ओळख वेदांची – अथर्ववेद

हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।

सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.

पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात.

अथर्ववेद….

चार वेदातील अंतिम परंतु विषयांच्या विविधतेत ऋग्वेदाच्या तोडीचा वेद म्हणजे अथर्ववेद. रचनेच्या दृष्टीकोनातून आणि भाषिक वैशिष्ट्यांवरून अथर्ववेदाचा काळ आणि स्थान याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते अथर्ववेदाचे संकलन जरी ऋग्वेदोत्तर काळातील वाटले तरी त्यातली मंत्र ऋग्वेद काळापासून रचनेत होते असेही मानले जाते.

असाही एक विचारप्रवाह आहे जो असे मानतो की अथर्ववेद हा वेदच नाही. कारण अथर्ववेदातील यज्ञ सोडून इतर अनेक विषय जसे यातु विद्या किंवा अभिचार मंत्र हे वैदिक धर्म, परंपरा किंवा संस्कारांचा भाग नाहीत. यासाठी इतर काही ग्रंथातील दाखले दिले जातात जसे ‘त्रयोवेदा अजायन्त’ (ऐतरेय ब्राह्मण) , ‘वेद शून्यैस्त्रिभिरेति सूर्यः’ (तैत्तिरिय ब्राह्मण) किंवा ‘यम् ऋषयस्त्रयी विदो विदुः ऋचः सामानि यजुष’ (तैत्तिरिय ब्राह्मण). आपण अर्थातच त्या वादात पडण्याचे कारण नाही कारण त्याचे खंडन अनेक थोर विद्वानांनी केले आहे. आज अथर्ववेदाचे स्वरुप आणि त्याचे भारतीय ज्ञानशाखातील योगदान पाहता अथर्ववेद हा वेदच होता यात शंकाच उरत नाही.

अथर्व …..

‘थर्व’ या धातूपासून ‘थर्वन्’ हा शब्द तयार होतो. निरुक्तात याचा अर्थ गतीशील असा होतो. म्हणून अथर्वन् म्हणजेच – गतिहीन, निश्चल किंवा स्थिर. अथर्ववेद म्हणजे अढळ ज्ञान देणारा अशा अर्थाने हा शब्द येतो. अथर्वन् आणि अंगिरस ऋषींनी रचलेला म्हणून ‘अथर्वांगिरस’ असेही या वेदाचे नाव आहे. अथर्वन् ऋषीकुलाने यज्ञादी कर्मे तर अगिरसांनी अभिचारादि मंत्राची रचना केली असे मानतात. याशिवाय ब्रह्मवेद, छन्दोवेद, भैषज्यवेद, क्षत्रवेद अशी अनेक नावे अथर्ववेदाला दिली जातात.

एकाच वेदाची इतकी नावे येण्याचे मुख्य कारण म्हणजे या वेदात अंतर्भूत असलेले विषय. चारही वेदात सर्वात जास्त विविधता असलेला वेद म्हणजे अथर्ववेद. ब्रह्मज्ञानापासून ते शापापर्यंत, आयुष्यवर्धक मंत्रांपासून ते शत्रुनाशक सूक्तांपर्यंत, औषधी उपचारांपासून ते जादुटोण्यापर्यंत, शेती पासून ते राज्यकर्मापर्यंतचे आणि भूगोलापासून ते खगोलापर्यंत अनेकविध विषय अथर्ववेदात येतात. म्हणूनच तर एकाच वेळी आयुर्वेद, अर्थशास्त्र (राजनीती) आणि शिल्पशास्त्र असे तीन सर्वस्वी भिन्न विषय अथर्ववेदाला आपले उगमस्थान मानतात.

रचना….

अथर्ववेद हा वेदवाङ्मयातील एक असला तरी त्याची रचना ऋग्वेदाइतकी काटेकोर नाही. अथर्ववेदात अध्यायाऐवजी रामायणासारखा कांड हा शब्द वापरलाय. एकूण २० कांडे मिळून ७३१ सूक्ते आहेत, ज्यात साधारण ५९८७ मंत्र आहेत. यातील जवळपास १२०० मंत्र ऋग्वेदातले आहेत. अथर्ववेदात काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपात विवेचन आढळते हे त्याचे अजून वैशिष्ट्य आहे.

काय आहे अथर्ववेदात…

एकदा अथर्ववेदातील विषयांची नुसती सुची पाहिली तरी अथर्ववेदात काय नाही असे म्हणावे लागेल! वैदिक कालखंडातील जनजीवनाचा विश्वकोश म्हणजे अथर्ववेद आहे. त्याकाळातील तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, राज्यतंत्र, शेती, तंत्रज्ञान आणि वैद्यक या सर्वविषयांवर सविस्तर भाष्य अथर्ववेदात येते. अथर्ववेदातील विषयांची सूक्तवार लहानशी सूची पाहूयात म्हणजे अथर्ववेदाची व्याप्ती समजून येईल.

भैषज्यसूक्ते – अथर्ववेदातील या सूक्तात निरनिराळ्या ८९ रोगांची माहिती आणि त्यांची चिकित्सा सांगितली आहे. या मंत्रात औषधे, औषधी वनस्पती आणि पाण्याचे वर्णन आणि प्रशंसा आढळते. कौशिक सूक्तात या मंत्रांच्या सहाय्याने केल्या जाणा-या जादूटोण्याचे वर्णन आहे. दन्तपीडा (दातदुखी), अतिसार, कुष्ठरोग, यक्ष्मा (क्षय) असे असंख्य आणि आजही आपल्याला माहिती असणारे रोग यात येतात. भैषज्यसूक्तात अनेक किटक, किटाणु, भूत, राक्षस यांचीही वर्णने आहेत.

आपल्या माहितीतले सांगायचे तर आजच्या भाषेत ज्याला ‘ओपन फ्रॅक्चर’ (Open Fracture) म्हणतात त्याचीही चिकित्सा अथर्ववेदात आढळते. रोहीणी वनस्पतीच्या सहाय्याने ती जखम कशी बांधावी याचे साद्यंत वर्णन त्या सूक्तात आढळते.

आयुर्वेदाचे मुळ अथर्ववेदात आहे असे का म्हणतात ते आपल्याला यातून उमगते. केवळ उपचारच नव्हेत तर अनेक वनस्पतींचे औषधी उपयोग आणि त्यावरील मंत्रांवरून त्याकाळी वनस्पतीशास्त्र(Botany) हे ही अभ्यासाचा भाग होते हे लक्षात येते.

पौष्टिक सूक्त – सुखसमृद्धिसाठी करण्यात येणा-या प्रार्थना या सूक्तातून व्यक्त होतात. घर बांधताना, हंगामाच्या सरुवातीला शेतात नांगर धरताना, पेरणीच्या वेळी तसेच उत्तम पीक आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या समृद्धीसाठीच्या प्रार्थना या सूक्तात येतात.

आयुष्य सूक्त – स्वास्थ्य आणि दीर्घायुषी जीवनासंबंधित अनेक सूक्ते अथर्ववेदात येतात. या मंत्रातून निरोगी आणि शतायुषी जीवनाची प्रार्थना केली जात असे.

प्रायश्चित्त सूक्त – पाप किंवा अपराधाच्या क्षमापनार्थ करण्यात येणा-या प्रायश्चित्तांशी संबंधित मंत्र या सूक्तात येतात. केवळ पापच नव्हे तर यज्ञ करताना जर चूक झाली तर त्यावरील प्रायश्चित्त विधानेही या मंत्रात येतात. ग्रह किंवा नक्षत्रांना शांत करण्याचे मंत्रही या सूक्तात येतात.

स्त्रीकर्माणि सूक्त – विवाह संस्कार, त्याचे विधी तसेच पती पत्नीच्या परस्परप्रेमाची वाढ या विषयांवरील सूक्ताना स्त्रीकर्माणि सूक्ते म्हणता येईल. या मंत्राद्वारे वर किंवा वधू प्राप्त करता येईल असा विचार असे. याच सूक्तात असे अनेक मंत्र आहेत जे इन्द्रजाल, शाप, अभिशाप किंवा वशीकरण अशा विषयांशी संबंधित आहेत.

**(एकता कपूर किंवा झी मराठीच्या टि.व्ही सिरियलना उपयोगी पडतील असे पुरुष वशीकरण, सवतीचा नाश करणे, स्त्री-दुर्लक्षण निवारण अशा विषयांवरचे मंत्रही या सूक्तात येतात!)

राजकर्माणि सूक्ते – राजाच्या आणि राज्याच्या व्यवहारासंबंधी मंत्र या सूक्तात येतात. शत्रुवर विजय मिळविण्याची प्रार्थना करणारे, अस्त्र आणि शस्त्रांची माहिती देणारे मंत्रही यात आहेत.

अभिचारात्मक सूक्ते– अभिचार म्हणजे जादू. शत्रुचा नाश करणे, शत्रुने केलेली जादू परतावून लावणे, शत्रुच्या जादूटोण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, शत्रुपक्षात रोगाच्या साथी पसरवणे अशा अनेक विषयांवरचे मंत्र या सूक्तात येतात.

याच बरोबर पृथ्वीसूक्तासारखे मातृभूमीचे प्रेम दर्शवणारे नितांतसुंदर सूक्तही यात येते.

यज्ञिक सूक्त – दैनंदिन जीवनात केल्या जाणऱ्या पूजाअर्चा, उत्सवात केले जाणारे होम आणि इतर काही यज्ञांचे विधी या सूक्तांत येतात.

कुंताप सूक्त – अथर्ववेदाच्या २० व्या कांडात अनेक कूट आणि गूढ सूक्ते आहेत. अनेक कोडी आणि त्यांची उत्तरे, गूढ अर्थाचे मंत्र या सूक्तात येतात. ऋग्वेदातील अस्यवामीय किंवा नासदीयसूक्ताच्या तोडीची काही सूक्ते येथे आढळतात.

दार्शनिक सूक्त – ईश्वर, प्रजापति, ब्रह्म, मन, प्राण इ. वर भाष्य असणारे मंत्र या सूक्तांत येतात. गायीच्या रुपात केलेले ईश्वराचे वर्णनही या सूक्तात येते.

अशा प्रकारे अनेक रंजक, गुढ आणि अभ्यासपूर्ण विषयांचे उगमस्थान असणारा अथर्ववेद हा तत्कालिन समाजाचे चित्रण आणि आजच्या समाजाला मार्गदर्शन असे दोन्ही हेतू साध्य करतो.

उपसंहार

चारही वेदांच्या ओळख करून घेतल्यावर आपल्या लक्षात येते की केवळ चार धार्मिक पुस्तके इतकी संकुचित ओळख वेदांची नाही. समृद्ध, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी भारताची ओळख वेदांतूनच जगाला होते. वेद हे भारतीय संस्कृती आणि उपखंडतील ज्ञानाचे उगमस्थान आहेत. परमात्म्याचे तत्त्वज्ञान असो की आयुर्वेदाचे विज्ञान…… लौकीक आणि पारलौकीक जीवनाकडे अत्यंत जिज्ञासु वृत्तीने पहायला वेद शिकवतात. आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, शिल्प, पानक अशा अनेक शास्त्रांचा पाया वेदच रचतात. ऋग्वेदातले ऋषी आयुष्य निखळ आनंदाने जगतात, त्याचबरोबर त्याचे रहस्यही मांडतात. तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आपल्यालाही ते आयुष्य कसे जगता येईल ते समजावून सांगतात. रंग, रस, गंध, नाद आणि स्पर्श या सर्व अनुभुतीतून आयुष्याला आकार द्यायला वेद शिकवतात. जीवनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पहात त्याचा आनंद घेण्याचे तात्त्विक आणि शास्त्रीय ज्ञान वेदातून प्राप्त होते म्हणूनच हजारो वर्षानंतरही आज अनेक भारतीय आणि अभारतीय विद्वान वेदांचा अभ्यास करतात. वेदांच्या या ज्ञानशाखांबद्दल पुढील भागात……..

तळटिप

१. “अथर्वाणोsथर्वणवन्तः। थर्वतिश्चरतिकर्मा, तत्प्रतिषेधः।” (निरुक्तः–११.१८)
२. सं मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते पुरुषा परुः। अथर्ववेद पै. – ४/१५

मागील भाग – ओळख वेदांची -सामवेद पुढील भाग – ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – सामवेद

मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि” असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण, बृहद्देवता असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.

साम हा शब्द सा (ऋचा) + अम् (आलाप) असा तयार होतो. वेदातील ज्या ऋचांवर आलाप किंवा गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद असे म्हणता येईल. ऋचा आणि साम हे एकमेकांशिवाय असूच शकत नाहीत. त्यामुळे हे दोघे जणु पति पत्नीच आहेत असे म्हटले आहे! याचाच अर्थ गायन हे आपल्या उपासनापद्धतीचा एक अविभाज्य अंगच होते.

सामवेदाची रचना कशी आहे?

पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे सामवेदाचे दोन भाग आहेत. सामवेदातील मंत्रांची संख्या साधारण १८७५ असून त्यातील ९९ मंत्र सोडले तर बाकी सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. पुर्वार्चिकात देवतांच्या स्तुतीपर मंत्र आहेत तर उत्तरार्चिकात यज्ञात आवश्यक असणा-या ऋचांचा संग्रह आहे.

ज्या मंत्रांच्या आधारावर गायन केले जाते त्याला योनिमंत्र म्हणतात. यालाच आपण आजच्या भाषेत थाट म्हणू शकतो. अशा एका योनिमंत्रावर अनेक गाणी गायली जाऊ शकतात. ऋग्वेदातील एकाच मंत्राचे गायन गौतम किंवा कश्यप असे ऋषीं त्यांच्या त्यांच्या शैलीने करत असत. जसे आज दोन भिन्न घराण्यातील गायक एकच राग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडतात.

उदाहरणार्थ ऋग्वेदातील एक मंत्र आपण सामयोनिच्या नोटेशनसकट पाहुयात

मूळ मंत्र –

अग्न॒ आया॑हि वी॒तये॑ गृणा॒नो ह॒व्यदा॑तये ।नि होता॑ सत्सि ब॒र्हिषि॑ ॥ (ऋ ६.०१६.१०)

आता हाच मंत्र गाण्यासाठी योनिमंत्र म्हणून सामवेदात कसा दिसतो ते पाहु

Yoni Mantra - Basic Notation of a Hymn in Samveda.
सामवेद योनिमंत्र

अक्षरांच्या वरील अंक हे उदात्त, अनुदात्त, स्वरित इ. स्वर दर्शवतात. हा झाला योनिमंत्र किंवा थाट. आता या चलनाचा आधार घेऊन जेव्हा मंत्र म्हटले जात तेव्हा त्याचा मूळ गाभा तसाच ठेऊनही वेगवेगळ्या प्रकारे गायन मांडले जायचे. यात शब्दांची किंचित ओढाताण होत असे.

उदाहरणार्थ हाच मंत्र गौतम कुलाच्या गायनात असा दिसेल

Parka by Gautama - A specific style of Samveda singing by Gautama
गौतमस्य पर्कम् ।

अशाप्रकारे सामगायनाचे किमान एक हजार प्रकार अस्तीत्वात होते, असे उल्लेख आहेत. यावरून त्याकाळची गायनकला किती समृद्ध होती याचा अंदाज येतो. भारतीय संगीतातील श्रुतींसारख्या सूक्ष्म आणि घराण्यांसारख्या व्यापक विविधतेचे मूळ अशाप्रकारे सामवेदात आढळते.

हा गायनाचा प्रकार त्याकाळी नक्की कसा असावा याचा अंदाज आज करणे अवघड आहे. कारण सामगायन करणा-या परंपरा जवळपास लुप्त झाल्या आहेत. परंतु मौखिक परंपरेने जे जतन केले गेले आहे त्यातील एक छोटी क्लिप ऐकून आपण अंदाज घेऊ शकतो.

सामवेद गायन Source – Alaap-A Discovery Of Indian Classical Music

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदु धर्म अभिमानाने मिरविणा-या बाली बेटावर एका केचक नृत्यामध्ये असाच रंगलेला आलाप अलिकडेच ऐकायला मिळाला.

सामवेदात आपल्याला परिचयाचे काय आहे?

साम, दाम, दंड, भेद या म्हणीतील साम या शब्दाचा अर्थ गोड बोलणे असा होतो. सामगायनातील गोडवा या अर्थानेच हा शब्द रुढ झाला.

कुंदनलाल सैगल (चित्रपट – तानसेन) आणि मन्ना डे (चित्रपट – संगीत सम्राट तानसेन) यानी अजरामर केलेले सप्त सुरन तीन ग्राम हे गाणं आठवतंय का? या गाण्यातील स्वरमंडलाचे वर्णन हे सामवेदातील स्वरमंडलाचे नारदीय शिक्षेत आलेले वर्णन आहे.

सप्तस्वराः त्रयो ग्रामाः मूर्छनास्त्वेकविंशति। ताना एकोनपंचाशत् इत्येतत्स्वरमण्डलम्।

देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत भारतीय संगीताचे मूळ सामगायनातच आहे. गायन हा देवाच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे संगीताला नादब्रह्म मानले जाते. वेदातील आकाराने लहान भावंड असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेदाने उभा केला. म्हणूनच तर श्रीकृष्णासह जवळपास प्रत्येक थोर ऋषीमुनींनी सामवेदाला भारतीय ज्ञानवाङ्मयात उच्च स्थान दिलेले आहे.

तळटिप

१.गीता अध्या. १० श्लोक २२
२. सर्वेषामं वा एष वेदानाम् रसो यत् साम (शतपथ ब्राह्मण १२.८.३.२३)
३. सामानि यो वेत्ति त वेद तत्त्वम् । (बृहद्देवता)
४. अमोSहमस्मि सा त्वं, सामाहमस्मि ऋक् त्वं। द्यौरहं पृथिवी त्वं। ताविह संभवाव, प्रजामाजनयावहै (अथर्ववेद १४/२/७१)
५. सामवेद – म.म पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर (पृ,क्र ६)
६. एकशतमध्वर्युशाखाः, सहस्रवर्त्मा सामवेदः ॥ महाभाष्य

मागील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद पुढील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – यजुर्वेद

ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.

यजुर्वेदातील मंत्रांना ‘यजु’ असे म्हणतात हे मंत्र गद्यात्मक आहेत. यजुर्वेदातले पद्यात्मक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. यज् या संस्कृत धातूपासून यजु शब्द तयार होते. यज् याचे तीन अर्थ पाणिनी सांगतो. देवाची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी व यजुंनी यज्ञ अशा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात आढळते.
यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक/ पुरोहीत असतो त्याला ऋत्विज असे म्हणतात. ऋत्विजांची वेदानुसार नावे अशी –
ऋग्वेद – होता (हे नाव आहे), यजुर्वेद – अध्वर्यु, सामवेद – उद्गाता, अथर्ववेद – ब्रह्मा. अध्वर्यु ज्या वेद मंत्रांचा प्रयोग करतात तोच यजुर्वेद म्हणून यजुर्वेदाला ‘अध्वर्युवेद’ असेही म्हणतात.

शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात. शुक्लयजुर्वेदात केवळ मंत्र आहेत तर कृष्णयजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहीती आहे.
कृष्णयजुर्वेदाच्या निर्मितीची एक कथा आहे. वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना वेदाचे शिक्षण दिले. परंतु दोघांमध्ये वेदार्थनिर्णयावरून काही वाद निर्माण झाला. वाद वाढल्यावर संतप्त झालेल्या वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवलक्यांनी ते ज्ञान ओकून टाकले. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी तित्तिर पक्षाचे रुप घेऊन ते ज्ञान ग्रहण केले. वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना जे ज्ञान दिले ती मूळ संहिता म्हणजे शुक्लयजुर्वेद तर तित्तिर पक्षांनी ग्रहण करून जे स्वीकारले ते ज्ञान म्हणजे कृष्ण यजुर्वेद असे मानतात. नवे व जुने ज्ञान आणि त्यांचे संपादन यामुळे यजुर्वेदाच्या काही शाखा आणि त्यांच्या संहिता निर्माण झाल्या जसे वाजसनेयी, तैत्तिरीय इ. याच्या अधिक तपशीलात न जाता आपण दोन्ही मिळून यजुर्वेदाची ओळख करून घेउ यात.

काय आहे यजुर्वेदात?…..
यजुर्वेदाची रचना अध्यायात केली आहे. एकूण ४० अध्याय आहेत. त्यात मुख्यत्वेकरून यज्ञासंबंधी माहिती आहे.

यज्ञ– यज्ञासाठी वेदी, कुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवन, हवनसामग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. गाईचे दूध काढणे, पाणी आणणे येथपासून ते यज्ञकुंडाची जागा, वेदी उभी करणे, यज्ञसाहित्य निवडणे, वेगवेगळ्या आहुति देणे येथपर्यंत प्रत्येक बारीक सारीक कृतींची माहीती यजुर्वेदात येते.
आपल्या ऐकण्यात विशेषकरून येणारे ‘अश्वमेध’ आणि ‘राजसूय’ (युधिष्ठिराने महाभारतात केलेला) हे यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. याखेरीज दर्श पूर्णमास (अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे याग/यज्ञ), अग्निष्टोम (पाच दिवसांचा मिनि यज्ञ), चातुर्मास्य, काम्येष्टी, वाजपेय, नक्षत्रेष्टि अशा अनेक छोट्या मोठ्या यज्ञांचा अंतर्भाव यजुर्वेदात होतो.

यजुर्वेदातील माहितीचा परीघ किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी यज्ञ ही काय संस्था होती हे पाहिले पाहिजे. त्याकाळातील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘यज’ याचा एक अर्थ एकत्र येणे असाही होतो. त्यामुळेच यज्ञ हा एक प्रकारचे सामाजिक समारंभ (मराठीत सोशल गॅदरींग) असे. यात विविध विधींसह अनेक मनोरंजक खेळ किंवा स्पर्धाही असत. जसे सामगायन असेल, रथांची शर्यत असेल, वाद्य वादन असेल अगदी पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींच्या नृत्यापासून ते रस्सीखेच सारख्या खेळांपर्यंत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम यज्ञात होत. यज्ञ हे संपुर्ण समाजाचे एकत्रिकरण करणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्यात एकी आणि समभाव वाढवणे आणि त्यांचे सर्वांगिण कल्याण साधणे अशी उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे साधन होते. हिलेब्रॅन्ट (Hillebrandt) सारखा विद्वान या खेळांची तुलना थेट ऑलिम्पिकशी (प्राचीन) करतो .

अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ करणारा राजा आहुति देताना म्हणत असे
आ ब्रह्म॑न् ब्राह्म॒णो ब्र॑ह्मवर्च॒सी जा॑यता॒मा रा॒ष्ट्रे रा॑ज॒न्यः शूर॑ इष॒व्योऽतिव्या॒धी म॑हार॒थो जा॑यतां॒ योगक्षे॒मो न॑: कल्पताम् ।।यजुर्वेद मा.वा संहिता अ २२.२२ ।।
संपूर्ण मंत्र मोठा आहे पण याचा अर्थ असा की – ‘ब्रह्मतेजाने संपन्न आणि शूर असे वीर आमच्या राष्ट्रात उत्पन्न होवोत, आमचा योगक्षेम (निर्वाह) उत्तम चालो.’

गोष्टी – यजुर्वेदाचा प्रमुख विषय यज्ञ असल्याने ऋग्वेदाइतक्या गोष्टी यजुर्वेदात नाहीत. पण निरनिराळ्या विषयांवरील काही आख्यायिका यजुर्वेदाच्या चर्चेत येतात. इंद्राने वायुदेवतेच्या मदतीने देवांच्या भाषेचे व्याकरण लिहिले अशी एक आख्यायिका यजुर्वेदात आहे. पुर्वी देव जी भाषा बोलत असत ती काहीशी नियमविरहीत किंवा व्याकरणरहीत होती. देवांच्या विनंतीवरून इंद्राने वायुदेवतेच्या सहाय्याने त्या भाषेला नियमबद्ध व व्याकृत केले असा उल्लेख यजुर्वेदात आहे.यजुर्वेदात मांडलेल्या विषयांचा विस्तारही यातून लक्षात येतो.

यजुर्वेदात आपल्या परीचयाचे काय आहे?…..

खुप काही…
आपण निरनिराळ्या वेळी ऐकलेला आणि वापरलेला –
भूर्भुव॒: स्व॒: तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।धियो॒ यो न॑: प्रचो॒दया॑त्। हा गायत्री मंत्र यजुर्वेदातला आहे. (अध्याय ३६, मंत्र ३)

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑ति हवामहे। हा अजून एक माहितीतला मंत्र यजुर्वेदातीलच आहे. (अध्याय२३-मंत्र १९)

आपण घरी किंवा महादेवाच्या देवळात ऐकलेले ‘रुद्र पठण’ हे यजुर्वेदातील आहे. (अध्याय १६)

भाषेतील चमत्कृती म्हणून सांगायचे तर वाजपेय या यज्ञात सहभागी असणारे किंवा तो यज्ञ करणारे म्हणून ‘वाजपेयी’ हे नाव रुढ झाले.

हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला हे ही जाता जाता सांगायला हरकत नाही.

तत्त्वज्ञान –
वैदिकांच्या कर्मकांडाचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि त्याचे व्यापक तत्त्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व म्हणजे ४० अध्यायात येतेच. विशेषतः आपल्याला माहिती असलेला भाग म्हणजे ‘ईशावास्योपनिषद’ जे यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा ४० वा अध्याय आहे.
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।
या प्रसिद्ध मंत्रातून परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने संग्रह न करता आवश्यकतेनुसार पदार्थांचा उपभोग घ्यावा असा उपदेश केला आहे.

अशाप्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद… अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली (मराठीत वर्क लाईफ बॅलन्स) शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे.

तळटीप
१. यज देवपूजा – संगतिकरण – दानेषु (अष्टाध्यायी ३.३.९०)
२. यजुर्भिः सामभिः यत् एनम् ऋग्भिः शंसन्ति यजुर्भिः यजन्ति सामभिः स्तुवन्ति ।निरुक्त १३.७।
३. Alfred Hillebrandt एक जर्मन विद्वान त्याच्या Vedische Mythologie (१, २४७) या पुस्तकात हा उल्लेख आढळतो.
४. तैत्तिरिय संहिता ७/४

मागील भाग – ओळख वेदांची – ऋग्वेद                                                        पुढील भाग – ओळख वेदांची – सामवेद 

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – ऋग्वेद

ऋग्वेद – वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!

वेद खरोखर इतके अगम्य आणि अवघड आहेत का? नक्कीच नाहीत. एकाच वेळी अत्युच्च दर्जाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदांसारखे दुसरे ग्रंथ सापडणे खरोखर कठीण आहे. केवळ अगम्य धार्मिक पुस्तके इतके तोकडे स्वरूप वेदांचे नक्की नाही.अत्यंत सुंदर प्रार्थना, रसाळ कथा, मजेदार वर्णने, कलाकुसर, तत्कालीन तंत्रज्ञान, चालीरिती, समारंभ आणि अर्थातच गहन तत्त्वज्ञान हे सर्वकाही वेदात आढळते. या लेखमालेत सर्वप्रथम वेद आणि वेदवाङ्मयाची प्राथमिक माहिती करून देणे हा उद्देश आहे.

आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला असा वाक्प्रचार खुपदा ऐकण्यात येतो. या चौदा विद्या कोणत्या?

४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्रे अशा एकूण चौदा विद्या किंवा विद्याशाखा होत. यातील वेद सोडून इतर ग्रंथ तूर्तास दूर ठेऊयात.

संस्कृतात विद् म्हणजे जाणणे, वेद हा शब्द येथून उगम पावला. वेद ४ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.

ऋग्वेद

ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद किंवा ऋचांनी बनलेला वेद. देवतांना आवाहन करण्यासाठीच्या मंत्रांना (आजच्या भाषेत श्लोकांना) ऋक् किंवा ऋचा असे म्हणता येईल.

ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे ज्या मंत्रातून ऋषींची कामना पूर्णपणे व्यक्त होते असा ऋचांचा समूह (आजच्या भाषेत स्तोत्र). ऋषीसूक्त, देवतासूक्त, अर्थसूक्त आणि छंदसूक्त असे सूक्तांचे प्रकार आहेत. ऋग्वेदात जवळजवळ अशी १०२८ सूक्ते (स्तोत्रे) आहेत एकूण ऋचांची संख्या ही १०५८० इतकी भरते.

हे सर्व मंत्र एकाच ऋषींनी रचले का? अर्थातच नाही. असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले आणि त्यांनी ते परंपरेने जपले. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हणजेच पुरुषाने (माणसाने) न रचलेले असेही म्हणतात.

आजच्या व्हॉटसॅप आणि फेसबुकच्या युगात एखादी माहिती किंवा बातमी जर सकाळी सांगितली तर संध्याकाळपर्यंत त्याला इतके फाटे फुटतात की खरं खोटं तर दूर मूळ बातमी काय होती हे ही विसरायला होतं! अशा वेळी ऋग्वेदासारखा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी जसा रचला गेला तसाचा तसा बदल न होता आपल्यापर्यंत पोचलाच कसा? याचे उत्तर ऋग्वेदाच्या रचनेत आहे. असे म्हणतात की ऋग्वेदाच्या रचनेच्या काळात लेखनकलाच अस्तीत्त्वात नव्हती. शाकल (शाकाल नव्हे!) सारख्या ऋषींनी ऋग्वेदाची रचना आणि पठणाच्या पद्धतींची मांडणी अशा पद्धतीने केली की त्यात कोणताही पाठभेदच होणार नाहीत.

आता ऋग्वेदाची रचना थोडी समजाऊन घेऊ. ऋग्वेदात १० मंडले आहेत. मंडल म्हणजे अध्यायासारखे विभाग. प्रत्येक मंडलाला नाव आहे. २ ते ८ ही मंडले ऋषींच्या नावाने आहेत. यात त्या त्या ऋषीकुलातील ऋषींचे मंत्र आहेत. १ले आणि १० वे मंडल संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या ऋषींच्या मंत्रांचे आहे. ९ व्या मंडलात केवळ सोमरसावरची निरनिराळ्या ऋषींची सूक्ते येतात. ही दहा मंडले खालील प्रमाणे. १) संमिश्र २) गृत्समद ३) विश्वामित्र ४) वामदेव ५) अत्रि ६) भरद्वाज ७)वसिष्ठ ८) कण्व व अंगिरस(?) ९) पवमानसोम (संमिश्र) १०) संमिश्र

प्रत्येक मंडलातील सूक्ते ही देवता, शब्दसंख्या इ च्या पूर्वनिश्चित क्रमाने येतात त्यामुळे त्यातही मागेपुढे होण्याचा संभव नाही.

काय आहे या सूक्तात?…….

गोष्टी! चांदोबातसुद्धा नसतील इतक्या रंजक कथा ऋग्वेदात आहेत. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापसातल्या संवादाच्या, सण समारंभांच्या, भक्तीच्या, युद्धांच्या, धर्माच्या अगदी लग्न, शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात आढळतात.

तत्त्वज्ञान…. ऋग्वेदात जितके तत्कालिन समाजजीवनाचे प्रतिबिंब आढळते तितकेच तत्कालिन मानवाच्या प्रगल्भ तत्वचिंतनाचेही. सृष्टीची उत्पत्ती, जडणघडण, चलनवलन, देवतांचे स्वरूप, नश्वर तसेच शाश्वत तत्त्वे, परमात्मा अशा अनेक गुढ विषयांवरचे चिंतनही ऋग्वेदातील सूक्तांत आढळते.

देवता
उषा, अश्विनौ, भग, पूषन्, अर्यमा, सोमरस, सूर्य, सविता, रुद्र, सोम (ग्रह), ब्रह्मणस्पती, अदिती, इंद्र, मरुत्, मित्रावरुण अशा अनेक देवतांची स्तुती ऋग्वेदातले मंत्र करतात. त्याकाळी देवतास्वरुपात प्रामुख्याने निसर्गाच्या विविध रुपांची पुजा केली जात असे. अशा देवतांना आवाहन करणारी, त्यांची स्तुती करणारी अनेक सूक्ते ऋग्वेदात आहेत. एकाच देवतेच्या संदर्भात येणा-या मंत्रांच्या गटाला देवतासूक्त म्हणतात.

ऋग्वेदातील अनेक मंत्र आपल्या परिचयाचे आहेत पण ते ऋग्वेदातले आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो. उदाहरणार्थ

आपल्याकडे हिंदी किंवा मराठी मालिकांमध्ये बारशापासून ते अंत्येष्टीपर्यंत काहीही मंगल अमंगल कार्य असले की ते भटजी एक मंत्र म्हणताना दाखवतात, ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः….’ हा ऋग्वेदातला मंत्र आहे. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणा-या ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या १० मंत्रांचा तो समूह आहे.

पुर्वी दुरदर्शनवर लागणा-या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत (मराठीत टायटल सॉंग!) आठवतंय का? ‘पृथ्वीसे पहीले सत नही था……’ ऋग्वेदातल्या नासदीयसूक्ताचे ते भाषांतरीत गाणं होतं. ऋग्वेदातल्या काही गोष्टीही या मालिकेत दाखवल्या होत्या… सृष्टीच्या उत्पत्तीविषयक गुढ चर्चा करणारे हे सूक्त आहे.

याचप्रकारे पुरुषसूक्तासारखे आपल्या ऐकण्यातले सूक्त हे ही ऋग्वेदातलेच आहे.भारतीय नौदलाचे ‘शं नो वरूणः’ हे बोधवाक्यही ऋग्वेदातलेच आहे.

एकुण काय तर वेद हे अपौरुषेय आहेत की नाहीत हा मुद्दा वादाचा असला तरी ते अगम्य आणि अज्ञेय नक्कीत नाहीत.. यजुर्वेदासह इतर वेदांबद्दल पुढील भागात……

तळटिप

१. ऋचां समूहो ऋग्वेदः। २. ऋच्यते – स्तूयते प्रतिपाद्यः अर्थः यथा या ऋक् ३. अपौरुषेयम् वाक्यं वेद। – सायण

पुढील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद ओळख वेदांची – समग्र लेखमाला

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact