अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।

प्रातःकालचे गंगास्नान करुन देवदर्शनासाठी निघालेल्या शंकराचार्यांच्या मार्गात एक चांडाळ आपल्या कुत्र्यांसह आडवा येतो. सवयीने त्याला ‘दुर हो’ असे आचार्य म्हणतात. तेव्हा तो चांडाळ त्यांना प्रश्न करतो – “हे महात्मन् नक्की काय दूर करू? माझे शरीर? ते तर तुमच्यासारखेच पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि नश्वरही आहे. बरं शरीरस्थ चैतन्य/आत्मा दूर करू? तो तर तुमच्या माझ्यासकट सर्व विश्व व्यापून आहे मग त्याला त्याच्यातूनच दूर कसा करणार?” आपल्या सिद्धांताचे व्यावहारीक दर्शन घडवणाऱ्या त्या शब्दांनी भानावर आलेले शंकराचार्य त्या चांडाळातील ईशतत्व जाणून त्याला प्रणाम करतात.
या एका छोट्या कथेतून कित्येक गोष्टींचा उलगडा होतो!! चांडाळ असो वा आचार्य, कर्मयोगी असो वा संन्यासी, परमतत्वाचा स्पर्श झालेला प्रत्येक व्यक्ती समान असतो. त्यांच्या साध्याच्या आड त्यांच्या मार्गाचे भिन्नत्व येत नाही. चांडाळाला झालेले ज्ञान आणि संन्यस्त आचार्यांना झालेले ज्ञान हे एकाच परमेश्वराशी निगडीत आहे. प्राप्तीचा मार्ग भिन्न असणे हे त्यांच्या अंतःप्रेरणेशी निगडीत आहे पण त्यांचे साध्य एकच आहे त्यामुळेच त्यांनी अंगिकारलेले मार्गही तितकेच श्रेष्ठ आहेत. ज्ञान मोठे आणि कर्म गौण असा भेद येथे नाही.
आपल्यालाही असा अनुभव अनेकदा येतो जेव्हा एखाद्या सिद्धांतामागील तत्व उमगलेले असते परंतू व्यवहारात ती गोष्ट अंगिकारणे साधलेले नसते. साधे उदाहरण घ्यायचे तर रस्त्यावरील रहदारीच्या नियमांचे पालन!! हे नियम पाळणे हे प्रत्येकाला तत्व म्हणून पटलेले असते परंतू ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे जमत नसते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाची आपली कारणेही असतात. मग ते तत्व चुकीचे आहे असे मानायचे का? तर ते तर्काला पटत नाही. अशी मग गोंधळाची अवस्था माणसाला अनुभवाला येते. जे रहदारीच्या साध्या नियमांच्या बाबतीत खरे आहे ते आत्मज्ञानासारख्या दुष्प्राप्य गोष्टीत वेगळे कसे असेल? त्या बाबतचा गोंधळ अर्जुनाचाही होतो. मग येथे चुकते काय…..? तर तत्वावरील निष्ठा…. चांडाळाच्या शब्दांनी भानावर आलेले आचार्य त्याला प्रणाम करून अद्वैतावरील आपली निष्ठा सिद्ध करतात. बहुसंख्य व्यक्ती मात्र येथे गोंधळून जातात. काय करावे आणि काय करु नये हे ठरवता येत नाही. सोपा पण तर्काला न पटणारा मार्ग स्वीकारावा की कठीण पण शाश्वत कल्याण करणारा मार्ग स्वीकारावा? बहुतांशी लोक चटकन सोपा मार्ग स्वीकारतात आणि सिग्नल तोडून निघून जातात!! असे अनेक सिग्नल, प्रसंग, विचार चुकवून तर्काला मागे सारत एके दिवशी आयुष्यात अशा ठिकाणी येऊन पोचतात की जेथे तर्काला मागे सारणे अशक्य होते आणि वैचारीक गोंधळापेक्षा सिग्नलला थांबणे सोपे वाटायला लागते. अर्जुनही याच संभ्रमात आहे. कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कर्माचे बंधन टाळून कर्म करायचे आहे पण मग त्यापेक्षा कर्मच टाळणे सोपे नाही का?
गीतेचा पाचवा अध्याय याच प्रश्नावर सुरु होतो. अर्जुन कृष्णाला प्रश्न करतो की एकीकडे कर्म टाकण्याचा उपदेश करतोस आणि कर्माची प्रशंसाही करतोस असे कसे. दोन्हीपैकी कल्याणकारक असे एक काहितरी सांग.

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌।।

यावर कृष्णाचे उत्तर आजच्या परिस्थितीला सुसंगत असेच आहे. संन्यास आणि कर्मयोगात, कर्मयोग आचरण्यास सुलभ आहे असे कृष्ण सांगतो.
सर्वप्रथम आत्मज्ञानासारखे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी निवडलेला मार्ग मग तो ज्ञान असो कर्म असो की भक्ती यात उणेअधिक काहीच नसते. ध्येय जितके उन्नत त्याच्या प्राप्तीचा मार्गही तितकाच श्रेष्ठ आहे असे आग्रही प्रतिपादन या अध्यायातून श्रीकृष्ण करतो. अर्थात व्यक्तीच्या परिस्थिती प्रमाणे मार्ग हे आचरण्यास सुलभ किंवा कठीण असू शकतात.

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।

संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

श्रीकृष्णाच्या मते निष्क्रियता आणि निष्कर्मता यातील फरक जाणून खरी संन्यस्त वृत्ती अंगिकारणे हे प्रत्येकाला साध्य होणे कठीण आहे. त्यापेक्षा कर्मयोग आचरणात आणणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे अधिक सुलभ आहे. परंतु येथे हे नीट ध्यानात घेतले पाहीजे की कर्मयोग आणि संन्यस्त वृत्ती या दोन भिन्न गोष्टी असल्याचे समजणे हे मात्र चुकीचे आहे. कारण कर्मयोगी व्यक्ती शरीराने कर्म करत असते परंतु वृत्तीने संन्यस्त असते तर संन्यस्त व्यक्ती यातील कर्माच्या भागातूनही निवृत्ती पत्करते. त्यामुळे केवळ सर्वसंगपरित्याग करून अंगाला राख फासून ध्यानस्थ बसणे म्हणजेच संन्यास असे जर कोणी मानत असेल तर ते अयोग्य आहे. भगवंत पुढे असेही म्हणतात की संन्यस्त किंवा कर्मयोगी व्यक्तीला वेगवेगळी फळे मिळतात असे मानणेही मूर्खपणाचे आहे. दोन्हीतही मिळणारे फलित हे एकच असते. जो हे जाणतो तो खरा ज्ञाता.
मग कर्मयोगाला सुलभ म्हणायचे कारण काय? याचे विवेचन भगवंत पुढे करतात.

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति॥

परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.

इंद्रियांशी निगडीत कर्म करत राहणे परंतु त्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेणे ही कला साध्य होणे अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारी साधना कर्मयोगाने सुलभ होते. व्यक्ती कर्माच्या बंधनाचे स्वरुप कर्म करता करता जाणायला लागते, आपल्या मनावर संयम प्राप्त करण्यास सक्षम होते आणि कालांतराने कर्म करूनही त्यापासून अलिप्त राहण्याचे ज्ञान प्राप्त करते.
आजच्या युगात व्यक्तीला शिक्षण, व्यवसाय, चरितार्थ, संसार आणि संगोपन अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात अशा वेळी आपले विहित कर्म प्रामाणिकपणे पार पाडणे त्याचवेळी मन कर्मफलाच्या बंधनातून मुक्त ठेवण्याचा यत्न करणे हे जास्त तर्कसंगत आहे असे भगवंत सांगतात. यातूनच कर्माचे कर्तेपण नाकारणे ही ज्ञात्याची अवस्था कर्मयोगीही प्राप्त करतो. फलाची आसक्ती नष्ट झाल्याने तो निरंतर मनःशांतीचा अनुभव घेतो आणि कमळावरील जलबिंदूप्रमाणे पापापासून अलिप्तही राहतो असे भगवंत सांगतात.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥

अशा चिरंतन मनःशांतीचा अनुभव घेणाऱ्या ज्ञात्याला भगवंत योगी आणि मुनी अशा संज्ञा वापरतात. अशा व्यक्तीला बाह्य विषयांची आसक्ती नसते, काम आणि क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग आवरण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असते. इच्छा, भय आणि क्रोध या विकारांना दूर सारून परमात्म्याचे ध्यान करणारा असा व्यक्ती सात्विक आणि अक्षय आनंदात लीन असतो असे श्रीकृष्ण प्रतिपादन करतो.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌॥

गीता वाचत/शिकवत असताना अनेक प्रश्न असे येतात की त्यातून प्रश्नकर्त्याची गोंधळाची अवस्था ध्यानात येते. पहिल्याच लेखात आपण असे म्हणालो होतो की – बहुसंख्य वाचक गीतेचा तयार उत्तराच्या (Instant Remedy) अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. गीता एका विशिष्ट दृष्टीकोनाचे समर्थन करत नाही. किंबहूना गीता केवळ योग्य दृष्टीकोन विकसित करण्याचा मार्ग सुचवते. त्यानुसार वागून योग्य तो मार्ग निवडणे हे अभ्यासकाचे कार्य आहे. गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग या दोन्ही योगांवर भगवंताने भाष्य केलेले आहे. व्यक्तीने आपल्या अंतःप्रेरणेने आणि परिस्थितीनुरुप भगवत्प्राप्तीचा कोणताही एक मार्ग निवडणे अपेक्षित आहे. याचा अर्थ निवडलेला एक मार्ग योग्य आणि दुसरा अयोग्य किंवा आपल्यापेक्षा भिन्न मार्गाने जाणारे चूक असा घेतला जातो. हे अभ्यासातले अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ज्ञानयोग उजवा आणि कर्मयोग उणा असे मानणे मूर्खपणाचे आहे असे गीता स्पष्टपणे म्हणते. आत्मज्ञ होण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडते यापेक्षा त्या मार्गावरून किती निष्ठेने वाटचाल करते हे जास्त महत्वाचे आहे. मार्ग हा व्यक्तीपरत्वे भिन्न असणार यात शंकाच नाही. अचल राहते ती निष्ठा जी कर्ममार्गी व्यक्तीला इंद्रियनिग्रह आणि ज्ञानी संन्यासाला नैष्कर्म्याप्रत नेते. ज्ञानकर्मसंन्यास, कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोग हे याच दृष्टीकोनाचे समर्थन करतात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ७ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

Copyright sheetaluwach.com 2021 ©

परामर्ष – Confab…

प्रश्न विचारा/Send Query or Feedback

परामर्ष Confab

नमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.
परामर्ष….
फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न  किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …

Hello Readers, Thanks a lot for the overwhelming response to the articles. I have received a lot of feedback including suggestions and queries. A bunch of them asked for more clarification regarding some terms, concepts or verses. This page is being prepared for resolving doubts from all these discussions.
Confab……
If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them through this link (Ask a Question). Click on the questions to read answers and discussions…

गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?
अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?
धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?
Does Lord Krishna in Bhagavad Gita ask us to stop enjoying worldly pleasures?
CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?
भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?
मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?
अध्यात्म म्हणजे काय?
‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?



गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?

मूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।१४।।
अन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व।
अर्थ – हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
तितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.
आदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.
सहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते।।२४।। विवेकचुडामणी
चिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा
विषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता।।७।। अपरोक्षानुभुति
विषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.
स्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.
ज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥
मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥

अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?

महाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.
अक्षौहिण्या: परीमाणं नराश्वरथदन्तिनाम्।यथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥
पायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे

  1. पत्ती    १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती
  2. सेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती
  3. गुल्म   (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती
  4. गण    (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती
  5. वाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती
  6. पृतना   (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती
  7. चमू    (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती
  8. अनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती
  9. अक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती
    साधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?

गीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.
उदाहरणादाखल काही श्लोक पाहू
१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।२-३८।।
३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८।।
४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

हे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात

५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२-२२।।
६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२ २३।।
७. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि।

हे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.

८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌। तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

हे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.

१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।    वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.

११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।

यासारखे गुढ श्लोक आहेत.

याव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
योगः कर्मसु कौशलम्।
योगक्षमेम् वहाम्यहम्।
नभः स्पृशं दीप्तम्।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही!

धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?

धर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.
शिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.
शेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.
परंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.
व्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.
भाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे

धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् । (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)
अहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः ।दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्। (याज्ञवल्क्यस्मृति १-१२२)

उत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.
त्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.
आश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.

DOES LORD KRISHNA IN BHAGAVAD GITA ASK US TO STOP ENJOYING WORLDLY PLEASURES?

Lord Krishna never asks you to stop enjoying worldly pleasures. He says we’ve to restrain the senses from temptations and expectations. It doesn’t mean not enjoying at all.

There is nothing wrong with enjoying material pleasures but it is inappropriate to fall prey to the senses for those pleasures. Senses are constantly pulling us towards pleasures, destabilizing strongest minds by creating expectations. Such Karma with an expectation towards its result, creates attachment and further drags us into joys or sorrows about the results.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

For example, Krishna would not say that one should not enjoy good food. He also approves working hard for earning that good food. But it is inappropriate to feel happy or disappointed if you succeed or fail within your efforts because that drags you to attachment, disturbs your mind. If the mind understands the inevitability of either success or failure, then the bond of Karma will not bind the soul. This is exactly what we forget while we strive to get what we like. If we don’t succeed, we get angry and then invite array of disorders from anger eventually losing our ultimate goal.

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

That is why Krishna says that it is not wrong to enjoy worldly pleasures, but it is wrong to be attached to them That attachment traps our soul in the bondage of bad Karma.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

But the self-controlled being, freed from attachment and aversion, who follows the conscious injunction despite being surrounded by the objects of the senses (material pleasure), with senses governed by the self; attains the precious union with the Ultimate Being.

So the gist is to enjoy the gifts of life without letting the gifts enjoy toying with your equanimity 🙂 Karma without expectations backed up by the intellect’ is what Chapter 2 and 3 explain.

CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?

Buddhism and Gita (Hinduism) share certain views and differ on certain. Both of them believe in the illusory state of existence i.e. the material world. To an extent both of them agree on sensory perceptions being the reason for suffering.

Buddhism believes in withdrawal from the material world and resorts to meditation leading to Nirvana. Which is kind of detachment from almost everything including self.

Gita, on the other hand promotes constant action (Karma) towards collective wellness backed up by the intellect (Sankhya). This is how a sole soul  self dissolves/unifies into the omnipresent. (Karma in Sankhya Yoga Chapter II)

Buddhism denounces everything as suffering while Gita upholds it as the beauty of the creator. Buddhism believes Salvation/Nirvana means Death since it frees one from suffering and pleasure. Wherein Gita makes Salvation achievable to a being by uniting Aatman (आत्मन् – Individual Self) with the Param Aatman (परम आत्मन् – The Ultimate) describing it as bliss which is eternal and above all material notions.

We have to understand why Buddhism tends to differ from the Gita. Buddhism emerged as a reaction to Hinduism (has its own reasons). Hence Buddha deliberately kept the theory of eternity away from his preaching while Gita preaches it.

Logically though, detachment from entire existence is not practical. Gita in the Chapter III describes it. Denouncing Karma isn’t possible since one at least has to pacify his bodily needs. He has to be a part of the material world to do that. Hence Gita’s view of appreciating the creation of the Ultimate and trying to be one with Him through Intellect (Sankhya) based Karma stands stronger.

I have already written about the greatness of Gita and why has it been relevant to generations after generations.

भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?

श्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। गीता २.४६।।
अन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)।

शब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥

हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.

सोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.

बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.

सलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति।। (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)

हे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)

अशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’। म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.

मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?

भारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.
प्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.
आता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू
१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.
वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥
मनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.
२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे.
अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् ।सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥
श्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥
असे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.
३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥
त्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.
हे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का? आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.
अशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.
प्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.

श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?

श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही शब्द कठोपनिषदाच्या प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतील दुसऱ्या श्लोकात येतात. या दोन्ही शब्दांचे व्यावहारीक आणि तात्विक असे दोन्ही अर्थ आपल्याला अनुभवास येतात. श्लोकाचा अन्वय, अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूयात
मूळ श्लोक

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते।।
अन्वयः – श्रेयः च प्रेयः च मनुष्यम् एतः । धीरः तौ सम्परीत्य विविनक्ति । प्रेयसः श्रेयः हि अभि वृणीते । मन्दः योगक्षेमात् प्रेयः वृणीते ।

श्रेयस आणि प्रेयस याचे येथे अभिप्रेत असणारे अर्थ हे कल्याणकारक आणि आनंददायक असे आहेत. माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते ज्यात काही सोपे आनंददायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडतो आणि सोपा व आनंददायक मार्ग डावलतो. असा साधारण अर्थ या श्लोकातून ध्वनीत होतो.
माणसाचे आयुष्य ही सुखदुःखांची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात ज्यात त्याला सोपा आणि अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गाप्रमाणेच त्यांचे फलित असते. वरकरणी सोप्या आणि कमी कष्टप्रद मार्गानी मिळणारे फलितही सीमीत असते तर अवघड आणि कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते.
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास विद्यार्थीदशेत किंवा उमेदवारीच्या काळात जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी व्यक्ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते आणि उर्वरीत काळ सुखाने घालवते. परंतु जी व्यक्ती हा काळ फार तोशीस न घेता माफक कष्टात घालवते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ घालवते आणि उर्वरीत आयुष्यही अधिक कष्टप्रद बनवते. कारण अर्थातच निवड…. योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. शिक्षण असो, गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती हेच तत्व सगळीकडे लागू पडते.
हे अर्थातच श्रेयस आणि प्रेयसाचे सर्वसामान्य अर्थविवेचन आहे. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा खुप गहन अर्थ अभिप्रेत आहे. प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सुख आहे.
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच सुखी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे?
प्रेयस हे ते क्षणिक सुख आहे जे भौतिक साधनांतून प्राप्त होते तर श्रेयस हे ते सुख आहे जे व्यक्ती समाधानातून आणि स्थितप्रज्ञ वृत्तीतून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे असे भारतीय तत्वज्ञान उपनिषदे आणि गीतेच्या माध्यमातून मांडते.

अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती समजून घेण्यात जितका स्पष्टीकरणाचा भाग आहे तितकाच अनुभूतीचाही आहे. कसे ते उत्तराच्या अंती स्पष्ट होईलच.

अध्यात्म शब्दाची साधारण फोड अधि + आत्म अशी होते. यात अधि हे अव्यय विशेषत्वाने किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने येते. आत्म याचा अर्थ आत्मन् म्हणजे आत्मा किंवा स्व.
त्यामुळे अध्यात्माचा शब्दशः अर्थ – प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने स्वतःला जाणणे. कसे जाणणे.
भगवद्गीतेच्या आठव्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अध्यात्म या संज्ञेचा अर्थ सांगतो. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुना प्र्श्न करतो की –

तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?

श्रीकृष्ण सांगतो –

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो

मग आता स्व-भाव म्हणजे काय हे नीट समजून घेऊ यात.
कारण आपल्या रोजच्या वापरातला शब्द असल्याने त्याच्या अर्थाकडे नीटसे लक्ष जात नाही. स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे.
वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो.
श्रीकृष्ण सांगतो.
अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रकर्षाने स्वतःला जाणायचे तर त्यासाठी स्वतःशिवाय इतर कोणतेही बाह्य साधन उपयुक्त ठरणार नाही. स्वतः प्रयत्न करून स्वतःला जाणणे भाग आहे. स्वतः च स्वतःवर प्रयोग करुन स्वतःच त्याचे निष्कर्ष तपासून पहायचे म्हणूनच अध्यात्मात अनुभूतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
अधिक वाचनासाठी –‘अंतरंग – भगवद्गीता’

‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?

उपनिषदे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत. परब्रह्म किंवा आत्मतत्त्वाचा अभ्यास हा उपनिषदांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. अहं ब्रह्मास्मि । हे बृहदारण्यक (१/२/४/१०) उपनिषदातील असून मूळ श्लोक असा आहे तद्धैतत्पश्यन्नृषिर्वामदेवः प्रतिपेदेऽहं मनुरभवं सूर्यश्चेति ।
तदिदमप्येतर्हि य एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इदं सर्वं भवति ।

उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक. अहम् म्हणजे मी आणि ब्रह्म अस्मि म्हणजे ब्रह्म आहे. अहम् ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा शब्दशः अर्थ होतो.
वास्तविक अर्थ काय –
आत्मज्ञान किंवा आत्मतत्त्व जाणणा-या व्यक्तीला झालेली ही उपरती आहे की सृष्टीचे कारक जे ब्रह्म तत्त्व, मी त्याचाच अंश किंवा आहे किंवा तत्त्वतः मी आणि तो कोणी निराळे नसून एकच आहोत. शारीर देह नश्वर तत्त्व असून आत्मा हे अविनाशी अविकारी आणि अनंत तत्त्व असून ते, मी, ब्रह्म आणि परब्रह्म हे एकस्वरूप आहेत. ज्याप्रकारे सर्व जलस्त्रोत जसे शेवटी समुद्रात एकरुप होतात तसेच हा अंश परमात्म्याशी तद्रुप होतो.
तत् त्वम् असि । (छान्दोग्य उपनिषद ६/८/१६) म्हणजेच ते (ब्रह्म) तू आहेस हे महावाक्यही याच अर्थाने येते.
जीवात्म्यात परमात्म्याचा अंश असतो या व्यापक अर्थाने ही महावाक्ये येतात.
वेदातही परब्रह्म हे एक तत्त्व असून त्याला ज्ञाते अनेक नावांनी ओळखतात असे म्हटले आहे एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:। – ऋग्वेद १/१६४/४६
गीतेतही भगवंत आपला अंश प्रत्येकात आहे हे सांगतो.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।१५.१५।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन (दोषनाश) ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे!) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***

सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….

या एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.
विहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.

ज्ञानकर्मसंन्यास……
‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.
१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे

पहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.

पहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.
अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो? तर –

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥
जेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.

भगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

म्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥

हे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.

मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.

अशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.
असे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.
मग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का? तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.

शरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.

जैसा जो जलापासिं उभा ठाके । तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे । तऱ्हीं निभ्रांत ओळखे । म्हणे मीं वेगळा आहें॥

जसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.
मग विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.

म्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥

असा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.

ज्ञानदेव म्हणतात

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें। जैसे न चलतां सूर्याचे चालणे। तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे। कर्मीचि असे ।
तो मनुष्यासारिखां त-हैं आवडे। परि मनुष्यत्व तेयांसि न घडें।।जैसे जली जलामाजिं न बुडे। भानुबिंब।।

सूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.

अशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.

निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.
श्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.

ज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥

या सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.
कर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
कारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.

उपसंहार
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
परित्राणाय साधूनां….।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
चौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते!

कर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो! विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –

एकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.

त्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.
कुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो ।

हिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरना।।तीजे बन पग नहीं धरना ||
तीजे बन में पंछ पारधी।।उन के नजर नहीं पड़ना ||
पांच हीरन पच्चीस हिरनी।।उन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे। खलका करेंगे बिछोना ||
कहे कबीर जो सुनो भाई साधो।।गुरु के चरन चित धरना||

पाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील!

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ६                                             पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय. इतकं पुरे होईल!!”

मागेल ते देण्याची तयारी दाखवणा-या जगजेत्त्या राजाला तो तत्त्वज्ञ नक्की काय सांगतोय….? तेच जे कृष्ण अर्जुनाला सांगतोय.

शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

कसे आहे आत्म्याचे स्वरूप..

सांख्ययोगाच्या १७ व्या श्लोकापासून पुढे आत्म्याच्या स्वरुपाचे वर्णन श्रीकृष्ण करतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२।।२०।।

हा (आत्मा) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन(अनादी) आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।२।।१७।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२।।२२।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२।।२३।।

आत्मा हा अविनाशी, शाश्वत, आणि सर्वव्यापी आहे. (श्लोक १७) तो ना जन्म घेतो ना नष्ट होतो. नष्ट होते ते शरीर. आत्मा नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शरीर नष्ट झाले की आत्मा दुस-या शरीरात प्रवेश करतो. जसे माणूस जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो.(श्लोक २२, २३)

तात्पर्य काय तर अज, नित्य, शाश्वत, पुराण अशा विशेषणांनी युक्त आत्मा देहामध्ये वास करून राहतो. देह, मग तो कोणताही असो जन्म, वाढ, वृद्ध्त्व आणि मृत्यु अशा अवस्थातून जातो. परंतु आत्म्याच्या स्वरूपात असे बदल घडत नाहीत. तुटणे, झिजणे, जळणे, बुडणे अशा अनेक अवस्थातून शरीर जाते याला विकार म्हणतात आत्म्याला विकार नसतात. शरीर एक दिवस नष्टही होते, आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ दुसरे शरीर धारण करतो.

अशा प्रकारे मायावी सृष्टी आणि अविकारी आत्मा यांचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो.

पण मग शोक करायचा नाही हे जरी पटले तरी संहार करण्याच्या पापाचे काय? भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का? असा प्रश्न उरतोच.

श्लोक ३१ ते ३९ पर्यंत श्रीकृष्ण स्वधर्म पालनाचे महत्व सांगतो. धर्माची आणि सत्याची बाजू राखण्यासाठी युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे. त्यासाठी करायला लागणा-या हानीत पाप नसते कारण ते धर्मपालनासाठीच असते. साधे उदाहरण घेउ यात. देशाच्या रक्षणासाठी शत्रुसैन्याशी सीमेवर लढणा-या जवानाला आपण पापी मानत नाही कारण देशाच्या, पर्यायाने समाजाच्या भल्यासाठी केलेले ते कर्तव्यपालन आहे, हत्याकांड नव्हे!

राज्याच्या हव्यासापोटी द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत अधःपतन झालेल्या राजकुळाला आणि हे घडू देणा-या समाजाला पुन्हा योग्य राज्यसंस्था देणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यासाठी युद्ध करणे हे पाप नाही. याउलट सर्व मार्ग संपल्यावरच जे युद्ध उभे राहीले आहे त्यापासून दुर जाणे हे पाप ठरेल. युद्धापासून पळ काढल्याने समाजात अवहेलना होईल आणि समाजामध्ये चुकीचे आदर्श उभे राहतील. समाजाला योग्य दिशा देणारे वर्तन करणे भावी शासकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी जर युदध करावे लागले तर ते कठोरपणे करणेच योग्य आहे. त्यावेळी क्षत्रियाने सामुहिक हिताऐवजी वैयक्तीक नातीगोती पाहून कमकुवत होणे हे पाप आहे. हे झाले अर्जुनाच्या दुस-या शंकेचे उत्तर.

सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचे स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म याच्या चर्चेतून श्रीकृष्ण अर्जुनाला हे पटवून देतो की – दुर्योधन, दुःशासन किंवा तो स्वतः या केवळ योग्य किंवा अयोग्य मनोवृत्ती आहेत. समाज कधी योग्य तर कधी अयोग्य मनोवृत्तींकडे झुकत असतो. कधीतरी अयोग्य बलवान असते आणि समाज त्यामागे धावतो. जसे आजही दुर्योधनाच्या मागे ११ अक्षैहीणी सैन्य आहे पुढे जेव्हा अर्जुन, पर्यायाने पांडव विजयी होतील तेव्हा ते योग्य मानून समाज त्याच्या मागे धावेल. जसे सृष्टीतील सुख, दुःख,स्पर्श, रस, गंध आणि शरीरही नाशवंत आहेत तसेच योग्य आणि अयोग्य वृत्तीही नाशवंत आहे. कारण त्या वृत्ती जपणारे माणसाचे मन चंचल असते. आज जे योग्य आणि हवेसे वाटते ते त्याला उद्या अयोग्य आणि नकोसे वाटू शकते. या मनाच्या चंचलतेवर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकदा मन स्थिर झाले की मग ते योग्य तेच पाहते आणि योग्य तेच करते. हे मनाचे स्थैर्य म्हणजे अर्जुनाच्या शंकेचा तिसरा भाग. कारण अर्जुनाचे मन स्थिर झाले की त्याला युद्ध योग्य की अयोग्य तेही कळेल आणि योग्य ते तो ठामपणे करूही शकेल. किंबहुना मन स्थिर झाले की सर्व प्रश्नच सुटतील आणि आत्मसुखही साध्य होईल हेच कृष्णाला पटवून द्यायचे आहे. तुकोबा म्हणतात तसे –

मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धिचे कारण।।

गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संदर्भात एक कथा सांगतात. जंगलातून प्रवास करत असताना ते एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील…”

संन्यस्त आणि गृह्स्थ हे मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन स्थिर असते तो गृहस्थ असूनही संन्यस्त असू शकतो आणि ज्याचे मन स्थिर नाही तो संन्यस्त गृहस्थच राहतो.

स्थितप्रज्ञ……… प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर/ठाम. ज्याची बुद्धी स्थिर असते तो स्थितप्रज्ञ. ज्याच्या विचार आणि कृतीमध्ये द्वैत नसते तो स्थितप्रज्ञ.

दुस-या अध्यायाच्या ५४ व्या श्लोकापासून स्थितप्रज्ञाचे वर्णन येते. मनाची स्थिरता प्राप्त असणारा आणि बुद्धीयोगाने कर्म करणारा स्थितप्रज्ञ असतो कसा? याचे कुतुहल अर्जुनाला असते. तो कृष्णाला विचारतो आणि कृष्ण त्याचे वर्णन करतो

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २।। ५६ ॥

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.

हे वाचायला जितके सोपे तितकेच आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२।। ६० ॥

दुःखाच्या प्रसंगी खेद न वाटता राहणे एकवेळ शक्य आहे परंतु सुखाची इच्छा न करणे अवघड नाही का? माणसला दुःख टोचते म्हणून नको असते पण दुःखाबरोबर सुखही क्षणिक आहे म्हणून ते ही टोचावे आणि नको वाटावे अशा मनस्थिती प्राप्त करणे सोपे नाही. कारण अर्थातच बलवान अशी इंद्रिये माणसाच्या मनाला निरनिराळ्या मोहाच्या मार्गाने खेचत असतात.

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥२।। ५८ ॥

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो.

म्हणूनच सर्वसामन्य माणसाला भूरळ पाडणारे मोह त्याला बाधत नाहीत. त्याचे मन आणि शरीर केवळ एकाच विचारात मग्न होते, ते म्हणजे शाश्वत आनंद जो क्षणिक सुख आणि दुःख यांच्याही पुढील पातळीवर असणारा मोक्ष आहे.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥२।।६४ ॥

परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.

अशा स्थितीला श्रीकृष्ण ब्राह्मी स्थिती म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची स्थिती म्हणतो.

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥२।।७२ ॥

उपसंहार

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा अद्धितीय ठेवा आहे कारण गीतेशिवाय इतर कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही.

गीतेच्या अंतरंगात डोकावल्यास असं लक्षात येतं की दुसरा अध्याय हा गीतेचा तत्त्वज्ञानातील पहीला अध्याय आहे आणि गीतेचे संपुर्ण सार सांगणारा अध्याय सुद्धा आहे. अर्जुनापुढे उभ्या असणा-या प्रश्नांचा रोख हा केवळ युदधाकडे नसतो तर अर्थातच शाश्वत आनंदाकडे असतो. या एका अध्यायातून श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे समाधान उभे करतो.

शाश्वत सुख हवे तर, या सृष्टीत शाश्वत आणि क्षणिक काय आहे ते जाणले पाहीजे. सांख्य मतानुसार दृष्य सृष्टी ही क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे.

क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत त्या क्षणिकातून बाहेर येत नाही तो पर्यंत शाश्वत सुख मिळणार नाही. क्षणिकातून बाहेर येणे म्हणजेच क्षणिकात गुंतवणारे सुख आणि दुःख यातून बाहेर येणे.

सुख आणि दुःखातून बाहेर येणे म्हणजेच हर्ष आणि शोक दोन्हीकडे समभावाने पहाणे आणि त्याचा त्याग करणे. समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा.

इंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.

ही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.

ज्याची बुद्धी स्थिर असते तो सुखी होतो कारण ते सुख आपल्यात असते, बाह्य पदार्थात नसते हे त्याला उमगलेले असते. मग त्याच्या कर्माची फळे त्याला बाधत नाहीत. सुख आणि दुःख दोन्ही त्याला उपभोगता येतात आणि त्यांच्या पलिकडेही जाता येते.
जसा भक्त आणि भगवंत एक होतो तसा ब्राह्मी स्थितीत गेलेला व्यक्ती परमानंदी लीन होतो.

असा मनोविजय मिळविणा-याचा आनंद पाडगांवकरांच्या एका कवितेतून तंतोतंत व्यक्त होतो.

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी ।अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो।।
फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग ।आज अवघे अंतरंग ओसंडले हो।।
मिटूनही डोळे दिसू लागले आकाश ।आज सारा अवकाश देऊळ झाला हो।।
काही न बोलता आता सांगता ये सारे । आतली प्रकाशाची दारे उघडली हो ।।

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ४ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ४

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥

नासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण? थोडं खोलात गेलं तर दोघांतली साम्यस्थळं दिसायला लागतात. दोघेही बुद्धीजीवी. दोघेही जण एकाच ध्येयाच्या वाटेवर असतात. शास्त्रज्ञ भौतिक प्रगतीच्या माध्यमातून शाश्वत सुखाचा शोध घेतो तर तत्त्वज्ञ अध्यात्मिक किंवा तात्त्विक प्रगतीच्या माध्यमातून…

वर्षानुवर्षे होणारी शास्त्रीय प्रगती माणसाला अधिकाधीक सुखी बनवते पण शास्त्रज्ञाला अधिकच कोड्यात टाकते. इतकी भौतिक सुखाची साधने निर्माण करूनही मानव खरोखर सुखी होतोय का? याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते? खरोखर सुख साधनातच असते की त्याचा शोध दुसरीकडे कुठे घ्यावा?

अर्जुनही याच द्विधा मनस्थितीत पडतो. युद्ध जिंकल्यावर राज्य मिळणार, सुखाची सर्व साधने मिळणार पण स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचे दुःख भोगावे लागणार. बरं युद्ध न करावे तर संहाराचे दुःख जाणार पण पळपुटेपणाची अवहेलना वाट्याला येणार. म्हणजे कोणतेच सुख पूर्णत्वाने वाट्याला येणार नाही त्याला दुःखाची किनार असणारच. त्यालाही असंच सुख हवंय जे कायम टिकेल आणि दुःखरहीत असेल. अर्जुन अतिशय गोंधळून जातो. त्याची विचारशक्ती कुंठीत होते आणि युद्ध करायलाच नको असा काहीसा अनिश्चित निर्णय घेऊन तो कृष्णाकडे वळतो.

आता कृष्णापुढे काम आलं एका गोंधळलेल्या परंतु अभ्यासु विद्वानाला समजावण्याचं. हे काम निश्चित सोपं नाही. कारण जो विचार कृष्ण मांडणार आहे तो अर्जुनाला पटवून द्यायचा आहे. त्यासंदर्भात त्याला ज्या शंका असतील त्यांचं निरसन करायचं आहे. उगीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायला तो बाबांना खाऊ मागणारा लहान मुलगा नाहीये!!

मोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.

नासदीयसूक्त … सांख्ययोग….

असं मानतात की नासदीयसुक्तातच सांख्य तत्त्वाची बीजेही आढळतात. सांख्य….. तत्त्वज्ञानातील एक सिद्धांत… ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा. बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वप्रणालीत स्थान मिळविणारा विचार.

सांख्य तत्त्वाचा संदर्भ किंवा विवेचन ऋग्वेदासह श्वेताश्वतर, तैत्तिरीय, ऐतरेय, बृहदारण्यक अशी उपनिषदे, बौधायनाचे गृह्यसुत्र, पतंजलीचे योगसुत्र आणि चरकसंहीता इतकेच काय पण परमार्थाच्या चिनी भाषांतरातही आढळतात. एक वेगळा ग्रंथ लिहीता येईल इतकी सामग्री सांख्य या एका शब्दात आहे. पण तूर्तास आपण केवळ भगवद्गीतेच्या दुस-या अध्यायाच्या संदर्भात आलेला सांख्य विषयच पाहू यात.

जसं संगणकाचं संपूर्ण विश्व हे बायनरी म्हणजे ० आणि १ एक या दोन तत्त्वांनी बनलंय तसंच सांख्य तत्त्वाच्या मते विश्व हे दोन तत्त्वांनी बनलंय. एक अविनाशी तत्व ‘पुरुष’आणि दुसरं विनाशी/विकारी तत्त्व ‘प्रकृती’. प्रकृती या तत्त्वात नश्वर अशा सर्व गोष्टी येतात तर पुरुष म्हणजे अविनाशी चैतन्य/आत्मा. या दोनहीच्या संयोगाने सृष्टीचे सर्जन होते. जेव्हा नश्वर शरीर विकाराच्या माध्यमातून नष्ट पावते तेव्हा आत्मा मुक्त होऊन प्रकृतीच्या दुस-या तत्त्वात सामावतो. असा सर्वसाधारण विचार सांख्य मांडतो.

आता गीतेकडे पाहू.. अर्जुनाच्या प्रश्नांचे तीन भाग पाडून प्रत्येक भागाला सांख्य सिद्धांताच्या आधारे कृष्ण उत्तर देतो.

पहीला भाग अर्थातच ‘नातेवाईकांच्या संहाराचा’. दुसरा भाग या कृतीतील ‘धर्म अधर्माचा’ आणि तिसरा भाग ‘मानसिक स्थैर्याचा’ कारण तेच ढळल्याने अर्जुन शस्त्र उचलणार नाहीये.

एका कुशल समुपदेशकाप्रमाणे कृष्ण अर्जुनाला समजावतो. प्रथम गोंधळलेल्या अर्जुनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कृष्ण त्याला रागावतो. ऐन युद्धाच्या वेळी हे असले नपुंसकासारखे, पुरुषार्थाला बाधा आणणारे वर्तन करणे वीर अर्जुनाला अशोभनीय आहे हे तो परखडपणे सांगतो. सैरभैर झालेल्या अर्जुनाच्या बोलण्यातील विसंगतीवर तो बोट ठेवतो. परखड टीका झाल्याने सहाजिकच आता अर्जुनाचे लक्ष कृष्णाच्या विवेचनाकडे केंद्रित झाले आहे.

शरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून जीवाचे अस्तीत्त्व बनते. यातील शरीर हे विकारी म्हणजेच नाश पावणारे आहे तर आत्मा हा अविकारी म्हणजे चिरंतन आहे. ज्या नातेवाईकांचे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारच आहे. तू नष्ट केलेस तरी आणि नाही केलेस तरी. याचा अर्थ काय? तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा? बरं, शोक करून ते टिकणार थोडेच आहेत. उद्या तेही जाणारच आहेत.जे जे जन्म घेते त्याचा मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे.

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः।।२।।११।।
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ।।२।।।।१२।।

सर्व विनाशी तत्त्वांची उदाहरणे देऊन कृष्ण अर्जुनला समजावतो की गेलेल्याचे किंवा जाणा-याचे दुःख करणे अयोग्य आहेच वर ते जाणे आपल्या हातून घडतेय याचे वैषम्य वाटणेही गैर आहे.

ज्ञानेश्वर महाराजही दोनच ओव्यात अर्जुनाची अवस्थेचे मार्मिक वर्णन करतात. त्यांच्या मते अर्जुनाची अवस्था ही जन्माने अंध असाण-या व्यक्ती सारखी आहे. नकळत दरवाजा समजून भिंतीवर डोके आपटावे तसे अर्जुनही नकळत चुकीच्या तत्त्वावर युक्तीवादाचे डोके आपटत आहे. त्याला स्वतःचे शरीर आणि आत्मा यांचे पुरेसे ज्ञान नाही आणि तो कौरवांचे शरीर नष्ट करण्याचा शोक करतोय.

जात्यंधा लागले पिसें। मग तैं सैरा धांवे जैसे।।
तुझे सिहाणेपण तैसे। दिसतसे ।।२।।९३।।

प्रकृतीचे नश्वरत्वही ज्ञानदेव एका ओवीत सांगतात. जे जे जन्म घेते ते ते नाश पावते. ते ते काय तर अर्थातच बाह्य इंद्रियांचे विषय….

हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे ।।

हा झाला सांख्ययोगाचा अर्धा भाग ज्यात प्रकृती तत्त्वाचे विनाशीत्व प्रकट होते. हे केवळ शरीराच्या बाबतच खरे नसून सृष्टीतील प्रत्येक तत्त्व जे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून जाणवते ते सर्वच नश्वर असते असेही कृष्ण सांगतो. बाह्य इंद्रिये कोणती? तर डोळे, कान, नाक, त्वचा. म्हणजेच काय तर जे डोळ्यांना दिसते ते चांगले/वाईट दृष्य, कानाला ऐकू येणारे बरेवाईट आवाज/बोलणे, नाकाला येणारे विविध वास आणि शीतोष्ण स्पर्श सगळे काही नश्वर म्हणजे अल्पजीवी आहे. आत्ता असेल नंतर नसेल, उद्या असेल परवा नष्ट होईल. भाडेकरूला जसे घर बदलण्याचे दुःख करून चालत नाही तसेच प्रकृतीतील नश्वर तत्त्वांच्या गमावण्याचे दुःखही निरर्थकच आहे.

एकुण काय तर नातेवाईकांचे किंवा कोणाचेही शरीर हे नश्वर आहे. आज ना उद्या ते नष्ट होणारच आहे. त्यामुळे युद्धप्रसंग उभा असताना अर्जुनाने ते नष्ट करण्यात अयोग्य असे काहीच नाही. हे झाले अर्जुनाच्या पहील्या शंकेचे उत्तर.

पण मग जर प्रकृती नश्वर तत्त्व आहे आणि त्याचा ध्यास अयोग्य आहे तर शाश्वत काय आहे? ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा?…. आत्मतत्त्व…..

शाश्वत सुख हवे तर शाश्वत तत्त्व काय हे जाणले पाहीजे आणि ते जाणायचे तर तशी मानसिकता हवी म्हणजेच काय तर प्रथम आत्मतत्त्वाची ओळख मग त्याचे स्वरूप जाणणा-या मानसिकतेची ओळख आणि मग ती जाणणा-या स्थितप्रज्ञाची ओळख…..

ही ओळखपरेड करुयात पुढच्या भागात……..

तळटीपा

१) परमार्थ – इ.स. ५ व्या शतकातील एक बौद्ध भिक्षु. इ.स. ४९९ मध्ये उज्जैनला जन्मलेल्या परमार्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर कंबोडीयासह दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक बौद्ध ग्रंथाच्या चीनी भाषांतराबद्दल त्याला ओळखण्यात येते. उदा. अभिधर्मकोष, सुवर्णप्रभाससुत्र. पंचशिखा आणि ईश्वरकृष्णाच्या सांख्य सिद्धांताचेही भाषांतर परमार्थाने केले. चीनमध्येच इ.स. ५६९ मध्ये त्याचा मृत्यु झाला.

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ३ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 3

Perspective …. Arjuna Vishada Yoga!

Perspective ……….. Perspective of an individual exercises profound effect on his expression. This is evident in the case of artists. The foundation of a creation rests on how an artist looks at the subject. If an artist’s approach to a subject, thought or an event is different, then the artistic expression that emerges from it can also be dramatically different.

Christopher Marlow generates a horrific picture of man’s lust of power and fame in ‘Doctor Faustus’, a tragic play based on a concept of a mortal possessing heavenly powers. The same concept is depicted in a hilarious comedy ‘Bruce Almighty’…  what differs is approach… Perspective of the artist towards a concept.

Arjuna Vishada… The same is true about the first chapter in Gita. Since this chapter has been consistently presented in the form of Arjuna’s lament, most of the readers find it melodramatic and Arjuna, an emotional fool! The solicitous side of Arjuna doesn’t surface unless we change our perspective… Conscience.

Conscience … the intellect to know the difference between right and wrong.

Conscience …. the patience that makes you think about the consequences before taking any step.

Conscience …. the difference between Arjuna and other warriors who had inhuman and destructive powers and were eager for war…

Numerous great warriors during the Mahabharata war were equipped with infinite power and divine weapons. Majority of them were eager to practice those weapons. But how many of them were mindful of the immeasurable damage these divine weapons could bring? Most of them were marching impatiently burning with selfishness or vengeance.

Perspective…….. ‘Eye for an eye makes the whole world blind’. Sheer Aggression or Vengeance as an approach to victory causes extermination!!

How much more should the conscience of a hero who has the power to destroy millions of families be awakened? Arjuna manifests this conscience. The restraint appears through Arjuna Vishada.

He does not dare take up arms unless he’s convinced of the inevitability of war and destruction. Not because he is weak or faint-hearted, but because he is confident of his destructive power. He is aware of the all-encompassing effects of genocide…

Arjuna stands out in this chapter not only as a mighty warrior but also as a mature, prolific and prudent leader. He is sure that if he has to be the future ruler, he has to take every step thoughtfully. Since the society will set him as a role-model and will follow his footsteps. That is why he inspects the horrible consequences of war from different perspectives and roles. Effects on all factors such as an individual, family, society, religion, economics, politics, values…

Knowing all this, he wants a satisfactory answer as to why is he waging war? Because as a prudent person and a future ruler, he has to take the moral responsibility of this war and justify it to the next generations. That is why he is anxious to take up arms without getting fully convinced.

Attitude … Inquisitiveness ….

Apart from presenting the ferocity of war and Arjuna’s maturity, there can still be a feature in Chapter 1. Which appears in the subsequent chapters as well. Curiosity …. desire for knowledge ….

There is a story in the Mahabharata. It is said that Drona used to play a trick while teaching archery to the Kauravs and Pandavas. In the morning, he would send each student with a container to fetch water. Since the vessel given to Ashwatthama had wider mouth, he used to come back earlier than others. Then Dronacharya used to teach him some distinct tricks till other disciples arrived. Only Arjuna comprehends this clue and manages to reach with Ashvatthama to become the beneficiary of this special class. Later he was also chosen to perform penance and travel to obtain divine weapons. Moreover, the fact that Arjuna was closest to Lord Krishna amongst the Pandava siblings clearly indicates that Arjuna was not only a mighty warrior but also a curious scholar.

That’s why mere Yudhisthira’s word or Krishna’s order isn’t enough for him. He knowingly turns down such appeals. His conscience keeps alarming that an annihilation demands much more substantial and comprehensive purpose than just vengeance.

Hence before taking any step he seeks multifarious enlightenment from Krishna. He wants to understand inevitability of war from different perspectives.

Arjuna, a curious seeker and a true worshiper of knowledge was the reason why a divine being like Krishna detailed the knowledge in 17 Chapters. Greater the seeker’s curiosity, greater the scope of knowledge! Therefore, attainment like Gita resulted out of the curiosity of a seeker like Arjuna.

And of course, if it was not for Arjuna Vishada, would Krishna have recited Gita? And would we have received it so easily?!

Therefore, the knowledge in the 17 chapters of Gita is a gift of Arjuna Vishada.

What is this gift … Sankhya Yoga …. in the next part …

Previous – Quest-Bhagavad Gita – Part 2 Next – Quest – Bhagavad Gita – Part 4

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!

दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.

अर्जुनविषाद. गीतेतील पहिल्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.

विवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.

विवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..

महाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती? प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..

सुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती? जास्तीत जास्त संहार…!

एक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना? या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.

युद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.

केवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….

हे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पिढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.

दृष्टीकोन.. जिज्ञासा….

युद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहिल्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.

जिज्ञासा…. ज्ञानलालसा….

महाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता!!!

उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.

आणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का? आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का?!!!!

त्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.

काय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग २ पुढील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ४

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 2

Questions … Arjuna .. then .. even today!

I am sure most of us have seen a movie called ‘Kung Fu Panda’ (All parts of course!) Master Shifu, the Kung Fu tutor, takes us through wonderful insights into human behaviour. After blaming almost everyone for his failure to build an unbeatable Supreme Warrior, he finally realizes that the biggest fault rested within him and not amongst any external factor. With painstaking efforts he wins over self-doubt and creates a Dragon Warrior out of a novice! The recognition of actual problem dawns upon him at the end – lack of Inner Peace!

From the Stone Age to the present day, man has made great progress with the strength of his unwavering intelligence. Created a number of tools of material convenience. Overcame many difficulties. But some questions still remain unanswered, even today.

Are humans really satisfied with so much material progress? If so, why is it that there is a constant search for new comforts? Each individual is struggling to be happy and satisfied. But to our surprise each one’s happiness, each one’s satisfaction lies in different things. So what exactly is happiness? Just getting what you demand is not happiness, because the list of demand never ends. We are constantly sourcing/demanding something or the other. We are sad if we don’t get it, we are sad if we get it later than expected. If we get it on time we are happy…. momentarily…..….. we want something else the next moment!! The list just never ends.

The question haunting human mind for ages is.. What exactly is happiness and sorrow? How do we find the key to unending happiness? A way to satisfied mind without any regrets…….. Inner Peace!!

Majority of readers study Gita in anticipation of an instant remedy. They don’t make a conscious effort to assimilate the knowledge in it. Cracking code of mankind’s oldest puzzle can’t be as easy as a Sudoku riddle in a newspaper where the solution is published the next day!! Just as everyone’s happiness and sorrows are different, their queries are different too and so is the key to fathom remedies.

Here surfaces the real greatness of Gita. It is a book that brings together solutions to the problems of human beings with different temperaments, intellects and situations. For ages Gita provides solutions to mankind, based on each one’s intellect, passion and efforts. With a thoughtfully bound, step by step series of 18 chapters Gita opens the door to a meaningful life.

The first chapter of the Gita ……….‘Arjuna Vishada Yoga’. The subject of each chapter is evident from its name. Vishada literally means lamenting, here it denotes reflection of self and surrounding. We’ll call it Predicament of Arjuna.

The total number of verses (shloka) is 47. This chapter falls into two parts. First part describes the as is situation on the battlefield. It begins with a rollcall. Taking names of the top Generals1 in the Kaurava and the Pandava troops, the descriptions of their conch shells, and Arjuna’s observation of the army. Arjuna’s melancholy begins from verse (shloka) 28 onward ….

Arjuna asks Lord Krishna to position his chariot between the two armies. He wants to observe the armies on both sides. He scans the Kaurava troops carefully. To his horror Arjuna sees thousands of elephants, horses, chariots and soldiers. Against him are standing his beloved elders like Bhishma & Shalya, sagacious teachers like Drona & Kripa, cousins like Duryodhana & Vikarna and a whole lot of the extended family. All primed to kill each other….

Seeing his own people in the army on both sides, Arjuna’s mind is ravished with thoughts.

Is this genocide really inevitable? Does winning kingdom justify slaying our own brothers? Is this going to bring satisfaction/happiness for us Pandavas?

If this is following my designated Self, occupational and religious duties then what does denouncing them mean? Is avoiding violence here unrighteous? What is the meaning of happiness if it comes through extermination of our own clan? If there is a sin in killing, then how can this crusade lead to satisfaction?

From 28 onwards for 20 verses, Arjuna describes the terrible consequences of war. The gist comes in below 3 verses (shloka):-

निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव ।न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।१-३१।।

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ।।१-३६।।

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।१-४४।।

Slaying one’s kinsmen will only lead to evil. The value system will be degraded, the clan will disappear and we will get hell.

One after the other, Arjuna presents Krishna with the disastrous aftereffects of this war. Eighteen Akshauhini2 army used to destroy their own clan. Would such a massacre really bring happiness? Isn’t it better to not fight at all? He believes he’s committing an awful sin. He feels that happiness even momentary, if achieved after the war is not worth.

Arjuna, caught in the chaotic battle of many such questions, puts down the bow. He tells Krishna, “I am so confused that it is impossible for me to wield a weapon….” The first chapter ends.

Arjuna Vishada … This first chapter of the Bhagavad Gita is of vital importance. One would naturally think that there is nothing special about this chapter when viewed from a philosophical point of view. This chapter deals with military census and Arjuna’s grief or fear. So does its greatness only rest on it being the first chapter of the Gita? Of course not.

What is the significance of Arjuna Vishada Yoga ………. in the next part

Footnotes: –

  1. The names of the following Knights appear in the first chapter …
  • Yuyudhana: – Brother of Satyaki. Present on all the 18 days of the war.
  • Dhrishtaketu: – King of Chedi kingdom
  • Chekitan: – Warrior king from the clan of Vrushni Yadava. Killed by Duryodhana in the war
  • Yudhamanyu and Uttamauja: – Warrior brothers from
  • Draupadeya (Sons of Draupadi) :- Shrutasoma, Shrutakarma, Shatanika and Shrutasena
  • Vikarna: – Good natured brother from 100 Kaurava siblings
  • Soumadatti: – Son of SomadattaBhurishrava

Apart from this, of course, famous Generals like Dronacharya, Bhishma, Virata, Drupada, Bhima, Arjuna, King of Kashi, Purujit, Kuntibhoja, Shaibya, Abhimanyu, Karna, Ashwatthama, are also mentioned.

  1. Akshauhini:– The total number of troops in the Mahabharata war was 18 Akshauhini. The Kauravas had 11 and the Pandavas had 7 Akshauhini. There were multiple ascending dimensions for counting troops – Patti, Senamukha, Gulma, Gana, Vahini, Prutana, Chamu, Anikini and Akshauhini. One Akshauhini is about 218,700 troops and the 18 Akshauhini totals to approximately 3,936,600. (See – Akshauhini)

Previous – Quest – Bhagavad Gita – Part 1 Next – Quest – Bhagavad Gita – Part 3

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग २

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही!

अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.

इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच. हवं ते नाही मिळालं की दुःख होतं, हवं ते संपलं की दुःख होतं, आज हवं असलेलं उद्या मिळालं तरी दुःख होतंच की!

वरवर पाहता प्रश्न सोपा आहे, परंतु वर्षानुवर्ष हा प्रश्न माणसापुढे उभाच आहे. सुख, दुःख म्हणजे नक्की काय? कायम सुखी आणि समाधानी केव्हा आणि कसं वाटेल?

बहुसंख्य वाचक गीतेचा (Instant Remedy) तयार उत्तराच्या अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. मानवजातीला पडलेले सर्वात प्राचीन कोडं म्हणजे वर्तमानपत्रातलं शब्दकोडं नव्हे, ज्याचं उत्तर दुस-या दिवशी छापून येईल! जसं प्रत्येकाचं सुख, दुःख वेगळं तसेच त्याचे प्रश्नही वेगळे आणि प्रश्न वेगळे म्हणून उत्तराचा मार्गही निराळा.

गीतेचे मोठेपण यातच दडलेले आहे. भिन्न स्वभाव, बुद्धी आणि परिस्थिती असणा-या मानवांच्या समस्येवर एकत्र उपाय देणारे ते पुस्तक आहे. ज्याची जशी कुवत आणि साधना त्याला तसे उत्तर गीतेत सापडत जाते, म्हणूनच पुरातन कालापासून ते आजपर्यंतच्या मानवाला गीता मार्गदर्शक ठरते. एक एक अध्यायाची पायरी रचत गीता अठरा अध्यायातून आपल्याला सार्थ जीवन जगण्याचे द्वारच उघडून देते.

प्रत्येक अध्यायाचा विषय हा त्याच्या नावावरून स्पष्ट होतो. ‘अर्जुनविषादयोग’ हा गीतेतील पहीला अध्याय आहे. एकूण श्लोकसंख्या ४७ आहे. या अध्यायाचे दोन भाग पडतात. पहिल्या भागात युद्धभूमीवरील स्थितीचे वर्णन आहे. यात सुरुवातीला कौरव आणि पांडव पक्षातील शूरवीरांची नावे, त्यांच्या शंखध्वनींचे वर्णन आणि अर्जुनाने केलेले सैन्याचे निरीक्षण आहे. २८ व्या श्लोकापासून पुढे अर्जुनाचा विषाद….

दोनहीकडचे अफाट सैन्य पाहून युद्धामुळे होणा-या भयानक संहाराची कल्पना अर्जुनाला येते. तेव्हा त्याला जे वाटते ते तो श्रीकृष्णाला सांगतो. तो सर्व अर्जुनविषाद आहे.

अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मधोमध आपला रथ उभा करावयास श्रीकृष्णाला सांगतो.दोनही बाजूच्या सैन्याचे निरीक्षण करण्याची त्याची इच्छा असते. कौरवांच्या बाजूचे सैन्य पाहील्यावर भीष्म, शल्य यांसारखे ज्येष्ठ नातेवाईक, द्रोणचार्य, कृपाचार्यांसारखे गुरु, दुर्योधन विकर्णासारखी भावंडं आणि त्यांची मुले यांच्यासह लक्षावधी हत्ती, घोडे, रथ आणि सैनिक अर्जुनाला युद्धासाठी उभे असलेले दिसतात. दोन्ही बाजूच्या सैन्यात आपलेच लोक पाहून अर्जुनाच्या मनात विचारांचे काहूर माजते.

इतका संहार खरोखर अपरीहार्य आहे का? हे युद्ध खरोखर कशासाठी लढलं जातंय? राज्य मिळविण्यासाठी आपल्याच बांधवांना मारणे हा धर्म आहे का? जर असेल तर मग अधर्म म्हणजे काय? येथे हिंसा टाळणे हा धर्म की अधर्म? मी कोणता धर्म पाळायचा? हिंसा केल्याने राज्याचे सुखही मिळणार आणि बांधवांच्या संहाराचे दुःखही तर मग सुख आणि दुःखाची व्याख्या काय? संहार करण्यात पाप असेल तर हे धर्मयुद्ध कसे?

२८ पासून सुमारे २० श्लोकातून युद्धाच्या भयानक परीणामांचे वर्णन अर्जुन करतो.

निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव ।न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।१-३१।।

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ।।१-३६।।

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।१-४४।।

स्वजनांची हिंसा करण्याने केवळ अमंगल असे पाप वाट्याला येईल. कुळ नष्ट होईल, कुलधर्म लोप पावेलआणि आम्हाला नरक प्राप्त होईल.

एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून आपल्याच कुळाचा नाश करायचा. अशा महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?

अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेला अर्जुन धनुष्य खाली ठेवतो. आपण इतके गोंधळून गेलो आहोत की शस्त्र चालवणे आपल्याला अशक्य झालं आहे असं तो कृष्णाला सांगतो आणि पहिला अध्याय संपतो.

अर्जुनविषाद… भगवद्गीतेचा हा प्रथम अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. कोणालाही सहाजिकच असे वाटेल की तत्त्वज्ञानाच्या संदर्भातून पाहील्यास या अध्यायात काहीच विशेष दिसत नाही. सैन्यगणना आणि शोक किंवा भयाने ग्रासलेले अर्जुनाचे प्रश्न इतकंच काय ते या अध्यायात पहायला मिळतं. मग केवळ गीतेतला पहिला अध्याय म्हणून महत्त्वाचा समजायचा का? तर तसं नक्कीच नाही.

काय आहे अर्जुनविषादयोगाचे महत्त्व………. पुढील भागात……..

तळटिपः-

१) पहील्या अध्यायात खालील शुरवीरांची नावे येतात…

  • युयुधानः– हा सात्यकीचा भाउ, युद्धाचे सर्व १८ दिवस हा उपस्थित असतो.
  • धृष्टकेतूः– चेदीनरेश
  • चेकीतानः– वृष्णिवंशीय क्षत्रिय राजा, भारतीययुद्धात दुर्योधन कडून मारला जातो
  • युधामन्यु आणि उत्तमौजाः- पांचालातील वीर बंधु
  • द्रौपदेयः– यात द्रौपदीचे सर्व पुत्र प्रतिविंध्य. श्रुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक, श्रुतसेन
  • विकर्णः– १०० कौरव भावंडातील
  • सौमदत्तिः– सोमदत्ताचा पूत्र – भूरिश्रवा

याशिवाय अर्थातच द्रोणाचार्य, भीष्म, विराट, द्रुपद, भीम, अर्जुन, काशीनरेश, पुरुजित, कुन्तिभोज, शिबी राजाचा पुत्र शैब्य, अभिमन्यु, कर्ण, अश्वत्थामा या प्रसिद्ध योद्ध्यांचाही उल्लेख होतो.

२) महाभारतीय युद्धातील एकुण सैन्यसंख्या १८ अक्षौहीणी होती. कौरवांची सैन्यसंख्या ११ तर पांडवांची ७ अक्षौहीणी होती. सैन्यसंख्या मोजण्याची परीमाणे – पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहीनी, पृतना, चमू, अनीकिनी आणि अक्षौहिणी अशी होती. एक अक्षौहीणी म्हणजे साधारण २,१८,७०० सैन्यसंख्या तर एकूण १८ अक्षौहीणी म्हणजे ३९,३६,६०० (पहा – अक्षौहीणी).

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग १ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग १

नमस्कार मित्रहो,

तुमचं स्वागत आहे. या ब्लॉगवर आपण ज्ञान, तत्त्वज्ञान आणि संस्कृती या विषयांवर बोलणार आहोत. विषयाचा पसारा खुप मोठा वाटतो नाही!? काय आहे, एकदा विषयात विस्ताराला वाव ठेवला की मग जे काही मांडू ते आपल्या चौकटीतच आहे असे सांगता येते! म्हणजे मग एखादा विषय यायला हवा होता की नाही वगैरे ठरवण्यात वेळ वाया न घालवता तुम्ही केवळ वाचनाचा आनंद घेउ शकता. मग करायची सुरुवात?


भगवद्गीता अंतरंग

काय आहे भगवद्गीतेचे अंतरंग….. गीता ही श्लोकांच्या स्वरुपात बांधलेली आहे. एकूण श्लोकसंख्या ७०० आहे. यात बोलणा-या व्यक्तीरेखा ४ आहेत.


धृतराष्ट्र – कौरवांचा पिता आणि हस्तिनापूरचा सम्राट. हा जन्मांध असतो. गीतेत याच्या मुखी एकच श्लोक आहे तो म्हणजे गीतेचा पहीला श्लोक. ‘आजोबा गोष्ट सांगा’ या धर्तीवर तो फक्त ‘संजया, कुरुक्षेत्रावर काय चालु आहे?’ असा प्रश्न विचारतो आणि गीता सुरु होते. धृतराष्ट्राचे पात्र येथेच आटपते.


संजय – धृतराष्ट्राचा सारथी आणि त्यावेळचा तात्पुरता युद्धवार्ताहार. हा कुरुक्षेत्रावर चाललेल्या कौरव पांडव युद्धाचे धावते वर्णन (Live Commentary) धृतराष्ट्राला सांगत असतो. याला गीतेत ४१ श्लोक आहेत.


अर्जुन – पांडवातला धनुर्धारी भाऊ. याच्या मुखी ८४ श्लोक आहेत. यातील बहुसंख्य पहिल्या अध्यायात आले आहेत.


श्रीकृष्ण – प्रत्यक्ष भगवान ज्याने हे तत्त्वज्ञान अर्जुनाला युद्धभूमीवर सांगीतले. गीतेतील सगळ्यात जास्त श्लोक म्हणजेच ५७४ श्लोक अर्थातच श्रीकृष्णाच्या तोंडी आहेत.


गीता एकूण १८ अध्यायांमध्ये विभागली आहे. या प्रत्येक अध्यायाचे नावात ‘योग’ आहे. म्हणजे अर्जुनविषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग वगैरे. प्रत्येक योग हा त्या त्या अध्यायाचा प्रमुख विषय आहे. उदाहरणार्थ १४ व्या अध्यायाचे नाव ‘गुणत्रयविभागयोग’ असे आहे. यात अर्थातच तीन गुण आणि त्यांची लक्षणे इत्यादींची वर्णने आहेत.


एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने!; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय..? उत्तर अगदी सोपे आहे.


खरंतर हा प्रश्नच त्याचे उत्तर आहे. हजारो वर्षांपुर्वीच्या माणसाला आयुष्याविषयी जे प्रश्न पडलेले होते आणि आजच्या माणसालाही पडलेले आहेत ते सारखेच आहेत. त्यावेळी अर्जुनाला काय प्रश्न पडले होते? आणि आज आपण जेव्हा अधून मधून अर्जुनासारखे गोंधळात पडतो तेव्हा आपल्याला पडणारे प्रश्न हे सारखेच आहेत. थोड्याफार फरकाने आपल्याला अजूनही खुप मुलभूत प्रश्नच अडचणीत आणतात. गीता याच प्रश्नांवर भाष्य करते. गीत तेच तत्त्वज्ञान सांगते जे तेव्हाच्या आणि आत्ताच्या मानवाला लागू पडते. म्हणून गीता काल, आज आणि उद्याही होती आणि असणार आहे.


प्रश्न………….अर्जुनविषाद……………. पुढील भागात

पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग २

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact