अथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही

अथेनियन अगोरा (Ancient Agora – Athens)

पाश्चात्य जगाला ज्ञात असणाऱ्या लोकशाहीचे अथेन्स (Athens) हे उगमस्थान मानले जाते. साधारण इ.स.पू. ६ व्या शतकापासून अथेन्स (Athens) राज्यात लोकशाही अस्तीत्त्वात आली आणि नंतर इतर ग्रीक राज्यांध्येही त्याचेच अनुकरण केले गेले असे मानतात. गंमतीचा भाग असा की गुलामगिरी आणि लोकशाही दोघीही प्राचीन अथेन्समध्ये एकत्र नांदत होत्या!! निवडणूकीपासून ते व्यापारावरील सरकारी नियंत्रणापर्यंत आपल्याला आज ज्ञात असणाऱ्या अनेक व्यवस्था अथेन्सी लोकशाहीचा भाग होत्या. पालिका, कार्यालये, समित्या, नोकरशहा, लोकप्रतिनिधी, समर्थक, विरोधक,मतदार आणि मतदान अशा सर्व संस्था अथेन्सवासीयांनी उभ्या केल्या होत्या. सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रौढ अथेन्सवासीयांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. मतदानाप्रमाणेच आपली मते मांडणे, सभा घेणे, भाषणे , वादविवाद करणे हा अथेन्सवासीयांचा आवडता कार्यक्रम होता. वादविवादासाठी प्रसिद्ध असलेले सॉक्रेटीस (Socrates), डेमॉस्थेनस (Demosthenes) सारखे तत्वज्ञ याच परंपरेतले. अशा भाषण, वादाविवाद, चर्चा, सभा, परिषदा इ. शहरांच्या मध्यवर्ती भागात होत असत. प्रशासक, नगरपालिका सदस्य, प्रतिष्ठित नागरीक, या सगळ्यांचा राबता असणारे हे ठिकाण म्हणजे अगोरा (Agora) किंवा आजच्या भाषेत शहराचा मध्यवर्ती भाग (मराठीत City Centre, किंवा CBD!). प्राचीन ग्रीकांच्या प्रत्येक शहरात असे ठिकाण असे. बाजारपेठ, सरकारी कार्यालये, सांस्कृतीक कार्यक्रम आणि गप्पांचे अड्डे यांचे एकत्रित संकुल म्हणजे अगोरा (Agora). अथेन्सच्या मधोमध ॲक्रॉप्लिसच्या दिशेने जाणाऱ्या प्राचीन अथेन्स महामार्गाच्या (Panathenaic Highway) दोन्ही बाजूला हे अगोरा (Agora) बांधले गेले होते. ज्याचे अवशेष आजही पहायला मिळतात. काय काय आहे या संकुलात…
निरनिराळ्या काळात बांधलेली नाट्यगृहे, चर्चेसाठीची आवारे, सरकारी कचेऱ्या, दुकाने, कारंजी, बागा, मंदिरे इतकेच काय पण एक टांकसाळ (mint) सुद्धा होती. ग्रीकांच्या व्यवस्था किती प्रगल्भ होत्या हे दर्शवणारी काही विशेष कार्यालये होती. जसे – दुकानांत तोलल्या जाणाऱ्या मालासाठीची प्रमाणीत वजने बाळगणारे पालिकेचे कार्यालय होते. येथे येऊन ग्राहक आपल्याला दिलेला माल योग्य वजनाचा असल्याची खात्री करू शकत असे. नगरपरीषदेच्या सदस्यांना बसण्यासाठी एक कार्यालय होते. त्यात राहण्याचीही सोय होती. नगरपरिषदेचा किमान एकतरी सदस्य येथे आळीपाळीने वास्तव्यास असे. जेणेकरून जनतेचा प्रतिनिधी नागरीकांना कोणत्याही वेळी उपलब्ध होई. याच ठिकाणावरून अथेन्सपासूनची भौगोलिक अंतरे प्रमाणीत केली जात असत. उदा. अथेन्सपासून स्पार्टापर्यंतचे (sparta) अंतर मोजायचे तर त्याचा आरंभबिंदू (zero point) अगोरा (Agora) मानला जाई!! ग्रीकांची लोकशाही किती विचारपूर्वक उभी केलेली होती हे या व्यवस्थेवरून स्पष्ट होते.
पारंपारीक अथेन्स-उत्सवाच्या (Athenian Festivals) दिवशी काढलेली मिरवणूक याच परीसरातील मार्गावरून पार्थेनॉनला जात असे. दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नलिका, चढण असलेल्या मार्गाला आधार, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी असे संपूर्ण नियोजित बांधकाम अगोरात आढळते. शेकडो वर्षे हा भाग त्याचं महत्व टिकवून होता आणि सतत नवनवीन बांधकामं स्वीकारत होता. लहान मुलांच्या खेळणी, स्वयंपाकाची उपकरणे, विक्रीला आलेल्या वस्तू, विनिमयाच्या नाण्यांपासून ते पार कालमापक घटीका आणि मतदान/निवडणूक यंत्रापर्यंत अनेक वस्तू येथे केलेल्या प्रदीर्घ उत्खननात सापडल्या आहेत. वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.

प्राचीन अगोराच्या मधोमध – पॅन अथेनियन महामार्ग – अथेन्स उत्सवाची मिरवणूक याच मार्गावरून वर टेकडीवर दिसणाऱ्या पार्थेनॉनला जाई.
काही एकरात पसरलेला अगोराचा उत्थनन केलेला परीसर. उजव्या बाजूला बाजारपेठेची पुनर्बांधणी केलेली इमारत
प्राचीन बांधकामांचे अवशेष
अगोराच्या मध्यभागात इ.स.पू. १०० मध्ये बांधलेल्या बाजारपेठ आणि फेरफटका मारायच्या जागेचे अवशेष
(थॉलस) Tholos या गोलाकार इमारतीचे अवशेष. नगरसेवक येथेच वास्तव्यास असत
मोहेंजोदारोची आठवण करून देणारी, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेने बांधलेली गटारे.
विहीर – पाणी ओढून काढल्याने उमटलेले दोरीच्या खुणाही दिसत आहेत.
इ.स.पू १५ मध्ये रोमन सिनेटर अग्रिपा (Agrippa) ने बांधून दिलेल्या थिएटरच्या बांधकामातील एक स्तंभ (कोरिंथिअन शैली)
अगोराच्या मध्यभागी, बारा ऑलिंपिअन देवतांचे पुतळे स्थापन केलेले मंदिर. इ.स.पू. ५२२
ग्रीक कोरीव कामाच उत्कृष्ट नमुना दाखवणारा ऑलिंपिअन देव. हाच अथेन्सचा भौगोलिक मध्य (Zero Point) मानला जाई
(ग्रीकांचा लोहार, आग आणि तंत्रशाळेचा देव) – (Hephaestus) हेफेस्टसचे देऊळ. अथेन्समधील प्राचीन मंदिरातील सगळ्यात जास्त सुस्थितीत राहिलेले मंदिर. इ.स.पू. ४४९
भिंतींवरील शिल्पे ग्रीक शैलीतील मंदिरांची खास रचना
मंदिराचा अंतर्भागातील रचना
भिंतींच्याच संगमरवरी दगडातील खास कोरीव कला… सेन्टॉर (Centaur) (आपले हॅरी पॉटरवाले!)
मंदिराच्या आतील स्तंभ आणि गर्भगृहाचा भाग
गर्भगृह, हा भाग इ.स. ७ व्या शतकापासून बराच काळ चर्च म्हणून वापरला गेला.

जवळपास १२ स्तरांपर्यंत केलेल्या उत्खननातून अथेन्सच्या अगोराच्या परीसरात अनेक अवशेष, वास्तू आणि वस्तू सापडल्या. साधारण इ.स.पू. ३००० पासून ते इ.स. १५०० पर्यंतच्या अशा अनेक वस्तूंचे एक संग्रहालय अगोराच्याच परिसरात उभे आहे. पर्गमॉन (Pergamon) चा राजा अटोलास (Attalos) याने इ.स.पू. १५० च्या आसपास बांधून दिलेल्या बाजारपेठेच्या जागेची पुनर्बांधणी करून त्यात हे म्युझियम (museum) वसवले आहे. जवळपास १५०० च्या आसपास वस्तुंचा संग्रह येथे आहे त्यातील केवळ प्राचीन अथेन्सच्या मोजक्या खुणा पाहू…

Kleroterion क्लॅरोटेरिअन – प्राचीन ग्रीक निवडणूक यंत्र.
ॲरिस्टॉटलच्या Constitution of the Athenians या ग्रंथात वर्णन केलेल्या  निवडणूकीच्या यंत्राचे उत्खननात मिळालेले अवशेष. संपूर्ण उभ्या आयताकृती यंत्रात जवळपास ५०० खाचा आणि एक नलिका असून त्याला लाकडी चौकटही असे. एकाच वेळी ५०० इच्छुक सदस्य किंवा नागरीकांमधून न्याय, अर्थ, प्रशासन वगैरे निरनिराळ्या समित्यांचे अधिकारी निष्पक्षपणे निवडण्याचे काम या यंत्रातून केले जाई. बाजूला ठेवलेल्या चकत्यांवर इच्छुक आपले नाव लिहून चकती यंत्रात खोचून ठेवत असे. नंतर फासे किंवा दोन रंगातील गोळे वापरून यंत्रातील चकत्या यादृच्छिकपणे (Randomly) निवडल्या जात असत.
वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे प्राचीन घटिकापात्र. इ.स.पू. ५वे शतक वरच्या पात्रातील सगळं पाणी खाल्यच्या पात्रात पडलं की वेळ संपली. चित्रातील पात्रात ६.४ ली पाणी मावते म्हणजे साधारण सहा मिनिटांसाठी वापरत असत. शेवटचा थेंब पडला की वक्त्याची किंवा भाषणाची वेळ संपली…
स्वयंपाकाची प्राचीन साधने (आधुनिक साधने तरी काय वेगळी असतात म्हणा!) इ.स.पू. ६वे शतक
प्राचीन भट्टी (Barbecue ?!) आणि ट्रे. इ.स.पू. ६वे शतक धातूच्या सळ्या आधुनिक आहेत, उपयोग समजण्यासाठी
हे काय आहे हे सांगण्याची गरज नाही, बाजूचे चित्र पुरेसे बोलके आहे… इ.स.पू ६५०

अथेन्समधील अशीच इतर म्युझियम्स अंतिम भागात पाहू……

मागील भाग – संस्कृतीचे स्तंभ – अथेन्स

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी

डेल्फी (Delphi)…….

जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा ग्रीसचा नवा तरुण सत्ताधीश अलेक्झांडर (Alexander the Great) डेल्फीच्या (Delphi) देवळाच्या दारात उभा होता. डेल्फीच्या महान पुजारीणीने (ओरॅकल) (Oracle) आपले भविष्य वर्तवावे या इच्छेने. जग जिंकण्यासाठी अपोलोच्या (Apollo) देवळाचा कौल त्याला आवश्यक वाटत होता. ओरॅकलच्या केवळ एका शब्दावर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा जोम कैकपटीने वाढला असता!! आजवर कित्येक महान सम्राटांनी या देवळाच्या पायरीवर आपली डोकी टेकवली होती. डेल्फीच्या शब्दाचं महत्व आणि सामर्थ्य साऱ्या जगानं अनुभवलं होतं. अलेक्झांडरला याची जाणीव होती म्हणून तर तो या देवळाच्या चौथऱ्यावर तिष्ठत होता.
“नाही……!!ओरॅकल (Oracle) आज होणार नाही………….!!!!” आतून निरोप आला…
वर्षातून केवळ काही दिवसच भविष्यवाणी वर्तवण्याची परंपरा होती ओरॅकलची. त्यातही देवाचा कौल घेणं न घेणं, भविष्य वर्तवणं न वर्तवणं हा पुजारीणींच्या लहरीचा भाग होता. दारात कोण उभा आहे याची फिकीर करण्याची त्यांची पद्धत नव्हती. गेली ५०० वर्ष लायकर्गससारख्या (Lycurgus) थोर राजापासून ते अगदी अलेक्झांडरच्या वडलांपर्यंत सगळ्यांनी याच लहरी स्वभावापुढे मान तुकवून भविष्यं ऐकली होती.
नाही……….??
असं काही ऐकायची अलेक्झांडरलाही सवय नव्हती… त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ओरॅकलइतकाच तोही लहरी आणि माथेफिरू होता. जग जिंकायचं तर सत्ता गाजवण्याची उर्मी किती प्रबळ असावी लागते हे त्याने दाखवूनच दिलं. केसाला धरून पुजारीणीला फरफटत मंदिराच्या आवारात त्याने आणलं आणि बळजबरीने भविष्य तिच्या तोंडून बाहेर पडलं……

“ἀνίκητος εἶ ὦ παῖ. (बाळा तू अजिंक्य आहेस)”

ओरॅकलने बळजबरीने वर्तवलेलं भविष्यही खरं ठरलं आणि अलेक्झांडर, ‘द ग्रेट’ झाला.
अशा खिळवून ठेवणाऱ्या अनेक कथा दंतकथांचं डेल्फी (Delphi)…….. भविष्याचा वेध घेणारं. गुढ, दुर्बोध, लहरी आणि तरीही आकर्षक…… ग्रीकांच्या अपोलोचं देवस्थान! अपोलो (Apollo) हा ग्रीकांचा कला, ज्ञान, सूर्यप्रकाश, भविष्यकथन, पशुपक्ष्यांचे कळप आणि थवे यांचा देव.
अथेन्सपासून साधारण २०० कि.मी. अंतरावर असणाऱ्या पार्नासस ( Mount Parnassus) डोंगरांवर डेल्फीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या परिसराबद्दल ग्रीक पुराणांत अनेक गोष्टी आहेत. देवांचा राजा झ्यूसने पृथ्वीचा मध्यभाग शोधण्यासाठी दोन गरुड सोडले. पृथ्वीच्या दोन टोकांकडून एकाच वेळी एकाच वेगाने जाणारे हे गरुड ज्या ठिकाणी एकमेकांला भेटतील तो पृथ्वीचा मध्य किंवा नाभी असे त्याने ठरवले. ते गरुड डेल्फीच्या डोंगरावर समोरासमोर आले. म्हणूनच हा भाग संपुर्ण जगाचा मध्यभाग (नाभी) आहे असे म्हटले गेले. अशी एक कथा आहे. या भागाच्या संरक्षणासाठी असलेल्या सापावरून (Python) या भागाला पायथो (Pytho) असे नाव पडले आणि म्हणून डेल्फीच्या प्रसिद्ध पुजारीणीला पिथिया (Pythia) म्हणतात. अशीही एक कथा आहे.
इ.स.पू ८ व्या शतकापासून डेल्फी (Deplhi) आणि ओरॅकलच्या (Oracle) अस्तीत्वाबद्दल उल्लेख सापडतात. म्हणजे अलेक्झांडरच्याही आधी जवळपास ५०० वर्ष….!! आणि तेव्हापासून अनेक थोर ग्रीक, रोमन,इतर सम्राट, राज्यकर्ते आणि प्रशासक डेल्फीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आले. यात प्राचीन स्पार्टाच्या लायकर्ग (Lycurgus) पासून ते पार रोमच्या निरोपर्यंत (फिडलवाला!) बऱ्यावाईट अनेक सम्राटांचा समावेश होतो. साहित्यिकांनाही डेल्फीचं आकर्षण होतंच. असिक्लिस (Aeschylus), ॲरिस्टॉटलपासून (Aristotle) ते पार शेक्सपिअरपर्यंत (Shakeshpeare) अनेकांनी आपल्या ग्रंथात, नाटकात डेल्फीचा उल्लेख केलाय. थेमिस्टोक्लेआ (Themistoclea) ही पुजारीण तर आपल्या प्रमेयवाल्या पायथॅगोरसची (Pythagoras) गुरु होती असे म्हणतात. सॉक्रेटिस (Socrates) हा जगातला सगळ्यात बुद्धीमान/शहाणा व्यक्ती असल्याची आकाशवाणीही अशाच एका पुजारीणीने केली होती. प्राचीन जगतात इतकी प्रसिद्ध असणारी दुसरी जागा क्वचितच आढळते.
डेल्फीला येऊन ओरॅकल ऐकणे हा एक पारंपारीक सोहळाच होता. जातकांची क्रमवारी लावणे, त्यांना प्रश्न नीट तयार करून देणे, त्यांना शुचिर्भूत करणे, ओरॅकलसमोर वागायचे तसेच नजराणा अर्पण करण्याचे शिष्टाचार शिकवणे, ओरॅकलच्या काव्यात्म भविष्याचा अर्थ लावणे ही सर्व कामे करणारी व्यवस्थाच अस्तीत्त्वात होती. भेटी आणि नजरण्यांच्या राशीच्या राशी डेल्फीत येऊन पडायच्या. अथेनियन्स, स्पार्टन्स, आर्केडियन्स, मॅसेडोनियन्स – प्रत्येक ग्रीक राज्यांमध्ये डेल्फीवर आपली छाप पाडण्याची स्पर्धाच असायची. भव्य पुतळे, सभागृहं, स्तंभ अशा अनेक डोळे दिपवणाऱ्या भेटींचा वर्षाव डेल्फीवर व्हायचा. युद्धातले विजय, नवीन राज्यारोहण, डेल्फीतील खेळांच्या स्पर्धा, अपोलोचा उत्सव अशा प्रत्येक प्रसंगाची आठवण म्हणून देवस्थानाला भेटी दिल्या जात असत. एका राज्याने मोठी भेट दिली की दुसऱ्याने त्यापेक्षा काहीतरी आगळेवेगळे करायचा प्रयत्न केलाच म्हणून समजा. डेल्फीचा डोंगर चढताना प्रत्येक वळणावर असलेले खजिन्यांची (treasury) बांधकामं देवस्थान किती संपन्न होते हे दर्शवते. इतकं करूनही आपलं भविष्य ऐकण्याची संधी मिळण्याची खात्री नाही ती नाहीच!!!
प्रत्यक्ष भविष्यकथनाच्या दिवशी व्रतस्थ पिथिया देवळातल्या एका विशिष्ट गाभाऱ्यात एका तिपईवर बसून काव्यात्म वाणीत भविष्य सांगत असे. असं म्हणतात की या गाभाऱ्यात एक विवर होते ज्यातील वाफ किंवा धुरामुळे ओरॅकल संमोहीत होत असे आणि तिच्याकरवी देव अपोलो स्वतः भविष्य वर्तवत असे. त्या काव्याचा अर्थ लावण्याचे काम तिच्या इतर सहकाऱ्यांकडे असे.
मंदिराच्या दर्शनी भागात ही वाक्यं कोरलेली होती……
γνῶθι σεαυτόν – Know Thyself – स्वतःला ओळखा
Μηδὲν ἄγαν – Nothing in Excess – (गरजेपेक्षा) जास्त नाही.
डेल्फी (Delphi) मोठं का होतं याची खूण ही वाक्यं पटवून देतात. महत्वाकांक्षेपायी डेल्फीच्या पायरीवर येणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तीला त्याच्या क्षणिक अस्तीत्वाची जाणीव करुन देणारी वाक्यं………..
डेल्फी केवळ गुढ भविष्य सांगणारी जादूची गुहा नव्हती तर ज्ञानाचा प्रकाश देणारी अपोलोची शाळा होती. डेल्फीच्या पुजारीणी जितक्या लहरी तितक्याच बुद्धीमान आणि द्रष्ट्या होत्या. निर्भिडपणे सत्य सांगणाऱ्या होत्या. स्वतःच्या आईला ठार मारणाऱ्या रोमन सम्राट नीरोला ‘तुझं येणं मंदिराला लांच्छनास्पद आहे, चालता हो’ असं स्पष्टपणे सांगण्याची धमक त्यांच्या अंगी होती. निरोने त्याच पुजारीणीला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली. याची पुरेपुर जाणीव असूनही मंदिराच्या लौकीकाला बाधा येईल असं वर्तन त्यांनी केलं नाही.

डोंगरमाथ्यावर वसलेले हेच ते अपोलोचे मंदीर आणि जगाचा मध्यभाग (नाभी)
पायथ्याशी आलेल्या जातकांचा पहिला स्टॉप…
पायथ्याशी असणाऱ्या याच खोल्यांमध्ये (Chambers) जातकांची वर्गवारी, प्राथमिक शिक्षण आणि प्रश्न लिहून देणाऱ्या पाट्या (Tablet!!) इ. कार्ये होत. व्हीआयपी भक्तांची रांग निराळी असे!!!!
मुख्य देवळाकडे जाणारी चढण, याच्या प्रत्येक वळणावर एक किंवा अधिक खजिने (Treasury) बांधलेले असत. बांधणाऱ्या राज्याच्या किंवा राजाच्या नावाने हे खजिने ओळखले जात.
भविष्याचा प्राचीन मार्ग चढताना आधुनिक भाविक. वळणावर खजिन्याचे बांधकाम दिसतंय
ही अथेन्सवासीयांच्या खजिन्याची इमारत (Treasury of Athenians)
असे अनेक शिलालेख वाटेत उभे असत. डेल्फीची वारी केलेल्यांची, तत्कालीन व्यवस्थेची माहीती यातून मिळते. काही शिलालेखात गुलामांंना स्वातंत्र्य दिल्याचेही उल्लेख आहेत, अगदी गुलामांच्या आणि मालकांच्या नावासकट
सर्पस्तंभ – २७ फूट उंचीचा, ३ सापांच्या वेटोळ्याचा विजयस्तंभ. प्लॅटीया (Plataea) येथल्या पर्शियन युद्धातील विजयाची खूण. या स्तंभावर युद्धात मदत केलेल्या गावांची नावे कोरली आहेत. मूळ स्तंभ रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने उखडून नेला जो आताच्या इस्तंबूलमध्ये आहे. स्तंभाच्या टोकावर ३ सापांनी उचलून धरलेले त्रिकोणी पात्र होते. पिथिया बसायला वापरत असे त्या प्रकारचे
अपोलोच्या मंदिराचा दर्शनी भाग!! यात्रेचा अंतिम टप्पा….
भवितव्याचं गुढ उकलण्याचं प्रवेशद्वार….. यावरूनच मुख्य मंदिरात प्रवेश केला जाई… अनेक थोर सम्राट, विद्वान आणि प्रशासकांना खुणावणारी वाट.
मुख्य मंदिराचे स्तंभ. याच परीसरात डेल्फीची प्रसिद्ध वाक्यं कोरलेली होती..
गर्भगृहाच्या बाजूने प्रवेशद्वाराचे दृष्य….
देवस्थान म्हटलं की उत्सव आलाच…. नाट्य, नृत्य आणि खेळही आलेच…. डेल्फीचं थिएटर
पाच हजार प्रेक्षकांना सामावून घेणारं थिएटर, येथे बसल्यावर पुढील मंदिराचं आणि डोंगराचंही दर्शन होतं.
डेल्फीच्या थिएटरपासून दिसणारा संपूर्ण मंदिराचा विहंगम देखावा…
डेल्फीतल्या उत्खननात सापडलेले पृथ्वीच्या मध्यभागाचे – नाभीचे संगमरवरी शिल्प. काळ अज्ञात
असं मानतात की नाभीचं शिल्प या अप्सरांच्या डोक्यावर उभं असावं काळ इ.स.पु. ३७३
उत्खननात मिळालेले अपोलो आणि अर्टेमिस (चंद्र, शिकार इ. ची ग्रीक देवता) यांच्या पुतळ्यांचे अलंकृत अवशेष
बैलाच्या चांदीच्या पुतळ्याचे अवशेष……
सहा फूट उंचीचा, रथांची शर्यत जिंकलेल्या सारथ्याचा ब्रॉन्झचा पुतळा. इ.स.पू. ४७५ डेल्फीतल्या उत्खननाच्या पहिल्या काही प्रयत्नातले यश… त्याच्या डोळ्याचा, दातांचा आणि शिरपेचाचा भाग चांदीचा आहे. त्याचा रथ आणि घोडे मिळाले नाहीत पण लगाम आणि त्याची पकड कलेचा अप्रतिम नमुना आहेत.
स्फिंक्स – हो, आपली इजिप्तवालीच …. पण स्त्रीचं मुख, पक्षाचे उभे पंख आणि सिंहाचे धड…. डेल्फीच्या देवळाच्या जवळ उभ्या केलेल्या १० मीटर उंच स्तंभावर हे २.२ मीटर उंचीचं शिल्प उभं होतं. इ.स.पू ५६० … पायाखाली स्तंभाचा अवशिष्ट भाग….
प्लुटार्क की प्लेटो!? इ.स.पू. १९०
डेल्फीच्या देवस्थानाचा संपूर्ण आराखडा (दोन भागात मिळून) . पायथा आणि मुख्य मंदिर लाल रेघेने अधोरेखित केले आहे. मार्गावरील लहान लहान चौकोनी इमारती या खजिन्याच्या (Treasury) आहेत.

मागील भाग – ॲक्रॉप्लिस – अथेन्स पुढील भाग – संस्कृतीचे स्तंभ – अथेन्स

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

वेदवाङ्मयाची थोरवी

If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.
And if I were to ask myself from what literature we, here in Europe, we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans, and of one Semitic race, the Jewish, may draw that corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal, in fact more truly human, a life, not for this life only, but a transfigured and eternal life—again I should point to India.1 ………..Friedrich Max Müller

मॅक्सम्युल्लर ने केम्ब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानातील या एका वाक्यातूनच वेद, वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती क्षितिजांवर विस्तारला होता हे लख्खपणे दिसते. केवळ तत्वज्ञानच नव्हे तर साहित्य, संगीत, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विद्याशाखांत मानवाने साधलेला समतोल पहायचा तर भारताकडे पहा असे तो म्हणतो. सर्वार्थाने पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा भारतीय भूमीला तो देतो.
एक पाश्चात्य विद्वान प्राचीन भारतीय भाषा आणि वाङ्मयाची बाजू इतकी पोटतिडकीने मांडतो हे विस्मयकारक आहे. त्याहीपेक्षा ज्या अर्थी तो ही बाजू मांडतोय त्या अर्थी आपण जुनं म्हणून दुर्लक्षित केलेल्या वाङ्मय तितकं टाकाऊ नक्कीच नसणार. बरं ही भाषणं तो पुराणातल्या गोष्टी ऐकायला आलेल्या भजनी मंडळातल्या बायकांसमोर देत नाहीये. केम्ब्रिज सारख्या मान्यवर विद्यापीठाने इ.स. १८८० च्या दशकात खास आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील भाषणांत त्याने हे उद्गार काढलेत. व्याख्यान ऐकणारे श्रोते केवळ पुस्तकी प्राध्यापक नव्हते. भारतात नुकतीच स्थिरावलेली इंग्रजी सत्ता राबवणारे मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी (Civil Servants) असे भारताशी प्रत्यक्ष संबंध येणारे आणि भारतात काम करणारे इंग्लिश लोकही त्यात होते.
भाषणात अनेक विषयांचा उल्लेख मॅक्सम्युल्लर करतो. जसे भूशास्त्र? (Geology), वनस्पतीशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology), मानवंशशास्त्र (Ethnology), पुरातत्वशास्त्र (Archaeology), नाणकशास्त्र (Numismatics), न्यायशास्त्र (Jurisprudence) आणि अर्थातच तत्वज्ञान (Philosophy). या आणि अशा अऩेक विद्यांच्या अभ्यासासाठी भारत ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे. केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे तर अनेक मार्गदर्शक तत्वांचा उगम या भूमीत होतो म्हणून भारताकडे पहावे असे तो सांगतो. इतकेच काय पण पाश्चात्य जगताच्या ज्ञानाचा उगम मानल्या जाणाऱ्या ग्रीसमधील्या अनेक बोधकथा, दंतकथा मूळच्या भारतीय बौद्ध आणि इतर संप्रदायातील असू शकतात असा तर्क तो मांडतो.
गेल्या आठ लेखात आपण वेद आणि वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. आपण हेही पाहिलं की केवळ अध्यात्म नव्हे तर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक विद्या शाखांचा विचार आणि अभ्यास प्राचीन भारतीय ऋषीमुनी करत होते हे ही वेदवाङ्मयात दिसून येते. वेदकालीन ऋषींनी मानव जीवनाशी संबंधीत जवळपास सर्व विषयांवर भाष्य केलेले आहे. यात शिकारीपासून ते शेतीपर्यंत, युद्धापासून ते वैद्यकापर्यंत आणि यज्ञापासून ते ज्योतिषापर्यंत अनेकविध विषय कौशल्याने हाताळले गेले आहेत. इतके की त्या विषयांचे सखोल ज्ञान या ऋषींना होते हे सहज कळून येते.
पण मग वैद्यक, ज्योतिष, तत्त्वज्ञान वगैरे विषयांवरील ग्रंथ पाश्चात्य संस्कृतीतही आहेतच की! आजच्या लेखात आपण इतकंच पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञानानी समृद्ध होणाऱ्या पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत असा काय फरक आहे की ज्यायोगे आज हजारो वर्षानंतरही जगभरातील विद्वान त्या वाङ्मयाचा अभ्यास करतात? केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकासारख्या अत्याधुनिक ज्ञानशाखातील संशोधकही कमी अधिक प्रमाणात वेदवाङ्मयाचा अभ्यास करतात. त्यांना मार्गदर्शक असे कोणते ज्ञान किंवा विचार वेदवाङ्मय पुरवते?
दृष्टिकोन……..
एखाद्या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून त्याची वेगळी विद्याशाखा बनवणे आणि त्याचा काटेकोर अभ्यास करणे ही तर पाश्चात्यांची देणगी आहे. अगदी उदाहरण द्यायचे तर आधुनिक विज्ञानाची कोणतीही शाखा घ्या, जसे जीवशास्त्र (Biology) या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून वनस्पतीशास्त्र(Botany), सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology), जनुकिय विज्ञान(Genetics) वगैरे विद्याशाखा पाश्चात्यांनी बनवल्या, त्याचे अभ्यासक्रम बनवले, पदव्या (मराठीत डिग्र्या!) निर्माण केल्या. वैद्यकातही डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची वेगळी शाखा बनवली. अगदी चव आणि गंध निर्माण करणारी शास्त्रेही विकसित केली गेली. वैज्ञानिक प्रगती हे ध्येय समोर ठेऊन विभागशः अनेक विद्याशाखा पाश्चात्यांनी दिल्या. अशा वैज्ञानिक प्रगतीचा मुख्य उद्देश अर्थातच मानव जातीचे कल्याण हा होता. मग तो उद्देश साधला गेला का? खरंतर नाही.
विज्ञान जितके अधिक प्रगल्भ आणि प्रगत झाले तितकेच ते संहारकही झाले. मानवजातीचे कल्याण हा मूळ उद्देश बाजूला पडला आणि मानवजात किंवा विशिष्ट मानव समुदायाला इतर समुदाय आणि जीवजंतूंपेक्षा अधिक शक्तीमान बनवणे हा स्वार्थी उद्देश प्रबळ झाला. वर्चस्वाच्या हव्यासापोटी विज्ञानाच्या शाखांची इतकी अजस्त्र वाढ झाली की प्रत्येक शाखा मानवाच्याच नव्हे संपूर्ण जीवसृष्टीच्या मुळावर उठावी इतकी संहारक होऊ लागली. आधी अण्वस्त्रे, मग रासायनिक अस्त्रे(Chemical Weapons), जैविक अस्त्रे(Biological Weapons) आणि आता तर जनुकिय तंत्रज्ञान (Genetics) यासारख्या अत्याधुनिक आयुधांनी मानवाच्या सुखापेक्षा चिंताच अधिक वाढवल्या. निसर्गाचा घटक म्हणून जन्माला आलेला मानव निसर्गावरच विजय मिळविण्याच्या अघोरी मार्गाला लागला आणि आता ते थांबवणे त्याच्या स्वतःच्याही हातात राहिले नाही. वैज्ञानिक प्रगती हा देशागणिक मानवी संस्कृतींच्या स्पर्धेचा विषय बनला. या स्पर्धेत टिकण्याची आणि जिंकण्याची इर्षा इतकी पराकोटीला गेली की मानवानेच त्याच्या आणि पर्यायाने पृथ्वीच्याही संहाराची बीजे पेरली. परीणामी आज आपण प्रदूषण(ध्वनी, वायु, पाणी आणि विचारसुद्धा), अस्त्र-शस्त्र, रोगराई, विकृत-दहशतवाद अशा अनेक समस्यांनी घेरलो गेलो आहोत.
समतोल…….
वैदिक ऋषीमुनी हे जसे तत्त्ववेत्ते होते तसेच शास्त्रवेत्तेही होते. वैज्ञानिक प्रगती वेदकाळातही होत होतीच. परंतु भारतीय शास्त्रवेत्त्यांचे मोठेपण यात आहे की त्यांनी या प्रगतीचा आणि निसर्गाचा योग्य समतोल राखणे महत्वाचे आहे हे जाणले आणि प्रत्येक शास्त्र हे विकसित होताना त्यातून निसर्ग, पर्यावरण आणि व्यापक सृष्टीशी माणसाची नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली. त्यांनी वैद्यक विकसित केले पण औषधांनी होणारे अनुषंगिक परीणाम (Side Effects) टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूनच. औषधी विकसित केल्या पण त्या नैसर्गिक तत्त्वांशी तादात्म्य बाळगून. त्यांनी आयुर्वेद हा निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे शास्त्र म्हणून विकसित केला. रोगांवर इलाज करण्याची पॅथी म्हणून नव्हे. त्यामुळे आहार(Diet), व्यायाम(Exercise), साधना (Meditation) आणि औषधी(Medicine) अशा सर्व अंगांनी समतोल साधणारी ज्ञानशाखा म्हणून आयुर्वेदाकडे पाहीले जाते. याच प्रकारे योग असो ज्योतिष असो किंवा अध्यात्म…..
प्रगती साधताना तिची दिशा आणि ध्येय हे एका सूत्रात बांधून निसर्गाच्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उद्दीष्ट्य साध्य करणे ही वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय शास्त्रांची देणगी आहे. विद्या, कला आणि तंत्र अतिरेकी अनियंत्रित आणि संहारक न होता विकसित करण्याचे तारतम्य वेदवाङ्मयाने जगाला शिकवले.
त्यामुळेच रसायनशास्त्र (Chemistry), पदार्थविज्ञान(Physics), वैद्यक(Medicine), जीवशास्त्र(Biology), वनस्पतीशास्त्र(Botany), धातुशास्त्र (Metallurgy) असो किंवा अगदी अणुविज्ञान (Automic Science), या सर्व शास्त्रांचा भारतीय भूमीतील उगम आणि विकास हा याच तत्त्वांना अनुसरुन झाला. तुकड्या तुकड्यात वेगवेगळी शास्त्रे म्हणून विकसित न होता ती कल्याणकारक आणि सर्वसमावेशक जीवनवेद म्हणून विकसित झाली. आपल्याला वेदांसह अनेक ग्रंथात हे सर्वच विषय कमीअधीक प्रमाणात आढळतात ते यामुळेच. जीवनाशी संबंधीत असे ज्ञान असल्याने त्याचा केवळ वेगळी विद्याशाखा म्हणून अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच ते ज्ञान सृष्टीचा समतोल राखण्यात किती यशस्वी ठरते हेही काटेकोरपणे अभ्यासणे गरजेचे मानले गेले. त्यामुळे शास्त्रे विकसितही झाली आणि त्यांची अनुषंगिक संहारकताही सीमीत केली गेली. वैज्ञानिक प्रगती आणि विवेकी तत्वज्ञान यांचा हा समतोल…..
आधुनिक जगात सातत्याने नवनवीन शोध लागत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे पण ते विवेकाने वापरण्याचे किंवा त्याचा गैरवापर टाळण्याचे शिक्षण देणारी मुल्यव्यवस्थाच अस्तीत्व हरवून बसली आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायरीगणीक आपण विनाशाच्या चिंतेने अधिकाधिक ग्रासले गेलो आहोत. हा विवेक जागवणारी आणि प्रसृत करणारी तत्वप्रणाली वेदवाङ्मयाने दिली.
सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भवेत्। किंवा
……सह नौ भुनक्तु।
किंवा
..वसुधैव कुटुम्बकम्। असो

यासारख्या प्रार्थनातून साधकाच्या मनावर हे तत्त्व कायम बिंबवले गेले की प्रत्येक कार्य, प्रत्येक पाऊल हे विश्वकल्याणाच्या हेतूतून उचलायचे आहे. संपुर्ण वसुधा (पृथ्वी) हे एकच कुटुंब आहे. यातील भूतमात्रांसह आपण सर्वजण एकाच साखळीतील कड्या आहोत. एक जरी कडी कमकुवत झाली तरी ही संपूर्ण साखळी दुर्बल होणार आहे. त्यामुळे प्रगती मग ती वैज्ञानिक असो तांत्रिक असो किंवा तात्त्विक तिच्यातून ही साखळी अधिक मजबूतच झाली पाहीजे. भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती, मानवी जीवन आणि निसर्ग तसेच पर्यायाने मन आणि शरीर यांचा समतोल साधला तरच ज्या सुखाच्या अपेक्षेने अधिकाधिक विकासाची ईर्षा आपण बाळगतो ते चिरंतन सुख प्राप्त होईल. हा विचार निःसंशयपणे प्राचीन भारतीय वेदवाङ्मयाने जगाला दिला.
तात्पर्य काय तर आज विकसनशील वगैरे शिक्का असलेल्या भारताने स्वतःच जगाला दिलेल्या विवेकी अभ्यासकाच्या भूमिकेत परत शिरुन आपल्याच प्राचीन वाङ्मयाचा आणि आधुनिक विद्यांचा तारतम्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. धर्मग्रंथ म्हणून नुसते अंधश्रद्धेने कवटाळून बसणे हे जसे चुकीचे आहे तसेच ते जुने कालबाह्य वाङ्मय म्हणून झिडकारणेही तितकेच चुकीचे आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिकेपेक्षा विवेकी वृत्तीने चतुरस्त्र अभ्यास करून वेद आणि वैदिक साहित्यातून मिळणारे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समारोपापुर्वी मॅक्सम्युल्लरच्या भाषणातील काही उतारे जसेच्या तसे वानगीदाखल देत आहे. त्याच्या भाषांतराची गरज पडू नये कारण अर्थातच आपल्याकडे इंग्रजी मराठीपेक्षा अधिक अभ्यासली जाते!!

If you care for geology, there is work for you from the Himalayas to Ceylon.
If you are a zoologist, think of Haeckel, who is just now rushing through Indian forests and dredging in Indian seas, and to whom his stay in India is like the realization of the brightest dream of his life.
The study of Mythology has assumed an entirely new character, chiefly owing to the light that has been thrown on it by the ancient Vedic Mythology of India. But though the foundation of a true Science of Mythology has been laid, all the detail has still to be worked out, and could be worked out nowhere better than in India.
Again, if you are a student of Jurisprudence, there is a history of law to be explored in India, very different from what is known of the history of law in Greece, in Rome, and in Germany, yet both by its contrasts and by its similarities full of suggestions to the student of Comparative Jurisprudence.
You know how some of the best talent and the noblest genius of our age has been devoted to the study of the development of the outward or material world, the growth of the earth, the first appearance of living cells, their combination and differentiation, leading up to the beginning of organic life, and its steady progress from the lowest to the highest stages. Is there not an inward and intellectual world also which has to be studied in its historical development, from the first appearance of predicative and demonstrative roots, their combination and differentiation, leading up to the beginning of rational thought in its steady progress from the lowest to the highest stages? And in that study of the history of the human mind, in that study of ourselves, of our true selves, India occupies a place second to no other country. Whatever sphere of the human mind you may select for your special study, whether it be language, or religion, or mythology, or philosophy, whether it be laws or customs, primitive art or primitive science, everywhere, you have to go to India, whether you like it or not, because some of the most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India, and in India only.

तळटीप:

1. INDIA: WHAT CAN IT TEACH US? (A Course of Lectures – DELIVERED BEFORE THE UNIVERSITY OF CAMBRIDGE BY – F. MAX MÜLLER, K.M.)

मागील भाग – ओळख वेदांची – आरण्यक ओळख वेदांची – समग्र लेखमाला

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version