = आणि, अयुक्तस्य = अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात, भावना = भावनासुद्धा, न = असत नाही, च = तसेच, अभावयतः = भावनाहीन मनुष्याला, शान्तिः न = शांती मिळत नाही, (च) = आणि, अशान्तस्य = शांतिरहित मनुष्याला, सुखम्‌ = सुख, कुतः = कोठून, (भविष्यति) = प्राप्त होईल
अर्थ
मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? ॥ २-६६ ॥
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ २-६७ ॥
अन्वय

हि = कारण, इव = ज्याप्रमाणे, अम्भसि = पाण्यात चालणाऱ्या, नावम्‌ = नावेला, वायुः = वायू हा, हरति = हरण करून नेतो (त्याप्रमाणे), चरताम्‌ = विषयांमध्ये वावरणाऱ्या, इंद्रियाणाम्‌ = इंद्रियांपैकी, मनः = मन, यत्‌ = ज्या (इंद्रियाच्या), अनु = बरोबर, विधीयते = राहते, तत्‌ = ते (एकच इंद्रिय), अस्य = या (अयुक्त) पुरुषाच्या, प्रज्ञाम्‌ = बुद्धीला, (हरति) = हरण करून घेते
अर्थ
कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते ॥ २-६७ ॥
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६८ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, महाबाहो = हे महाबाहो, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, सर्वशः = सर्वप्रकारांनी, निगृहीतानि = निगृहीत केलेली असतात, तस्य = त्या पुरुषाची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर असते
अर्थ
म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. ॥ २-६८ ॥
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥
अन्वय

सर्वभूतानाम्‌ = संपूर्ण प्राण्यांच्या संदर्भात, या = जी, निशा = रात्रीप्रमाणे असते, तस्याम्‌ = अशा त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदांच्या प्राप्तीचे ठिकाणी, संयमी = स्थितप्रज्ञ योगी, जागर्ति = जागा असतो, (च) = (आणि), यस्याम्‌ = ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या बाबतीत, भूतानि = सर्व प्राणी, जाग्रति = जागे असतात, सा = ती, पश्यतः = परमात्मतत्त्व जाणणाऱ्या, मुनेः = मुनीला, निशा = रात्रीप्रमाणे असते
अर्थ
सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ॥ २-६९ ॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ २-७० ॥
अन्वय

आपूर्यमाणम्‌ = सर्व बाजूंनी परिपूर्ण, अचलप्रतिष्ठम्‌ = अचल प्रतिष्ठा असणाऱ्या अशा, समुद्रम्‌ = समुद्रात, यद्वत्‌ = ज्याप्रमाणे, आपः = नाना नद्यांचे पाणी, प्रविशन्ति = त्याला विचलित न करता सामावून जाते, तद्वत्‌ = त्याप्रमाणे, सर्वे = सर्व, कामाः = भोग, यम्‌ = ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी, प्रविशन्ति = (कोणताही प्रकारचा विकार त्याच्या ठिकाणी उत्पन्न न करता) सामावून जातात, सः = तोच स्थितप्रज्ञ पुरुष, शान्तिम्‌ = परम शांति, आप्नोति = प्राप्त करून घेतो (याउलट), न कामकामी = भोगांची इच्छा करणारा (शांति प्राप्त करून घेत) नाही
अर्थ
ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. ॥ २-७० ॥
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥ २-७१ ॥
अन्वय

सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, विहाय = त्याग करून, यः = जो, पुमान्‌ = पुरुष, निर्ममः = ममतारहित, निरहङ्कारः = अहंकाररहित, (च) = आणि, निःस्पृहः = स्पृहारहित होऊन, चरति = वावरत असतो, सः = तोच (पुरुष), शान्तिम्‌ = शांतीप्रत, अधिगच्छति = प्राप्त होतो, म्हणजे शांती प्राप्त करून घेतो
अर्थ
जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शांती मिळते. ॥ २-७१ ॥
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ २-७२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा ब्राह्मी स्थितिः = ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची ही स्थिती आहे, एनाम्‌ = ही स्थिती, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, (योगी) = योगी, (कदापि) = कधीही, न विमुह्यति = मोहित होत नाही, (च) = आणि, अन्तकाले अपि = अंतकाळी सुद्धा, अस्याम्‌ स्थित्वा = या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन, (सः) = तो, ब्रह्मनिर्वाणम्‌ = ब्रह्मानंदाप्रत, ऋच्छति = जातो (म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो)
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. ॥ २-७२ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

भगवद्गीता – अध्याय १ – अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥

अन्वय
धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च = आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥ १-१ ॥
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥
अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥
अन्वय
आचार्य = अहो आचार्य, तव = तुमच्या, धीमता = बुद्धिमान, शिष्येण = शिष्याने, द्रुपदपुत्रेण = द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने, व्युढाम्‌ = व्युहरचना करून सिद्ध केलेली, एताम्‌ = ही, पाण्डुपुत्राणाम्‌ = पांडूच्या पुत्रांची, महतीम्‌ = विशाल, चमूम्‌ = सेना, पश्य = पाहा
अर्थ
अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥
अन्वय

अत्र = येथे, महेष्वासाः = मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले, च = आणि, युधि = युद्धात, भीमार्जुनसमाः = भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे, शूराः = शूर-वीर, युयुधानः = सात्यकी, च = आणि, विराटः = विराट, च = तसेच, महारथः = महारथी, द्रुपदः = द्रुपद, धृष्टकेतुः = धृष्टकेतू, चेकितानः = चेकितान, च = आणि, वीर्यवान्‌ = बलवान, काशिराजः = काशिराज, पुरुजित्‌ = पुरुजित, कुन्तिभोजः = कुन्तिभोज, च = आणि, नरपुङ्गवः = नरश्रेष्ठ, शैब्यः = शैब्य, च = आणि, विक्रान्तः = पराक्रमी, युधामन्युः = युधामन्यू, च = तसेच, वीर्यवान्‌ = शक्तिमान, उत्तमौजाः = उत्तमौजा, सौभद्रः = सुभद्रेचा पुत्र, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, सर्व एव = हे सर्वच, महारथाः = महारथी, (सन्ति) = आहेत
अर्थ
या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥ १-४, १-५, १-६ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥
अन्वय

द्विजोत्तम = हे ब्राह्मणश्रेष्ठ, अस्माकम्‌ = आमच्या पक्षात, तु = सुद्धा, ये = जे, विशिष्टाः = महत्त्वाचे, (सन्ति) = आहेत, तान्‌ = त्यांना, निबोध = आपण जाणून घ्या, मम = माझ्या, सैन्यस्य = सैन्याचे, नायकाः = जे सेनापती आहेत, तान्‌ = ते, ते = तुमच्या, संज्ञार्थम्‌ = माहितीसाठी, ब्रविमी = मी सांगतो
अर्थ
हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥ १-७ ॥
भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥
अन्वय

भवान्‌ = तुम्ही द्रोणाचार्य, च = आणि, भीष्मः = भीष्म, च = तसेच, कर्णः = कर्ण, च = आणि, समितिञ्जयः = युद्धात विजयी होणारे, कृपः = कृपाचार्य, च = तसेच, अश्वत्थामा = अश्वत्थामा, च = तसेच, विकर्णः = विकर्ण, तथैव च = आणि त्याचप्रमाणे, सौमदत्तिः = सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा
अर्थ
आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥ १-८ ॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥
अन्वय

अन्ये = इतर, च = सुद्धा, मदर्थे = माझ्यासाठी, त्यक्तजीविताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुष्कळ, शूराः = शूरवीर, (सन्ति) = आहेत, सर्वे = ते सर्व, नानाशस्त्रप्रहरणाः = निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज, युद्धविशारदाः = युद्धात पारंगत, (सन्ति) = आहेत
अर्थ
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥
अन्वय

भीष्माभिरक्षितम्‌ = भीष्म-पितामहांकडून रक्षिले गेलेले, अस्माकम्‌ = आमचे, तत्‌ = ते, बलम्‌ = सैन्य, अपर्याप्तम्‌ = सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे, तु = आणि, भीमाभिरक्षितम्‌ = भीमाकडून रक्षिले गेलेले, एतेषाम्‌ = या पांडवांचे, इदम्‌ = हे, बलम्‌ = सैन्य, पर्याप्तम्‌ = जिंकण्यास सोपे आहे
अर्थ
भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥
अन्वय

च = म्हणून, सर्वेषु = सर्व, अयनेषु = व्यूहद्वारात, यथाभागम्‌ = आपापल्या जागेवर, अवस्थिताः = राहून, भवन्तः = आपण, सर्वे एव = सर्वांनीच, हि = निःसंदेहपणे, भीष्मम्‌ एव = भीष्म पितामहांचेच, अभिरक्षन्तु = सर्व बाजूंनी रक्षण करावे
अर्थ
म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥
तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥
अन्वय

तस्य = त्या(दुर्योधना)चा(च्या हृदयात), हर्षम्‌ = आनंद, सञ्जनयन्‌ = निर्माण करीत, कुरुवृद्धः = कौरवातील वृद्ध, प्रतापवान्‌ = महापराक्रमी(अशा), पितामहः = पितामह भीष्मांनी, उच्चैः = मोठ्या सुरात, सिंहनादम्‌ = सिंहाच्या आरोळीप्रमाणे, विनद्य = गर्जना करून, शङ्खम्‌ = शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला.
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, शङ्खाः = शंख, च = आणि, भेर्यः = नगारे, च = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व शिंगे (इत्यादी रणवाद्ये), सहसा एव = एकदमच, अभ्यहन्यन्त = वाजू लागली, (तेषां) = (त्यांचा), सः = तो, शब्दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत्‌ = झाला
अर्थ
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १-१४ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, श्वेतैः = पांढऱ्या, हयैः = घोड्यांनी, युक्ते = युक्त अशा, महति = उत्तम, स्यन्दने = रथात, स्थितौ = बसलेल्या, माधवः = श्रीकृष्ण महाराजांनी, च = आणि, पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), एव = सुद्धा, दिव्यौ = अलौकिक, शङ्खौ = शंख, प्रदध्मतुः = वाजविले
अर्थ
यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) ही दिव्य शंख वाजविले. ॥ १-१४ ॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥
अन्वय

हृषीकेशः = श्रीकृष्ण महाराजांनी, पाञ्चजन्यम्‌ = पांचजन्य नावाचा, धनञ्जयः = अर्जुनाने, देवदत्तम्‌ = देवदत्त नावाचा, (च) = आणि, भीमकर्मा = भयानक कर्मे करणाऱ्या, वृकोदरः = भीमसेनाने, पौण्ड्रम्‌ = पौण्ड्र नावाचा, महाशङ्खम्‌ = मोठा शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥
अन्वय

कुन्तीपुत्रः = कुन्तीपुत्र, राजा = राजा, युधिष्ठिरः = युधिष्ठिराने, अनन्तविजयम्‌ = अनंतविजय नावाचा, (च) = आणि, नकुलः = नकुलाने, च = व, सहदेवः = सहदेवाने, सुघोष-मणिपुष्पकौ = सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंङ्ख, (दध्मौ) = वाजविले
अर्थ
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ॥ १-१६ ॥
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक्‌ ॥ १-१८ ॥
अन्वय

परमेष्वासः = श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा, काश्यः = काशिराज, च = आणि, महारथः = महारथी, शिखण्डी = शिखंडी, च = व, धृष्टद्युम्नः = धृष्टद्युम्न, च = तसेच, विराटः = राजा विराट, च = आणि, अपराजितः = अजिंक्य, सात्यकिः = सात्यकी, द्रुपदः = राजा द्रुपद, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, च = तसेच, महाबाहुः = मोठ्या भुजा असणारा, सौभद्रः = सुभद्रापुत्र(अभिमन्यू), (एते, सर्वे) = या सर्वांनी, पृथिवीपते = हे राजन्‌, सर्वशः = सर्व बाजूंनी, पृथक्‌-पृथक्‌ = वेगवेगळे, शङ्खान्‌ = शंख, दध्मुः = वाजविले
अर्थ
श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. ॥ १-१७, १-१८ ॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ॥ १-१९ ॥
अन्वय

(च) = आणि, नभः = आकाशाला, च = तसेच, पृथिवीं = पृथ्वीला, एव = सुद्धा, व्यनुनादयन्‌ = दुमदुमून टाकीत, सः = त्या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धार्तराष्ट्राणाम्‌ = धार्तराष्ट्रांची म्हणजे आपल्या पक्षातील लोकांची, हृदयानि = हृदये, व्यदारयत्‌ = विदीर्ण करून टाकली
अर्थ
आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥
अन्वय

महीपते = हे राजा, अथ = त्यानंतर, कपिध्वजः = ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे (अशा), पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), व्यवस्थितान्‌ = मोर्चा बांधून उभ्या असलेल्या, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना, दृष्ट्वा = पाहून, तदा = तेव्हा, शस्त्रसम्पाते प्रवृत्ते = शस्त्र चालविण्याच्या तयारीचे वेळी, धनुः = धनुष्य, उद्यम्य = उचलून, हृषीकेशम्‌ = हृषीकेश श्रीकृष्णांना उद्देशून, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वाक्य, आह = उच्चारले, अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, अच्युत = हे अच्युता, मे = माझा, रथम्‌ = रथ, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्यभागी, स्थापय = उभा करा
अर्थ
महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२ ॥
अन्वय

अस्मिन्‌ = या, रणसमुद्यमे = युद्धाच्या उद्योगात, कैः सह = (ज्या) कोणाकोणाबरोबर, मया = मला, योद्धव्यम्‌ = लढणे योग्य आहे, योद्धुकामान्‌ = (त्या) युद्ध करण्याच्या इच्छेने, अवस्थितान्‌ = रणांगणात सज्ज झालेल्या, एतान्‌ = या (शत्रुपक्षातील योद्ध्यां) ना, यावत्‌ अहम्‌ निरीक्षे = (मी) जोपर्यंत नीट पाहून घेत आहे (तोपर्यंत रथ उभा करा.)
अर्थ
मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. ॥ १-२२ ॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥
अन्वय

दुर्बुद्धेः = दुष्टबुद्धी अशा, धार्तराष्ट्रस्य = दुर्योधनाचे, युद्धे = युद्धात, प्रियचिकीर्षवः = हित करू इच्छिणारे, ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अत्र = या सैन्यात, समागताः = एकत्र आले आहेत (त्या), योत्स्यमानान्‌ = युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना, अहम्‌ = मी, अवेक्षे = पाहीन
अर्थ
दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥ १-२३ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, भारत = हे धृतराष्ट्र, गुडाकेशेन = अर्जुनाने, एवम्‌ = असे, उक्तः = म्हटले असता, हृषीकेशः = श्रीकृष्णांनी, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, भीष्मद्रोणप्रमुखतः = भीष्म व द्रोण यांच्या समोर, च = तसेच, सर्वेषाम्‌ = सर्व, महीक्षिताम्‌ = राजांच्या समोर, रथोत्तमम्‌ = उत्तम रथ, स्थापयित्वा = उभा करून, इति = असे, उवाच = म्हटले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), समवेतान्‌ = युद्धासाठी एकत्र जमलेल्या, एतान्‌ = या, कुरून्‌ = कौरवांना, पश्य = पाहा
अर्थ
संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा. ॥ १-२४, १-२५ ॥
तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥
श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
अन्वय

अथ = त्यानंतर, पार्थः = पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने), तत्र उभयोः अपि = त्या दोन्हीही, सेनयोः = सैन्यांमध्ये, स्थितान्‌ = उभे असलेले, पितॄन्‌ = काका, पितामहान्‌ = आजे, पणजे, आचार्यान्‌ = गुरू, मातुलान्‌ = मामे, भ्रातॄन्‌ = भाऊ, पुत्रान्‌ = मुलगे, पौत्रान्‌ = नातू, तथा = तसेच, सखीन्‌ = मित्र, श्वशुरान्‌ = सासरे, च = आणि, सुहृदः = सुहृद (यांना), एव = च, अपश्यत्‌ = पाहिले
अर्थ
त्यानंतर पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने) त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ।
अन्वय

अवस्थितान्‌ = उपस्थित असलेल्या, तान्‌ सर्वान्‌ बन्धून्‌ = त्या सर्व बंधूंना, समीक्ष्य = पाहून, परया = आत्यंतिक, कृपया = करुणेने, आविष्टः = परवश झालेला, सः = तो, कौन्तेयः = कुन्तीपुत्र अर्जुन, विषीदन्‌ = शोक करीत, इदम्‌ = हे(वचन), अब्रवीत्‌ = बोलला ॥ १-२७(उत्तरार्ध),
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, युयुत्सुम्‌ = युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम्‌ = रणांगणावर उपस्थित असणाऱ्या, इमम्‌ स्वजनम्‌ = या स्वजन समुदायाला, दृष्ट्वा = पाहिल्यावर, मम = माझे, गात्राणि = अवयव, सीदन्ति = गळून जात आहेत, च = आणि, मुखम्‌ = तोंड, परिशुष्यति = कोरडे पडत आहे, च = तसेच, मे = माझ्या, शरीरे = शरीरांच्या ठिकाणी, वेपुथः = कंप, च = व, रोमहर्षः = रोमांच, जायते = निर्माण झाले आहेत ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥
अन्वय

हस्तात्‌ = हातातून, गाण्डीवम्‌ = गांडीव धनुष्य, स्रंसते = गळून पडत आहे, च = व, त्वक्‌ = त्वचा, एव = सुद्धा, परिदह्यते = फार जळजळत आहे, च = तसेच, मे = माझे, मनः = मन, भ्रमति इव = भरकटल्यासारखे होत आहे, (अतः) = त्यामुळे मी, अवस्थातुम्‌ = उभा राहाण्यास, च = सुद्धा, न शक्नोमि = समर्थ नाही
अर्थ
हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥ १-३० ॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥
अन्वय

केशव = हे केशवा, निमित्तानि = चिन्हे, च = सुद्धा, (अहम्‌) = मी, विपरीतानि = विपरीतच, पश्यामि = पाहात आहे, (च) = तसेच, आहवे = युद्धामध्ये, स्वजनम्‌ = स्वजन-समुदायाला, हत्वा = ठार मारून, श्रेयः च = कल्याण सुद्धा (होईल असे), न अनुपश्यामि = मला दिसत नाही
अर्थ
हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ १-३१ ॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, विजयम्‌ = विजयाची, न काङ्क्षे = मला इच्छा नाही, च = तसेच, न राज्यम्‌ = राज्याची (इच्छा) नाही, च = आणि, सुखानि = सुखांचीही (इच्छा नाही), गोविन्द = हे गोविंदा, नः = आम्हाला, राज्येन = राज्याचे, किम्‌ = काय प्रयोजन आहे, वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च) = आणि, जीवितेन = जगण्याचा, किम्‌ = काय उपयोग आहे
अर्थ
हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ॥ १-३२ ॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥
अन्वय

येषाम्‌ = ज्यांच्या, अर्थे = साठी, नः = आम्हाला, राज्यम्‌ = राज्य, भोगाः = भोग, च = आणि, सुखानि = सुखे (इत्यादी), काङ्क्षितम्‌ = अभीष्ट आहेत, ते = ते, इमे = हे (सर्वजण), धनानि = धन, च = आणि, प्राणान्‌ = प्राण (यांची आशा), त्यक्त्वा = सोडून, युद्धे = युद्धात, अवस्थिताः = उभे आहेत
अर्थ
आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. ॥ १-३३ ॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥
अन्वय

आचार्याः = गुरुजन, पितरः = काका, पुत्राः = मुलगे, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, पितामहाः = आजे, मातुलाः = मामे, श्वशुराः = सासरे, पौत्राः = नातू, श्यालाः = मेहुणे, तथा = तसेच, सम्बन्धिनः = आप्त लोक, (सन्ति) = आहेत
अर्थ
गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥
अन्वय

मधुसूदन = हे मधुसूदना, घ्नतः अपि = (मला) मारले तरी सुद्धा, (अथवा) = किंवा, त्रैलोक्यराज्यस्य = तीन लोकांच्या राज्याच्या, हेतोः = साठी, अपि = सुद्धा, एतान्‌ = या सर्वांना, हन्तुम्‌ = ठार मारण्याची, न इच्छामि = मला इच्छा नाही (मग), महीकृते = (या) पृथ्वीसाठी (तर), नु किम्‌ = काय सांगावे
अर्थ
हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? ॥ १-३५ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥
अन्वय

जनार्दन = हे जनार्दना, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, निहत्य = मारून, नः = आम्हाला, का = कोणते, प्रीतिः = सुख, स्यात्‌ = मिळणार, एतान्‌ = या, आततायिनः = आततायींना, हत्वा = मारल्यावर, अस्मान्‌ = आम्हाला, पापम्‌ एव = पापच, आश्रयेत्‌ = लागेल
अर्थ
हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌ ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, माधव = हे माधवा, स्वबान्धवान्‌ = आपल्याच बांधवांना (म्हणजे), धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, हन्तुम्‌ = मारण्यास, वयम्‌ = आम्ही, न अर्हाः = योग्य नाही, हि = कारण, स्वजनम्‌ = आपल्याच कुटुंबाला, हत्वा = मारून, कथम्‌ = कसे (बरे), सुखिनः = आम्ही सुखी, स्याम = होऊ
अर्थ
म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? ॥ १-३७ ॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥
अन्वय

यद्यपि = जरी, लोभोपहतचेतसः = लोभाने बुद्धिभ्रष्ट झालेले, एते = हे (लोक), कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशाने उत्पन्न झालेला, दोषम्‌ = दोष, च = तसेच, मित्रद्रोहे = मित्राशी द्रोह करण्यातील, पातकम्‌ = पाप, न पश्यन्ति = पाहात नाहीत, (तथापि) = तरी, जनार्दन = हे जनार्दना, कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या, दोषम्‌ = दोषाला, प्रपश्यद्भिः = जाणणाऱ्या, अस्माभिः = आम्ही, अस्मात्‌ पापात्‌ = या पापापासून, निवर्तितुम्‌ = परावृत्त होण्यासाठी, कथम्‌ = का (बरे), न ज्ञेयम्‌ = विचार करू नये
अर्थ
जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? ॥ १-३८, १-३९ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥
अन्वय

कुलक्षये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, प्रणश्यन्ति = नष्ट होऊन जातात, धर्मे नष्टे = धर्माचा नाश झाल्यावर, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, कुलम्‌ = कुळात, अधर्मः उत = पापसुद्धा, अभिभवति = मोठ्या प्रमाणात पसरते
अर्थ
कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, अधर्माभिभवात्‌ = पाप अधिक वाढल्याने, कुलस्त्रियः = कुळातील स्त्रिया, प्रदुष्यन्ति = अतिशय दूषित होतात, च = (आणि), वार्ष्णेय = हे वार्ष्णेया, स्त्रीषु दुष्टासु = स्त्रिया दूषित झाल्या असताना, वर्णसङ्करः = वर्णसंकर, जायते = उत्पन्न होतो
अर्थ
हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥ १-४१ ॥
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥
अन्वय

कुलघ्नानाम्‌ = कुळाचा नाश करणाऱ्यांना, च = आणि, कुलस्य = कुळाला, सङ्करः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जाण्यासाठी (असतो), लुप्तपिण्डोदकक्रियाः = पिंड व पाणी यांच्या क्रियांना म्हणजे श्राद्ध व तर्पण यांना मुकलेले (असे), एषाम्‌ = यांचे, पितरः हि = पितरसुद्धा, पतन्ति = अधोगतीस प्राप्त होतात
अर्थ
वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥
अन्वय

वर्णसङ्करकारकैः = वर्णसंकर करणाऱ्या, एतैः दोषैः = या दोषांमुळे, कुलघ्नानाम्‌ = कुलघाती लोकांचे, शाश्वताः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, च = आणि, जातिधर्माः = जातिधर्म, उत्साद्यन्ते = नष्ट होऊन जातात
अर्थ
या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुळधर्म उध्वस्त होतात. ॥ १-४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥
अन्वय

जनार्दन= हे जनार्दना, उत्सन्नकुलधर्माणाम्‌ = ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशा, मनुष्याणाम्‌ = मनुष्यांचा, नरके = नरकातील, वासः = निवास (हा), अनियतम्‌ = अनिश्चित काळापर्यंत, भवति = होतो, इति = असे, अनुशुश्रुम = आम्ही ऎकत आलो आहोत
अर्थ
हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऎकत आलो आहोत. ॥ १-४४ ॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥
अन्वय

अहो = अरेरे, बत = किती वाईट, राज्यसुखलोभेन = राज्य व सुख यांच्या लोभाने, वयम्‌ = आम्ही (बुद्धिमान असूनही), यत्‌ = जे, स्वजनम्‌ = स्वजनांना, हन्तुम्‌ = मारण्यास, उद्यताः = तयार झालो आहोत, (तत्‌) = (ते म्हणजे), महत्‌ = मोठे, पापम्‌ = पाप, कर्तुम्‌ = करण्यास, व्यवसिताः = आम्ही तयार झालो आहोत
अर्थ
अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे! ॥ १-४५ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥ १-४६ ॥
अन्वय

यदि = जरी, अशस्त्रम्‌ = शस्त्ररहित, अप्रतिकारम्‌ = प्रतिकार न करणाऱ्या (अशा), माम्‌ = मला, शस्त्रपाणयः = हातात शस्त्र घेतलेले, धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, रणे = युद्धामध्ये, हन्युः = मारतील, (तथापि) = तरी, तत्‌ = ते (मारणे), मे = माझ्यासाठी, क्षेमतरम्‌ = अधिक कल्याणकारक, भवेत्‌ = होईल
अर्थ
जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥ १-४६ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, सङ्ख्ये = रणांगणावर, शोकसंविग्नमानसः = शोकामुळे मन उद्विग्न झालेला, अर्जुनः = अर्जुन, एवम्‌ = असे, उक्त्वा = बोलून, सशरम्‌ = बाणासह, चापम्‌ = धनुष्य, विसृज्य = टाकून, रथोपस्थे = रथाच्या मागील भागी, उपाविशत्‌ = बसला
अर्थ
संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ॥ १-४७ ॥

अंतरंग – भगवद्गीता – विभूतियोग

शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।
मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं, काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं।
काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर, खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं।

संत नामदेव नित्य नेमाने विठ्ठलाशी संवाद करत असत. एकदा विठ्ठलाने त्यांना सांगितले की ‘जोपर्यंत तुझ्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तुला निर्गुण निराकार भगवंताच्या वास्तविक स्वरुपाचे ज्ञान होणार नाही. तेव्हा तू विसोबा खेचर नामक गृहस्थांना भेट. ते तुला उत्तम दृष्टांत देतील.’ नामदेव जेव्हा विसोबा खेचरांना भेटायला गेले तेव्हा त्यांना विलक्षण दृष्य दिसले. विसोबा निवांतपणे पहुडले होते आणि त्यांचे पाय महादेवाच्या पिंडीवर विसावले होते. ते पाहून नामदेवांना सहाजिकच राग आला. ते पाहून विसोबा म्हणाले, “बाबा रे, वार्धक्यामुळे मला पाय उचलणेही कठीण जाते. तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे टेकव” नामदेवांनी विसोबांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. परंतु तेथेही तेच झाले. पाय टेकताच त्याच्या खाली पुन्हा महादेवाची पिंड दिसायला लागली. नामदेवांना कळेना. हा जागा बदलण्याचा उद्योग चार पाच वेळा करुनही तोच परिणाम दिसायला लागल्यावर नामदेव विसोबांना शरण गेले. विसोबांनी त्यांना सांगितले की – ईश्वर हा सर्वव्यापी सर्वत्र आहे, मग पाय कोठेही ठेवल्याने काय फरक पडतो. फरक आपल्या दृष्टीचा आहे.

“चराचरातील भगवंताचे हे अधिष्ठान जाणणे म्हणजेच त्याच्या शक्तीचे/विभूतिचे स्वरुप जाणणे होय. ते जाणणारा भक्त भगवंताशी एकरुप होतो आणि भूतातेही भगवंताला प्राप्त करतो.”

विभूति हा शब्द पुरेसा जाणल्यास विभूतियोग जाणणे कठीण नाही. रुढार्थाने विभूति हा शब्द मोठ्या महान व्यक्तीसाठी वापरला जातो. परंतू विभूति शब्दाचा मूळ अर्थ विशेष शक्ती, सामर्थ्य किंवा तेज असा आहे. तेज जे सर्वकाही व्यापते.
अगदी साध्या शब्दात सांगायचे तर ‘वि म्हणजे विशेष’ आणि ‘भूत म्हणजे जीव, भूतमात्र किंवा आपण सारे’! त्यामुळे असा जीव ज्यात काही विशेष आहे त्याला विभूति असे म्हणायला हरकत नाही. असे काय आहे जे विशेष आहेच परंतू सर्व भूतमात्रात आहे? अर्थातच आत्मा, चैतन्य किंवा परमात्म्याचा अंश. म्हणूनच आपल्यातील परमात्म्याला जो जाणतो तोच चराचरातील भगवंतालाही जाणतो आणि म्हणूनच तर अशा ज्ञानी माणसाला वि-भूती म्हणले जाते. श्रीकृष्ण अर्जुनालाही हेच सांगतो की – जे जे उत्तम , उदात्त उन्नत आहे त्याच्या ठायी माझा भाव जाणणे म्हणजेच विभूति जाणणे. ते जे उन्नत उदात्त आहे ते स्वतः आणि ते जाणणारा व्यक्ती दोघेही विभूतिमत्वाला पोचतात.

(अशा उदात्ताच्या ध्यासातून मिळणारी मुक्ती किंवा मोक्ष हे प्रत्येक भूताचे ध्येय आहे. म्हणूनच तर सावरकरांनी मोक्ष आणि मुक्ती ही स्वातंत्र्यदेवतेची रुपे आहेत असे म्हटले आहे. केवळ इंग्रजांचे जोखड मानेवरून उखडून टाकणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे त्याचा ध्यास घेणे हे सावरकरांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य होते. विभूति कोणाला म्हणावे हे येथे स्पष्ट व्हावे!! असो)

मुण्डक उपनिषदापासून ते भागवतपुराणापर्यंत तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथात आणि अगदी किरातार्जुनीयासारख्या महाकाव्यातही ‘विभूति’ हा शब्द विशेष शक्ती, तेज किंवा परमात्म्याचा अंश याच अर्थाने वापरला आहे. श्रीकृष्णही अर्जुनाला आपल्या विभूतिंचा परिचय अनेक उदाहरणातून करून देतो.
येथे केवळ हे ध्यानात घ्यायचे आहे की ही उदाहरणे आहेत. याचा केवळ भगवंताने वर्णन केलेल्याच विभूतित त्याचे अस्तीत्व जाणवते आणि इतरात नाही असे नाही. विसोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्वाभूती सर्वव्यापी आहे केवळ साधकाला म्हणजे अर्जुनाला (आणि आपल्यालाही) समजण्यास सोपे जावे म्हणून वानगीदाखल घेतलेली नावे ही या अध्यायात येतात. भगवंताच्या विभूति योगाबद्दल पुढील भागात.
तळटीप
१. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूति जीवस्य मायारचितस्य नित्याः।
आविर्हिताः क्वापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे ह्यविशुद्धकर्तुः ॥ (भागवत – ५/१२)
२. यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् ।
तं तं लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत्भूतिकामः। (मुण्डकोपनिषद – ३.१.१०)
३. हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः। यस्याङ्‌घ्रिरेणुं जुषतेऽनभीप्सोः।(भागवत – ५/१२/२०)
४. त्रीनत्यरोच उपलभ्य ततोविभूतिं लोकान् स मां व्यसृजदुत्स्मयतीं तदन्ते। (भागवत – १/१६/३५)
५. इत्युक्तवन्तं परिरभ्य दोर्भ्यां तनूजं आविष्कृतदिव्यमूर्तिः।<>br अघोपघातं मघवा विभूत्यै भवोद्भवाराधनं आदिदेश । (किरातार्जुनीय ११.८०)

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग (अंतिम)

सातव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात, भक्तीचे आणि भगवंताच्या साक्षात्काराचे स्वरुप सांगत असताना, श्रीकृष्ण ‘अधिभूत’, ‘अधिदैव’ आणि ‘अधियज्ञ’ अशा संज्ञा वापरतो. त्यांचे अर्थ पुरसे न समजल्याने अर्जुन त्याला अध्यात्मासह सर्व संज्ञांचा अर्थ विचारतो. त्यामुळे आठव्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला या सर्व संकल्पना विस्ताराने समजावून सांगतो. त्यानंतर अर्थातच तो आपली वि-ज्ञानाची चर्चा पुढे चालू ठेवतो. म्हणूनच ‘राजविद्याराजगुह्ययोग’ हा अध्याय खरंतर ज्ञानविज्ञानयोगाचा पुढील भागच म्हणायला हवा. या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतो.

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌॥
दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू अ-शुभापासून मुक्त होशील.

ज्ञानविज्ञानात सांगितलेले विशेष ज्ञान असो किंवा त्याही आधी विषद केलेले ज्ञान आणि कर्मयोग, श्रीकृष्ण वारंवार त्याच तत्वांचा पुनरुच्चार करतो, उदाहरणे देतो. त्यामुळे अर्जुनाच्या मनातील शंका दूर होतात आणि आपल्याही!
नवव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो की –
‘प्रत्येक युगाच्या अंती सर्व भूतमात्र मला येऊन मिळतात आणि नवीन युगाच्या आरंभी मी त्यांचे पुनः सर्जन करतो.’
येथे हे ध्यानात घेतले पाहीजे की – या श्लोकातील ‘मी’ हा सृष्टीकर्ता परमात्मा आहे. श्रीकृष्ण हे त्या परमात्म्याने धारण केलेले एक मूर्त रूप (अवतार) आहे.
येथे अवतार या शब्दाचा नीट अर्थ समजून घेणे उचित ठरेल. अव + तृ याचा अर्थ (खाली) उतरणे असा होतो. परमात्मा जेव्हा मूर्त रुपाने खाली (येथे भूलोकात) उतरतो तेव्हा त्यास अवतार असे म्हणतात. एका अर्थाने परमात्म्याच्या अंशरुपाने अवतीर्ण झालेले मूर्त रुप (अवतार) हे आपल्यासारखेच भूतमात्र आहे. कारण आपल्यातही त्याच परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच राम काय किंवा कृष्ण काय हे भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करतात, सुखदुःख भोगतात. आपल्यात आणि त्यांच्यात फरक इतकाच की जे तत्व जाणायला आपल्याला अनेक जन्म लागतात ते तत्व त्यांना याच जन्मी उमगते. त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करून ते पुन्हा परमात्म्यात विलिन होतात.
श्रीकृष्णही अर्जुनाला हेच सांगतोय.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌॥
हे कौन्तेया (कुंतीपुत्रा), कल्पाच्या (युगाच्या) शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो.

मी जरी त्यांना उत्पन्न करत असलो तरी या कर्माचे फल मला बाधत नाही. कारण हे सर्जन अत्यंत निष्काम वृत्तीनेच मी करतो. कर्मसिद्धांतानुसार फळाच्या अपेक्षेशिवाय, निष्काम वृत्तीने केलेल्या कर्माचे बंधन बाधत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण पुढे म्हणतो की प्रत्येक भूतमात्र हे कर्माच्या फलस्वरुप माझ्यापासून उत्पन्न होतात. परंतु मी त्यांच्यात नसतो. कारण प्रत्येकाच्या कर्मफलानुसार त्याचे सर्जन होते आणि हे कर्म मी निष्काम भावनेने करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥
अव्यक्त (अशा) मी (परमात्म्याने) हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.

म्हणूनच जसा मी, कर्माच्या ठायी उदासीन असतो तसे उदासीन राहणारा व्यक्तीही जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होऊन मला येऊन मिळतो.परंतु याउलट हा भाव न जाणणारे मूढ लोक, अवतार घेऊन कर्म करणाऱ्या मला सामान्य मनुष्य समजतात. सकाम भक्ती करणारे लोकही याच प्रकारे कर्मबंधनाने बाधित होतात, असे श्रीकृष्ण म्हणतो.
ज्ञानविज्ञानयोगात श्रीकृष्णाने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी. यातील सकाम भक्ती करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासु भक्त परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत. ते काही एक उद्दीष्ट्य समोर ठेवून भक्ती/उपासना करतात. म्हणूनच मग आपल्या कर्मासंबंधी उदासीनता प्राप्त होत नसल्याने जन्ममृत्युच्या चक्रात अडकतात. आपल्या कर्माच्या फलस्वरुप पुण्य प्राप्त करुन स्वर्गात जातात. पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा मृत्युलोकात येतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते।
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. (अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.)

अतिशय साधे परंतु परिणामकारक तत्व येथे श्रीकृष्ण सांगतो. जो ज्याची इच्छा, कामना किंवा भक्ती करतो तो त्या गतीला प्राप्त होतो.

(आपला शाहरुख ते …कायनात वगैरे वाल्या शेरात तरी दुसरे काय सांगतो म्हणा :P)

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌।
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

अशाप्रकारे जे ज्याचे उपास्य दैवत तो त्या गतीला पोचतो. भौतिक सुख हवे तर त्याची उपासना करा, वस्तु किंवा पद हवे तर त्याची. व्यक्ती जसे आणि जितके प्रयत्न करेल त्यानुसार फळ त्याला मिळेल यात शंका नाही.
मग जर परमात्म्याला प्राप्त करायचे तर भक्तीही परमात्म्याचीच करायला हवी!

तानसेनाची एक सुंदर कथा आहे.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने तानसेन दरबाराला मोहून टाकत असतो. अकबराला असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन त्या तुलनेत काहीच नाही. माझ्या गुरुंचे गाणे हे अलौकीक असा साक्षात्कार देणारे गाणे असते. मी त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. अकबराच्या हट्टापायी दोघेही तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेत गुरुदेवांची भेट घडते. एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय आणि निसर्गासह आपल्या शरीरातील कणन् कण केवळ गाणं ऐकतोय असा अलौकिक अनुभव अकबराला येतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव निघुन गेलेले असतात. सहाजिकच अकबर तानसेनाला विचारतो की अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो, “मी भूतलावरील अनेकांपैकी एका राजाला प्रसन्न करण्यासाठी गातो तर माझे गुरुदेव हे एकमेवाद्वितीय अशा अनन्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! जो ज्याची उपासना करतो त्याला तशी गती प्राप्त होते.

येथे शेवटचे वाक्य नीट समजून घेतले पाहीजे. अनेकदा असे सांगितले जाते की खुप पुण्य केले की मोक्ष प्राप्ती होते. हे अर्धसत्य आहे. पुण्याची प्राप्त केल्याने उत्तम गती प्राप्त होते कारण ते एक चांगले कर्म आहे. चांगले कर्म चांगली गती असे साधे सूत्र आहे. म्हणून मग पुण्यात्मा स्वर्गस्थ होईल आणि पुण्यक्षय झाला की पुन्हा भूलोकी जन्म घेईल. पाप पुण्य, सुखदुःख किंवा चांगले वाईट हे परस्परविरोधी अवस्था दाखविणारे हे भोग आहेत. पाप केलं दुःख प्राप्त होते, पुण्य केले सुख प्राप्त होते. मोक्ष याच्या पलिकडे आहे. मोक्ष म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्हीच्याही पुढची अवस्था आहे. म्हणून त्याच्या विरुद्धार्थी अवस्थाच नसते! परमात्म्याची प्राप्ती ही अनन्यसाधारण अवस्था आहे म्हणूनच त्याची भक्ती ही अनन्यभावनेनेच केली पाहीजे.
हे झाले सकाम भक्तीबद्दल…
श्रीकृष्णाला आवडणारा ज्ञानी भक्त मात्र भगवंताचे अनन्य स्वरुप जाणतो आणि त्याची निष्काम उपासना करतो. त्यामुळे कर्माची बंधने टाळून परमगती प्राप्त करतो.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌।
परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतो की जे अशा प्रकारे अनन्यभावाने माझी भक्ती करतात त्यांना त्यांची योग्य गती मी प्राप्त करून देतो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

योगक्षेमम् वहाम्यहम्। या उक्तीचा असा अर्थ घ्यायचा आहे.
अशाप्रकारे ज्ञानविज्ञानयोगात प्रारंभ केलेले परमात्म्याच्या साक्षात्काराचे विवेचन येथे नवव्या अध्यायात श्रीकृष्ण पूर्ण करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।

परस्परविरोधी वाटणारे परंतु कर्मसिद्धांताचे समर्थन करणारे हे तत्व जाणणे ही खरी श्रेष्ठ विद्या आहे म्हणून याला राजविद्या असे म्हटले आहे. पाप पुण्याच्या कोष्टकातील सकाम भक्तीच्याही पुढे जाऊन निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती केल्यासच त्याची प्राप्ती होते हे खरे गुह्य (गुपित किंवा गुढ तत्व) म्हणूनच या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असे ठेवले आहे.

**गंमतीचा भाग असा की राजगुह्य या शब्दाचे दोन्ही भाग हे एकमेकांचे हिंदी आणि मराठी प्रतिशब्दच आहेत.

असो भगवंताच्या साक्षात्काराबद्दल पुढील भागात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

अध्याय नववा

बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) ‘राजविद्याराजगुह्ययोग’ असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत – लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली! पण मग लोक केवळ या अध्यायाचेच भाषांतर किंवा निरुपण वाचून गीतेत ‘…असे म्हटले आहे’ किंवा ‘…तसे म्हटले आहे’ असे सांगायला लागले. गंमतीचा भाग असा की बाकीचे अध्याय सोडून एकदम नवव्या अध्यायात जे म्हटले आहे त्याचा अर्थ लावल्याने समजापेक्षा गैरसमज अधिक फोफावले!

जिना चढताना एकदम नववी पायरी घ्यावी आणि पाय अवास्तव ताणल्याने पडावे किंवा अवघडावे तशी अनेकांची अवस्था झाली! आपण आधी पाहिल्याप्रमाणे गीतेच्या १८ अध्यायांचा सोपान ही अतिशय जाणीवपूर्वक रचलेली विचारांची साखळी आहे. कोणत्याची श्लोकाचा त्याच्या आधीच्या आणि चालू अध्यायाच्या योग्य संदर्भाशिवाय उल्लेख केल्यास त्याच्या अर्थाचा विपर्यास होण्याचा धोका असतो. हे आपण मागच्या अध्यायात पाहिलेच आहे. (पहा – अक्षरब्रह्मयोग). या अध्यायातही अशी उदाहरणे मिळतील. वानगीदाखल नवव्या अध्यायातले एक उदाहरण घेऊ.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला एलआयसी (LIC) चे बोधवाक्य ठाऊक आहे.
योगक्षेमं वहाम्यहम्।।
या उद्गारांचा शब्दशः अर्थ –
‘मी (अहम्) उपजिविकेचा भार (योगक्षमम्) वहन करेन (वहामि)’
असा होतो.याचा अर्थ तुमच्या उपजिविकेचा भार एलआयसी वाहणार आहे. आता हे बोधवाक्य वाचून जर प्रत्येकजण एलआयसीच्या दारात उभा रहायला लागला तर त्याला काय म्हणावे!!?
हे बोधवाक्य आहे. त्यातून बोध घ्यायचा आहे गैरसमज नव्हे. बोध घ्यायचा तर त्या वाक्याचा ससंदर्भ अर्थ ध्यानात घ्यायला हवा.
पूर्ण श्लोक असा आहे

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त माझे (परमेश्वराचे) निरंतर चिंतन करीत (मला) निष्काम भावाने भजतात, त्या नित्य चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

म्हणजे काय, तर जे लोक नित्यनियमितपणे एलआयसीची भक्ती करतात (पॉलिसीचे हप्ते भरतात) त्यांच्या उपजिविकेची काळजी एलआयसी करेल. जे अर्थातच खरे आहे. पण केवळ अर्धेच वचन वाचून त्याचा अर्थ घ्यायला जाणाऱ्याची फजिती होणे सहाजिकच नाही का?
(पुलंना घर दाखवणारा कुळकर्णी जेव्हा ‘हा वर जायचा रस्ता! ’ असे म्हणतो तेव्हा घर दाखविण्याचा संदर्भ लक्षात न घेता अर्थ घेतला तर भलताच समज व्हायचा… (पहा – मी आणि माझा शत्रुपक्ष)

आता सिनेमातल्या श्लोकाकडे पहा

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्।
आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार उत्पन्न करतो.

येथे ‘मी उत्पन्न करतो’ इतकाच अर्थ घेऊन ‘सृष्टीची उत्पत्ती आणि नाश भगवंताच्या इच्छेने होतो’ असे म्हणणे हे केवळ अर्धसत्य झाले. व्यक्तीच्या कर्मानुरुप गती त्याला प्राप्त होते हे श्रीकृष्णाने आधीच्या अध्यायात सांगून ठेवले आहे. तसेच या आधीच्या सातव्या श्लोकात (९-७)

‘कल्पाच्या किंवा युगाच्या आरंभी संपूर्ण भूतमात्र माझ्यात विलिन होते आणि मी त्याचे पुनः सर्जन करतो’

असेही श्रीकृष्ण सांगतो. याचा अर्थ व्यक्ती जसे कर्म करेल तसे फळ त्याला मिळेल.
संपूर्ण सृष्टीचक्राला हा नियम लागू पडतो. जरूरीपेक्षा जास्त वाढलेली वृक्षाची फांदी बुंध्याला वजन न पेलल्यामुळे तुटुन पडते. आवश्यकतेपेक्षा जास्तीचे अतिक्रमणाने निसर्गाचा समतोल ढळतो व त्याच्या परिणामस्वरुप नैसर्गिक आपत्ती येते. म्हणूनच बेसुमार वृक्षतोड, खाणकाम किंवा प्रदुषण करणाऱ्या माणसांच्या समुहाला पूर, ज्वालामुखी, भूकंप किंवा त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते हे त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ नव्हे काय? तेथे ईश्वराच्या शक्तीला दोष देणे, तेही एका वेगळ्या काढलेल्या श्लोकाच्या संदर्भाने, हे अयोग्य आहे.
मौजेचा भाग म्हणजे सिनेमाच्या अंतिम भागात प्रत्यक्ष देवच माणसाच्या मूर्खपणाचे वाभाडे काढतो. श्रीकृष्ण (कुमार अक्षय!) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सांगतो. धर्माच्या नावाखाली मानवाने देवावर कसे अतिक्रमण केले हे तो दाखवून देतो. म्हणूनच मग सृष्टीच्या सर्जनामागचे मूळ तत्व एकच आहे हे विसरून अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक देव(!) कसे निर्माण केले जातात, याच निर्मात्यांचे भाऊबंद असणारे उरलेले मानव याला कसे बळी पडतात हेही तो सांगतो! जे श्लोकाचा, धर्मग्रंथाचा आणि पर्यायाने ईश तत्वाचा विपरीत अर्थ खरा समजून अंधश्रद्धेत गुरफटून जातात. त्यांच्या विनाशाला ते स्वतः च कारणीभूत ठरतात देव नाही.
सिनेमात शेवटी श्रीकृष्ण जे सांगतो ते गुपित म्हणजेच राजविद्या-राजगुह्य-योग. त्याबद्दल अधिकचे पुढील भागात…

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥

प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन….
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे अर्जुना, या शरीरात मीच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

जर ब्रह्म अ-क्षर आहे तर जे क्षर आहे ते अधिभूत आहे.

तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां।
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक।

ज्ञानदेवांनी दोन ओळीत अधिभूताचे सुंदर वर्णन केलंय. पाच महाभूतांपासून जे बनते (पांच पांच मिळोनिया). जे दृष्य आहे. ज्याला आपण पाहतो आणि नावाने ओळखतो (नामरुपादिक) ते नाशवंत (वियोगवेळे भ्रंशे) भूतमात्र म्हणजे अधिभूत.

अधिदैवत म्हणजे काय?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा।
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे।

अधिदैवताला ज्ञानदेवांनी दुसरा परमात्माच म्हटले आहे. अधिदैव म्हणजे इंद्रियांना कार्यरत करणारी शक्ती. डोळ्यांना दृष्टी, त्वचेला स्पर्श किंवा नाकाला गंध देणारे तत्व म्हणजे अधिदैव.

अधियज्ञ
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः असे श्रीकृष्ण सांगतो.
येथे अधिभूत किंवा अधिदैव या कल्पना समजणे तितकेसे कठीण नाही. अधियज्ञ समजणे काहीसे अवघड आहे. मुळात त्यासाठी आधी ‘यज्ञ’ समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

यज्ञ
सर्वसाधारणपणे यज्ञ याचे आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे एक चौकोनी वेदी आहे ज्यात अग्नि तेवत आहे आणि ऋषीमुनी त्यात वरुन पळीने तुप ओतत आहेत. धार्मिक टिव्ही सिरियलमध्ये वगैरे याच कृतीला यज्ञ म्हणतात!! हल्ली अग्निहोत्र नावाचा एक घरगुती यज्ञाचा प्रकारही प्रसिद्ध (मराठीत पॉप्युलर) होत आहे. हा यज्ञ आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे. केवळ अग्निमध्ये आहुती देणे म्हणजे यज्ञ नव्हे. किंबहूना अग्नीमध्ये आहुती देणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे यज्ञ नाहीच. हे प्रतिक आले कुठुन मग?
यासाठी पुन्हा अक्षरब्रह्माकडे वळावे लागेल. अग्निला संस्कृतात ‘पावक’ असा शब्द आहे. पावक याचा अर्थ पावन किंवा शुद्ध करणारा. आपल्याला हे माहिती आहे की – सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्निमध्ये झाळतात. त्यामुळे त्यातील अशुद्ध तत्वे भस्मीभूत होऊन शुद्ध सोने प्राप्त होते. लोखंडही गाळून त्याचे पोलाद करताना शुद्धीकरणासाठी हाच अग्नि वापरतात. म्हणून कोणतीही गोष्ट शुद्ध करण्यासाठी, मग ते वातावरण का असेना, अग्निची योजना केली जाते. हे तथ्य आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. म्हणूनच अग्नि आणि शुद्धीकरण (आहुती) यांचा संबंध जोडून यज्ञाचे प्रतीक निर्माण करण्यात आले. यज्ञ हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मग ते वस्तु, वातावरण किंवा मनाचेही शुद्धीकरण असो. मन शुद्ध करणे किंवा शुद्ध मनाने किंवा उदात्त हेतूने केलेले कार्य म्हणजे यज्ञ….
म्हणूनच यज्ञाला यजुर्वेदात विश्वतोधार म्हटले आहे.

स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ आ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी । य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ सुवि॑द्वा सो वितेनि॒रे।

निघण्टुत यज्ञाची १५ अर्थपूर्ण नावे/प्रकार येतात.
यज्ञः, वेनः, अध्वरः, मेधः, विदर्थः, नार्यः, सवनम्, होत्रा, इष्टिः, देवताता, मखः, विष्णुः, इन्दुः, प्रजापतिः, धर्मः इति पञ्चदश यज्ञनामानि।।

(**जाता जाता हे सांगायला हरकत नाही की यातील ‘अध्वरः’ या शब्दाचा अर्थ तैत्तिरिय ब्राह्मणात अहिंसा असा दिलाय. यज्ञ हिंसेचे समर्थन करत नाही हे ध्यानात यावा हा हेतू)

कर्मयोगात म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम कर्माला यज्ञाची उपमा देतो किंबहुना कर्म हे यज्ञ समजून इदं न मम या भावनेने केल्यास त्याचे बंधन लागत नाही असे म्हणतो ते याच अर्थाने. सगळ्या निसर्गाच्या चक्राचा आधार हे असे यज्ञकर्म किंवा कर्मयज्ञ आहे हे ही तो सांगतो. (पहा कर्मयोग)

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।

आता अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हे समजणे कठीण जाणार नाही!
जीव आणि अजीव या दोन्हीच्याही द्वैतातून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. या दोन्हीच्याही सहाय्याने सृष्टीचे सर्जन करणारा मी या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व आहे. जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
साधे उदाहरण घेउ भक्त पायाने चालत देवदर्शनाला जातो. येथे भक्ताचे पाय हे ‘अधिभूत (जड तत्व)’ आहे. देऊळ जेथे देवाचे वास्तव्य (शक्ती/चैतन्य) आहे ते गन्तव्य स्थान हे ‘अधिदैव’ आहे. प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार हा ‘अधियज्ञ’ आहे. आता देवळात गेल्यावर आपल्याला जे पवित्र, शुद्ध आणि सात्विक वगैरे वाटते ते अव्यक्त असते. केवळ देवळात गेल्यावरच तसा अनुभव यावा का? देव तर सगळीकडे आहे. प्रत्यक्ष आपल्यातही आहे. मग पावित्र्य, सात्विक भाव हे आपल्याच अंतरी आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा जड आणि चैतन्य दोन्ही तत्वांच्या पार दिसायला लागते. जणु त्यांची आहुती पडते, बुद्धी शुद्ध होते आणि अधियज्ञ साकार होतो. म्हणजे आपल्याला आपल्यातीलच परब्रह्माची जाणीव होते.
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः हे श्रीकृष्ण म्हणतो ते या अर्थाने. अधि-आत्म (अध्यात्म) म्हणजे स्व-भाव जाणणे. अधियज्ञ म्हणजे स्वतःच स्वतःला पावन करणारा यज्ञ.
आता राहीला अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. प्रयाणकाली किंवा मरतेसमयी स्थिरमती व्यक्तीने काय जाणायचे आहे. उत्तर अगदी सोपे आहे. श्रीकृष्ण त्याला एक साधे तत्व सांगतो.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।
हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

मनुष्य अनन्यभावनेने ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तो अंतिमतः त्या अवस्थेला जाऊन मिळतो.
मराठीत एक छान म्हण आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस… ज्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्याला सतत त्याचेच प्रतिबिंब आजूबाजूला दिसते. वरवर धाडसीपणाचा आव आणणारे असे कितीतरी शूर वीर आपण आजूबाजूला पाहतो! ज्याच्या मनात शांत समाधानी भाव असतात त्याला आसमंतात त्याचाच प्रत्यय येतो. मग जो सातत्याने अनन्यभावाने परमात्म्याचे चिंतन करेल त्याला परमात्मा प्राप्त होणे सहाजिकच नाही का? तत्व साधे आहे. जसा भाव तसा देव! एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
भाव तोंचि देव ।ये अर्थी संदेह धरूं नका।
भाव भक्ति फळे भावें देव मिळे। निजभावें सोहाळे स्वानंदाचे।
भावचि कारण भावचि कारण ।यापरतें साधन नाहीं नाहीं।
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।मनोरथ कोडी पुरती तेथें।
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की,

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌।

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील.

(गंमतीचा भाग असा की या श्लोकांतील अनन्यभक्तीचा भाव वगळून केवळ ‘मामनुस्मर युध्य च’ हा भाग प्रसिद्ध करुन त्यायोगे गीतेत हिंसेचा प्रसार केला आहे असा भास करुन दिला जातो!! गीता किंवा एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या अयोग्य अन्वयार्थाबद्दल पुन्हा कधीतरी…..)

परमेश्वराच्या साक्षात्कार घडविणाऱ्या गीतेतील अध्यायांच्या गटातील अक्षरब्रह्मयोग येथेच संपन्न करुयात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

भगवद्गीता – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग

गीता शिकवत असताना हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की श्रीकृष्णाने गीता सांगायला १८ अध्याय का घेतले? जे काही सांगायचं ते श्रीकृष्णासारख्या विद्वानाला थोडक्यात सांगता आलं नसतं का? दोन चार अध्यायात आटपायचं ना! असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एखादे हसत खेळत गीता, किंवा सुलभ गीता गाईड वगैरे काहीतरी छापायला काय हरकत होती? आजच्या भाषेत सांगायचे तर एक छोटा युट्युब व्हिडीओ करायचा How to understand Gita in 5 minutes!!
सात आंधळ्यांची कथा आपल्यापैकी साधारण प्रत्येकाला माहिती आहे. जगभरातील जवळपास प्रत्येक संस्कृतीत ही कथा येते. कमी अधिक फरकाने या सर्व कथांचा मतितार्थही सारखाच आहे. हत्ती नक्की असतो कसा हे अनुभवण्यासाठी सात अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून आपले मत मांडतात. ज्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागतो त्याला हत्ती त्या आकाराचा असतो असे वाटते. कोणाला तो खांबासारखा तर कोणाला दोरी सारखा वाटतो इ. इ.
तात्पर्य काय की सातही आंधळ्यांना वाटलेले हत्तीचे स्वरुप हे अपूर्ण आहे. बरं सातही आकार जाणले म्हणजे हत्ती कळाला का? तर तसेही नाही. आकार हे केवळ एक परिमाण झाले. हत्ती जाणायाचा तर आकार, रंग, गंध, वृत्ती यासह सर्व बाजू जाणायला ह्व्यात. म्हणजेच माणसाला एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा घटनेचे खरे स्वरुप जाणून घ्यायचे असेल तर त्याला ते अनेक बाजूंनी समजून घ्यायला हवे. आपल्याला दिसणारी एकच एक बाजू म्हणजे सत्य नव्हे.
जैन दर्शनांतही ‘स्याद् वाद’ नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट तत्व आहे. त्याला ‘अनेकान्तवाद’ असेही म्हणतात. स्याद्वादी म्हणतात प्रत्येक वस्तुमध्ये (यात सगळे आले) असंख्य गुणावगुण असतात. ज्याला जे गुण अनुभवास येतात तो त्या गुणांच्या आधारे ती वस्तु जाणतो. याचा अर्थ त्याला केवळ व्यक्तीसापेक्ष ज्ञान प्राप्त होते. या असंख्य गुणावगुणांसकट जाणायचे तर त्या वस्तुला सात विविध आयामातून पाहणे आवश्यक आहे. हे सातही आयाम विभिन्न परीस्थितीतून वस्तुच्या गुणावगुणांचे ज्ञान करून देतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर कित्येकदा असा अनुभव येतो की आपण एखाद्या व्यक्तीला जसे समजत असतो त्याच्या अगदी विरुद्ध असे मत आपल्याला ऐकायला किंवा अनुभवायला मिळते. सार्वजनिक जीवनातल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण अनेक कथा, दंतकथा ऐकत असतो ज्यात एकात ती व्यक्ती नायक असते तर दुसऱ्यात खलनायक. वर्षानुवर्ष एखाद्याच्या संगतीत राहूनही ती व्यक्ती नक्की कशी आहे हे सांगणे कठीण जाते. कारण अनेकान्तवाद!!
संपूर्ण गुणावगुणांसकट एखादी व्यक्ती जाणणे इतके कठीण असेल तर मग प्रत्यक्ष गुणातीत परमेश्वराचे स्वरुप जाणणे किती कठीण असेल? गीता सांगायला श्रीकृष्णाने १८ अध्याय कशाला घेतले या प्रश्नाचे हे उत्तर आहे.
श्रीकृष्ण जसे सांगत जातो तसे अर्जुनाला त्या ज्ञानाचे वेगवेगळे आयाम दिसायला लागतात. त्यावर तो प्रश्न विचारतो आणि मग पुढील अध्यायात कृष्ण त्याचे निरसन करतो. विविध दृष्टिकोनांतून ज्ञान त्याच्यापुढे मांडतो. अशाप्रकारे अर्जुनाला ‘हत्ती’ सर्वबाजूंनी अगदी स्वभावासकट समजतो. आपल्यालाही ‘हत्ती’ जाणायचा तर अशाच प्रकारे प्रत्येक अध्यायातून तो वेगवेळ्या परिमाणातून जाणायला हवा.
गीतेच्या पहील्या सहा अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्व किंवा आत्मन् म्हणजे काय, तो कसा जाणायाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता कोणती याचे तत्वज्ञान सांगतो. पुढल्या सहा अध्यायातून ते ज्ञान कोणत्या स्वरूपात प्रकट होते याचे वर्णन श्रीकृष्ण करतो. अनेक अंगांनी श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या स्वरुपाचे तसेच स्व किंवा आत्मन् मधील त्या स्वरुपाचा साक्षात्कार घडवतो. ज्याला आपण मागील अध्यायात विज्ञान म्हणालो. सात निरनिराळ्या कल्पनांच्या अनेकान्तवादातून विज्ञान समजून घेणे म्हणजे अक्षरब्रह्मयोग….. ज्ञानविज्ञानयोगाच्या अंतिम श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः।।
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.

अर्जुनाला सहाजिक प्रश्न पडतो की अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतकाळी जाणणे म्हणजे काय?
अक्षरब्रह्मयोगाला याच प्रश्नांपासून सुरुवात होते. अर्जुन विचारतो की

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥

तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?
(किती प्रश्न झाले? सात!!! आंधळ्यांची संख्या किती सात…. अनेकान्तवादातील आयाम किती सात……. धर्म, भूगोल किंवा नाव बदलले तरी तत्वज्ञांचे विचार हे अंतिमतः एकाच सत्याच्या दिशेने जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.)
अर्जुनाच्या सात प्रश्नांची श्रीकृष्णानी दिलेली उत्तरे हा या अध्यायाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात श्रीकृष्ण, ज्ञानी भक्ताचे आपले निरुपण, जे मागील अध्यायात सुरु केले होते ते पुढे नेतो आणि अंतिम काही श्लोकात परमगती प्राप्त करण्याच्या दोन मार्गांची चर्चा श्रीकृष्ण करतो.

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या तीन संज्ञांचे अर्थ प्रथम श्रीकृष्ण सांगतो.
जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. क्षर आणि अक्षर असे दोन शब्द आहेत. यातला अक्षर आपल्याला माहिती आहे. मराठीत असे अनेक शब्द आहेत जे आपण बोलण्यात सहज वापरून जातो परंतु त्यांचे अर्थ खरोखर विलक्षण आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते! अक्षर हा असाच एक शब्द. क्षर याचा अर्थ नाशवंत किंवा ज्याला क्षय आहे असे. तर अक्षर याचा अर्थ ज्याचा नाश होत नाही किंवा जे शाश्वत आहे, अक्षय आहे.
आपल्याला माहित असलेले अक्षर तरी काय आहे. ज्याचा क्षर किंवा भाग पडत नाही ते. वर्णमालेतले कोणतेही अ-क्षर घ्या. जेव्हा आपण अक्षर म्हणतो तेव्हा त्याची अधिक फोड करता येत नाही. ते क्षर नसते म्हणून अक्षर…. म्हणूनच त्याचा उच्चार एका ध्वनीत होतो.
(येथे एक नवलाची गोष्ट सांगायला हरकत नाही. अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा सांगणारी ज्ञानेश्वरांची वाणी अजरामर झाली कारण ती ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणते. येथे अक्षर शब्दावरचा श्लेष हा भाषा आणि अक्षय तत्व या दोन्ही अर्थाने वापरला जातो. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानेश्वरीतील ज्ञान दोन्ही अक्षर आहे हेच तर ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक वापरलाय हे पाहिले की ज्ञानदेव योगीराज होते हे पटावे. असो)
सांख्ययोगात श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीव-अजीवातील अजीव म्हणजे ब्रह्म.. कारण ते अक्षर आहे. त्याचे विघटन होत नाही त्याची फोड करता येत नाही. त्याचे कितीही भाग केले तरी ते सर्व ब्रह्मच रहातात. अर्धे किंवा पाव ब्रह्म होत नाहीत. अंशात्मक असो की पूर्ण, ब्रह्म हे सर्वथा आणि सर्वत्र पूर्णच असते. बृहदारण्यक उपनिषदातील ॐ पूर्णमदः पूर्णमिदं ही प्रार्थनाही हेच सांगते.
हे झाले ब्रह्म मग अध्यात्म काय आहे?
एकदा ब्रह्म काय आहे हे समजले की अध्यात्म समजणे कठीण नाही. अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो स्व-भाव हा अजून एक वापरून बोथट झालेला शब्द….
स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे. वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो. श्रीकृष्ण सांगतो अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो असे श्रीकृष्ण सांगतो…..
अर्जुनाच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

ज्ञानविज्ञानयोग

पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।

अर्जुनविषादापासून आरंभलेला आपला प्रवास आता एक टप्पा पार करत आहे. आतापर्यंतच्या दहा भागात आपण भगवद्गीतेतील आत्मतत्व जाणण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट क्रमाने श्रीकृष्ण संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला उपदेश करतो. केवळ युद्धच नव्हे तर एकुणच आयुष्यात माणसाचा दृष्टीकोन कसा असावा याचे मार्गदर्शन या उपदेशाने प्राप्त होते.
माणसाचे आयुष्य हे एक निरंतर चालणारे द्वंद्वच आहे. दृष्य जगतातील बरेवाईट प्रसंग म्हणजेच ते द्वंद्व, असे मानून माणूस त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे केवळ एका पाठोपाठ एक अशा प्रसंगातून स्वतःला निभावून नेण्याचे कसब तो प्राप्त करतो. अखेर अनेक वर्षांच्या या अशा चकमकींनंतर त्याला हे उमगते की, ते युद्ध बाह्य जगाशी नसून अदृष्य अशा ‘स्व’शी आहे.
अर्जुनाला हीच जाणीव श्रीकृष्ण करून देतो. महाभारतात सतत युद्धे जिंकणाऱ्या अर्जुनाला कुरुक्षेत्रातही विजय मिळवण्याची खात्री असते. परंतु तरीही त्याला समाधान प्राप्त होत नसते. म्हणजे मग आपण आयुष्यभर केलेल्या युद्धांचे, युद्धकलेच्या अभ्यासाचे आणि एकुणच पार पाडलेल्या सर्व प्रसंगांचे फलित काय? जगण्यासाठीची धडपड करणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की – जन्मापासून शिक्षण, व्यवसाय, कुटुंब, उपजिविका, मालमत्ता, या सगळ्यांसाठी सतत संघर्ष करूनही जर अल्पजीवी समाधान मिळत असेल तर नक्कीच ते समाधान या सगळ्यांत नाहीये. खरं समाधान अंतरी आहे जे द्वंद्व आपण लढलोच नाही!
गीतेच्या अभ्यासाला याच प्रश्नावर अर्जुनाची आणि आपलीही सुरुवात होते. मग युद्ध करण्यास तयार नसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण सर्वप्रथम शरीर आणि आत्मा यांचे द्वैत समजावून सांगतो. देह नश्वर आहे आणि आत्मा शाश्वत आहे याचे ज्ञान करून देतो. मनुष्याचा केवळ कर्मावर अधिकार आहे त्याच्या फळावर नाही. त्यामुळे त्याने केवळ निःसंग वृत्तीने कर्म केले पाहीजे. त्यासाठी स्थिर प्रज्ञा हवी. अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी लागणारी संन्यस्त वृत्ती आणि त्यासाठीचा आत्मसंयम… अशाप्रकारे एकेका अध्यायातून आत्मज्ञानाची उतरंड श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर उभी करतो.
गीतेच्या अध्यायांची विभागणी करायची झाल्यास पहिले सहा अध्याय हा एक विभाग होईल. यात आत्मज्ञान किंवा स्वतःला जाणण्याची प्रक्रिया विस्तृतपणे मांडली आहे. माणसाच्या शाश्वत सुखाचा मार्ग अंतस्थ द्वंद्वात आहे आणि ते द्वंद्व कसे लढायचे याचे ज्ञान म्हणजे गीतेचा पहिल्या सहा अध्यायांचा विभाग. यात अर्जुनविषादाखेरीज सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास,कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोगाचा समावेश होतो. आत्मज्ञान म्हणजे स्वतःतील ईशतत्व जाणण्याचे ज्ञान. अशा ज्ञानी व्यक्तीला हेच ईशतत्व आपल्यासह प्रत्येक चराचर सृष्टीत अंशरुपाने वास करून राहते याचा प्रत्यय येतो. दृष्य सृष्टी ही भगवंताच्या मायेचा भाग आहे. त्या मायेच्याही पलिकडे असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार होणे म्हणजे विज्ञान. प्राप्त ज्ञानाचा प्रत्यय येणे म्हणजे विज्ञानयोग.
ज्ञानविज्ञानयोगात भगवंत पदार्थातील आपल्या वास्तव्याचे स्वरुप समजावून सांगतात. आत्मज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला सृष्टीचे व्यापक स्वरूप जाणता येते. चराचर सृष्टीचे आधारभूत तत्व एकच आहे हे त्याला जाणवते. ज्याला आपण विज्ञान (विशेष ज्ञान) म्हणुयात. जे दिसते ते आणि जे असते ते या दोन गोष्टींची जाण असणे म्हणजे विज्ञान. असे भगवंत सांगतात. आपण Science (विज्ञान) म्हणतो ते तरी दुसरे काय सांगते! दृष्य पदार्थ आणि त्यामागचे तत्व.
आपल्या स्वरुपाचे वर्णन करताना श्रीकृष्ण परा आणि अपरा अशा दोन प्रकृतींचा उल्लेख करतो. अपरा म्हणजेच समोर दिसणारी. जे आपल्याला समोर दिसते आणि जे आपल्या मन आणि बुद्धीने जाणता येते त्याला अपरा म्हटले आहे.

(**जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागलेली दृष्य प्रकृती म्हणजे अपरा होय.

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेली दृष्य सृष्टी जी मन, बुद्धी आणि अहंकाराच्या माध्यमातून आपण जाणतो.
परा म्हणजे याच सृष्टीला गतिमान करणारे चैतन्य. जे आपल्याला दिसत नाही परंतु त्याचे अस्तीत्व जाणवते. परा म्हणजे दृष्टीच्या पलिकडे असणारे.

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌।

साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास
जिवंत व्यक्ती डोळ्यांच्या माध्यमातून पाहते. हाच अवयव मृत व्यक्तीलाही असतो पण त्याला दिसत नाही. मग दोन्हीत फरक कशाचा आहे तर चैतन्याचा…
परा म्हणजेच आपल्याला न दिसणारी परंतु अस्तीत्व असणारी माझी प्रकृती आहे असे श्रीकृष्ण सांगतो. याची उदाहरणे देत म्हणतो – “मी पाण्यातील रस आहे ,अग्नीतले तेज आहे आणि चंद्रसूर्यातील उर्जा…..”

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु।

दृष्याच्या पलिकडची ही प्रकृती जाणणे हे विज्ञान आहे. श्रीकृष्ण म्हणतो सृष्टीतील परा किंवा चैतन्य म्हणजे माझाच अंश असल्याने सृष्टीचे सनातन कारण मीच आहे. मग हे जाणण्यात चुकते कुठे. माया…..
श्रीकृष्ण पुढे सांगतो या सृष्टीत मनुष्याला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती या गोष्टींच्या आसक्तीत अडकतो आणि त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहतो. आसक्तीच्या पलिकडे जाऊन शाश्वत काय आणि नश्वर काय याचा विचारच बहुसंख्यांना पडत नाही. असे मोहावश लोक केवल प्राप्य वस्तूकडे पहात राहातात आणि दृष्याच्या पलिकडील चैतन्यस्वरूपाकडे पाठ फिरवतात. कृष्ण म्हणतो अशी ही अलौकीक माया तरून जाणे केवळ अशाच व्यक्तीला शक्य आहे जो अनन्यभावाने माझी निरंतर भक्ती करतो.

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।

भक्त….
भक्तांचे चार प्रकार श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी.

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।

अर्थार्थी हा काहीएक प्राप्तीसाठी भक्ती करतो, तर आर्त भक्त संकटात देवाला आळवतो, जिज्ञासु भक्त भगवंताला जाणण्यासाठी भक्ती करतो तर ज्ञानी भक्त मात्र अनन्य भगवंताचे स्वरूप तत्वतः जाणतो आणि त्या स्वरुपाची भक्ती करतो. म्हणून भगवंताला तो अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण म्हणतो.
पण मग इतर भक्त गैर आहेत का? अर्थातच नाहीत. ज्यांचे देव वेगळे आहेत ते चुकत आहेत का? तर तसेही नाही. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात एक ऋचा आहे

इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्य: स सुपर्णो गरुत्मान्।
एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:।

सत्य किंवा परमात्मा एकच आहे. त्याला लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात.
श्रीकृष्ण सांगतो की काळाच्या ओघात धर्मामध्ये अनेक देव, देवता, अवतारांचा उगम झाला. जसे ऋग्वेदातही इंद्र, मित्र, वरुण यासारख्या देवता होत्या. परंपरेनुसार लोक यातील कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती करत आले आहेत. हे अर्थार्थी, आर्त किंवा जिज्ञासु भक्त होत. जे आपल्या कामनापुर्तीसाठी कोण्या एका देवतेची प्रामाणिकपणे भक्ती करतात. यात गैर काहीच नाही. किंबहुना अशा भक्तांना त्यांच्या भक्तीनुसार योग्य ते फळही मी देतो. जेणेकरून त्या भक्ताची त्या देवतेमधील श्रद्धा दृढ होते.

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्।
‌ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते। लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्‌।

अशा भक्तांचा मार्ग हा किंचीत अधिक लांबतो. निरनिराळ्या नावाच्या मूर्त स्वरूपातील देवतांची भक्ती करणारा भक्तालाही शेवटी भगवद्स्वरूप एकच आहे याचा बोध होतो. दृष्य आणि नश्वर फल देणारा देवही अंतिमतः त्याच परमात्म्याचा अंश आहे हे जाणल्यानंतर मग तो भक्त सकाम भक्तीतून निष्काम भक्तीकडे वळतो.
ज्ञानी भक्ताला मात्र या नश्वर सृष्टीतला कोणताच लाभ नको असतो. या मायेपासून दूर रहात केवळ अनन्यभावनेने परमात्म्याची भक्ती करतो. म्हणून तो मला अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण सांगतो.

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।

अशाप्रकारे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या दृष्य सृष्टीतही भगवंताचे अंशात्मक अधिष्ठान आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान आणि त्या सृष्टीचा मोह त्यागून तिच्या मायेपलीकडच्या भगवंताला जाणणे म्हणजे विज्ञान हे भगवंत स्पष्ट करतात.
अशा विज्ञानी भक्तीचे उदाहरणच कबीराच्या सुंदर शब्दात पाहूयात.

पंडित शोधि कहो समुझाई, जाते आवागमन नशाई।
अर्थ धर्म औ काम मोक्ष कहु, कौन दिशा बसे भाई।
उत्तर कि दक्षिण पूरब की पश्चिम, स्वर्ग पताल कि माहीं।
बिना गोपाल ठौर नही कतहुँ, नर्क जात धौं काही।
अनजाने को स्वर्ग नर्क है, हरि जाने को नाही।
जेहि डर से भव लोग डरतु है, सो डर हमरे नाही।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।

पोकळ शास्त्रचर्चा करणाऱ्याला कबीर म्हणतात हे पंडीता असे काही ज्ञान दे की ज्याने जन्ममरणाचे बंधन (आवागमन) नष्ट होईल. हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, स्वर्ग, नरक वगैरे मंडळी कोठे असतात बाबा? आम्हाला काय कळणार? जर तुझे हे ब्रह्म सर्वत्र आहे तर मग जिथे नास्तिक मंडळी जातात तो नरक कुठे असतो? बाबा रे जो अंतरीच्या ‘हरी’ ला जाणत नाही त्याला स्वर्गही नरकच आहे आणि जो त्याला जाणतो त्याला स्वर्ग काय आणि नरक काय!!!!! आम्हाला हे ठाऊक आहे की आमच्या अंतरंगात ‘तो’ आहे म्हणून आम्हाला ना स्वर्ग हवा ना नरक…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १० पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।

महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
कालिदासाच्या कुमारसंभवातील पाचव्या सर्गात खरेतर मजेदार संवाद आहेत. परंतु नांदीचा हा श्लोक मात्र एक गंभीर बोधवाक्य बनून गेला! त्याचे कारण या श्लोकाचा अंतिम चरण

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे….

योगारूढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते त्याची सुरुवात ही अर्थातच ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करुन होते.
भगवंत सांगतात की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शारीर क्रियांमध्ये प्रथम हवे. कारण

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्या तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो

‘अति सर्वत्र वर्जयेत्’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारिरीक क्रियातील अती ला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यासारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीरच मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
अशा प्रकारे भौतिक आणि अधिभौतिकाचा सुंदर मेळ घालण्याचे कार्य श्रीकृष्ण करतो.
अनेकदा असा प्रश्न पडतो की मानवासहित निसर्गातील प्रत्येक घटक हा ईश्वराचीच देणगी असेल तर मग त्याचा अव्हेर करून संन्यासी बनण्यात काय हशील आहे? श्रीकृष्णाच्या लेखी योगी यातील कशाचाच अव्हेर करत नाही. रंग, रस, गंध,नाद या सर्व माध्यमातून जीवनातला आनंद योगीही लुटतोच परंतु त्याचे मन या कशाचाही आहारी जात नाही, अतिरेक करत नाही. बाह्य सृष्टीतील सुख आणि त्याचप्रमाणे दुःखही नश्वर आहे याची त्याला जाणीव असते. परमात्मप्राप्तीचा आनंदच केवळ शाश्वत असा आनंद आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी जागरुकतेने प्रयत्न करतो.
भारतीय तत्वज्ञानाच्या बाबत असा एक गैरसमज पसरलेला दिसतो की त्यात केवळ संन्यस्त वृत्तीचा अंगिकार केलेला आहे. भौतिक किंवा गोचर सृष्टी म्हणजे माया आणि तिचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यासी होणे असा टोकाचा अर्थ घेतला जातो. भारत म्हणजे संन्यासी, साधू, अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करणे, अस्थिपंजर झालेले योगी….. असेच चित्र रंगवले जाते.
श्रीकृष्णाचे मत या विचाराला छेद देते. वेदकालापासून प्रत्येक तत्वज्ञाचा दृष्टिकोन हा सृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप जाणण्याचा होता. ब्रह्म जाणणे केवळ अंगाला राख फासून साधू झाल्यानेच प्राप्त होते असे त्यांनी कधीच मानले नाही. आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला त्यांनी जाणलं आणि त्याला ब्रह्म मानलं. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… गायनाचार्य पलुस्करांच्या एक गोष्टीचा संदर्भ येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही.

एकदा गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर जंगलातून प्रवास करत असताना एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील!!”
येथे नादब्रह्माची उपासना करणारा गायक आणि परब्रह्माची उपासना करणारा संन्यासी दोघेही योगीच मानले गेले आहेत. कलाकारालाही आणि संन्यास्तालाही पथ्ये पाळून आणि अति टाळून योगी होता येते हेच श्रीकृष्णाला येथे सांगायचे आहे. एकाला साधनेसाठी शरीरनियमन आवश्यक आहे तर दुसऱ्याला रियाजासाठी! भगवत्प्राप्तीसाठी प्रत्येकाने संन्यास घेऊन जंगलाचाच मार्ग स्वीकारायला हवा इतका एकांगी विचार मांडण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली नाही.
हे अर्थातच सोपे नाही याची श्रीकृष्णाला जाण आहेच. अर्जुनही ती बोलून दाखवतो. सगळेच जण गायनाचार्य किंवा सिद्धयोगी होत नाहीत. प्रयत्न करुनही अनेकजण मनावर विजय मिळवू शकत नाहीत मग असे लोक मार्गातून विचलित होतात. त्यांना पापी समजायचे का?

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि।।
जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?

अर्थातच नाही. आत्मोद्धारासाठी कर्म करणारी व्यक्ती अधोगतीला प्राप्त होत नाही. जरी तो आपल्या उद्दीष्ट्यापर्यंत पोचू शकला नाही तरी केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या फलस्वरुप त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि कालांतराने तो आपले ध्येय साध्य करतो असे श्रीकृष्ण सांगतो. कर्मसिद्धांताच्या तर्कानेही पाहिले तर हे पटावे की उत्तम कर्माची फलेही उत्तमच असतात. मग ते कर्म जर भगवत्प्राप्तीच्या उद्देशाने केले तर त्याचे फलस्वरूप सकाम कर्म करणारा भक्तही कालांतराने भगवंताशी एकरुप होतोच.
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो. जीवनाचा आस्वाद घेत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हे खरे ज्ञान आहे कारण सर्वाभूती परमेश्वर आहेच म्हणूनच मग त्याचे स्वरुप कलेतून, तपस्येतून, कर्मातून किंवा निव्वळ भक्तीतूनही जाणता येईल. आवश्यक आहे तो त्या त्या मार्गावरील साधकाचा आत्मसंयम…….

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version