अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।

महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
कालिदासाच्या कुमारसंभवातील पाचव्या सर्गात खरेतर मजेदार संवाद आहेत. परंतु नांदीचा हा श्लोक मात्र एक गंभीर बोधवाक्य बनून गेला! त्याचे कारण या श्लोकाचा अंतिम चरण

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे….

योगारूढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते त्याची सुरुवात ही अर्थातच ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करुन होते.
भगवंत सांगतात की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शारीर क्रियांमध्ये प्रथम हवे. कारण

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्या तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो

‘अति सर्वत्र वर्जयेत्’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारिरीक क्रियातील अती ला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यासारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीरच मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
अशा प्रकारे भौतिक आणि अधिभौतिकाचा सुंदर मेळ घालण्याचे कार्य श्रीकृष्ण करतो.
अनेकदा असा प्रश्न पडतो की मानवासहित निसर्गातील प्रत्येक घटक हा ईश्वराचीच देणगी असेल तर मग त्याचा अव्हेर करून संन्यासी बनण्यात काय हशील आहे? श्रीकृष्णाच्या लेखी योगी यातील कशाचाच अव्हेर करत नाही. रंग, रस, गंध,नाद या सर्व माध्यमातून जीवनातला आनंद योगीही लुटतोच परंतु त्याचे मन या कशाचाही आहारी जात नाही, अतिरेक करत नाही. बाह्य सृष्टीतील सुख आणि त्याचप्रमाणे दुःखही नश्वर आहे याची त्याला जाणीव असते. परमात्मप्राप्तीचा आनंदच केवळ शाश्वत असा आनंद आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी जागरुकतेने प्रयत्न करतो.
भारतीय तत्वज्ञानाच्या बाबत असा एक गैरसमज पसरलेला दिसतो की त्यात केवळ संन्यस्त वृत्तीचा अंगिकार केलेला आहे. भौतिक किंवा गोचर सृष्टी म्हणजे माया आणि तिचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यासी होणे असा टोकाचा अर्थ घेतला जातो. भारत म्हणजे संन्यासी, साधू, अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करणे, अस्थिपंजर झालेले योगी….. असेच चित्र रंगवले जाते.
श्रीकृष्णाचे मत या विचाराला छेद देते. वेदकालापासून प्रत्येक तत्वज्ञाचा दृष्टिकोन हा सृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप जाणण्याचा होता. ब्रह्म जाणणे केवळ अंगाला राख फासून साधू झाल्यानेच प्राप्त होते असे त्यांनी कधीच मानले नाही. आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला त्यांनी जाणलं आणि त्याला ब्रह्म मानलं. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… गायनाचार्य पलुस्करांच्या एक गोष्टीचा संदर्भ येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही.

एकदा गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर जंगलातून प्रवास करत असताना एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील!!”
येथे नादब्रह्माची उपासना करणारा गायक आणि परब्रह्माची उपासना करणारा संन्यासी दोघेही योगीच मानले गेले आहेत. कलाकारालाही आणि संन्यास्तालाही पथ्ये पाळून आणि अति टाळून योगी होता येते हेच श्रीकृष्णाला येथे सांगायचे आहे. एकाला साधनेसाठी शरीरनियमन आवश्यक आहे तर दुसऱ्याला रियाजासाठी! भगवत्प्राप्तीसाठी प्रत्येकाने संन्यास घेऊन जंगलाचाच मार्ग स्वीकारायला हवा इतका एकांगी विचार मांडण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली नाही.
हे अर्थातच सोपे नाही याची श्रीकृष्णाला जाण आहेच. अर्जुनही ती बोलून दाखवतो. सगळेच जण गायनाचार्य किंवा सिद्धयोगी होत नाहीत. प्रयत्न करुनही अनेकजण मनावर विजय मिळवू शकत नाहीत मग असे लोक मार्गातून विचलित होतात. त्यांना पापी समजायचे का?

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि।।
जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?

अर्थातच नाही. आत्मोद्धारासाठी कर्म करणारी व्यक्ती अधोगतीला प्राप्त होत नाही. जरी तो आपल्या उद्दीष्ट्यापर्यंत पोचू शकला नाही तरी केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या फलस्वरुप त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि कालांतराने तो आपले ध्येय साध्य करतो असे श्रीकृष्ण सांगतो. कर्मसिद्धांताच्या तर्कानेही पाहिले तर हे पटावे की उत्तम कर्माची फलेही उत्तमच असतात. मग ते कर्म जर भगवत्प्राप्तीच्या उद्देशाने केले तर त्याचे फलस्वरूप सकाम कर्म करणारा भक्तही कालांतराने भगवंताशी एकरुप होतोच.
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो. जीवनाचा आस्वाद घेत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हे खरे ज्ञान आहे कारण सर्वाभूती परमेश्वर आहेच म्हणूनच मग त्याचे स्वरुप कलेतून, तपस्येतून, कर्मातून किंवा निव्वळ भक्तीतूनही जाणता येईल. आवश्यक आहे तो त्या त्या मार्गावरील साधकाचा आत्मसंयम…….

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे!) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***

सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….

या एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.
विहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.

ज्ञानकर्मसंन्यास……
‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.
१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे

पहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.

पहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.
अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो? तर –

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥
जेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.

भगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

म्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥

हे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.

मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.

अशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.
असे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.
मग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का? तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.

शरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.

जैसा जो जलापासिं उभा ठाके । तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे । तऱ्हीं निभ्रांत ओळखे । म्हणे मीं वेगळा आहें॥

जसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.
मग विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.

म्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥

असा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.

ज्ञानदेव म्हणतात

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें। जैसे न चलतां सूर्याचे चालणे। तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे। कर्मीचि असे ।
तो मनुष्यासारिखां त-हैं आवडे। परि मनुष्यत्व तेयांसि न घडें।।जैसे जली जलामाजिं न बुडे। भानुबिंब।।

सूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.

अशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.

निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.
श्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.

ज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥

या सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.
कर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
कारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.

उपसंहार
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
परित्राणाय साधूनां….।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
चौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते!

कर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो! विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –

एकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.

त्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.
कुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो ।

हिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरना।।तीजे बन पग नहीं धरना ||
तीजे बन में पंछ पारधी।।उन के नजर नहीं पड़ना ||
पांच हीरन पच्चीस हिरनी।।उन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे। खलका करेंगे बिछोना ||
कहे कबीर जो सुनो भाई साधो।।गुरु के चरन चित धरना||

पाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील!

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ६                                             पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..
ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की….. त्यासाठी इतकी वणवण करायची काय आवश्यकता आहे!?

या गोष्टीतला विनोदाचा भाग सोडला तर त्या टोळक्याला पडलेला प्रश्न विचार करण्यासारखा आहे. निष्क्रियतेचे त्या टोळक्याने केलेले समर्थन नीट तपासले की कर्मयोग समजणे सोपे होईल.

निष्क्रियता…… निरनिराळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या परीघातून प्रत्येकासमोर उभी असणारी संभ्रमाची अवस्था.
प्रत्येकाला या निष्क्रियतेचा अनुभव सतत कोणत्यातरी संदर्भात येत असतो, तसेच प्रत्येकजण स्वतःही अनेकदा निष्क्रियतेचा भाग असतो.
राजकारणी आणि उद्य़ोजकांच्या पातळीवर निर्णय घेण्याबाबत निष्क्रियता, नोकरशाहीमध्ये निर्णय राबविण्याबाबत निष्क्रियता, सामाजिक पातळीवर सार्वजनिक हिताबाबत निष्क्रियता तर वैयक्तिक पातळीवर क्षमतेच्या पुरेशा वापराबाबत निष्क्रियता…

मानवी जग आणि मानवी मन ज्या एका मजेदार कसोटीवर विलक्षण साम्य दाखवते ते म्हणजे निष्क्रियता! दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके! गंमतीचा भाग असा की निष्क्रियतेबद्दल प्रत्येक जण वैयक्तीक आणि सामुहीक पातळीवर इतरांना दोष देत असतो पण जोडीने स्वतःच्या निष्क्रियतेकडे मात्र दुर्लक्ष करत असतो!

विश्वशांतीच्या किंवा पर्यावरणाच्या बाबतीत विकसित आणि विकसनशील देश एकमेकांना निष्क्रिय मानतात. धोरणांच्या बाबतीत जगभरातले (फक्त भारतीयच नव्हे!) उद्योजक सरकारला निष्क्रिय मानतात. नोकरशाही एकमेकाला तर सामान्य माणूस स्वतः सोडून जवळपास सगळ्यांना निष्क्रिय मानतो. ‘कोणी काही करत नाही आम्ही एकटेच धडपडतोय’ हे भरतवाक्य संयुक्त राष्ट्रांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते घरातल्या सूनेपर्यंत प्रत्येक जण ऐकवत असतो. प्रत्येक जण एकाच वेळी स्वतः निष्क्रिय असतो आणि इतरांना ते निष्क्रिय असल्याबद्दल दोषही देत असतो.

या अशा अवस्थेमुळे माणूस व पर्यायाने समाज किंकर्तव्यमूढ होतो. संभ्रमामुळे त्याला काय करायचे हे ठरवता येत नाही. मग योग्य अयोग्य गोष्टी हातून घडत राहतात आणि संपूर्ण व्यवस्था बिघडते. याचाच अर्थ असा की कर्म करण्याची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कर्म यात सुसंगती आणल्यास माणसाची व्यक्तीगत आणि सामाजिक गोंधळाची अवस्था संपुष्टात येईल आणि तो योग्य कर्म करून सुखी होईल.

कर्मयोग………….निष्क्रियता आणि निष्कामता यातला फरक म्हणजे कर्मयोग. कर्मापासून फारकत न घेता उलट कर्म तन्मयतेने करणे परंतु त्याच्या बंधनात न पडता आत्मा मुक्त ठेवणे म्हणजे कर्मयोग.
कर्ममार्ग पुरेसा न उमगल्याने अर्जुन गोंधळात पडतो आणि घोर कर्म टाळण्यासाठी निष्क्रियतेकडे झुकणारे मत मांडतो.

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥

श्रीकृष्णा, जर तुला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग, मला हे युद्धासारखे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहेस? तेव्हा एक काहीतरी निश्चित सांग जेणेकरून मला योग्य तो मार्ग मिळेल

मग कर्मयोगाच्या माध्यमातून कृष्ण अर्जुनाचा संभ्रम दुर करतो आणि केवळ युद्धच नव्हे तर संपुर्ण आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगण्याचा मार्ग सांगतो.

ऩिष्क्रियता……….
वर चर्चा केलेला ऩिष्क्रियतेचा जो गोंधळ उभा राहतो तो केवळ विचारांचा आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. कारण तो पुढे हे स्पष्ट करतो की आत्मज्ञान किंवा परमात्म प्राप्ती हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा कर्ममार्ग…

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ। ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्।।३-३।।

ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग स्वीकारणे हे सर्वस्वी व्यक्तीच्या जीवनशैली, विचारसरणी आणि कुवतीवर अवलंबुन आहे.
अर्जुनाचा वैचारीक गोंधळ होतो कारण त्याची जीवनशैली कर्मयोगास योग्य असून केवळ युद्धप्रसंगापुरता तो ज्ञानमार्गाचा विचार करतोय. सोयीप्रमाणे दोन्ही मार्गांचा एकाच वेळी अवलंब करण्याचा प्रयत्न हा गोंधळाला निमंत्रण देतो.

ज्ञानी किंवा योगी व्यक्ती हा ज्ञानप्राप्तीतून आलेली निष्कामता (निष्क्रियता नव्हे) स्वीकारतो आणि आत्मानंदी लीन होतो. समाधिस्थ अवस्थेतून अशी निष्कामता त्याला प्राप्त होते. तो निष्क्रिय नसतो. अशा व्यक्तीच्या गरजा अत्यंत सीमीत असतात म्हणूनच त्यांचे कर्मही. कर्मविचार आणि प्रत्यक्ष कर्म यांचे एकत्रित स्वरूप त्याला उमगलेले असते. त्यामुळे तो आळसाने कर्म टाळत नाही. कर्म आणि मनःसंयमाच्या मार्गातून तो निष्कामता प्राप्त करतो.

परंतु बहुसंख्य लोकांना या मार्गाने जाणे शक्य नसते. रोजचे कर्म करत आयुष्य जगणा-या बहुसंख्य समाजाला कर्ममार्ग जास्त सुलभ वाटणे सहाजिक आहे. कारण अर्थातच ते रोजच्या आयुष्यात आधीच कार्यमग्न असतात. स्वतःच्या, कुटुंबाच्या, व्यवसायाच्या, इच्छा, आकांक्षा आणि गरजांच्या पूर्तीमध्ये ते गुंतलेले असतात. कधी त्यांना करायचे म्हणून तर कधी त्यांना करावे लागते म्हणून तर कधी सगळे करतात म्हणून निरनिराळ्या कर्माचा ते भाग बनतात. अशाप्रकरे इच्छेने किंवा इच्छा नसूनही कर्माला बांधले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कर्मयोग आहे.

कर्मयोग……….

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥

कर्म करणे हा प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे. मनुष्याला कर्म करणे भाग आहे. शरीराच्या किमान गरजा भागविण्यासाठी तरी कर्म करणे आलेच. आणि हेच कर्माचे मूळ आहे.

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस बुद्धी, कुवत आणि परीस्थितीप्रमाणे निरनिराळे मार्ग निवडतो आणि त्यातून त्याच्या कर्माचा पसारा वाढत जातो. म्हणजे काय तर इतर अनेक घटक, व्यक्ती, परीस्थिती या कर्मावर परीणाम करू शकतात. यातूनच मग इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि अर्थातच सुख आणि दुःख निर्माण होते. हे आत्म्याला कर्मबंधनात टाकते.

तेव्हा आता कर्म करायचे आणि आत्म्याचे बंधनही टाळायचे ही कसरत करायची, तर मग गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. यातूनच निष्क्रियता येते. म्हणून कर्मविचार आणि कृती यातील एकतानता समजून घेणे आणि तसे कर्म करणे हे आवश्यक आहे.कर्माचे बंधन लागणार नसल्याची खात्री पटलेला मनुष्य निष्क्रिय राहणार नाही. ते बंधन न लागता कर्म कसे करावे हे जाणणे म्हणजे कर्मयोग….

फलाची अपेक्षा न करता कर्म केले तर त्या कर्माचे बंधन आत्म्याला बाधत नाही.ही अवस्था शारीरीक तितकीच मानसिकही आहे. मनुष्याची इंद्रिये त्याला निरनिराळ्या अपेक्षांच्या जाळ्यात ओढतात आणि कर्मासाठी प्रवृत्त करतात. तेव्हा शरीराने कर्म करायचे आणि मनाने त्याच्या फळाची अपेक्षाही न बाळगता रहायचे याला निष्कामता म्हणता येईल. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याचा गर्व न बाळगणे (सेल्फी पोस्ट न करणे!) किंवा मदत झालेल्याने आपल्याविषयी कृतज्ञ असावे अशी अपेक्षा न ठेवणे हे निरपेक्ष कर्म होय.

माणसाची इंद्रिये त्याच्या मनात सतत कर्मफळाची आसक्ती निर्माण करत असतात. चांगले खायची आसक्ती, मग ते मिळवायचे कर्म, ते मिळेपर्यंतची अवस्था, मग ते मिळाले तर सुख नाही मिळाले तर दुःख, दुस-याला मिळाले तरी अधिक दुःख आणि आपल्याला मिळाले तर त्याला दुःख… हे सर्व मनाचे खेळ इंद्रियांच्या माध्यमातून सतत घडत असतात.

कर्मयोगी तो असतो ज्याचे शरीर कर्म करते आणि मन इंद्रियांना फळाच्या आसक्तीपासून दूर ठेवते. वरवर पाहता कर्म करणारा पण मनातून त्याच्या फळाची लालसा बाळगणारा ढोंगी असतो. असे दुटप्पी वागणा-यांना तुकोबा भोंदु म्हणतात. 

ऐसे कैसे झाले भोँदु। कर्म करुनि म्हणति साधू। अंगा लावुन राख। डोळे झाकुनि करिति पाप।।।

कारण इंद्रिय संयमन हा कर्मयोगाचाच भाग आहे.
मग कर्म कसे असावे…..

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥

इंद्रियांवर संयम राखून, निरपेक्ष बुद्धीने कर्मामध्ये जो लीन होतो तो अनासक्त कर्मयोगी होय.

यज्ञ……
अनासक्त कर्म करण्याला श्रीकृष्ण यज्ञाची उपमा देतो. पुरातन काळापासून यज्ञ हे अत्यंत श्रेष्ठ कर्म मानलं गेलंय कारण ते निष्काम आणि अनासक्त आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे.

आहुति देताना ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ असे म्हटले जाते. माणसानेही त्याचे विहीत कर्म करताना मी पणा टाकून ते कर्म केले तरच त्याचे बंधन त्याला लागणार नाही. कर्माला यज्ञ म्हणण्यामागे हा दृष्टीकोन आहे.

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥

यज्ञ…. दृष्टीकोन…
विश्वकल्याणाच्या उदात्त तत्त्वावर यज्ञाची कल्पना उभी आहे. वेदकालीन समाजाच्या सुखाच्या कल्पना अनेक वैदिक प्रार्थनांमध्ये येतात. त्यातील प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ती प्रार्थना विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखासाठी आहे. वैयक्तीक सुख हे समाज, राष्ट्र आणि संपूर्ण विश्वाच्या व्यापक हिताचाच भाग आहे असा दृष्टीकोन बाळगल्यामुळे तत्कालिन समाजाला एक व्यवस्था आणि दिशा होती. समाजाचे हित साधले की त्यातील व्यक्तीचे हित आपसुकच साधले जाईल.

‘सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः’ किंवा ‘सहनौ भुनक्तु’

यासारख्या प्रार्थनांमध्ये सगळ्यांचा सुखाचा विचार केला आहे. त्यामुळेच सामुहीक आणि वैयक्तिक अशा दोनही पातळीवर कल्याण होते ही दृढ भावना त्या काळात होती. हाच विचार मांडताना श्रीकृष्ण म्हणतो की व्यक्तीने कर्म करताना व्यापक हिताचा दृष्टिकोन ठेवावा.

कर्म मनुष्याला चुकणार नसल्याने ते करावेच लागणार. केवळ त्यामागचा दृष्टीकोन योग्य असल्यास आत्म्याला बंधनात न टाकता कर्म घडेल. कृष्ण पुढे सांगतो की मी स्वतःही जेव्हा अवतार घेतो तेव्हा मी त्या अवतारातील सर्व विहीत कर्मे करतो. कारण एक ते त्या देहाला स्वाभाविक आहे आणि दुसरे असे की समाज अशा व्यक्तींचे अनुकरण करतो. कर्मयोग्याने स्वतः निष्काम कर्म करत असताना त्यातून इतरांना कर्मयोगाचे दिशादर्शन करावे. यालाच लोकसंग्रह अशी संज्ञा तो वापरतो.

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥

हे पार्था मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.

उपसंहार
अशाप्रकारे कर्मयोगाचे विवेचन करताना कर्माची अपरिहार्यता, अनासक्त कर्म, इंद्रियसंयम आणि लोकसंग्रह अशा क्रमाने श्रीकृष्ण संपुर्ण मानवजातीच्या वैचारीक गोंधळावर आणि कर्माच्या एकतानतेवर भाष्य करतो.

मनुष्यसमाज मग तो राष्ट्र, राज्य, धर्म अशा कोणत्याही स्वरुपाचा असो त्याचे व्यापक हित आणि त्यातील माणसांचे वैयक्तीक हित हे सहसा भिन्न नसते. केवळ मनुष्य जेव्हा वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थाला प्राधान्य देतो तेव्हाच समाजहिताला अडथळा निर्माण होतो. तसेच जेव्हा प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थ साधण्याची धडपड करतो तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण होते, कोणी काय करायचे आणि काय नाही करायचे याचा संभ्रम निर्माण होतो आणि समाजाव्यवस्था निष्क्रिय होते. आजची सर्वव्यापी वैचारिक गोंधळाची आणि निष्क्रियतेची स्थिती ही या कर्मयोगाच्या पुरेशा ज्ञानाच्या अभावी प्राप्त होते. हीच स्थिती अर्जुनाच्या काळात होती आजही आहे. त्यामुळे अर्जुनाची जी अवस्था होती तशीच आपल्यातील प्रत्येकाची होते.

केवळ अर्जुनच नव्हे तर त्याकाळातील संपूर्ण समाज हा युद्धाच्या मार्गाने विनाशापर्यंत येण्याचे कारण कर्मयोगाचे अज्ञान हेच होते. भीष्मादि ज्येष्ठांपासून ते दुर्योधनादि कनिष्ठांपर्यंत व्यक्तींनी इंद्रियसंयम, अनासक्त कर्म, लोकसंग्रह आणि व्यापक समाजहित हा कर्मयोगाचा सोपान न अवलंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि संपुर्ण समाजाचे हित धोक्यात आले. तेव्हा आणि आजही माणसाने निरपेक्ष वृत्तीने जर स्वतःचे वैयक्तिक कर्म केले तर त्याचे आणि संपुर्ण मानवजातीचे कल्याण होईल.

इंद्रियांच्या आहारी न जाता योग्य ते कर्म व्यापक समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन निष्काम वृत्तीने करणे म्हणज कर्मयोग……. गीतेतील तत्त्वज्ञान हे सार्वकालिक व आजही तितकेच सुसंगत नाही का?

भक्तीचे महत्व सांगताना कबीर कर्मयोगाचेच निकष मांडतात. भक्तीमध्ये भक्त जसे निरपेक्षपणे भगवंताचे नाव घेत राहतो. तसेच निष्काम वृत्तीने मानव कोणत्याही भ्रमात न राहता कर्म करत राहीला तर कर्मयोग आणि त्यायोगे मोक्ष साध्य होईल.

और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।।

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ५ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 5

I met a traveller from an antique land,
Who said: Two vast and trunkless legs of stone
Stand in the desert. Near them, on the sand,
Half sunk, a shattered visage lies, whose frown,
And wrinkled lip, and sneer of cold command,
Tell that its sculptor well those passions read
Which yet survive, stamped on these lifeless things,
The hand that mocked them and the heart that fed:
And on the pedestal these words appear:
‘My name is Ozymandias, king of kings:
Look on my works, ye Mighty, and despair!’
Nothing beside remains. Round the decay
Of that colossal wreck, boundless and bare
The lone and level sands stretch far away

Indeed, a great account by Shelley, expressing vainness of the material wealth! Shelley’s sonnet ‘Ozymandias’ too signifies, what Krishna is trying to explain Arjuna.

Everything material is short lived. Monumental cities or gigantic structures! Even great kings and valiant warriors like Bhishma or Arjuna aren’t lasting forever. A material grant will shine today and expire tomorrow. The gist is instead of cultivating the temptations of the body, one should seek eternal happiness.

Undying happiness will be the product of an undying soul, hence understanding the nature of soul is key to Salvation.

What is the nature of soul….

From the 17th verse of Chapter II – Sankhya Yoga, Lord Krishna describes the nature of the soul.

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२।।२०।।

The soul is never born nor dies at any time nor does it come into being again when the body is created. The soul is birthless, eternal, imperishable, timeless and is never destroyed even when the body is.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।२।।१७।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२।।२२।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२।।२३।।

The soul is indestructible, eternal, and omnipresent. (Verse 17) It is neither born nor deceased. It’s the body that is destroyed. When the body is destroyed, the soul enters another, the way a man shrugs off his old clothes and puts on new ones. (Verses 22, 23)

The body of a being goes through various stages of existence like birth, aging and death. The soul, however isn’t bound by these. The body may undergo wear and tear, burning, drowning or like. The soul does not have these infirmities. The body is destroyed one day; the soul is not. He only verves into another body.

Thus Lord Krishna explains Arjuna, nature of the illusory creation and the immortal soul.

The coherent Arjuna fires the next question! What about the sin of killing, even if you agree to not mourn? If it is believed that the bodies of Bhishma or Drona are mortal, isn’t it a sin to kill any of them?

From verses 31 to 39, Lord Krishna explains the importance of following one’s duty (Swa Dharmaस्वधर्म). Swa means Self and Dharma is Duty (here). Fighting for the truth and righteousness is the duty of a warrior (Kshatriyaक्षत्रिय). There is no sin in a combat if it’s for upholding greater good of the society. Let’s take a simple example. A soldier on the front, defending his country is not looked upon as a sinner. It is his duty to protect his nation. His action is hence held in the interest of the society and not demeaned as ruthless massacre.

A royal court which helplessly tolerates misbehaviour against a female member of family (Draupadi) requires re-engineering. It’s the ordained duty of a true warrior to bring proper statehood to the depraved dynasty and to a society which allowed such a shameful act to happen. It is not a sin to fight against it. In fact, it would be a sin to move away from the war in such state of affairs. Moreover, fleeing from war will create wrong ideals in the society. It is the duty of the future ruler (Arjuna) to guide the society in the right direction. Even if he has to fight for it, it is the right thing to do. It is a sin for Kshatriyas to be weakened by seeing individual kinship instead of collective interest. Lord Krishna thus pacifies Arjuna’s query on sin!

Krishna discourses origin of existence, nature of body and soul and duty (Swa Dharma) of an individual. His motive is to convince Arjuna that – Duryodhana, Dushasana or he himself are purely right or wrong perspectives. Masses keep verging knowingly or unknowingly between right and wrong ideologies. Sometimes the unjust is strong and society may run after it. Just as the army then behind Duryodhana is outnumbering Pandavas.

As the existence is perishable so are right and wrong attitudes. These are perceptions emerging out of a vacillating mindset. What looks good to you today may not be so great tomorrow. One must overcome this inconstancy of mind. Because once the mind is stable, it comprehends what is right and does it.

A gun never fires, the hand behind it fires;
hand never fires, man behind it fires;
man never fires, Mind behind it fires!

This stability of mind is the third part of Arjuna’s quest. Once his mind gains stability, he would know whether war is right or wrong and he could act accordingly. In fact, an unwavering mind would decipher all questions related to existence and lead him to eternal peace – Salvation.

There’s a story about classical vocalist Pt. Vishnu Digambar Paluskar. While traveling through the forest, he rested at a temple. There arrived a hermit. In the dusky evening, the ascetic, immersed in his own universe, begins to sing. Paluskar felt that the whole world is mesmerized listening to that song, the temple is filled with celestial light! After a while, when he came to his senses, the song is over and the light is gone. Paluskar asked the ascetic, “Will you teach me singing that has such a transcendental effect? I am ready to do anything for it. I am even ready to become a hermit.” The ascetic grinned and replies “Such singing is not the result of being a hermit. But when you attain such a proficiency in your trade, you will automatically become a hermit. “

Hermits and commoners are games of the mind. The one whose mind is stable can be a hermit even though he is a commoner and the one whose mind is not stable……

Sthita Prajna – The Unwavering ………

Prajna means intellect, Sthita means steadfast. The Unwavering one…. whose intellect is stable. One who has no duality in thought and action….. A staunch pragmatist.

The description of Sthita Prajna surfaces from verse 54 of the second chapter. Arjuna curiously seeks to know how the one with stable mind looks, behaves and reacts. Krishna describes.

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २।। ५६ ॥

The one, who’s mind is undisturbed by distress, without desire for happiness, free from attachment, fear and anger, that sage is known as steadfast in consciousness.

A sage is a person who has no regrets, has no desire for happiness at all, and whose love, fear and anger have disappeared.

It’s as hard to put it into practice as it is easy to say. For..

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२।। ६० ॥

O Arjuna the senses are so turbulent they can forcibly lead astray the mind of even a vigilant person of sound judgement.

Strong senses invariably attract the human mind into various temptations. Hence developing neutrality towards sorrow and happiness becomes difficult. A common man can understand being neutral towards sorrow but being neutral to happiness? Sounds crazy!

Unlike the Sthita Prajna,

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥२।। ५८ ॥

Similar to a tortoise that withdraws its limbs, when one completely withdraws the senses from the temptations, he is established in perfect knowledge.

That is why the temptations that seduce the common man do not bother him. His mind and body are engrossed in only one thought, eternal bliss… which is salvation.

In case of momentary happiness and sorrow,

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥२।।६४ ॥

But the self-controlled being, while amidst objects of the senses, freed from the attachment and aversion, with senses governed by the self; attains ecstasy.

Like a droplet on a leaf maintaining its distinctness, the Sthita Prajna attains bliss despite staying amongst the sensory temptations.

Lord Krishna calls such a state ‘Brahmi’ – ultimate state, that is, the state of attaining eternal happiness.

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥२।।७२ ॥

O Arjuna, one who attains the realization of the Ultimate Truth, is never again deluded and at the moment of death, liberates from the material existence and merges into the ultimate consciousness.

Epilogue

The Sthita Prajna and his qualities are unique features of the Gita. They’ve not been mentioned anywhere else in Indian Philosophy (like Upanishadas).

A closer look at Gita reveals that Chapter II actually summarizes the entire essence of Indian School of Wisdom. The questions Arjuna is struggling with, are related not just to war but to a meaningful life. Lord Krishna unfolds the mystery within this chapter.

If we want eternal happiness, we should be able to distinguish between what is eternal and what is fleeting in existence. According to the Sankhya, the visual creation is temporary, while the soul is eternal.

We, who are part of the fleeting creation will not get eternal happiness until we free ourselves out of that delusion. To come out of the delusion is to come out of the momentary pleasure and sorrow.

To come out of happiness and sorrow is to look at both joy and sorrow with equanimity and to give them up. To gain this equilibrium, restraint is needed on the senses.

If the senses are to be controlled, then the mind must be controlled, and to control the mind, is not to suppress it but to conquer it with the intellect.

The one who acquires this intellect becomes Sthita Prajna i.e. the Unwavering.

He, whose intellect is stable, is happy because he recognizes that happiness is within and not in the matter around. Then the fruits of his deeds do not bother him. He can withstand both happiness and sorrow and can go beyond them.

Here the process and the product become one. The seeker and the sought after (happiness) become one. The person who has gone into the Brahmi – Ultimate state, breaks the confinements of material happiness and reaches inner peace – Salvation aka Nirvana.

What could better explain the bliss than John Donne’s lines!

One short sleep past, we wake eternally
And death shall be no more; Death, thou shalt die.

Once we realize the dreamy nature of material world and awaken ourselves out of it, fear of even the death, vanishes. Pure happiness dawns, breaking barriers of existence.

Previous Part – Quest – Bhagavad Gita – Part 4

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय. इतकं पुरे होईल!!”

मागेल ते देण्याची तयारी दाखवणा-या जगजेत्त्या राजाला तो तत्त्वज्ञ नक्की काय सांगतोय….? तेच जे कृष्ण अर्जुनाला सांगतोय.

शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

कसे आहे आत्म्याचे स्वरूप..

सांख्ययोगाच्या १७ व्या श्लोकापासून पुढे आत्म्याच्या स्वरुपाचे वर्णन श्रीकृष्ण करतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२।।२०।।

हा (आत्मा) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन(अनादी) आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।२।।१७।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२।।२२।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२।।२३।।

आत्मा हा अविनाशी, शाश्वत, आणि सर्वव्यापी आहे. (श्लोक १७) तो ना जन्म घेतो ना नष्ट होतो. नष्ट होते ते शरीर. आत्मा नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शरीर नष्ट झाले की आत्मा दुस-या शरीरात प्रवेश करतो. जसे माणूस जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो.(श्लोक २२, २३)

तात्पर्य काय तर अज, नित्य, शाश्वत, पुराण अशा विशेषणांनी युक्त आत्मा देहामध्ये वास करून राहतो. देह, मग तो कोणताही असो जन्म, वाढ, वृद्ध्त्व आणि मृत्यु अशा अवस्थातून जातो. परंतु आत्म्याच्या स्वरूपात असे बदल घडत नाहीत. तुटणे, झिजणे, जळणे, बुडणे अशा अनेक अवस्थातून शरीर जाते याला विकार म्हणतात आत्म्याला विकार नसतात. शरीर एक दिवस नष्टही होते, आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ दुसरे शरीर धारण करतो.

अशा प्रकारे मायावी सृष्टी आणि अविकारी आत्मा यांचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो.

पण मग शोक करायचा नाही हे जरी पटले तरी संहार करण्याच्या पापाचे काय? भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का? असा प्रश्न उरतोच.

श्लोक ३१ ते ३९ पर्यंत श्रीकृष्ण स्वधर्म पालनाचे महत्व सांगतो. धर्माची आणि सत्याची बाजू राखण्यासाठी युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे. त्यासाठी करायला लागणा-या हानीत पाप नसते कारण ते धर्मपालनासाठीच असते. साधे उदाहरण घेउ यात. देशाच्या रक्षणासाठी शत्रुसैन्याशी सीमेवर लढणा-या जवानाला आपण पापी मानत नाही कारण देशाच्या, पर्यायाने समाजाच्या भल्यासाठी केलेले ते कर्तव्यपालन आहे, हत्याकांड नव्हे!

राज्याच्या हव्यासापोटी द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत अधःपतन झालेल्या राजकुळाला आणि हे घडू देणा-या समाजाला पुन्हा योग्य राज्यसंस्था देणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यासाठी युद्ध करणे हे पाप नाही. याउलट सर्व मार्ग संपल्यावरच जे युद्ध उभे राहीले आहे त्यापासून दुर जाणे हे पाप ठरेल. युद्धापासून पळ काढल्याने समाजात अवहेलना होईल आणि समाजामध्ये चुकीचे आदर्श उभे राहतील. समाजाला योग्य दिशा देणारे वर्तन करणे भावी शासकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी जर युदध करावे लागले तर ते कठोरपणे करणेच योग्य आहे. त्यावेळी क्षत्रियाने सामुहिक हिताऐवजी वैयक्तीक नातीगोती पाहून कमकुवत होणे हे पाप आहे. हे झाले अर्जुनाच्या दुस-या शंकेचे उत्तर.

सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचे स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म याच्या चर्चेतून श्रीकृष्ण अर्जुनाला हे पटवून देतो की – दुर्योधन, दुःशासन किंवा तो स्वतः या केवळ योग्य किंवा अयोग्य मनोवृत्ती आहेत. समाज कधी योग्य तर कधी अयोग्य मनोवृत्तींकडे झुकत असतो. कधीतरी अयोग्य बलवान असते आणि समाज त्यामागे धावतो. जसे आजही दुर्योधनाच्या मागे ११ अक्षैहीणी सैन्य आहे पुढे जेव्हा अर्जुन, पर्यायाने पांडव विजयी होतील तेव्हा ते योग्य मानून समाज त्याच्या मागे धावेल. जसे सृष्टीतील सुख, दुःख,स्पर्श, रस, गंध आणि शरीरही नाशवंत आहेत तसेच योग्य आणि अयोग्य वृत्तीही नाशवंत आहे. कारण त्या वृत्ती जपणारे माणसाचे मन चंचल असते. आज जे योग्य आणि हवेसे वाटते ते त्याला उद्या अयोग्य आणि नकोसे वाटू शकते. या मनाच्या चंचलतेवर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकदा मन स्थिर झाले की मग ते योग्य तेच पाहते आणि योग्य तेच करते. हे मनाचे स्थैर्य म्हणजे अर्जुनाच्या शंकेचा तिसरा भाग. कारण अर्जुनाचे मन स्थिर झाले की त्याला युद्ध योग्य की अयोग्य तेही कळेल आणि योग्य ते तो ठामपणे करूही शकेल. किंबहुना मन स्थिर झाले की सर्व प्रश्नच सुटतील आणि आत्मसुखही साध्य होईल हेच कृष्णाला पटवून द्यायचे आहे. तुकोबा म्हणतात तसे –

मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धिचे कारण।।

गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संदर्भात एक कथा सांगतात. जंगलातून प्रवास करत असताना ते एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील…”

संन्यस्त आणि गृह्स्थ हे मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन स्थिर असते तो गृहस्थ असूनही संन्यस्त असू शकतो आणि ज्याचे मन स्थिर नाही तो संन्यस्त गृहस्थच राहतो.

स्थितप्रज्ञ……… प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर/ठाम. ज्याची बुद्धी स्थिर असते तो स्थितप्रज्ञ. ज्याच्या विचार आणि कृतीमध्ये द्वैत नसते तो स्थितप्रज्ञ.

दुस-या अध्यायाच्या ५४ व्या श्लोकापासून स्थितप्रज्ञाचे वर्णन येते. मनाची स्थिरता प्राप्त असणारा आणि बुद्धीयोगाने कर्म करणारा स्थितप्रज्ञ असतो कसा? याचे कुतुहल अर्जुनाला असते. तो कृष्णाला विचारतो आणि कृष्ण त्याचे वर्णन करतो

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २।। ५६ ॥

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.

हे वाचायला जितके सोपे तितकेच आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२।। ६० ॥

दुःखाच्या प्रसंगी खेद न वाटता राहणे एकवेळ शक्य आहे परंतु सुखाची इच्छा न करणे अवघड नाही का? माणसला दुःख टोचते म्हणून नको असते पण दुःखाबरोबर सुखही क्षणिक आहे म्हणून ते ही टोचावे आणि नको वाटावे अशा मनस्थिती प्राप्त करणे सोपे नाही. कारण अर्थातच बलवान अशी इंद्रिये माणसाच्या मनाला निरनिराळ्या मोहाच्या मार्गाने खेचत असतात.

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥२।। ५८ ॥

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो.

म्हणूनच सर्वसामन्य माणसाला भूरळ पाडणारे मोह त्याला बाधत नाहीत. त्याचे मन आणि शरीर केवळ एकाच विचारात मग्न होते, ते म्हणजे शाश्वत आनंद जो क्षणिक सुख आणि दुःख यांच्याही पुढील पातळीवर असणारा मोक्ष आहे.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥२।।६४ ॥

परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.

अशा स्थितीला श्रीकृष्ण ब्राह्मी स्थिती म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची स्थिती म्हणतो.

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥२।।७२ ॥

उपसंहार

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा अद्धितीय ठेवा आहे कारण गीतेशिवाय इतर कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही.

गीतेच्या अंतरंगात डोकावल्यास असं लक्षात येतं की दुसरा अध्याय हा गीतेचा तत्त्वज्ञानातील पहीला अध्याय आहे आणि गीतेचे संपुर्ण सार सांगणारा अध्याय सुद्धा आहे. अर्जुनापुढे उभ्या असणा-या प्रश्नांचा रोख हा केवळ युदधाकडे नसतो तर अर्थातच शाश्वत आनंदाकडे असतो. या एका अध्यायातून श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे समाधान उभे करतो.

शाश्वत सुख हवे तर, या सृष्टीत शाश्वत आणि क्षणिक काय आहे ते जाणले पाहीजे. सांख्य मतानुसार दृष्य सृष्टी ही क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे.

क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत त्या क्षणिकातून बाहेर येत नाही तो पर्यंत शाश्वत सुख मिळणार नाही. क्षणिकातून बाहेर येणे म्हणजेच क्षणिकात गुंतवणारे सुख आणि दुःख यातून बाहेर येणे.

सुख आणि दुःखातून बाहेर येणे म्हणजेच हर्ष आणि शोक दोन्हीकडे समभावाने पहाणे आणि त्याचा त्याग करणे. समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा.

इंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.

ही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.

ज्याची बुद्धी स्थिर असते तो सुखी होतो कारण ते सुख आपल्यात असते, बाह्य पदार्थात नसते हे त्याला उमगलेले असते. मग त्याच्या कर्माची फळे त्याला बाधत नाहीत. सुख आणि दुःख दोन्ही त्याला उपभोगता येतात आणि त्यांच्या पलिकडेही जाता येते.
जसा भक्त आणि भगवंत एक होतो तसा ब्राह्मी स्थितीत गेलेला व्यक्ती परमानंदी लीन होतो.

असा मनोविजय मिळविणा-याचा आनंद पाडगांवकरांच्या एका कवितेतून तंतोतंत व्यक्त होतो.

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी ।अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो।।
फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग ।आज अवघे अंतरंग ओसंडले हो।।
मिटूनही डोळे दिसू लागले आकाश ।आज सारा अवकाश देऊळ झाला हो।।
काही न बोलता आता सांगता ये सारे । आतली प्रकाशाची दारे उघडली हो ।।

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ४ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 4

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम्।। (Rigveda. 10.129)

Nasadiya Sukta (नासदीय सूक्त) ……… It is said that the description of the origin of creation given in this hymn (129) in the 10th Mandala of Rigveda, matches with the one in Big Bang Theory (not the TV serial!). It is astonishing to find resemblance between thoughts of two seekers with distinct paths. A philosopher and a scientist.

It is a wonderful fact that a scientist proves what a philosopher stated ages ago. What could be the reason? If you go a little deeper, you can see the similarities between the two. Both are intellectuals. Both embark on different paths but seek a common goal. The scientist seeks eternal happiness through material progress, while the philosopher, through spiritual progress …

The scientific progress that has been made over the years makes mankind happier but puzzles the scientist. Is man really happy after creating so many means of material happiness? The answer is definitely negative. Because if that were the case, there would be no need to build more means of happiness. The philosopher also plunges into this riddle. New tools make people happy, but only momentarily. So what are those that keep them happy forever? Is Happiness really in the tools or elsewhere?

Arjuna too falls into this dilemma. After winning the war, he will get the kingdom, he will get all the means of happiness, but he will have to suffer the pain of killing his own relatives. If he doesn’t not fight, he won’t suffer the loss of extermination, but there will be contempt for being a weakling. Essence is, there’s no happiness without a smidgen of sorrow. But he’s looking for happiness that will last forever and be free from sorrows. With a chaotic mindset, Arjuna makes somewhat uncertain decision to not fight. He then turns to Krishna and says –

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌।। Gita 2.7।।

A chaotic mindset has weakened my ability to act. I am asking you to (please) explain what’s good for me since I am your disciple.

Now it’s Krishna’s turn to enlighten a confused but studious seeker. The theory has to be potent enough to satisfy Arjuna, a scholarly disciple.

With great skill, Krishna convinces Arjuna, why he should continue to battle. Moreover, Krishna raises the path of eternal happiness before him by unfolding concepts like the nature of existence, the importance of karma, the stability of intellect and the steadfast attitude that comes with the knowledge of all these, respectively.

Sankhya Yoga ….

It is believed that the seeds of Sankhya principle can be traced back as far as Rigveda. Sankhya ….. a theory… which fascinated thinkers from Rigvedic sages to Buddhist scholars. Principle, that finds a place in many schools of thought such as Buddhism and Jainism. References or versions of Sankhya school are found in Rigveda, Upanishadas (Shwetashvatara श्वेताश्वतर, Taittiriya तैत्तिरीय, Aitareya ऐतरेय, Brihadaranyaka बृहदारण्यक), Baudhayana’s Grihyasutra (बौधायन गृह्यसूत्र), Patanjali’s Yogasutra (पतंजली योगसूत्र) and Charaksamhita (चरकसंहीता). Links go even to Chinese translation of Parmartha1 (परमार्थ).  Sankhya… a word in itself has enough material to compose a separate thesis. But for now we will only look at Sankhya in the context of the 2nd chapter of Bhagavad Gita.

Just as the entire world of computers is made up of binary 0 and 1 so is the universe, according to Sankhya, made up of 2 eternal principles. Sankhya means number and Yoga means unification. The entire existence is formed through unification of these 2 eternal principles. Purusha (पुरुष) and Prakriti (प्रकृती). ‘Purusha (पुरुष)’ is an imperishable, everlasting, numerous element and ‘Prakriti(प्रकृती)’ is perishable, capricious element. Prakriti is classified into multiple predetermined elements (Mahabhuta) collaborating to create an assorted world. The principle of Prakriti stands for all things that are mortal, while Purusha is the indestructible soul/energy. The combination of these two creates existence. When the mortal form perishes, the soul is liberated and absorbed into another being in the Prakriti. Such is a skeletal framework of Sankhya Philosophy.

Now let’s look into Gita … Krishna splits his rationale in three parts based on the Sankhya principle.

  • Reality of existence
  • Balancing Perspectives, practising equanimity.
  • Portrayal of the Unwavering (स्थितप्रज्ञ) – Practitioner of equanimity

Krishna handles this like a skilled counsellor. He emphatically states that it is indecent for a valiant Arjuna to behave cowardly. He is already mourning on an intended destruction while he does not even have knowledge of creation.

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे। गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ।।Gita 2.11।।

You are not only mourning for the unavoidable but also upholding an argument in its favour! The learned neither lament for those who are dead nor for the living.

The body is made up of – perishable elements Prakriti, and the soul (Aatman -आत्मन्) is immortal –  Purusha. It is certain that the body will perish whether or not you destroy it. What does this mean? This means it is irrational to grieve and argue about the inevitable. No matter how hard you try, no one will live beyond their existential boundary. Even you, me or monarchs around us won’t be living forever.

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ।।Gita 2.12।।

Never at any time did I not exist, nor you, nor all these rulers (e.g. Kauravas) and certainly never shall we cease to exist in the future.

Then why and how much to mourn? The death of the one who is born is inevitable. This is the law of creation.

Krishna explains to Arjuna that it is pointless to grieve for the departed or even the living! Whatever born is destroyed. It yields and perishes. That is seen momentarily of course by the subject of external senses.

After all, the body of an enemy, relative or anyone else is mortal. Sooner or later it will be destroyed. So there is nothing wrong with Arjuna destroying it when an inevitable war is raging.

This is the first half of Sankhya doctrine in which the perishable principle of Prakriti is manifested. This is true not only about the body, but also about the fact that every element of creation that is perceived through the external senses is mortal. What are the external senses? Eyes, ears, nose, skin…. This means that, what can be seen by the eyes, heard by the ears, smells coming from the nose and touch felt by the skin are all short-lived.

Prakriti is a finite and mutable principle hence it can’t alone serve the human quest of eternal happiness. On the other hand, Purusha/Soul is an indestructible and everlasting principle that binds us and the creator together. Knowledge of Purusha leads to the knowledge of the creator i.e. to the door of eternal happiness.

How does Krishna describe the nature of Soul and further moves to the remaining parts of his explanation…? in the next part …

Footnote:

  1. Parmartha परमार्थ – A 10th Century Buddhist monk. Born in Ujjain in CE 499, Parmartha converted and spread Buddhism in Cambodia initially and then in southern China. He is known for his Chinese translations of many Buddhist texts like Abhidharmakosh (अभिधर्मकोष) and Suvarnaprabhasasutra (सुवर्णप्रभाससुत्र). Parmartha also translated the Sankhya doctrine of Panchshikha and Ishwar Krishna. He died in CE 569 in China.

Previous Quest – Bhagavad Gita – Part 3 Next – Quest- Bhagavad Gita – Part 5

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ४

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥

नासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण? थोडं खोलात गेलं तर दोघांतली साम्यस्थळं दिसायला लागतात. दोघेही बुद्धीजीवी. दोघेही जण एकाच ध्येयाच्या वाटेवर असतात. शास्त्रज्ञ भौतिक प्रगतीच्या माध्यमातून शाश्वत सुखाचा शोध घेतो तर तत्त्वज्ञ अध्यात्मिक किंवा तात्त्विक प्रगतीच्या माध्यमातून…

वर्षानुवर्षे होणारी शास्त्रीय प्रगती माणसाला अधिकाधीक सुखी बनवते पण शास्त्रज्ञाला अधिकच कोड्यात टाकते. इतकी भौतिक सुखाची साधने निर्माण करूनही मानव खरोखर सुखी होतोय का? याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते? खरोखर सुख साधनातच असते की त्याचा शोध दुसरीकडे कुठे घ्यावा?

अर्जुनही याच द्विधा मनस्थितीत पडतो. युद्ध जिंकल्यावर राज्य मिळणार, सुखाची सर्व साधने मिळणार पण स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचे दुःख भोगावे लागणार. बरं युद्ध न करावे तर संहाराचे दुःख जाणार पण पळपुटेपणाची अवहेलना वाट्याला येणार. म्हणजे कोणतेच सुख पूर्णत्वाने वाट्याला येणार नाही त्याला दुःखाची किनार असणारच. त्यालाही असंच सुख हवंय जे कायम टिकेल आणि दुःखरहीत असेल. अर्जुन अतिशय गोंधळून जातो. त्याची विचारशक्ती कुंठीत होते आणि युद्ध करायलाच नको असा काहीसा अनिश्चित निर्णय घेऊन तो कृष्णाकडे वळतो.

आता कृष्णापुढे काम आलं एका गोंधळलेल्या परंतु अभ्यासु विद्वानाला समजावण्याचं. हे काम निश्चित सोपं नाही. कारण जो विचार कृष्ण मांडणार आहे तो अर्जुनाला पटवून द्यायचा आहे. त्यासंदर्भात त्याला ज्या शंका असतील त्यांचं निरसन करायचं आहे. उगीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायला तो बाबांना खाऊ मागणारा लहान मुलगा नाहीये!!

मोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.

नासदीयसूक्त … सांख्ययोग….

असं मानतात की नासदीयसुक्तातच सांख्य तत्त्वाची बीजेही आढळतात. सांख्य….. तत्त्वज्ञानातील एक सिद्धांत… ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा. बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वप्रणालीत स्थान मिळविणारा विचार.

सांख्य तत्त्वाचा संदर्भ किंवा विवेचन ऋग्वेदासह श्वेताश्वतर, तैत्तिरीय, ऐतरेय, बृहदारण्यक अशी उपनिषदे, बौधायनाचे गृह्यसुत्र, पतंजलीचे योगसुत्र आणि चरकसंहीता इतकेच काय पण परमार्थाच्या चिनी भाषांतरातही आढळतात. एक वेगळा ग्रंथ लिहीता येईल इतकी सामग्री सांख्य या एका शब्दात आहे. पण तूर्तास आपण केवळ भगवद्गीतेच्या दुस-या अध्यायाच्या संदर्भात आलेला सांख्य विषयच पाहू यात.

जसं संगणकाचं संपूर्ण विश्व हे बायनरी म्हणजे ० आणि १ एक या दोन तत्त्वांनी बनलंय तसंच सांख्य तत्त्वाच्या मते विश्व हे दोन तत्त्वांनी बनलंय. एक अविनाशी तत्व ‘पुरुष’आणि दुसरं विनाशी/विकारी तत्त्व ‘प्रकृती’. प्रकृती या तत्त्वात नश्वर अशा सर्व गोष्टी येतात तर पुरुष म्हणजे अविनाशी चैतन्य/आत्मा. या दोनहीच्या संयोगाने सृष्टीचे सर्जन होते. जेव्हा नश्वर शरीर विकाराच्या माध्यमातून नष्ट पावते तेव्हा आत्मा मुक्त होऊन प्रकृतीच्या दुस-या तत्त्वात सामावतो. असा सर्वसाधारण विचार सांख्य मांडतो.

आता गीतेकडे पाहू.. अर्जुनाच्या प्रश्नांचे तीन भाग पाडून प्रत्येक भागाला सांख्य सिद्धांताच्या आधारे कृष्ण उत्तर देतो.

पहीला भाग अर्थातच ‘नातेवाईकांच्या संहाराचा’. दुसरा भाग या कृतीतील ‘धर्म अधर्माचा’ आणि तिसरा भाग ‘मानसिक स्थैर्याचा’ कारण तेच ढळल्याने अर्जुन शस्त्र उचलणार नाहीये.

एका कुशल समुपदेशकाप्रमाणे कृष्ण अर्जुनाला समजावतो. प्रथम गोंधळलेल्या अर्जुनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कृष्ण त्याला रागावतो. ऐन युद्धाच्या वेळी हे असले नपुंसकासारखे, पुरुषार्थाला बाधा आणणारे वर्तन करणे वीर अर्जुनाला अशोभनीय आहे हे तो परखडपणे सांगतो. सैरभैर झालेल्या अर्जुनाच्या बोलण्यातील विसंगतीवर तो बोट ठेवतो. परखड टीका झाल्याने सहाजिकच आता अर्जुनाचे लक्ष कृष्णाच्या विवेचनाकडे केंद्रित झाले आहे.

शरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून जीवाचे अस्तीत्त्व बनते. यातील शरीर हे विकारी म्हणजेच नाश पावणारे आहे तर आत्मा हा अविकारी म्हणजे चिरंतन आहे. ज्या नातेवाईकांचे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारच आहे. तू नष्ट केलेस तरी आणि नाही केलेस तरी. याचा अर्थ काय? तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा? बरं, शोक करून ते टिकणार थोडेच आहेत. उद्या तेही जाणारच आहेत.जे जे जन्म घेते त्याचा मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे.

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः।।२।।११।।
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ।।२।।।।१२।।

सर्व विनाशी तत्त्वांची उदाहरणे देऊन कृष्ण अर्जुनला समजावतो की गेलेल्याचे किंवा जाणा-याचे दुःख करणे अयोग्य आहेच वर ते जाणे आपल्या हातून घडतेय याचे वैषम्य वाटणेही गैर आहे.

ज्ञानेश्वर महाराजही दोनच ओव्यात अर्जुनाची अवस्थेचे मार्मिक वर्णन करतात. त्यांच्या मते अर्जुनाची अवस्था ही जन्माने अंध असाण-या व्यक्ती सारखी आहे. नकळत दरवाजा समजून भिंतीवर डोके आपटावे तसे अर्जुनही नकळत चुकीच्या तत्त्वावर युक्तीवादाचे डोके आपटत आहे. त्याला स्वतःचे शरीर आणि आत्मा यांचे पुरेसे ज्ञान नाही आणि तो कौरवांचे शरीर नष्ट करण्याचा शोक करतोय.

जात्यंधा लागले पिसें। मग तैं सैरा धांवे जैसे।।
तुझे सिहाणेपण तैसे। दिसतसे ।।२।।९३।।

प्रकृतीचे नश्वरत्वही ज्ञानदेव एका ओवीत सांगतात. जे जे जन्म घेते ते ते नाश पावते. ते ते काय तर अर्थातच बाह्य इंद्रियांचे विषय….

हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे ।।

हा झाला सांख्ययोगाचा अर्धा भाग ज्यात प्रकृती तत्त्वाचे विनाशीत्व प्रकट होते. हे केवळ शरीराच्या बाबतच खरे नसून सृष्टीतील प्रत्येक तत्त्व जे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून जाणवते ते सर्वच नश्वर असते असेही कृष्ण सांगतो. बाह्य इंद्रिये कोणती? तर डोळे, कान, नाक, त्वचा. म्हणजेच काय तर जे डोळ्यांना दिसते ते चांगले/वाईट दृष्य, कानाला ऐकू येणारे बरेवाईट आवाज/बोलणे, नाकाला येणारे विविध वास आणि शीतोष्ण स्पर्श सगळे काही नश्वर म्हणजे अल्पजीवी आहे. आत्ता असेल नंतर नसेल, उद्या असेल परवा नष्ट होईल. भाडेकरूला जसे घर बदलण्याचे दुःख करून चालत नाही तसेच प्रकृतीतील नश्वर तत्त्वांच्या गमावण्याचे दुःखही निरर्थकच आहे.

एकुण काय तर नातेवाईकांचे किंवा कोणाचेही शरीर हे नश्वर आहे. आज ना उद्या ते नष्ट होणारच आहे. त्यामुळे युद्धप्रसंग उभा असताना अर्जुनाने ते नष्ट करण्यात अयोग्य असे काहीच नाही. हे झाले अर्जुनाच्या पहील्या शंकेचे उत्तर.

पण मग जर प्रकृती नश्वर तत्त्व आहे आणि त्याचा ध्यास अयोग्य आहे तर शाश्वत काय आहे? ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा?…. आत्मतत्त्व…..

शाश्वत सुख हवे तर शाश्वत तत्त्व काय हे जाणले पाहीजे आणि ते जाणायचे तर तशी मानसिकता हवी म्हणजेच काय तर प्रथम आत्मतत्त्वाची ओळख मग त्याचे स्वरूप जाणणा-या मानसिकतेची ओळख आणि मग ती जाणणा-या स्थितप्रज्ञाची ओळख…..

ही ओळखपरेड करुयात पुढच्या भागात……..

तळटीपा

१) परमार्थ – इ.स. ५ व्या शतकातील एक बौद्ध भिक्षु. इ.स. ४९९ मध्ये उज्जैनला जन्मलेल्या परमार्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर कंबोडीयासह दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक बौद्ध ग्रंथाच्या चीनी भाषांतराबद्दल त्याला ओळखण्यात येते. उदा. अभिधर्मकोष, सुवर्णप्रभाससुत्र. पंचशिखा आणि ईश्वरकृष्णाच्या सांख्य सिद्धांताचेही भाषांतर परमार्थाने केले. चीनमध्येच इ.स. ५६९ मध्ये त्याचा मृत्यु झाला.

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ३ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 3

Perspective …. Arjuna Vishada Yoga!

Perspective ……….. Perspective of an individual exercises profound effect on his expression. This is evident in the case of artists. The foundation of a creation rests on how an artist looks at the subject. If an artist’s approach to a subject, thought or an event is different, then the artistic expression that emerges from it can also be dramatically different.

Christopher Marlow generates a horrific picture of man’s lust of power and fame in ‘Doctor Faustus’, a tragic play based on a concept of a mortal possessing heavenly powers. The same concept is depicted in a hilarious comedy ‘Bruce Almighty’…  what differs is approach… Perspective of the artist towards a concept.

Arjuna Vishada… The same is true about the first chapter in Gita. Since this chapter has been consistently presented in the form of Arjuna’s lament, most of the readers find it melodramatic and Arjuna, an emotional fool! The solicitous side of Arjuna doesn’t surface unless we change our perspective… Conscience.

Conscience … the intellect to know the difference between right and wrong.

Conscience …. the patience that makes you think about the consequences before taking any step.

Conscience …. the difference between Arjuna and other warriors who had inhuman and destructive powers and were eager for war…

Numerous great warriors during the Mahabharata war were equipped with infinite power and divine weapons. Majority of them were eager to practice those weapons. But how many of them were mindful of the immeasurable damage these divine weapons could bring? Most of them were marching impatiently burning with selfishness or vengeance.

Perspective…….. ‘Eye for an eye makes the whole world blind’. Sheer Aggression or Vengeance as an approach to victory causes extermination!!

How much more should the conscience of a hero who has the power to destroy millions of families be awakened? Arjuna manifests this conscience. The restraint appears through Arjuna Vishada.

He does not dare take up arms unless he’s convinced of the inevitability of war and destruction. Not because he is weak or faint-hearted, but because he is confident of his destructive power. He is aware of the all-encompassing effects of genocide…

Arjuna stands out in this chapter not only as a mighty warrior but also as a mature, prolific and prudent leader. He is sure that if he has to be the future ruler, he has to take every step thoughtfully. Since the society will set him as a role-model and will follow his footsteps. That is why he inspects the horrible consequences of war from different perspectives and roles. Effects on all factors such as an individual, family, society, religion, economics, politics, values…

Knowing all this, he wants a satisfactory answer as to why is he waging war? Because as a prudent person and a future ruler, he has to take the moral responsibility of this war and justify it to the next generations. That is why he is anxious to take up arms without getting fully convinced.

Attitude … Inquisitiveness ….

Apart from presenting the ferocity of war and Arjuna’s maturity, there can still be a feature in Chapter 1. Which appears in the subsequent chapters as well. Curiosity …. desire for knowledge ….

There is a story in the Mahabharata. It is said that Drona used to play a trick while teaching archery to the Kauravs and Pandavas. In the morning, he would send each student with a container to fetch water. Since the vessel given to Ashwatthama had wider mouth, he used to come back earlier than others. Then Dronacharya used to teach him some distinct tricks till other disciples arrived. Only Arjuna comprehends this clue and manages to reach with Ashvatthama to become the beneficiary of this special class. Later he was also chosen to perform penance and travel to obtain divine weapons. Moreover, the fact that Arjuna was closest to Lord Krishna amongst the Pandava siblings clearly indicates that Arjuna was not only a mighty warrior but also a curious scholar.

That’s why mere Yudhisthira’s word or Krishna’s order isn’t enough for him. He knowingly turns down such appeals. His conscience keeps alarming that an annihilation demands much more substantial and comprehensive purpose than just vengeance.

Hence before taking any step he seeks multifarious enlightenment from Krishna. He wants to understand inevitability of war from different perspectives.

Arjuna, a curious seeker and a true worshiper of knowledge was the reason why a divine being like Krishna detailed the knowledge in 17 Chapters. Greater the seeker’s curiosity, greater the scope of knowledge! Therefore, attainment like Gita resulted out of the curiosity of a seeker like Arjuna.

And of course, if it was not for Arjuna Vishada, would Krishna have recited Gita? And would we have received it so easily?!

Therefore, the knowledge in the 17 chapters of Gita is a gift of Arjuna Vishada.

What is this gift … Sankhya Yoga …. in the next part …

Previous – Quest-Bhagavad Gita – Part 2 Next – Quest – Bhagavad Gita – Part 4

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!

दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.

अर्जुनविषाद. गीतेतील पहिल्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.

विवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.

विवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..

महाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती? प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..

सुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती? जास्तीत जास्त संहार…!

एक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना? या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.

युद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.

केवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….

हे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पिढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.

दृष्टीकोन.. जिज्ञासा….

युद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहिल्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.

जिज्ञासा…. ज्ञानलालसा….

महाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता!!!

उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.

आणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का? आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का?!!!!

त्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.

काय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग २ पुढील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ४

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact