ओळख वेदांची – उपनिषद – भाग २

उपनिषदे

छान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार? त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार? त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.

आरुणि – बाळ श्वेतकेतु, गुरुकुलातून आल्यापासून तू किंचित गर्विष्ठ वाटत आहेस.
श्वेतकेतु – नाही बाबा, मी सखोल अभ्यासाने विद्या प्राप्त केली आहे. या ज्ञानामुळे मी परीपक्व झालोय. मला याचा अभिमान आहे गर्व नाही.
आरुणि – तू गुरुकुलातून उच्च ज्ञान प्राप्त करून आला आहेस. इतक्याच अभ्यासाचा तूला अभिमान वाटतोय? हरकत नाही, तर मग मला हे सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी जाणल्यावर अप्राप्यही प्राप्त होते किंवा अज्ञातही ज्ञात होते ?
हा प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतु गोंधळात पडतो. अज्ञातही ज्ञात होण्याची विद्या कोणती? हे त्याला गुरुकुलात शिकवलेले नसते.
आरुणि – बाळा, विद्या शिकल्याने प्राप्त होणारे ज्ञान हे श्रेष्ठ असतेच परंतू ते अंतिम ज्ञान नव्हे. तू गुरुकुलात जे ज्ञान शिकलास ते बाह्य जगाबद्दलचे ज्ञान होते. ते जग जे आपल्याला पाहता येते तसेच स्पर्श, रस आणि गंध यांच्या माध्यमातून अनुभवता येते. परंतु त्या जगाचे अंतरंग आपल्या दृष्टीस पडत नाही. ते जाणून घेण्याची विद्या साध्य करता आली पाहिजे.
श्वेतकेतु – मी पुरेसे समजलो नाही बाबा. आपण थोडे विस्ताराने सांगाल काय?
आरुणि – हे तांब्याचे पात्र पहा. आपल्या डोळ्यांसमोर हे पात्र आहे. त्याचा उपयोग आपण करतो. अशा अनेक तांब्याच्या वस्तू आपण वापरतो. ही पात्रे आणि त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. मात्र त्याचे मूळ मात्र ‘ताम्र’ हा एकमेव धातूच आहे. तसेच आपल्याला दिसणारे जग हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असले तरी त्याचे मूळ हे एकच तत्त्व आहे. ते तत्वच एकदा जाणले की संपूर्ण सृष्टीचे स्वरूप उलगडेल. पाण्यात विरघळलेले मीठ आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या खारट चवीवरून आपण ओळखतो तसेच सृष्टीतील प्रत्येक घटकात हे तत्व अंतर्भूत आहेच. सृष्टीच्या अंतरंगात शिरून ते जाणण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.

छान्दोग्य उपनिषदातील ही कथा/संवाद केवळ छान्दोग्यच नव्हे तर सर्वच उपनिषदांच्या विषयावर प्रकाश टाकते. सृष्टीचे कोडे उलगडण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्याचे कार्य उपनिषदे करतात. त्यामुळेच उपनिषदांचे विषय हे अदृष्याचे ज्ञान, आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, ज्ञानोपासना असेच आहेत.

(** यावरून हे ही लक्षात यायला हरकत नाही की उपनिषदांचा विषय फक्त आणि फक्त आत्मानुभूतीचे तत्वज्ञान आहे. कोणत्याही देवाची उपासना किंवा पर्यायाने धर्माचा उपदेश प्रमुख उपनिषदात येत नाही. त्यामुळेच जगातील जवळपास सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या तत्त्वज्ञांना उपनिषदे आकर्षित करतात.)

संवाद अर्थात (One on One Discussion)

आपण मागच्या लेखात पाहिले की उपनिषद शब्दाचा अर्थ (गुरुजवळ) बसून प्राप्त केलेले ज्ञान असा होतो. याच अर्थाला साजेसे असे हे संवाद सर्व प्रमुख उपनिषदांमध्ये येतात. गुरु-शिष्य, पिता-पूत्र, पती-पत्नी किंवा देव-मानव अशा अनेक प्रकारच्या संवादातून उपनिषदे अतिशय सहज सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडतात. आजकाल जसे Talk Shows किंवा Expert Interviews/Dialogues होतात तसेच.

आरुणि – श्वेतकेतु प्रमाणेच
याज्ञवल्क्य – मैत्रेयी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – गार्गी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – जनक राजा
(*सीता फेम नसावा पण त्याच वंशातला) (बृहदारण्यक उपनिषद),
अजातशत्रु – गार्ग्य बालाकि (कौषितकी उपनिषद),
यमराज-नचिकेता (कठोपनिषद),
शौनक – अंगिरस (मुण्डकोपनिषद),
कामलायन – सत्यकाम जाबाल (छान्दोग्य उपनिषद),
नारद – सनत्कुमार (छान्दोग्य उपनिषद)

असे अनेक संवाद उपनिषदांमध्ये येतात.

संख्या –

उपनिषदांची एकूण संख्या किती आणि त्यातील प्रमुख उपनिषदे कोणती हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेदवाङ्मयाचा भाग असल्याकारणाने प्रत्येक वेद व त्याच्या सर्व शाखांची उपनिषदे होती असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उपनिषदांची संख्या जवळपास ११८० च्या आसपास भरते. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत त्यातील पहिल्या श्लोकात दहा प्रमुख प्राचीन उपनिषदे येतात. ती अशी

ईशकेनकठप्रश्नमुण्डमाण्डूक्यतित्तिरिः । ऐतरेयम् च छान्दोग्यं बृहदारण्यकम् तथा।। (ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड/मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरिय, ऐतरेय , छान्दोग्य तसेच बृहदारण्यक)

आदि शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्ये लिहीली यात वरील १० आणि श्वेताश्वतर उपनिषदाचा समावेश होतो. याखेरीज निरनिराळ्या विद्वानांनी गौरवलेली कौषीतकी, प्रश्न, मैत्री अशी इतरही काही उपनिषदे प्रमुख मानली जातात. यातील ईश, कठ आणि मुण्डक ही उपनिषदे पद्य तर बाकीची गद्य स्वरूपात आहेत.

विषय

संख्या आणि विषयाची खोली लक्षात घेता उपनिषदातील विषयांवर भाष्य करणे हे एका लेखाचे काम नव्हे. बाह्य सृष्टी आणि ब्रह्मरुप आत्मा या दोन्हीचे यथार्थ स्वरूप उपनिषदे मांडतात. श्वेतकेतु, मैत्रेयी, नचिकेत या सारख्या अनेक जिज्ञासुंच्या शंका आणि त्याचे गुरुतुल्य ऋषींनी विस्तृतपणे केलेले समाधान अशी मांडणीची सोपी पद्धत उपनिषदे अंमलात आणतात. मी कोण? हे जग कसे निर्माण झाले? याचा कर्ता कोण आहे? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यंत गुढ अशा या शंका आहेत.

याखेरीज उत्कृष्ट वचने (वाक्ये), गोष्टी, वर्णने आणि भाष्य या माध्यमांचाही उपनिषदात उपयोग होतो.

आत्मा आणि ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा मुख्य विषय असला तरी त्या अनुषंगाने सृष्टीच्या जवळपास प्रत्येक घटकाचा तात्त्विक अंगाने उपनिषदे अभ्यास करतात.

साधे उदाहरण घ्यायचे तर आजकाल प्रसिद्धीस आलेल्या ‘योग’ (आजच्या भाषेत योगा (Yoga)) चे मूळ हे श्वेताश्वतर उपनिषदात आढळते. प्राणाचा अवरोध, इंद्रियदमन आणि समाधी स्थिती यावर विस्तृत भाष्य या उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात येते. अगदि योगाभ्यासासाठी योग्य जागेच्या निवडीपासून ते समाधी स्थितीतील जीवात्म्याला होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनपर्यंतचे विचार या उपनिषदात मांडले आहेत. अशाच प्रकारे ॐकार (प्रणव) तसेच इतर प्रतीकांची उपासना, यज्ञ, कर्म, वर्तन, वाणी, विचार अशा असंख्य विषयांवरचे तत्वज्ञान उपनिषदातून मिळते.

महावाक्ये

ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. तांब्याच्या पात्राच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे – स्वतः कोण आहोत याचे रहस्य जाणणे म्हणजेच सृष्टीचे रहस्य जाणणे होय. ही उपनिषदांची शिकवण आहे. या अर्थाची जी वाक्ये उपनिषदात येतात त्यांना महावाक्ये म्हणतात. प्रत्येक वाक्य एकेका वेदाशी संबंधित उपनिषदात येते.

१. प्रज्ञानं ब्रह्म। (ऐतरेय उपनिषद) (प्रकट ज्ञान हेच ब्रह्म आहे)
२. अहं ब्रह्मास्मि। (बृहदारण्यक उपनिषद) (मी (आत्मा) ब्रह्म आहे),
सोSहम्। (ईशोपनिषद) (तो मीच आहे)
३. तत्त्वमसि। (छान्दोग्य उपनिषद) (ते (ब्रह्म) तू आहेस)
४. अयमात्मा ब्रह्म। (माण्डूक्य उपनिषद) (हा आत्मा ब्रह्म आहे)
गूढ तसेच अर्थगर्भ अशी ही वाक्ये वाचली की उपनिषदांना भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया का म्हणतात ते लक्षात येते.

आपल्या परिचयाचे

आपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य उपनिषदातलेच आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे याच अर्थाचे Pravda vítězí (सत्याचाच विजय होतो) हे वाक्य चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय चिन्हात येते.

आपण नेहेमी म्हणत आलेला –

भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः । स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑।

हा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातला मंत्र माण्डूक्य उपनिषदाच्या सुरुवातीला येतो. ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः’ हा स्वस्तिमंत्र याच उपनिषदात पुढे येतो.

महत्व

केवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.

तळटीप

१. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्‌ सत्यस्य परमं निधानम्‌ ॥ (मुण्डकोपनिषद – तृतीय मुण्डक – खंड १ मंत्र ६)
२. भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः ।
स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑ ॥ ऋग्वेद मंडल १.सूक्त ८९ ऋचा ०८

मागील भाग – ओळख वेदांची – उपनिषद पुढील भाग – ओळख वेदांची – आरण्यक

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

ओळख वेदांची – उपनिषद

उपनिषदे

शहाजहान बादशहाचे नाव घेतले की दोन गोष्टी अपरिहार्यपणे समोर येतात. एक अर्थातच ताजमहाल आणि दुसरा औरंगजेब! त्यापैकी ताजमहाल हा शहाजहान बादशहाने भारताला दिला की तो आधीपासूनच अस्तीत्वात होता हा वादाचा विषय आहे आणि औरंगजेब………… असो! परंतु फार प्रसिद्ध नसलेली आणि केवळ आपल्या कार्यामुळे भारताला उपयुक्त ठरलेली शहाजहानची आणखी एक देणगी म्हणजे त्याचा ज्येष्ठ पुत्र – दारा शिकोह.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाने मारलेल्या भावंडाच्या यादीतला एक भाऊ, केवळ इतकाच काय तो दाराचा आणि आपला परिचय. यापेक्षा त्याबद्दल अधिक काही वाचनात येत नाही.

भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया असणारी उपनिषदे पाश्चात्य जगतापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा असणारा पहिला ऐतिहासिक दुवा म्हणून दारा शिकोह चे नाव घेतले तर आश्चर्य वाटेल की नाही?!

पण हे खरं आहे. हिंदु आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास दारा शिकोह ने केला होता. १६५७ च्या आसपास दारा शिकोह ने जवळपास ५० उपनिषदांची पर्शियन भाषेत भाषांतरे केली. पाश्चात्यांना पुरेशी माहीती नसणाऱ्या या महान ग्रंथांची ही भाषांतरे अब्राहम अंकेतिल द्युपरॉं (Abraham Hyacinthe Anquetil-Duperron) या फ्रेंच विद्वानाच्या हाती आली. त्याने १७९६ पर्यंत या सर्व भाषांतरीत उपनिषदांची लॅटिन भाषेत Oupnek’hat या नावाने भाषांतरे केली आणि पाश्चात्य जगताला भारतीय तत्त्वज्ञानाच्या या थोर परंपरेची ओळख करून दिली.

उपनिषदांवर खरेतर लिहायला लागू नये इतकी ती आता प्रसिद्ध झाली आहेत. जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाचा कोणताही उल्लेख हा उपनिषदांशिवाय पूर्णच होत नाही. शॉपेनहाउएर (Arthur Schopenhauer) पासून आजतागायत अनेक पाश्चात्य विद्वानांनी उपनिषदांचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे.

आत्तापर्यंत आपण चारही वेद आणि ब्राह्मण ग्रंथांबाबत माहिती घेतली. यातून वैदिक धर्म, त्यातील देवता, यज्ञसंस्था, वेदकालीन लोक, त्यांचे जीवन या सर्व गोष्टींचा परिचय करून घेतला. यात वैदिक धर्मातील कर्मकांडांचा भागही आला. आता थोडे पुढे जाउयात. वैदिक धर्माची ज्ञानकांडे म्हणजे उपनिषदे.

उत्तरवेदकाळात यज्ञसंस्थेचे महत्व वाढत गेले. निरनिराळ्या देवता यज्ञ केल्याने संतुष्ट होऊन यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या इच्छा पूर्ण करतात अशी धारणा पक्की होत गेली. परंतु त्यामुळे सुरुवातीला असणारे यज्ञसंस्थेचे उदात्त स्वरूप बदलले. अनेक प्रकारचे यज्ञ प्रचारात येऊन यज्ञसंस्थेची आणि पर्यायाने कर्मकांडाची बेसुमार वाढ होऊ लागली. देवदेवतांचे ‘प्रस्थ’ प्रमाणाबाहेर वाढत गेले. यातूनच देवाच्या अस्तीत्वाबद्दलच संशय निर्माण होऊ लागला. देव किंवा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे नक्की काय या संदर्भातील जिज्ञासा वाढीस लागली. कर्मकांडरहित शुद्ध ज्ञान, ज्ञानोपासना आणि ब्रह्मजिज्ञासा दृढ होत गेली. हाच उपनिषदांचा आरंभ होय. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान विस्तृतपणे मांडणे या उद्देशाने उपनिषदांची रचना झाली असे म्हणता येईल.

उपनिषदांमध्ये दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख येतो.

परा विद्या – आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाशी संबंधित विद्येला परा विद्या अशी संज्ञा आहे.
अपरा विद्या – आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगताशी संबंधित विद्येला अपरा विद्या म्हणता येईल.

**(जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

उपनिषदांचा मुख्य विषय पराविद्य़ा हाच आहे.

उपनिषद या शब्दाचेही अनेक अर्थ प्रचलित झाले. यातील समजण्यासाठी सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे – उप + नि + सद् अर्थात जवळ बसणे, म्हणजेच गुरुच्या जवळ बसून साधकाने प्राप्त केलेले ज्ञान. आदि शंकराचार्यांच्या मते अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद्.

उपनिषदांचा विषय त्याच्या नावातूनच नीट स्पष्ट होतो. डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगाच्या पलिकडे जाऊन तर्क आणि बुद्धीसामर्थ्याने ही सृष्टी समजून घेण्याचे ज्ञान म्हणजेच उपनिषदे.

वेदान्त – उपनिषदांना वेदान्त अशीही संज्ञा आहे. साधारणपणे वेदवाङ्मयाचे जर भाग पाडायचे झाले तर मंत्र, कर्म आणि ज्ञान असे तीन विभाग करता येतील. याची ग्रंथविभागणी खालीलप्रमाणे होईल.

मंत्र – मंत्रमय संहिता (प्रत्यक्ष वेद) कर्म – कर्मकांड आणि उपासनापद्धतीचे वर्णन करणारी ब्राह्मणे आणि आरण्यके ज्ञान – ज्ञानस्वरूप उपनिषदे

अशाप्रकारे उपनिषदे वेदवाङ्मायाच्या अंतिम टप्प्यात येतात म्हणून त्यास वेदान्त अशी संज्ञा वापरली जाते.

मुक्तिकोपनिषदात भगवान श्रीराम व हनुमंताचा संवाद आहे. कैवल्यरूप मुक्ति कोणत्या उपायाने प्राप्त होईल असे हनुमंताने विचारल्यावर भगवान राम उत्तर देतात –

इयं कैवल्यमुक्तिस्तु केनोपायेन सिद्ध्यति । माण्डूक्यमेकमेवालं मुमुक्षूणां विमुक्तये ॥ २६॥
तथाप्यसिद्धं चेज्ज्ञानं दशोपनिषदं पठ ।ज्ञानं लब्ध्वा चिरादेव मामकं धाम यास्यसि ॥ २७॥

मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकांना मुक्ती देण्यासाठी (एकटे) माण्डूक्य उपनिषद पुरेसे आहे. त्यातूनही जर ज्ञान किंवा उपरती साध्य झाली नाही तर (मात्र) दहा उपनिषदांचे अध्ययन कर. त्यामुळे (आत्म)ज्ञानासह माझे परमधाम (वैकुंठ?) प्राप्त होईल.

ही दहा उपनिषदे कोणती आणि त्यात काय सांगितले आहे. हे पुढील भागात……………

तळटिप
१. अथ परा, यया तदक्षरमधिगम्यते । – मुण्डकोपनिषद् १-१-६

मागील भाग – ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ पुढील भाग – ओळख वेदांची – उपनिषद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ

समग्र वेदवाङ्मयाचा परिचय करुन घेण्याच्या उपक्रमात आपण सर्वप्रथम चारही वेदांची ओळख करून घेतली. वेदांनंतर अर्थातच क्रमाने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश होतो. यातील ब्राह्मण ग्रंथांचा परिचय करून घेऊयात. (जातीने ब्राह्मण असण्याचा आणि या ग्रंथांच्या नावाचा आपापसात काही संबंध नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.)


वेदवाङ्मयातील वेद आणि उपनिषदे ही सर्वसाधारणपणे आपल्या बोलण्यात किंवा ऐकण्यात येतात. त्यांचा थोडाफार परिचयही आपल्याला असतो. परंतु ब्राह्मण ग्रंथ हे त्यामानाने किंचित कमी परिचयाचे आणि ऐकण्यातही कमी येतात. याचे मुख्य कारण अर्थातच त्यांचे विषय आहेत. वेदांचे महत्त्व अर्थातच वेगळे सांगायला नको. उपनिषदे ही भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया म्हणून प्रसिद्ध आहेतच. ब्राह्मण ग्रंथांचा विषय हा प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञप्रक्रिया यांचे विस्तृत विवेचन हा असल्याने याज्ञिकी जाणणाऱ्या, आचरणाऱ्या किंवा अभ्यासणाऱ्या लोकांव्यतिरिक्त या ग्रंथांबद्दल माहित असणारे लोक खुप कमी आढळतात. गंमतीचा भाग असा की आपल्या नैमित्तिक पूजाकर्मात किंवा निरनिराळ्या व्रतांच्या संदर्भातील पूजनांमधील अनेक विधींचे मूळ हे ब्राह्मण ग्रंथांतील यज्ञविधीच्या विवेचनात आढळते पण ते आपल्या ध्यानात येत नाही. आपण आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे रोजच्या पठणातील अऩेक मंत्र जसे वेदातील आहेत हे आपल्याला ठाऊक नसते तसेच.

उत्तरवेदकालामध्ये यज्ञसंस्थेचे महत्त्व वाढत गेले. यज्ञसंस्थेतील प्रत्येक अंगाची सांगोपांग माहिती असणे हे अतिशय आवश्यक कार्यच झाले. यज्ञ, यज्ञातील मंत्र, त्यांची पठण पद्धती, त्या अनुषंगाने केले जाणारे विधी, विधी करण्यामागची भूमिका, त्यासाठी लागणारी साधने, विधी सिद्ध करण्याचे योग्य तंत्र यासाठी अचूक संहितांची आवश्यकता भासत गेली. ब्राह्मण ग्रंथांची रचना याच कारणाने करण्यात आली असे मानले जाते.

काही तासांच्या छोट्या यज्ञापासून ते १५ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचे यज्ञ हे – आयोजन, शेकडो व्यक्ती, वस्तू आणि विधी यांचा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून अत्यंत नियोजनबद्ध पार पाडले जात असत.कार्यक्रमाच्या रुपरेषेपासून ते उपकराणांच्या मांडणीपर्यंत प्रत्येक चरण (step) पूर्वनियोजित असे. यावरून कार्यक्रम व्यवस्थापन (Event Management) सारख्या आजकालीन शास्त्रातील तत्कालीन लोकांनी केलेली प्रगती ठळकपणे दिसून येते.

व्याख्या किंवा अर्थ –

ब्राह्मण शब्दाची उत्पत्ती किंवा अर्थ काय असावा यावर अनेक विद्वानांची भाष्ये आहेत. ब्रह्म या शब्दाच्या दोन प्रचलित अर्थांचा संदर्भ येथे घेतला जातो. ब्रह्म म्हणजे मंत्र किंवा यज्ञ. शतपथ ब्राह्मणात ‘ब्रह्म वै मन्त्रः’ असा उल्लेख आहे. याचा अर्थ वैदिक मंत्रांचे (ब्रह्म) विवेचन करतात ते ब्राह्मण असा होतो.

विषय –

आधी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञ प्रयोगाची माहिती येते. याचे अर्थातच दोन भाग पडतात. एक विधी आणि दुसरा अर्थवाद. साधारणतः विधी म्हणजेच यज्ञाच्या सविस्तर प्रयोगाची माहिती तर अर्थवाद म्हणजे प्रयोगाचा उद्देश, त्यातील तंत्र, मंत्र आणि कृतीचे समर्थन करणारा युक्तिवाद किंवा माहिती. ब्राह्मण ग्रंथांचा विषय आणि त्याची विभागणी कशी आहे यावर शाबरभाष्यात स्पष्टिकरण मिळते. ऋषी शबरांच्या मते ब्राह्मणग्रंथात यज्ञविधीचा विस्तार आणि विचार दहा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून केला जातो.

हेतु, निर्वचन, निंदा, प्रशंसा, संशय, विधि, परकृति, पुराकल्प, व्यवधारणकल्पना आणि उपमान.

यातील प्रमुख संकल्पना सहा आहेत त्यांची थोडक्यात माहिती पाहू

१. विधि – कोणताही यज्ञ कधी आणि कसा करावा तसेच त्याची साधने काय असावीत, यज्ञातील प्रमुख पुरोहित कोण असावेत इ. चा विचार येथे केला जाई. तैत्तिरिय संहितेत औदुंबराची फांदी वापरण्याचा उल्लेख आहे. यजमानेन सम्मिता औदुम्बरी भवति। यात ही फांदी यजमानाच्या मापाची असावी असे म्हटले आहे. यावरून यज्ञसाधनांचा किती खोलवर विचार केला जाई हे समजून येते.

२. विनियोग – विनियोग म्हणजे अर्थातच उपयोग किंवा वापर. कोणत्या मंत्राच्या विनियोगाने (वापराने/उच्चारणाने) कोणता उद्देश सफल होतो याचा विचार म्हणजे विनियोग. उदाहरणार्थ प्राण्यांच्या रोगनिवारणार्थ ‘सः नः पवस्व शं गवे’ हा मंत्र म्हटला जावा.

३. हेतु – हेतु म्हणजे अर्थातच कारण. एखादा विशिष्ट विधी करण्यासाठीचे कारण किंवा एखादे उपकरण किंवा मंत्र वापरण्यामागचा हेतू काय आहे याचा येथे विचार केला जाई.

४. अर्थवाद – अर्थवाद म्हणजे यज्ञविधीसाठी उपयुक्त गोष्टींची प्रशंसा आणि निषिद्ध किंवा त्याज्य गोष्टींची निंदा करणे. उदाहरणार्थ यज्ञात उडीद हे निषिद्ध मानले जातात म्हणून तैत्तिरिय संहितेत ‘अमेध्या वै माषा’ असा उल्लेख आहे.

५. निरुक्ति – निरुक्त या यास्काचार्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाच्या संदर्भातीलच अर्थ येथे येतो. निरुक्ति म्हणजे शब्दांची व्याख्या. यज्ञादि कर्माच्या संदर्भात वापरल्या जाणा-या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणे म्हणजे निरुक्ति. ब्राह्मण ग्रंथात याचा खुप खोलवर विचार झाल्याचे दिसते.

६. आख्यान – आख्यान म्हणजे खरंतर गोष्ट किंवा कथा. येथेही यज्ञविधीचा विषय रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे आख्यान होय. यात यज्ञातील विधी त्यामागील उद्देश यांच्या संदर्भातील कथा येतात. अशाप्रकारे बोध करून देणाऱ्या अनेक सुंदर कथांचा संग्रह ब्राह्मण ग्रंथातून आपल्याला पहायला मिळतो. उदाहरणार्थ – स्वार्थ आणि निःस्वार्थ प्रवृत्तीवर भाष्य करणारी शुनःशेपाची कथा (ऐतरेय ब्राह्मण), अपात्री विद्यादान न करण्यासंदर्भातील दध्यंग अथर्वणाची कथा इ.

या विवेचनावरून हे ध्यानात येईल की भारतीय संस्कृतीचे प्रत्येक अंग मग ते तत्त्वज्ञान असो की यज्ञासारखे कर्मकांड, अतिशय विचारपूर्वक व सर्वसमावेशक पद्धतीने मांडले जात असे. यज्ञविधीत वापरल्या जाणा-या साध्या पळी पासून ते यज्ञाच्या अंतिम टप्प्यात केल्या जाणा-या अवभृथस्नानापर्यंत प्रत्येक विधी, मंत्र, साहित्य, वस्तू आणि व्यक्तीच्या संदर्भात या १० वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून मगच त्याचा स्वीकार केला जात असे. यावरून तत्कालीन ऋषीमुनींची जीवनदृष्टी किती सखोल होती हे लक्षात येते. आजही आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा संकल्पापासून ते क्षमापनापर्यंतचे सर्व विधी करतो त्या प्रत्येक कृती, कर्म आणि मंत्रामागचा विचार हा ब्राह्मण ग्रंथांची देणगी आहे.

ब्राह्मण ग्रंथांची विभागणी –

प्रत्येक वेदात आणि वेदशाखेत ब्राह्मण ग्रंथांची रचना करण्यात आली. आजही विभागशः जवळपास १८ ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहेत ते असे

ऋग्वेद – ऐतरेय ब्राह्मण आणि शांखायन/कौषीतकि ब्राह्मण

शुक्लयजुर्वेद – शतपथ ब्राह्मण

कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय ब्राह्मण

सामवेद – सामवेदाची ताण्ड्य, षड्विंश, सामविधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद, संहितोपनिषद, वंश, जैमिनीय अशी एकूण ९ ब्राह्मणे मानतात.

अथर्ववेद – गोपथ ब्राह्मण

वेदातील मंत्रांचे अर्थ, यज्ञातील विधी आणि प्रयोग याबरोबरच ब्राह्मण ग्रंथात भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचीही माहिती मिळते. विशेषतः प्राचीन तसेच उत्तरवेदकालीन इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये ऋगवेदाइतकेच शतपथ ब्राह्मण प्रसिद्ध आहे. आकाराने सर्वात मोठ्या अशा या ब्राह्मणात यज्ञविधी तर आहेतच पण त्याबरोबरच इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कुरु, पांचाल, कोसल, विदेह या राज्यांचा तसेच जनक, दुष्यन्त, जनमेजय इ. राजांचेही उल्लेख आढळतात. एकूण काय तर वेदवाङ्मय समृद्ध करून त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध ब्राह्मण ग्रंथ जोडतात. उपनिषदांसारखे तत्त्वचिंतन करणारे ग्रंथही ब्राह्मण ग्रंथाचाच भाग म्हणून विकसित होतात. त्या उपनिषदांबद्दल पुढच्या भागात.

तळटिप
१ तैत्तिरिय संहिता ६/२/१०/३
२ ताण्ड्य ब्राह्मण

मागील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद पुढील भाग – ओळख वेदांची – उपनिषद (क्रमशः)

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

ओळख वेदांची – अथर्ववेद

हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।

सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.

पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात.

अथर्ववेद….

चार वेदातील अंतिम परंतु विषयांच्या विविधतेत ऋग्वेदाच्या तोडीचा वेद म्हणजे अथर्ववेद. रचनेच्या दृष्टीकोनातून आणि भाषिक वैशिष्ट्यांवरून अथर्ववेदाचा काळ आणि स्थान याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते अथर्ववेदाचे संकलन जरी ऋग्वेदोत्तर काळातील वाटले तरी त्यातली मंत्र ऋग्वेद काळापासून रचनेत होते असेही मानले जाते.

असाही एक विचारप्रवाह आहे जो असे मानतो की अथर्ववेद हा वेदच नाही. कारण अथर्ववेदातील यज्ञ सोडून इतर अनेक विषय जसे यातु विद्या किंवा अभिचार मंत्र हे वैदिक धर्म, परंपरा किंवा संस्कारांचा भाग नाहीत. यासाठी इतर काही ग्रंथातील दाखले दिले जातात जसे ‘त्रयोवेदा अजायन्त’ (ऐतरेय ब्राह्मण) , ‘वेद शून्यैस्त्रिभिरेति सूर्यः’ (तैत्तिरिय ब्राह्मण) किंवा ‘यम् ऋषयस्त्रयी विदो विदुः ऋचः सामानि यजुष’ (तैत्तिरिय ब्राह्मण). आपण अर्थातच त्या वादात पडण्याचे कारण नाही कारण त्याचे खंडन अनेक थोर विद्वानांनी केले आहे. आज अथर्ववेदाचे स्वरुप आणि त्याचे भारतीय ज्ञानशाखातील योगदान पाहता अथर्ववेद हा वेदच होता यात शंकाच उरत नाही.

अथर्व …..

‘थर्व’ या धातूपासून ‘थर्वन्’ हा शब्द तयार होतो. निरुक्तात याचा अर्थ गतीशील असा होतो. म्हणून अथर्वन् म्हणजेच – गतिहीन, निश्चल किंवा स्थिर. अथर्ववेद म्हणजे अढळ ज्ञान देणारा अशा अर्थाने हा शब्द येतो. अथर्वन् आणि अंगिरस ऋषींनी रचलेला म्हणून ‘अथर्वांगिरस’ असेही या वेदाचे नाव आहे. अथर्वन् ऋषीकुलाने यज्ञादी कर्मे तर अगिरसांनी अभिचारादि मंत्राची रचना केली असे मानतात. याशिवाय ब्रह्मवेद, छन्दोवेद, भैषज्यवेद, क्षत्रवेद अशी अनेक नावे अथर्ववेदाला दिली जातात.

एकाच वेदाची इतकी नावे येण्याचे मुख्य कारण म्हणजे या वेदात अंतर्भूत असलेले विषय. चारही वेदात सर्वात जास्त विविधता असलेला वेद म्हणजे अथर्ववेद. ब्रह्मज्ञानापासून ते शापापर्यंत, आयुष्यवर्धक मंत्रांपासून ते शत्रुनाशक सूक्तांपर्यंत, औषधी उपचारांपासून ते जादुटोण्यापर्यंत, शेती पासून ते राज्यकर्मापर्यंतचे आणि भूगोलापासून ते खगोलापर्यंत अनेकविध विषय अथर्ववेदात येतात. म्हणूनच तर एकाच वेळी आयुर्वेद, अर्थशास्त्र (राजनीती) आणि शिल्पशास्त्र असे तीन सर्वस्वी भिन्न विषय अथर्ववेदाला आपले उगमस्थान मानतात.

रचना….

अथर्ववेद हा वेदवाङ्मयातील एक असला तरी त्याची रचना ऋग्वेदाइतकी काटेकोर नाही. अथर्ववेदात अध्यायाऐवजी रामायणासारखा कांड हा शब्द वापरलाय. एकूण २० कांडे मिळून ७३१ सूक्ते आहेत, ज्यात साधारण ५९८७ मंत्र आहेत. यातील जवळपास १२०० मंत्र ऋग्वेदातले आहेत. अथर्ववेदात काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपात विवेचन आढळते हे त्याचे अजून वैशिष्ट्य आहे.

काय आहे अथर्ववेदात…

एकदा अथर्ववेदातील विषयांची नुसती सुची पाहिली तरी अथर्ववेदात काय नाही असे म्हणावे लागेल! वैदिक कालखंडातील जनजीवनाचा विश्वकोश म्हणजे अथर्ववेद आहे. त्याकाळातील तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, राज्यतंत्र, शेती, तंत्रज्ञान आणि वैद्यक या सर्वविषयांवर सविस्तर भाष्य अथर्ववेदात येते. अथर्ववेदातील विषयांची सूक्तवार लहानशी सूची पाहूयात म्हणजे अथर्ववेदाची व्याप्ती समजून येईल.

भैषज्यसूक्ते – अथर्ववेदातील या सूक्तात निरनिराळ्या ८९ रोगांची माहिती आणि त्यांची चिकित्सा सांगितली आहे. या मंत्रात औषधे, औषधी वनस्पती आणि पाण्याचे वर्णन आणि प्रशंसा आढळते. कौशिक सूक्तात या मंत्रांच्या सहाय्याने केल्या जाणा-या जादूटोण्याचे वर्णन आहे. दन्तपीडा (दातदुखी), अतिसार, कुष्ठरोग, यक्ष्मा (क्षय) असे असंख्य आणि आजही आपल्याला माहिती असणारे रोग यात येतात. भैषज्यसूक्तात अनेक किटक, किटाणु, भूत, राक्षस यांचीही वर्णने आहेत.

आपल्या माहितीतले सांगायचे तर आजच्या भाषेत ज्याला ‘ओपन फ्रॅक्चर’ (Open Fracture) म्हणतात त्याचीही चिकित्सा अथर्ववेदात आढळते. रोहीणी वनस्पतीच्या सहाय्याने ती जखम कशी बांधावी याचे साद्यंत वर्णन त्या सूक्तात आढळते.

आयुर्वेदाचे मुळ अथर्ववेदात आहे असे का म्हणतात ते आपल्याला यातून उमगते. केवळ उपचारच नव्हेत तर अनेक वनस्पतींचे औषधी उपयोग आणि त्यावरील मंत्रांवरून त्याकाळी वनस्पतीशास्त्र(Botany) हे ही अभ्यासाचा भाग होते हे लक्षात येते.

पौष्टिक सूक्त – सुखसमृद्धिसाठी करण्यात येणा-या प्रार्थना या सूक्तातून व्यक्त होतात. घर बांधताना, हंगामाच्या सरुवातीला शेतात नांगर धरताना, पेरणीच्या वेळी तसेच उत्तम पीक आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या समृद्धीसाठीच्या प्रार्थना या सूक्तात येतात.

आयुष्य सूक्त – स्वास्थ्य आणि दीर्घायुषी जीवनासंबंधित अनेक सूक्ते अथर्ववेदात येतात. या मंत्रातून निरोगी आणि शतायुषी जीवनाची प्रार्थना केली जात असे.

प्रायश्चित्त सूक्त – पाप किंवा अपराधाच्या क्षमापनार्थ करण्यात येणा-या प्रायश्चित्तांशी संबंधित मंत्र या सूक्तात येतात. केवळ पापच नव्हे तर यज्ञ करताना जर चूक झाली तर त्यावरील प्रायश्चित्त विधानेही या मंत्रात येतात. ग्रह किंवा नक्षत्रांना शांत करण्याचे मंत्रही या सूक्तात येतात.

स्त्रीकर्माणि सूक्त – विवाह संस्कार, त्याचे विधी तसेच पती पत्नीच्या परस्परप्रेमाची वाढ या विषयांवरील सूक्ताना स्त्रीकर्माणि सूक्ते म्हणता येईल. या मंत्राद्वारे वर किंवा वधू प्राप्त करता येईल असा विचार असे. याच सूक्तात असे अनेक मंत्र आहेत जे इन्द्रजाल, शाप, अभिशाप किंवा वशीकरण अशा विषयांशी संबंधित आहेत.

**(एकता कपूर किंवा झी मराठीच्या टि.व्ही सिरियलना उपयोगी पडतील असे पुरुष वशीकरण, सवतीचा नाश करणे, स्त्री-दुर्लक्षण निवारण अशा विषयांवरचे मंत्रही या सूक्तात येतात!)

राजकर्माणि सूक्ते – राजाच्या आणि राज्याच्या व्यवहारासंबंधी मंत्र या सूक्तात येतात. शत्रुवर विजय मिळविण्याची प्रार्थना करणारे, अस्त्र आणि शस्त्रांची माहिती देणारे मंत्रही यात आहेत.

अभिचारात्मक सूक्ते– अभिचार म्हणजे जादू. शत्रुचा नाश करणे, शत्रुने केलेली जादू परतावून लावणे, शत्रुच्या जादूटोण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, शत्रुपक्षात रोगाच्या साथी पसरवणे अशा अनेक विषयांवरचे मंत्र या सूक्तात येतात.

याच बरोबर पृथ्वीसूक्तासारखे मातृभूमीचे प्रेम दर्शवणारे नितांतसुंदर सूक्तही यात येते.

यज्ञिक सूक्त – दैनंदिन जीवनात केल्या जाणऱ्या पूजाअर्चा, उत्सवात केले जाणारे होम आणि इतर काही यज्ञांचे विधी या सूक्तांत येतात.

कुंताप सूक्त – अथर्ववेदाच्या २० व्या कांडात अनेक कूट आणि गूढ सूक्ते आहेत. अनेक कोडी आणि त्यांची उत्तरे, गूढ अर्थाचे मंत्र या सूक्तात येतात. ऋग्वेदातील अस्यवामीय किंवा नासदीयसूक्ताच्या तोडीची काही सूक्ते येथे आढळतात.

दार्शनिक सूक्त – ईश्वर, प्रजापति, ब्रह्म, मन, प्राण इ. वर भाष्य असणारे मंत्र या सूक्तांत येतात. गायीच्या रुपात केलेले ईश्वराचे वर्णनही या सूक्तात येते.

अशा प्रकारे अनेक रंजक, गुढ आणि अभ्यासपूर्ण विषयांचे उगमस्थान असणारा अथर्ववेद हा तत्कालिन समाजाचे चित्रण आणि आजच्या समाजाला मार्गदर्शन असे दोन्ही हेतू साध्य करतो.

उपसंहार

चारही वेदांच्या ओळख करून घेतल्यावर आपल्या लक्षात येते की केवळ चार धार्मिक पुस्तके इतकी संकुचित ओळख वेदांची नाही. समृद्ध, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी भारताची ओळख वेदांतूनच जगाला होते. वेद हे भारतीय संस्कृती आणि उपखंडतील ज्ञानाचे उगमस्थान आहेत. परमात्म्याचे तत्त्वज्ञान असो की आयुर्वेदाचे विज्ञान…… लौकीक आणि पारलौकीक जीवनाकडे अत्यंत जिज्ञासु वृत्तीने पहायला वेद शिकवतात. आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, शिल्प, पानक अशा अनेक शास्त्रांचा पाया वेदच रचतात. ऋग्वेदातले ऋषी आयुष्य निखळ आनंदाने जगतात, त्याचबरोबर त्याचे रहस्यही मांडतात. तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आपल्यालाही ते आयुष्य कसे जगता येईल ते समजावून सांगतात. रंग, रस, गंध, नाद आणि स्पर्श या सर्व अनुभुतीतून आयुष्याला आकार द्यायला वेद शिकवतात. जीवनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पहात त्याचा आनंद घेण्याचे तात्त्विक आणि शास्त्रीय ज्ञान वेदातून प्राप्त होते म्हणूनच हजारो वर्षानंतरही आज अनेक भारतीय आणि अभारतीय विद्वान वेदांचा अभ्यास करतात. वेदांच्या या ज्ञानशाखांबद्दल पुढील भागात……..

तळटिप

१. “अथर्वाणोsथर्वणवन्तः। थर्वतिश्चरतिकर्मा, तत्प्रतिषेधः।” (निरुक्तः–११.१८)
२. सं मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते पुरुषा परुः। अथर्ववेद पै. – ४/१५

मागील भाग – ओळख वेदांची -सामवेद पुढील भाग – ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – सामवेद

मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि” असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण, बृहद्देवता असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.

साम हा शब्द सा (ऋचा) + अम् (आलाप) असा तयार होतो. वेदातील ज्या ऋचांवर आलाप किंवा गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद असे म्हणता येईल. ऋचा आणि साम हे एकमेकांशिवाय असूच शकत नाहीत. त्यामुळे हे दोघे जणु पति पत्नीच आहेत असे म्हटले आहे! याचाच अर्थ गायन हे आपल्या उपासनापद्धतीचा एक अविभाज्य अंगच होते.

सामवेदाची रचना कशी आहे?

पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे सामवेदाचे दोन भाग आहेत. सामवेदातील मंत्रांची संख्या साधारण १८७५ असून त्यातील ९९ मंत्र सोडले तर बाकी सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. पुर्वार्चिकात देवतांच्या स्तुतीपर मंत्र आहेत तर उत्तरार्चिकात यज्ञात आवश्यक असणा-या ऋचांचा संग्रह आहे.

ज्या मंत्रांच्या आधारावर गायन केले जाते त्याला योनिमंत्र म्हणतात. यालाच आपण आजच्या भाषेत थाट म्हणू शकतो. अशा एका योनिमंत्रावर अनेक गाणी गायली जाऊ शकतात. ऋग्वेदातील एकाच मंत्राचे गायन गौतम किंवा कश्यप असे ऋषीं त्यांच्या त्यांच्या शैलीने करत असत. जसे आज दोन भिन्न घराण्यातील गायक एकच राग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडतात.

उदाहरणार्थ ऋग्वेदातील एक मंत्र आपण सामयोनिच्या नोटेशनसकट पाहुयात

मूळ मंत्र –

अग्न॒ आया॑हि वी॒तये॑ गृणा॒नो ह॒व्यदा॑तये ।नि होता॑ सत्सि ब॒र्हिषि॑ ॥ (ऋ ६.०१६.१०)

आता हाच मंत्र गाण्यासाठी योनिमंत्र म्हणून सामवेदात कसा दिसतो ते पाहु

Yoni Mantra - Basic Notation of a Hymn in Samveda.
सामवेद योनिमंत्र

अक्षरांच्या वरील अंक हे उदात्त, अनुदात्त, स्वरित इ. स्वर दर्शवतात. हा झाला योनिमंत्र किंवा थाट. आता या चलनाचा आधार घेऊन जेव्हा मंत्र म्हटले जात तेव्हा त्याचा मूळ गाभा तसाच ठेऊनही वेगवेगळ्या प्रकारे गायन मांडले जायचे. यात शब्दांची किंचित ओढाताण होत असे.

उदाहरणार्थ हाच मंत्र गौतम कुलाच्या गायनात असा दिसेल

Parka by Gautama - A specific style of Samveda singing by Gautama
गौतमस्य पर्कम् ।

अशाप्रकारे सामगायनाचे किमान एक हजार प्रकार अस्तीत्वात होते, असे उल्लेख आहेत. यावरून त्याकाळची गायनकला किती समृद्ध होती याचा अंदाज येतो. भारतीय संगीतातील श्रुतींसारख्या सूक्ष्म आणि घराण्यांसारख्या व्यापक विविधतेचे मूळ अशाप्रकारे सामवेदात आढळते.

हा गायनाचा प्रकार त्याकाळी नक्की कसा असावा याचा अंदाज आज करणे अवघड आहे. कारण सामगायन करणा-या परंपरा जवळपास लुप्त झाल्या आहेत. परंतु मौखिक परंपरेने जे जतन केले गेले आहे त्यातील एक छोटी क्लिप ऐकून आपण अंदाज घेऊ शकतो.

सामवेद गायन Source – Alaap-A Discovery Of Indian Classical Music

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदु धर्म अभिमानाने मिरविणा-या बाली बेटावर एका केचक नृत्यामध्ये असाच रंगलेला आलाप अलिकडेच ऐकायला मिळाला.

सामवेदात आपल्याला परिचयाचे काय आहे?

साम, दाम, दंड, भेद या म्हणीतील साम या शब्दाचा अर्थ गोड बोलणे असा होतो. सामगायनातील गोडवा या अर्थानेच हा शब्द रुढ झाला.

कुंदनलाल सैगल (चित्रपट – तानसेन) आणि मन्ना डे (चित्रपट – संगीत सम्राट तानसेन) यानी अजरामर केलेले सप्त सुरन तीन ग्राम हे गाणं आठवतंय का? या गाण्यातील स्वरमंडलाचे वर्णन हे सामवेदातील स्वरमंडलाचे नारदीय शिक्षेत आलेले वर्णन आहे.

सप्तस्वराः त्रयो ग्रामाः मूर्छनास्त्वेकविंशति। ताना एकोनपंचाशत् इत्येतत्स्वरमण्डलम्।

देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत भारतीय संगीताचे मूळ सामगायनातच आहे. गायन हा देवाच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे संगीताला नादब्रह्म मानले जाते. वेदातील आकाराने लहान भावंड असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेदाने उभा केला. म्हणूनच तर श्रीकृष्णासह जवळपास प्रत्येक थोर ऋषीमुनींनी सामवेदाला भारतीय ज्ञानवाङ्मयात उच्च स्थान दिलेले आहे.

तळटिप

१.गीता अध्या. १० श्लोक २२
२. सर्वेषामं वा एष वेदानाम् रसो यत् साम (शतपथ ब्राह्मण १२.८.३.२३)
३. सामानि यो वेत्ति त वेद तत्त्वम् । (बृहद्देवता)
४. अमोSहमस्मि सा त्वं, सामाहमस्मि ऋक् त्वं। द्यौरहं पृथिवी त्वं। ताविह संभवाव, प्रजामाजनयावहै (अथर्ववेद १४/२/७१)
५. सामवेद – म.म पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर (पृ,क्र ६)
६. एकशतमध्वर्युशाखाः, सहस्रवर्त्मा सामवेदः ॥ महाभाष्य

मागील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद पुढील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – यजुर्वेद

ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.

यजुर्वेदातील मंत्रांना ‘यजु’ असे म्हणतात हे मंत्र गद्यात्मक आहेत. यजुर्वेदातले पद्यात्मक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. यज् या संस्कृत धातूपासून यजु शब्द तयार होते. यज् याचे तीन अर्थ पाणिनी सांगतो. देवाची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी व यजुंनी यज्ञ अशा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात आढळते.
यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक/ पुरोहीत असतो त्याला ऋत्विज असे म्हणतात. ऋत्विजांची वेदानुसार नावे अशी –
ऋग्वेद – होता (हे नाव आहे), यजुर्वेद – अध्वर्यु, सामवेद – उद्गाता, अथर्ववेद – ब्रह्मा. अध्वर्यु ज्या वेद मंत्रांचा प्रयोग करतात तोच यजुर्वेद म्हणून यजुर्वेदाला ‘अध्वर्युवेद’ असेही म्हणतात.

शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात. शुक्लयजुर्वेदात केवळ मंत्र आहेत तर कृष्णयजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहीती आहे.
कृष्णयजुर्वेदाच्या निर्मितीची एक कथा आहे. वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना वेदाचे शिक्षण दिले. परंतु दोघांमध्ये वेदार्थनिर्णयावरून काही वाद निर्माण झाला. वाद वाढल्यावर संतप्त झालेल्या वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवलक्यांनी ते ज्ञान ओकून टाकले. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी तित्तिर पक्षाचे रुप घेऊन ते ज्ञान ग्रहण केले. वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना जे ज्ञान दिले ती मूळ संहिता म्हणजे शुक्लयजुर्वेद तर तित्तिर पक्षांनी ग्रहण करून जे स्वीकारले ते ज्ञान म्हणजे कृष्ण यजुर्वेद असे मानतात. नवे व जुने ज्ञान आणि त्यांचे संपादन यामुळे यजुर्वेदाच्या काही शाखा आणि त्यांच्या संहिता निर्माण झाल्या जसे वाजसनेयी, तैत्तिरीय इ. याच्या अधिक तपशीलात न जाता आपण दोन्ही मिळून यजुर्वेदाची ओळख करून घेउ यात.

काय आहे यजुर्वेदात?…..
यजुर्वेदाची रचना अध्यायात केली आहे. एकूण ४० अध्याय आहेत. त्यात मुख्यत्वेकरून यज्ञासंबंधी माहिती आहे.

यज्ञ– यज्ञासाठी वेदी, कुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवन, हवनसामग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. गाईचे दूध काढणे, पाणी आणणे येथपासून ते यज्ञकुंडाची जागा, वेदी उभी करणे, यज्ञसाहित्य निवडणे, वेगवेगळ्या आहुति देणे येथपर्यंत प्रत्येक बारीक सारीक कृतींची माहीती यजुर्वेदात येते.
आपल्या ऐकण्यात विशेषकरून येणारे ‘अश्वमेध’ आणि ‘राजसूय’ (युधिष्ठिराने महाभारतात केलेला) हे यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. याखेरीज दर्श पूर्णमास (अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे याग/यज्ञ), अग्निष्टोम (पाच दिवसांचा मिनि यज्ञ), चातुर्मास्य, काम्येष्टी, वाजपेय, नक्षत्रेष्टि अशा अनेक छोट्या मोठ्या यज्ञांचा अंतर्भाव यजुर्वेदात होतो.

यजुर्वेदातील माहितीचा परीघ किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी यज्ञ ही काय संस्था होती हे पाहिले पाहिजे. त्याकाळातील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘यज’ याचा एक अर्थ एकत्र येणे असाही होतो. त्यामुळेच यज्ञ हा एक प्रकारचे सामाजिक समारंभ (मराठीत सोशल गॅदरींग) असे. यात विविध विधींसह अनेक मनोरंजक खेळ किंवा स्पर्धाही असत. जसे सामगायन असेल, रथांची शर्यत असेल, वाद्य वादन असेल अगदी पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींच्या नृत्यापासून ते रस्सीखेच सारख्या खेळांपर्यंत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम यज्ञात होत. यज्ञ हे संपुर्ण समाजाचे एकत्रिकरण करणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्यात एकी आणि समभाव वाढवणे आणि त्यांचे सर्वांगिण कल्याण साधणे अशी उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे साधन होते. हिलेब्रॅन्ट (Hillebrandt) सारखा विद्वान या खेळांची तुलना थेट ऑलिम्पिकशी (प्राचीन) करतो .

अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ करणारा राजा आहुति देताना म्हणत असे
आ ब्रह्म॑न् ब्राह्म॒णो ब्र॑ह्मवर्च॒सी जा॑यता॒मा रा॒ष्ट्रे रा॑ज॒न्यः शूर॑ इष॒व्योऽतिव्या॒धी म॑हार॒थो जा॑यतां॒ योगक्षे॒मो न॑: कल्पताम् ।।यजुर्वेद मा.वा संहिता अ २२.२२ ।।
संपूर्ण मंत्र मोठा आहे पण याचा अर्थ असा की – ‘ब्रह्मतेजाने संपन्न आणि शूर असे वीर आमच्या राष्ट्रात उत्पन्न होवोत, आमचा योगक्षेम (निर्वाह) उत्तम चालो.’

गोष्टी – यजुर्वेदाचा प्रमुख विषय यज्ञ असल्याने ऋग्वेदाइतक्या गोष्टी यजुर्वेदात नाहीत. पण निरनिराळ्या विषयांवरील काही आख्यायिका यजुर्वेदाच्या चर्चेत येतात. इंद्राने वायुदेवतेच्या मदतीने देवांच्या भाषेचे व्याकरण लिहिले अशी एक आख्यायिका यजुर्वेदात आहे. पुर्वी देव जी भाषा बोलत असत ती काहीशी नियमविरहीत किंवा व्याकरणरहीत होती. देवांच्या विनंतीवरून इंद्राने वायुदेवतेच्या सहाय्याने त्या भाषेला नियमबद्ध व व्याकृत केले असा उल्लेख यजुर्वेदात आहे.यजुर्वेदात मांडलेल्या विषयांचा विस्तारही यातून लक्षात येतो.

यजुर्वेदात आपल्या परीचयाचे काय आहे?…..

खुप काही…
आपण निरनिराळ्या वेळी ऐकलेला आणि वापरलेला –
भूर्भुव॒: स्व॒: तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।धियो॒ यो न॑: प्रचो॒दया॑त्। हा गायत्री मंत्र यजुर्वेदातला आहे. (अध्याय ३६, मंत्र ३)

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑ति हवामहे। हा अजून एक माहितीतला मंत्र यजुर्वेदातीलच आहे. (अध्याय२३-मंत्र १९)

आपण घरी किंवा महादेवाच्या देवळात ऐकलेले ‘रुद्र पठण’ हे यजुर्वेदातील आहे. (अध्याय १६)

भाषेतील चमत्कृती म्हणून सांगायचे तर वाजपेय या यज्ञात सहभागी असणारे किंवा तो यज्ञ करणारे म्हणून ‘वाजपेयी’ हे नाव रुढ झाले.

हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला हे ही जाता जाता सांगायला हरकत नाही.

तत्त्वज्ञान –
वैदिकांच्या कर्मकांडाचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि त्याचे व्यापक तत्त्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व म्हणजे ४० अध्यायात येतेच. विशेषतः आपल्याला माहिती असलेला भाग म्हणजे ‘ईशावास्योपनिषद’ जे यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा ४० वा अध्याय आहे.
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।
या प्रसिद्ध मंत्रातून परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने संग्रह न करता आवश्यकतेनुसार पदार्थांचा उपभोग घ्यावा असा उपदेश केला आहे.

अशाप्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद… अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली (मराठीत वर्क लाईफ बॅलन्स) शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे.

तळटीप
१. यज देवपूजा – संगतिकरण – दानेषु (अष्टाध्यायी ३.३.९०)
२. यजुर्भिः सामभिः यत् एनम् ऋग्भिः शंसन्ति यजुर्भिः यजन्ति सामभिः स्तुवन्ति ।निरुक्त १३.७।
३. Alfred Hillebrandt एक जर्मन विद्वान त्याच्या Vedische Mythologie (१, २४७) या पुस्तकात हा उल्लेख आढळतो.
४. तैत्तिरिय संहिता ७/४

मागील भाग – ओळख वेदांची – ऋग्वेद                                                        पुढील भाग – ओळख वेदांची – सामवेद 

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – ऋग्वेद

ऋग्वेद – वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!

वेद खरोखर इतके अगम्य आणि अवघड आहेत का? नक्कीच नाहीत. एकाच वेळी अत्युच्च दर्जाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदांसारखे दुसरे ग्रंथ सापडणे खरोखर कठीण आहे. केवळ अगम्य धार्मिक पुस्तके इतके तोकडे स्वरूप वेदांचे नक्की नाही.अत्यंत सुंदर प्रार्थना, रसाळ कथा, मजेदार वर्णने, कलाकुसर, तत्कालीन तंत्रज्ञान, चालीरिती, समारंभ आणि अर्थातच गहन तत्त्वज्ञान हे सर्वकाही वेदात आढळते. या लेखमालेत सर्वप्रथम वेद आणि वेदवाङ्मयाची प्राथमिक माहिती करून देणे हा उद्देश आहे.

आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला असा वाक्प्रचार खुपदा ऐकण्यात येतो. या चौदा विद्या कोणत्या?

४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्रे अशा एकूण चौदा विद्या किंवा विद्याशाखा होत. यातील वेद सोडून इतर ग्रंथ तूर्तास दूर ठेऊयात.

संस्कृतात विद् म्हणजे जाणणे, वेद हा शब्द येथून उगम पावला. वेद ४ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.

ऋग्वेद

ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद किंवा ऋचांनी बनलेला वेद. देवतांना आवाहन करण्यासाठीच्या मंत्रांना (आजच्या भाषेत श्लोकांना) ऋक् किंवा ऋचा असे म्हणता येईल.

ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे ज्या मंत्रातून ऋषींची कामना पूर्णपणे व्यक्त होते असा ऋचांचा समूह (आजच्या भाषेत स्तोत्र). ऋषीसूक्त, देवतासूक्त, अर्थसूक्त आणि छंदसूक्त असे सूक्तांचे प्रकार आहेत. ऋग्वेदात जवळजवळ अशी १०२८ सूक्ते (स्तोत्रे) आहेत एकूण ऋचांची संख्या ही १०५८० इतकी भरते.

हे सर्व मंत्र एकाच ऋषींनी रचले का? अर्थातच नाही. असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले आणि त्यांनी ते परंपरेने जपले. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हणजेच पुरुषाने (माणसाने) न रचलेले असेही म्हणतात.

आजच्या व्हॉटसॅप आणि फेसबुकच्या युगात एखादी माहिती किंवा बातमी जर सकाळी सांगितली तर संध्याकाळपर्यंत त्याला इतके फाटे फुटतात की खरं खोटं तर दूर मूळ बातमी काय होती हे ही विसरायला होतं! अशा वेळी ऋग्वेदासारखा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी जसा रचला गेला तसाचा तसा बदल न होता आपल्यापर्यंत पोचलाच कसा? याचे उत्तर ऋग्वेदाच्या रचनेत आहे. असे म्हणतात की ऋग्वेदाच्या रचनेच्या काळात लेखनकलाच अस्तीत्त्वात नव्हती. शाकल (शाकाल नव्हे!) सारख्या ऋषींनी ऋग्वेदाची रचना आणि पठणाच्या पद्धतींची मांडणी अशा पद्धतीने केली की त्यात कोणताही पाठभेदच होणार नाहीत.

आता ऋग्वेदाची रचना थोडी समजाऊन घेऊ. ऋग्वेदात १० मंडले आहेत. मंडल म्हणजे अध्यायासारखे विभाग. प्रत्येक मंडलाला नाव आहे. २ ते ८ ही मंडले ऋषींच्या नावाने आहेत. यात त्या त्या ऋषीकुलातील ऋषींचे मंत्र आहेत. १ले आणि १० वे मंडल संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या ऋषींच्या मंत्रांचे आहे. ९ व्या मंडलात केवळ सोमरसावरची निरनिराळ्या ऋषींची सूक्ते येतात. ही दहा मंडले खालील प्रमाणे. १) संमिश्र २) गृत्समद ३) विश्वामित्र ४) वामदेव ५) अत्रि ६) भरद्वाज ७)वसिष्ठ ८) कण्व व अंगिरस(?) ९) पवमानसोम (संमिश्र) १०) संमिश्र

प्रत्येक मंडलातील सूक्ते ही देवता, शब्दसंख्या इ च्या पूर्वनिश्चित क्रमाने येतात त्यामुळे त्यातही मागेपुढे होण्याचा संभव नाही.

काय आहे या सूक्तात?…….

गोष्टी! चांदोबातसुद्धा नसतील इतक्या रंजक कथा ऋग्वेदात आहेत. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापसातल्या संवादाच्या, सण समारंभांच्या, भक्तीच्या, युद्धांच्या, धर्माच्या अगदी लग्न, शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात आढळतात.

तत्त्वज्ञान…. ऋग्वेदात जितके तत्कालिन समाजजीवनाचे प्रतिबिंब आढळते तितकेच तत्कालिन मानवाच्या प्रगल्भ तत्वचिंतनाचेही. सृष्टीची उत्पत्ती, जडणघडण, चलनवलन, देवतांचे स्वरूप, नश्वर तसेच शाश्वत तत्त्वे, परमात्मा अशा अनेक गुढ विषयांवरचे चिंतनही ऋग्वेदातील सूक्तांत आढळते.

देवता
उषा, अश्विनौ, भग, पूषन्, अर्यमा, सोमरस, सूर्य, सविता, रुद्र, सोम (ग्रह), ब्रह्मणस्पती, अदिती, इंद्र, मरुत्, मित्रावरुण अशा अनेक देवतांची स्तुती ऋग्वेदातले मंत्र करतात. त्याकाळी देवतास्वरुपात प्रामुख्याने निसर्गाच्या विविध रुपांची पुजा केली जात असे. अशा देवतांना आवाहन करणारी, त्यांची स्तुती करणारी अनेक सूक्ते ऋग्वेदात आहेत. एकाच देवतेच्या संदर्भात येणा-या मंत्रांच्या गटाला देवतासूक्त म्हणतात.

ऋग्वेदातील अनेक मंत्र आपल्या परिचयाचे आहेत पण ते ऋग्वेदातले आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो. उदाहरणार्थ

आपल्याकडे हिंदी किंवा मराठी मालिकांमध्ये बारशापासून ते अंत्येष्टीपर्यंत काहीही मंगल अमंगल कार्य असले की ते भटजी एक मंत्र म्हणताना दाखवतात, ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः….’ हा ऋग्वेदातला मंत्र आहे. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणा-या ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या १० मंत्रांचा तो समूह आहे.

पुर्वी दुरदर्शनवर लागणा-या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत (मराठीत टायटल सॉंग!) आठवतंय का? ‘पृथ्वीसे पहीले सत नही था……’ ऋग्वेदातल्या नासदीयसूक्ताचे ते भाषांतरीत गाणं होतं. ऋग्वेदातल्या काही गोष्टीही या मालिकेत दाखवल्या होत्या… सृष्टीच्या उत्पत्तीविषयक गुढ चर्चा करणारे हे सूक्त आहे.

याचप्रकारे पुरुषसूक्तासारखे आपल्या ऐकण्यातले सूक्त हे ही ऋग्वेदातलेच आहे.भारतीय नौदलाचे ‘शं नो वरूणः’ हे बोधवाक्यही ऋग्वेदातलेच आहे.

एकुण काय तर वेद हे अपौरुषेय आहेत की नाहीत हा मुद्दा वादाचा असला तरी ते अगम्य आणि अज्ञेय नक्कीत नाहीत.. यजुर्वेदासह इतर वेदांबद्दल पुढील भागात……

तळटिप

१. ऋचां समूहो ऋग्वेदः। २. ऋच्यते – स्तूयते प्रतिपाद्यः अर्थः यथा या ऋक् ३. अपौरुषेयम् वाक्यं वेद। – सायण

पुढील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद ओळख वेदांची – समग्र लेखमाला

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

परामर्ष – Confab…

प्रश्न विचारा/Send Query or Feedback

परामर्ष Confab

नमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.
परामर्ष….
फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न  किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …

Hello Readers, Thanks a lot for the overwhelming response to the articles. I have received a lot of feedback including suggestions and queries. A bunch of them asked for more clarification regarding some terms, concepts or verses. This page is being prepared for resolving doubts from all these discussions.
Confab……
If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them through this link (Ask a Question). Click on the questions to read answers and discussions…

गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?
अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?
धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?
Does Lord Krishna in Bhagavad Gita ask us to stop enjoying worldly pleasures?
CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?
भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?
मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?
अध्यात्म म्हणजे काय?
‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?



गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?

मूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।१४।।
अन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व।
अर्थ – हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
तितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.
आदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.
सहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते।।२४।। विवेकचुडामणी
चिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा
विषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता।।७।। अपरोक्षानुभुति
विषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.
स्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.
ज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥
मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥

अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?

महाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.
अक्षौहिण्या: परीमाणं नराश्वरथदन्तिनाम्।यथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥
पायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे

  1. पत्ती    १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती
  2. सेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती
  3. गुल्म   (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती
  4. गण    (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती
  5. वाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती
  6. पृतना   (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती
  7. चमू    (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती
  8. अनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती
  9. अक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती
    साधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?

गीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.
उदाहरणादाखल काही श्लोक पाहू
१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।२-३८।।
३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८।।
४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

हे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात

५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२-२२।।
६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२ २३।।
७. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि।

हे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.

८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌। तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

हे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.

१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।    वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.

११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।

यासारखे गुढ श्लोक आहेत.

याव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
योगः कर्मसु कौशलम्।
योगक्षमेम् वहाम्यहम्।
नभः स्पृशं दीप्तम्।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही!

धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?

धर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.
शिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.
शेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.
परंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.
व्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.
भाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे

धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् । (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)
अहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः ।दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्। (याज्ञवल्क्यस्मृति १-१२२)

उत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.
त्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.
आश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.

DOES LORD KRISHNA IN BHAGAVAD GITA ASK US TO STOP ENJOYING WORLDLY PLEASURES?

Lord Krishna never asks you to stop enjoying worldly pleasures. He says we’ve to restrain the senses from temptations and expectations. It doesn’t mean not enjoying at all.

There is nothing wrong with enjoying material pleasures but it is inappropriate to fall prey to the senses for those pleasures. Senses are constantly pulling us towards pleasures, destabilizing strongest minds by creating expectations. Such Karma with an expectation towards its result, creates attachment and further drags us into joys or sorrows about the results.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

For example, Krishna would not say that one should not enjoy good food. He also approves working hard for earning that good food. But it is inappropriate to feel happy or disappointed if you succeed or fail within your efforts because that drags you to attachment, disturbs your mind. If the mind understands the inevitability of either success or failure, then the bond of Karma will not bind the soul. This is exactly what we forget while we strive to get what we like. If we don’t succeed, we get angry and then invite array of disorders from anger eventually losing our ultimate goal.

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

That is why Krishna says that it is not wrong to enjoy worldly pleasures, but it is wrong to be attached to them That attachment traps our soul in the bondage of bad Karma.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

But the self-controlled being, freed from attachment and aversion, who follows the conscious injunction despite being surrounded by the objects of the senses (material pleasure), with senses governed by the self; attains the precious union with the Ultimate Being.

So the gist is to enjoy the gifts of life without letting the gifts enjoy toying with your equanimity 🙂 Karma without expectations backed up by the intellect’ is what Chapter 2 and 3 explain.

CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?

Buddhism and Gita (Hinduism) share certain views and differ on certain. Both of them believe in the illusory state of existence i.e. the material world. To an extent both of them agree on sensory perceptions being the reason for suffering.

Buddhism believes in withdrawal from the material world and resorts to meditation leading to Nirvana. Which is kind of detachment from almost everything including self.

Gita, on the other hand promotes constant action (Karma) towards collective wellness backed up by the intellect (Sankhya). This is how a sole soul  self dissolves/unifies into the omnipresent. (Karma in Sankhya Yoga Chapter II)

Buddhism denounces everything as suffering while Gita upholds it as the beauty of the creator. Buddhism believes Salvation/Nirvana means Death since it frees one from suffering and pleasure. Wherein Gita makes Salvation achievable to a being by uniting Aatman (आत्मन् – Individual Self) with the Param Aatman (परम आत्मन् – The Ultimate) describing it as bliss which is eternal and above all material notions.

We have to understand why Buddhism tends to differ from the Gita. Buddhism emerged as a reaction to Hinduism (has its own reasons). Hence Buddha deliberately kept the theory of eternity away from his preaching while Gita preaches it.

Logically though, detachment from entire existence is not practical. Gita in the Chapter III describes it. Denouncing Karma isn’t possible since one at least has to pacify his bodily needs. He has to be a part of the material world to do that. Hence Gita’s view of appreciating the creation of the Ultimate and trying to be one with Him through Intellect (Sankhya) based Karma stands stronger.

I have already written about the greatness of Gita and why has it been relevant to generations after generations.

भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?

श्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। गीता २.४६।।
अन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)।

शब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥

हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.

सोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.

बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.

सलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति।। (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)

हे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)

अशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’। म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.

मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?

भारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.
प्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.
आता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू
१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.
वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥
मनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.
२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे.
अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् ।सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥
श्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥
असे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.
३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥
त्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.
हे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का? आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.
अशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.
प्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.

श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?

श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही शब्द कठोपनिषदाच्या प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतील दुसऱ्या श्लोकात येतात. या दोन्ही शब्दांचे व्यावहारीक आणि तात्विक असे दोन्ही अर्थ आपल्याला अनुभवास येतात. श्लोकाचा अन्वय, अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूयात
मूळ श्लोक

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते।।
अन्वयः – श्रेयः च प्रेयः च मनुष्यम् एतः । धीरः तौ सम्परीत्य विविनक्ति । प्रेयसः श्रेयः हि अभि वृणीते । मन्दः योगक्षेमात् प्रेयः वृणीते ।

श्रेयस आणि प्रेयस याचे येथे अभिप्रेत असणारे अर्थ हे कल्याणकारक आणि आनंददायक असे आहेत. माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते ज्यात काही सोपे आनंददायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडतो आणि सोपा व आनंददायक मार्ग डावलतो. असा साधारण अर्थ या श्लोकातून ध्वनीत होतो.
माणसाचे आयुष्य ही सुखदुःखांची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात ज्यात त्याला सोपा आणि अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गाप्रमाणेच त्यांचे फलित असते. वरकरणी सोप्या आणि कमी कष्टप्रद मार्गानी मिळणारे फलितही सीमीत असते तर अवघड आणि कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते.
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास विद्यार्थीदशेत किंवा उमेदवारीच्या काळात जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी व्यक्ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते आणि उर्वरीत काळ सुखाने घालवते. परंतु जी व्यक्ती हा काळ फार तोशीस न घेता माफक कष्टात घालवते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ घालवते आणि उर्वरीत आयुष्यही अधिक कष्टप्रद बनवते. कारण अर्थातच निवड…. योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. शिक्षण असो, गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती हेच तत्व सगळीकडे लागू पडते.
हे अर्थातच श्रेयस आणि प्रेयसाचे सर्वसामान्य अर्थविवेचन आहे. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा खुप गहन अर्थ अभिप्रेत आहे. प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सुख आहे.
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच सुखी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे?
प्रेयस हे ते क्षणिक सुख आहे जे भौतिक साधनांतून प्राप्त होते तर श्रेयस हे ते सुख आहे जे व्यक्ती समाधानातून आणि स्थितप्रज्ञ वृत्तीतून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे असे भारतीय तत्वज्ञान उपनिषदे आणि गीतेच्या माध्यमातून मांडते.

अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती समजून घेण्यात जितका स्पष्टीकरणाचा भाग आहे तितकाच अनुभूतीचाही आहे. कसे ते उत्तराच्या अंती स्पष्ट होईलच.

अध्यात्म शब्दाची साधारण फोड अधि + आत्म अशी होते. यात अधि हे अव्यय विशेषत्वाने किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने येते. आत्म याचा अर्थ आत्मन् म्हणजे आत्मा किंवा स्व.
त्यामुळे अध्यात्माचा शब्दशः अर्थ – प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने स्वतःला जाणणे. कसे जाणणे.
भगवद्गीतेच्या आठव्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अध्यात्म या संज्ञेचा अर्थ सांगतो. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुना प्र्श्न करतो की –

तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?

श्रीकृष्ण सांगतो –

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो

मग आता स्व-भाव म्हणजे काय हे नीट समजून घेऊ यात.
कारण आपल्या रोजच्या वापरातला शब्द असल्याने त्याच्या अर्थाकडे नीटसे लक्ष जात नाही. स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे.
वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो.
श्रीकृष्ण सांगतो.
अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रकर्षाने स्वतःला जाणायचे तर त्यासाठी स्वतःशिवाय इतर कोणतेही बाह्य साधन उपयुक्त ठरणार नाही. स्वतः प्रयत्न करून स्वतःला जाणणे भाग आहे. स्वतः च स्वतःवर प्रयोग करुन स्वतःच त्याचे निष्कर्ष तपासून पहायचे म्हणूनच अध्यात्मात अनुभूतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
अधिक वाचनासाठी –‘अंतरंग – भगवद्गीता’

‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?

उपनिषदे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत. परब्रह्म किंवा आत्मतत्त्वाचा अभ्यास हा उपनिषदांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. अहं ब्रह्मास्मि । हे बृहदारण्यक (१/२/४/१०) उपनिषदातील असून मूळ श्लोक असा आहे तद्धैतत्पश्यन्नृषिर्वामदेवः प्रतिपेदेऽहं मनुरभवं सूर्यश्चेति ।
तदिदमप्येतर्हि य एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इदं सर्वं भवति ।

उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक. अहम् म्हणजे मी आणि ब्रह्म अस्मि म्हणजे ब्रह्म आहे. अहम् ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा शब्दशः अर्थ होतो.
वास्तविक अर्थ काय –
आत्मज्ञान किंवा आत्मतत्त्व जाणणा-या व्यक्तीला झालेली ही उपरती आहे की सृष्टीचे कारक जे ब्रह्म तत्त्व, मी त्याचाच अंश किंवा आहे किंवा तत्त्वतः मी आणि तो कोणी निराळे नसून एकच आहोत. शारीर देह नश्वर तत्त्व असून आत्मा हे अविनाशी अविकारी आणि अनंत तत्त्व असून ते, मी, ब्रह्म आणि परब्रह्म हे एकस्वरूप आहेत. ज्याप्रकारे सर्व जलस्त्रोत जसे शेवटी समुद्रात एकरुप होतात तसेच हा अंश परमात्म्याशी तद्रुप होतो.
तत् त्वम् असि । (छान्दोग्य उपनिषद ६/८/१६) म्हणजेच ते (ब्रह्म) तू आहेस हे महावाक्यही याच अर्थाने येते.
जीवात्म्यात परमात्म्याचा अंश असतो या व्यापक अर्थाने ही महावाक्ये येतात.
वेदातही परब्रह्म हे एक तत्त्व असून त्याला ज्ञाते अनेक नावांनी ओळखतात असे म्हटले आहे एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:। – ऋग्वेद १/१६४/४६
गीतेतही भगवंत आपला अंश प्रत्येकात आहे हे सांगतो.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।१५.१५।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन (दोषनाश) ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact