भगवद्गीता – अध्याय १ – अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥

अन्वय
धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च = आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥ १-१ ॥
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥
अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥
अन्वय
आचार्य = अहो आचार्य, तव = तुमच्या, धीमता = बुद्धिमान, शिष्येण = शिष्याने, द्रुपदपुत्रेण = द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने, व्युढाम्‌ = व्युहरचना करून सिद्ध केलेली, एताम्‌ = ही, पाण्डुपुत्राणाम्‌ = पांडूच्या पुत्रांची, महतीम्‌ = विशाल, चमूम्‌ = सेना, पश्य = पाहा
अर्थ
अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥
अन्वय

अत्र = येथे, महेष्वासाः = मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले, च = आणि, युधि = युद्धात, भीमार्जुनसमाः = भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे, शूराः = शूर-वीर, युयुधानः = सात्यकी, च = आणि, विराटः = विराट, च = तसेच, महारथः = महारथी, द्रुपदः = द्रुपद, धृष्टकेतुः = धृष्टकेतू, चेकितानः = चेकितान, च = आणि, वीर्यवान्‌ = बलवान, काशिराजः = काशिराज, पुरुजित्‌ = पुरुजित, कुन्तिभोजः = कुन्तिभोज, च = आणि, नरपुङ्गवः = नरश्रेष्ठ, शैब्यः = शैब्य, च = आणि, विक्रान्तः = पराक्रमी, युधामन्युः = युधामन्यू, च = तसेच, वीर्यवान्‌ = शक्तिमान, उत्तमौजाः = उत्तमौजा, सौभद्रः = सुभद्रेचा पुत्र, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, सर्व एव = हे सर्वच, महारथाः = महारथी, (सन्ति) = आहेत
अर्थ
या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥ १-४, १-५, १-६ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥
अन्वय

द्विजोत्तम = हे ब्राह्मणश्रेष्ठ, अस्माकम्‌ = आमच्या पक्षात, तु = सुद्धा, ये = जे, विशिष्टाः = महत्त्वाचे, (सन्ति) = आहेत, तान्‌ = त्यांना, निबोध = आपण जाणून घ्या, मम = माझ्या, सैन्यस्य = सैन्याचे, नायकाः = जे सेनापती आहेत, तान्‌ = ते, ते = तुमच्या, संज्ञार्थम्‌ = माहितीसाठी, ब्रविमी = मी सांगतो
अर्थ
हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥ १-७ ॥
भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥
अन्वय

भवान्‌ = तुम्ही द्रोणाचार्य, च = आणि, भीष्मः = भीष्म, च = तसेच, कर्णः = कर्ण, च = आणि, समितिञ्जयः = युद्धात विजयी होणारे, कृपः = कृपाचार्य, च = तसेच, अश्वत्थामा = अश्वत्थामा, च = तसेच, विकर्णः = विकर्ण, तथैव च = आणि त्याचप्रमाणे, सौमदत्तिः = सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा
अर्थ
आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥ १-८ ॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥
अन्वय

अन्ये = इतर, च = सुद्धा, मदर्थे = माझ्यासाठी, त्यक्तजीविताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुष्कळ, शूराः = शूरवीर, (सन्ति) = आहेत, सर्वे = ते सर्व, नानाशस्त्रप्रहरणाः = निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज, युद्धविशारदाः = युद्धात पारंगत, (सन्ति) = आहेत
अर्थ
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥
अन्वय

भीष्माभिरक्षितम्‌ = भीष्म-पितामहांकडून रक्षिले गेलेले, अस्माकम्‌ = आमचे, तत्‌ = ते, बलम्‌ = सैन्य, अपर्याप्तम्‌ = सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे, तु = आणि, भीमाभिरक्षितम्‌ = भीमाकडून रक्षिले गेलेले, एतेषाम्‌ = या पांडवांचे, इदम्‌ = हे, बलम्‌ = सैन्य, पर्याप्तम्‌ = जिंकण्यास सोपे आहे
अर्थ
भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥
अन्वय

च = म्हणून, सर्वेषु = सर्व, अयनेषु = व्यूहद्वारात, यथाभागम्‌ = आपापल्या जागेवर, अवस्थिताः = राहून, भवन्तः = आपण, सर्वे एव = सर्वांनीच, हि = निःसंदेहपणे, भीष्मम्‌ एव = भीष्म पितामहांचेच, अभिरक्षन्तु = सर्व बाजूंनी रक्षण करावे
अर्थ
म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥
तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥
अन्वय

तस्य = त्या(दुर्योधना)चा(च्या हृदयात), हर्षम्‌ = आनंद, सञ्जनयन्‌ = निर्माण करीत, कुरुवृद्धः = कौरवातील वृद्ध, प्रतापवान्‌ = महापराक्रमी(अशा), पितामहः = पितामह भीष्मांनी, उच्चैः = मोठ्या सुरात, सिंहनादम्‌ = सिंहाच्या आरोळीप्रमाणे, विनद्य = गर्जना करून, शङ्खम्‌ = शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला.
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, शङ्खाः = शंख, च = आणि, भेर्यः = नगारे, च = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व शिंगे (इत्यादी रणवाद्ये), सहसा एव = एकदमच, अभ्यहन्यन्त = वाजू लागली, (तेषां) = (त्यांचा), सः = तो, शब्दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत्‌ = झाला
अर्थ
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १-१४ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, श्वेतैः = पांढऱ्या, हयैः = घोड्यांनी, युक्ते = युक्त अशा, महति = उत्तम, स्यन्दने = रथात, स्थितौ = बसलेल्या, माधवः = श्रीकृष्ण महाराजांनी, च = आणि, पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), एव = सुद्धा, दिव्यौ = अलौकिक, शङ्खौ = शंख, प्रदध्मतुः = वाजविले
अर्थ
यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) ही दिव्य शंख वाजविले. ॥ १-१४ ॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥
अन्वय

हृषीकेशः = श्रीकृष्ण महाराजांनी, पाञ्चजन्यम्‌ = पांचजन्य नावाचा, धनञ्जयः = अर्जुनाने, देवदत्तम्‌ = देवदत्त नावाचा, (च) = आणि, भीमकर्मा = भयानक कर्मे करणाऱ्या, वृकोदरः = भीमसेनाने, पौण्ड्रम्‌ = पौण्ड्र नावाचा, महाशङ्खम्‌ = मोठा शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥
अन्वय

कुन्तीपुत्रः = कुन्तीपुत्र, राजा = राजा, युधिष्ठिरः = युधिष्ठिराने, अनन्तविजयम्‌ = अनंतविजय नावाचा, (च) = आणि, नकुलः = नकुलाने, च = व, सहदेवः = सहदेवाने, सुघोष-मणिपुष्पकौ = सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंङ्ख, (दध्मौ) = वाजविले
अर्थ
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ॥ १-१६ ॥
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक्‌ ॥ १-१८ ॥
अन्वय

परमेष्वासः = श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा, काश्यः = काशिराज, च = आणि, महारथः = महारथी, शिखण्डी = शिखंडी, च = व, धृष्टद्युम्नः = धृष्टद्युम्न, च = तसेच, विराटः = राजा विराट, च = आणि, अपराजितः = अजिंक्य, सात्यकिः = सात्यकी, द्रुपदः = राजा द्रुपद, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, च = तसेच, महाबाहुः = मोठ्या भुजा असणारा, सौभद्रः = सुभद्रापुत्र(अभिमन्यू), (एते, सर्वे) = या सर्वांनी, पृथिवीपते = हे राजन्‌, सर्वशः = सर्व बाजूंनी, पृथक्‌-पृथक्‌ = वेगवेगळे, शङ्खान्‌ = शंख, दध्मुः = वाजविले
अर्थ
श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. ॥ १-१७, १-१८ ॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ॥ १-१९ ॥
अन्वय

(च) = आणि, नभः = आकाशाला, च = तसेच, पृथिवीं = पृथ्वीला, एव = सुद्धा, व्यनुनादयन्‌ = दुमदुमून टाकीत, सः = त्या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धार्तराष्ट्राणाम्‌ = धार्तराष्ट्रांची म्हणजे आपल्या पक्षातील लोकांची, हृदयानि = हृदये, व्यदारयत्‌ = विदीर्ण करून टाकली
अर्थ
आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥
अन्वय

महीपते = हे राजा, अथ = त्यानंतर, कपिध्वजः = ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे (अशा), पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), व्यवस्थितान्‌ = मोर्चा बांधून उभ्या असलेल्या, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना, दृष्ट्वा = पाहून, तदा = तेव्हा, शस्त्रसम्पाते प्रवृत्ते = शस्त्र चालविण्याच्या तयारीचे वेळी, धनुः = धनुष्य, उद्यम्य = उचलून, हृषीकेशम्‌ = हृषीकेश श्रीकृष्णांना उद्देशून, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वाक्य, आह = उच्चारले, अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, अच्युत = हे अच्युता, मे = माझा, रथम्‌ = रथ, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्यभागी, स्थापय = उभा करा
अर्थ
महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२ ॥
अन्वय

अस्मिन्‌ = या, रणसमुद्यमे = युद्धाच्या उद्योगात, कैः सह = (ज्या) कोणाकोणाबरोबर, मया = मला, योद्धव्यम्‌ = लढणे योग्य आहे, योद्धुकामान्‌ = (त्या) युद्ध करण्याच्या इच्छेने, अवस्थितान्‌ = रणांगणात सज्ज झालेल्या, एतान्‌ = या (शत्रुपक्षातील योद्ध्यां) ना, यावत्‌ अहम्‌ निरीक्षे = (मी) जोपर्यंत नीट पाहून घेत आहे (तोपर्यंत रथ उभा करा.)
अर्थ
मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. ॥ १-२२ ॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥
अन्वय

दुर्बुद्धेः = दुष्टबुद्धी अशा, धार्तराष्ट्रस्य = दुर्योधनाचे, युद्धे = युद्धात, प्रियचिकीर्षवः = हित करू इच्छिणारे, ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अत्र = या सैन्यात, समागताः = एकत्र आले आहेत (त्या), योत्स्यमानान्‌ = युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना, अहम्‌ = मी, अवेक्षे = पाहीन
अर्थ
दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥ १-२३ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, भारत = हे धृतराष्ट्र, गुडाकेशेन = अर्जुनाने, एवम्‌ = असे, उक्तः = म्हटले असता, हृषीकेशः = श्रीकृष्णांनी, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, भीष्मद्रोणप्रमुखतः = भीष्म व द्रोण यांच्या समोर, च = तसेच, सर्वेषाम्‌ = सर्व, महीक्षिताम्‌ = राजांच्या समोर, रथोत्तमम्‌ = उत्तम रथ, स्थापयित्वा = उभा करून, इति = असे, उवाच = म्हटले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), समवेतान्‌ = युद्धासाठी एकत्र जमलेल्या, एतान्‌ = या, कुरून्‌ = कौरवांना, पश्य = पाहा
अर्थ
संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा. ॥ १-२४, १-२५ ॥
तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥
श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
अन्वय

अथ = त्यानंतर, पार्थः = पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने), तत्र उभयोः अपि = त्या दोन्हीही, सेनयोः = सैन्यांमध्ये, स्थितान्‌ = उभे असलेले, पितॄन्‌ = काका, पितामहान्‌ = आजे, पणजे, आचार्यान्‌ = गुरू, मातुलान्‌ = मामे, भ्रातॄन्‌ = भाऊ, पुत्रान्‌ = मुलगे, पौत्रान्‌ = नातू, तथा = तसेच, सखीन्‌ = मित्र, श्वशुरान्‌ = सासरे, च = आणि, सुहृदः = सुहृद (यांना), एव = च, अपश्यत्‌ = पाहिले
अर्थ
त्यानंतर पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने) त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ।
अन्वय

अवस्थितान्‌ = उपस्थित असलेल्या, तान्‌ सर्वान्‌ बन्धून्‌ = त्या सर्व बंधूंना, समीक्ष्य = पाहून, परया = आत्यंतिक, कृपया = करुणेने, आविष्टः = परवश झालेला, सः = तो, कौन्तेयः = कुन्तीपुत्र अर्जुन, विषीदन्‌ = शोक करीत, इदम्‌ = हे(वचन), अब्रवीत्‌ = बोलला ॥ १-२७(उत्तरार्ध),
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, युयुत्सुम्‌ = युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम्‌ = रणांगणावर उपस्थित असणाऱ्या, इमम्‌ स्वजनम्‌ = या स्वजन समुदायाला, दृष्ट्वा = पाहिल्यावर, मम = माझे, गात्राणि = अवयव, सीदन्ति = गळून जात आहेत, च = आणि, मुखम्‌ = तोंड, परिशुष्यति = कोरडे पडत आहे, च = तसेच, मे = माझ्या, शरीरे = शरीरांच्या ठिकाणी, वेपुथः = कंप, च = व, रोमहर्षः = रोमांच, जायते = निर्माण झाले आहेत ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥
अन्वय

हस्तात्‌ = हातातून, गाण्डीवम्‌ = गांडीव धनुष्य, स्रंसते = गळून पडत आहे, च = व, त्वक्‌ = त्वचा, एव = सुद्धा, परिदह्यते = फार जळजळत आहे, च = तसेच, मे = माझे, मनः = मन, भ्रमति इव = भरकटल्यासारखे होत आहे, (अतः) = त्यामुळे मी, अवस्थातुम्‌ = उभा राहाण्यास, च = सुद्धा, न शक्नोमि = समर्थ नाही
अर्थ
हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥ १-३० ॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥
अन्वय

केशव = हे केशवा, निमित्तानि = चिन्हे, च = सुद्धा, (अहम्‌) = मी, विपरीतानि = विपरीतच, पश्यामि = पाहात आहे, (च) = तसेच, आहवे = युद्धामध्ये, स्वजनम्‌ = स्वजन-समुदायाला, हत्वा = ठार मारून, श्रेयः च = कल्याण सुद्धा (होईल असे), न अनुपश्यामि = मला दिसत नाही
अर्थ
हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ १-३१ ॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, विजयम्‌ = विजयाची, न काङ्क्षे = मला इच्छा नाही, च = तसेच, न राज्यम्‌ = राज्याची (इच्छा) नाही, च = आणि, सुखानि = सुखांचीही (इच्छा नाही), गोविन्द = हे गोविंदा, नः = आम्हाला, राज्येन = राज्याचे, किम्‌ = काय प्रयोजन आहे, वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च) = आणि, जीवितेन = जगण्याचा, किम्‌ = काय उपयोग आहे
अर्थ
हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ॥ १-३२ ॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥
अन्वय

येषाम्‌ = ज्यांच्या, अर्थे = साठी, नः = आम्हाला, राज्यम्‌ = राज्य, भोगाः = भोग, च = आणि, सुखानि = सुखे (इत्यादी), काङ्क्षितम्‌ = अभीष्ट आहेत, ते = ते, इमे = हे (सर्वजण), धनानि = धन, च = आणि, प्राणान्‌ = प्राण (यांची आशा), त्यक्त्वा = सोडून, युद्धे = युद्धात, अवस्थिताः = उभे आहेत
अर्थ
आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. ॥ १-३३ ॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥
अन्वय

आचार्याः = गुरुजन, पितरः = काका, पुत्राः = मुलगे, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, पितामहाः = आजे, मातुलाः = मामे, श्वशुराः = सासरे, पौत्राः = नातू, श्यालाः = मेहुणे, तथा = तसेच, सम्बन्धिनः = आप्त लोक, (सन्ति) = आहेत
अर्थ
गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥
अन्वय

मधुसूदन = हे मधुसूदना, घ्नतः अपि = (मला) मारले तरी सुद्धा, (अथवा) = किंवा, त्रैलोक्यराज्यस्य = तीन लोकांच्या राज्याच्या, हेतोः = साठी, अपि = सुद्धा, एतान्‌ = या सर्वांना, हन्तुम्‌ = ठार मारण्याची, न इच्छामि = मला इच्छा नाही (मग), महीकृते = (या) पृथ्वीसाठी (तर), नु किम्‌ = काय सांगावे
अर्थ
हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? ॥ १-३५ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥
अन्वय

जनार्दन = हे जनार्दना, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, निहत्य = मारून, नः = आम्हाला, का = कोणते, प्रीतिः = सुख, स्यात्‌ = मिळणार, एतान्‌ = या, आततायिनः = आततायींना, हत्वा = मारल्यावर, अस्मान्‌ = आम्हाला, पापम्‌ एव = पापच, आश्रयेत्‌ = लागेल
अर्थ
हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌ ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, माधव = हे माधवा, स्वबान्धवान्‌ = आपल्याच बांधवांना (म्हणजे), धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, हन्तुम्‌ = मारण्यास, वयम्‌ = आम्ही, न अर्हाः = योग्य नाही, हि = कारण, स्वजनम्‌ = आपल्याच कुटुंबाला, हत्वा = मारून, कथम्‌ = कसे (बरे), सुखिनः = आम्ही सुखी, स्याम = होऊ
अर्थ
म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? ॥ १-३७ ॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥
अन्वय

यद्यपि = जरी, लोभोपहतचेतसः = लोभाने बुद्धिभ्रष्ट झालेले, एते = हे (लोक), कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशाने उत्पन्न झालेला, दोषम्‌ = दोष, च = तसेच, मित्रद्रोहे = मित्राशी द्रोह करण्यातील, पातकम्‌ = पाप, न पश्यन्ति = पाहात नाहीत, (तथापि) = तरी, जनार्दन = हे जनार्दना, कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या, दोषम्‌ = दोषाला, प्रपश्यद्भिः = जाणणाऱ्या, अस्माभिः = आम्ही, अस्मात्‌ पापात्‌ = या पापापासून, निवर्तितुम्‌ = परावृत्त होण्यासाठी, कथम्‌ = का (बरे), न ज्ञेयम्‌ = विचार करू नये
अर्थ
जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? ॥ १-३८, १-३९ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥
अन्वय

कुलक्षये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, प्रणश्यन्ति = नष्ट होऊन जातात, धर्मे नष्टे = धर्माचा नाश झाल्यावर, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, कुलम्‌ = कुळात, अधर्मः उत = पापसुद्धा, अभिभवति = मोठ्या प्रमाणात पसरते
अर्थ
कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, अधर्माभिभवात्‌ = पाप अधिक वाढल्याने, कुलस्त्रियः = कुळातील स्त्रिया, प्रदुष्यन्ति = अतिशय दूषित होतात, च = (आणि), वार्ष्णेय = हे वार्ष्णेया, स्त्रीषु दुष्टासु = स्त्रिया दूषित झाल्या असताना, वर्णसङ्करः = वर्णसंकर, जायते = उत्पन्न होतो
अर्थ
हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥ १-४१ ॥
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥
अन्वय

कुलघ्नानाम्‌ = कुळाचा नाश करणाऱ्यांना, च = आणि, कुलस्य = कुळाला, सङ्करः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जाण्यासाठी (असतो), लुप्तपिण्डोदकक्रियाः = पिंड व पाणी यांच्या क्रियांना म्हणजे श्राद्ध व तर्पण यांना मुकलेले (असे), एषाम्‌ = यांचे, पितरः हि = पितरसुद्धा, पतन्ति = अधोगतीस प्राप्त होतात
अर्थ
वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥
अन्वय

वर्णसङ्करकारकैः = वर्णसंकर करणाऱ्या, एतैः दोषैः = या दोषांमुळे, कुलघ्नानाम्‌ = कुलघाती लोकांचे, शाश्वताः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, च = आणि, जातिधर्माः = जातिधर्म, उत्साद्यन्ते = नष्ट होऊन जातात
अर्थ
या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुळधर्म उध्वस्त होतात. ॥ १-४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥
अन्वय

जनार्दन= हे जनार्दना, उत्सन्नकुलधर्माणाम्‌ = ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशा, मनुष्याणाम्‌ = मनुष्यांचा, नरके = नरकातील, वासः = निवास (हा), अनियतम्‌ = अनिश्चित काळापर्यंत, भवति = होतो, इति = असे, अनुशुश्रुम = आम्ही ऎकत आलो आहोत
अर्थ
हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऎकत आलो आहोत. ॥ १-४४ ॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥
अन्वय

अहो = अरेरे, बत = किती वाईट, राज्यसुखलोभेन = राज्य व सुख यांच्या लोभाने, वयम्‌ = आम्ही (बुद्धिमान असूनही), यत्‌ = जे, स्वजनम्‌ = स्वजनांना, हन्तुम्‌ = मारण्यास, उद्यताः = तयार झालो आहोत, (तत्‌) = (ते म्हणजे), महत्‌ = मोठे, पापम्‌ = पाप, कर्तुम्‌ = करण्यास, व्यवसिताः = आम्ही तयार झालो आहोत
अर्थ
अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे! ॥ १-४५ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥ १-४६ ॥
अन्वय

यदि = जरी, अशस्त्रम्‌ = शस्त्ररहित, अप्रतिकारम्‌ = प्रतिकार न करणाऱ्या (अशा), माम्‌ = मला, शस्त्रपाणयः = हातात शस्त्र घेतलेले, धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, रणे = युद्धामध्ये, हन्युः = मारतील, (तथापि) = तरी, तत्‌ = ते (मारणे), मे = माझ्यासाठी, क्षेमतरम्‌ = अधिक कल्याणकारक, भवेत्‌ = होईल
अर्थ
जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥ १-४६ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, सङ्ख्ये = रणांगणावर, शोकसंविग्नमानसः = शोकामुळे मन उद्विग्न झालेला, अर्जुनः = अर्जुन, एवम्‌ = असे, उक्त्वा = बोलून, सशरम्‌ = बाणासह, चापम्‌ = धनुष्य, विसृज्य = टाकून, रथोपस्थे = रथाच्या मागील भागी, उपाविशत्‌ = बसला
अर्थ
संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ॥ १-४७ ॥

अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।

महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
कालिदासाच्या कुमारसंभवातील पाचव्या सर्गात खरेतर मजेदार संवाद आहेत. परंतु नांदीचा हा श्लोक मात्र एक गंभीर बोधवाक्य बनून गेला! त्याचे कारण या श्लोकाचा अंतिम चरण

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे….

योगारूढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते त्याची सुरुवात ही अर्थातच ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करुन होते.
भगवंत सांगतात की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शारीर क्रियांमध्ये प्रथम हवे. कारण

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्या तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो

‘अति सर्वत्र वर्जयेत्’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारिरीक क्रियातील अती ला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यासारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीरच मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
अशा प्रकारे भौतिक आणि अधिभौतिकाचा सुंदर मेळ घालण्याचे कार्य श्रीकृष्ण करतो.
अनेकदा असा प्रश्न पडतो की मानवासहित निसर्गातील प्रत्येक घटक हा ईश्वराचीच देणगी असेल तर मग त्याचा अव्हेर करून संन्यासी बनण्यात काय हशील आहे? श्रीकृष्णाच्या लेखी योगी यातील कशाचाच अव्हेर करत नाही. रंग, रस, गंध,नाद या सर्व माध्यमातून जीवनातला आनंद योगीही लुटतोच परंतु त्याचे मन या कशाचाही आहारी जात नाही, अतिरेक करत नाही. बाह्य सृष्टीतील सुख आणि त्याचप्रमाणे दुःखही नश्वर आहे याची त्याला जाणीव असते. परमात्मप्राप्तीचा आनंदच केवळ शाश्वत असा आनंद आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी जागरुकतेने प्रयत्न करतो.
भारतीय तत्वज्ञानाच्या बाबत असा एक गैरसमज पसरलेला दिसतो की त्यात केवळ संन्यस्त वृत्तीचा अंगिकार केलेला आहे. भौतिक किंवा गोचर सृष्टी म्हणजे माया आणि तिचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यासी होणे असा टोकाचा अर्थ घेतला जातो. भारत म्हणजे संन्यासी, साधू, अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करणे, अस्थिपंजर झालेले योगी….. असेच चित्र रंगवले जाते.
श्रीकृष्णाचे मत या विचाराला छेद देते. वेदकालापासून प्रत्येक तत्वज्ञाचा दृष्टिकोन हा सृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप जाणण्याचा होता. ब्रह्म जाणणे केवळ अंगाला राख फासून साधू झाल्यानेच प्राप्त होते असे त्यांनी कधीच मानले नाही. आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला त्यांनी जाणलं आणि त्याला ब्रह्म मानलं. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… गायनाचार्य पलुस्करांच्या एक गोष्टीचा संदर्भ येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही.

एकदा गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर जंगलातून प्रवास करत असताना एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील!!”
येथे नादब्रह्माची उपासना करणारा गायक आणि परब्रह्माची उपासना करणारा संन्यासी दोघेही योगीच मानले गेले आहेत. कलाकारालाही आणि संन्यास्तालाही पथ्ये पाळून आणि अति टाळून योगी होता येते हेच श्रीकृष्णाला येथे सांगायचे आहे. एकाला साधनेसाठी शरीरनियमन आवश्यक आहे तर दुसऱ्याला रियाजासाठी! भगवत्प्राप्तीसाठी प्रत्येकाने संन्यास घेऊन जंगलाचाच मार्ग स्वीकारायला हवा इतका एकांगी विचार मांडण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली नाही.
हे अर्थातच सोपे नाही याची श्रीकृष्णाला जाण आहेच. अर्जुनही ती बोलून दाखवतो. सगळेच जण गायनाचार्य किंवा सिद्धयोगी होत नाहीत. प्रयत्न करुनही अनेकजण मनावर विजय मिळवू शकत नाहीत मग असे लोक मार्गातून विचलित होतात. त्यांना पापी समजायचे का?

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि।।
जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?

अर्थातच नाही. आत्मोद्धारासाठी कर्म करणारी व्यक्ती अधोगतीला प्राप्त होत नाही. जरी तो आपल्या उद्दीष्ट्यापर्यंत पोचू शकला नाही तरी केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या फलस्वरुप त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि कालांतराने तो आपले ध्येय साध्य करतो असे श्रीकृष्ण सांगतो. कर्मसिद्धांताच्या तर्कानेही पाहिले तर हे पटावे की उत्तम कर्माची फलेही उत्तमच असतात. मग ते कर्म जर भगवत्प्राप्तीच्या उद्देशाने केले तर त्याचे फलस्वरूप सकाम कर्म करणारा भक्तही कालांतराने भगवंताशी एकरुप होतोच.
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो. जीवनाचा आस्वाद घेत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हे खरे ज्ञान आहे कारण सर्वाभूती परमेश्वर आहेच म्हणूनच मग त्याचे स्वरुप कलेतून, तपस्येतून, कर्मातून किंवा निव्वळ भक्तीतूनही जाणता येईल. आवश्यक आहे तो त्या त्या मार्गावरील साधकाचा आत्मसंयम…….

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही

अथेनियन अगोरा (Ancient Agora – Athens)

पाश्चात्य जगाला ज्ञात असणाऱ्या लोकशाहीचे अथेन्स (Athens) हे उगमस्थान मानले जाते. साधारण इ.स.पू. ६ व्या शतकापासून अथेन्स (Athens) राज्यात लोकशाही अस्तीत्त्वात आली आणि नंतर इतर ग्रीक राज्यांध्येही त्याचेच अनुकरण केले गेले असे मानतात. गंमतीचा भाग असा की गुलामगिरी आणि लोकशाही दोघीही प्राचीन अथेन्समध्ये एकत्र नांदत होत्या!! निवडणूकीपासून ते व्यापारावरील सरकारी नियंत्रणापर्यंत आपल्याला आज ज्ञात असणाऱ्या अनेक व्यवस्था अथेन्सी लोकशाहीचा भाग होत्या. पालिका, कार्यालये, समित्या, नोकरशहा, लोकप्रतिनिधी, समर्थक, विरोधक,मतदार आणि मतदान अशा सर्व संस्था अथेन्सवासीयांनी उभ्या केल्या होत्या. सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रौढ अथेन्सवासीयांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. मतदानाप्रमाणेच आपली मते मांडणे, सभा घेणे, भाषणे , वादविवाद करणे हा अथेन्सवासीयांचा आवडता कार्यक्रम होता. वादविवादासाठी प्रसिद्ध असलेले सॉक्रेटीस (Socrates), डेमॉस्थेनस (Demosthenes) सारखे तत्वज्ञ याच परंपरेतले. अशा भाषण, वादाविवाद, चर्चा, सभा, परिषदा इ. शहरांच्या मध्यवर्ती भागात होत असत. प्रशासक, नगरपालिका सदस्य, प्रतिष्ठित नागरीक, या सगळ्यांचा राबता असणारे हे ठिकाण म्हणजे अगोरा (Agora) किंवा आजच्या भाषेत शहराचा मध्यवर्ती भाग (मराठीत City Centre, किंवा CBD!). प्राचीन ग्रीकांच्या प्रत्येक शहरात असे ठिकाण असे. बाजारपेठ, सरकारी कार्यालये, सांस्कृतीक कार्यक्रम आणि गप्पांचे अड्डे यांचे एकत्रित संकुल म्हणजे अगोरा (Agora). अथेन्सच्या मधोमध ॲक्रॉप्लिसच्या दिशेने जाणाऱ्या प्राचीन अथेन्स महामार्गाच्या (Panathenaic Highway) दोन्ही बाजूला हे अगोरा (Agora) बांधले गेले होते. ज्याचे अवशेष आजही पहायला मिळतात. काय काय आहे या संकुलात…
निरनिराळ्या काळात बांधलेली नाट्यगृहे, चर्चेसाठीची आवारे, सरकारी कचेऱ्या, दुकाने, कारंजी, बागा, मंदिरे इतकेच काय पण एक टांकसाळ (mint) सुद्धा होती. ग्रीकांच्या व्यवस्था किती प्रगल्भ होत्या हे दर्शवणारी काही विशेष कार्यालये होती. जसे – दुकानांत तोलल्या जाणाऱ्या मालासाठीची प्रमाणीत वजने बाळगणारे पालिकेचे कार्यालय होते. येथे येऊन ग्राहक आपल्याला दिलेला माल योग्य वजनाचा असल्याची खात्री करू शकत असे. नगरपरीषदेच्या सदस्यांना बसण्यासाठी एक कार्यालय होते. त्यात राहण्याचीही सोय होती. नगरपरिषदेचा किमान एकतरी सदस्य येथे आळीपाळीने वास्तव्यास असे. जेणेकरून जनतेचा प्रतिनिधी नागरीकांना कोणत्याही वेळी उपलब्ध होई. याच ठिकाणावरून अथेन्सपासूनची भौगोलिक अंतरे प्रमाणीत केली जात असत. उदा. अथेन्सपासून स्पार्टापर्यंतचे (sparta) अंतर मोजायचे तर त्याचा आरंभबिंदू (zero point) अगोरा (Agora) मानला जाई!! ग्रीकांची लोकशाही किती विचारपूर्वक उभी केलेली होती हे या व्यवस्थेवरून स्पष्ट होते.
पारंपारीक अथेन्स-उत्सवाच्या (Athenian Festivals) दिवशी काढलेली मिरवणूक याच परीसरातील मार्गावरून पार्थेनॉनला जात असे. दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नलिका, चढण असलेल्या मार्गाला आधार, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी असे संपूर्ण नियोजित बांधकाम अगोरात आढळते. शेकडो वर्षे हा भाग त्याचं महत्व टिकवून होता आणि सतत नवनवीन बांधकामं स्वीकारत होता. लहान मुलांच्या खेळणी, स्वयंपाकाची उपकरणे, विक्रीला आलेल्या वस्तू, विनिमयाच्या नाण्यांपासून ते पार कालमापक घटीका आणि मतदान/निवडणूक यंत्रापर्यंत अनेक वस्तू येथे केलेल्या प्रदीर्घ उत्खननात सापडल्या आहेत. वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.

प्राचीन अगोराच्या मधोमध – पॅन अथेनियन महामार्ग – अथेन्स उत्सवाची मिरवणूक याच मार्गावरून वर टेकडीवर दिसणाऱ्या पार्थेनॉनला जाई.
काही एकरात पसरलेला अगोराचा उत्थनन केलेला परीसर. उजव्या बाजूला बाजारपेठेची पुनर्बांधणी केलेली इमारत
प्राचीन बांधकामांचे अवशेष
अगोराच्या मध्यभागात इ.स.पू. १०० मध्ये बांधलेल्या बाजारपेठ आणि फेरफटका मारायच्या जागेचे अवशेष
(थॉलस) Tholos या गोलाकार इमारतीचे अवशेष. नगरसेवक येथेच वास्तव्यास असत
मोहेंजोदारोची आठवण करून देणारी, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेने बांधलेली गटारे.
विहीर – पाणी ओढून काढल्याने उमटलेले दोरीच्या खुणाही दिसत आहेत.
इ.स.पू १५ मध्ये रोमन सिनेटर अग्रिपा (Agrippa) ने बांधून दिलेल्या थिएटरच्या बांधकामातील एक स्तंभ (कोरिंथिअन शैली)
अगोराच्या मध्यभागी, बारा ऑलिंपिअन देवतांचे पुतळे स्थापन केलेले मंदिर. इ.स.पू. ५२२
ग्रीक कोरीव कामाच उत्कृष्ट नमुना दाखवणारा ऑलिंपिअन देव. हाच अथेन्सचा भौगोलिक मध्य (Zero Point) मानला जाई
(ग्रीकांचा लोहार, आग आणि तंत्रशाळेचा देव) – (Hephaestus) हेफेस्टसचे देऊळ. अथेन्समधील प्राचीन मंदिरातील सगळ्यात जास्त सुस्थितीत राहिलेले मंदिर. इ.स.पू. ४४९
भिंतींवरील शिल्पे ग्रीक शैलीतील मंदिरांची खास रचना
मंदिराचा अंतर्भागातील रचना
भिंतींच्याच संगमरवरी दगडातील खास कोरीव कला… सेन्टॉर (Centaur) (आपले हॅरी पॉटरवाले!)
मंदिराच्या आतील स्तंभ आणि गर्भगृहाचा भाग
गर्भगृह, हा भाग इ.स. ७ व्या शतकापासून बराच काळ चर्च म्हणून वापरला गेला.

जवळपास १२ स्तरांपर्यंत केलेल्या उत्खननातून अथेन्सच्या अगोराच्या परीसरात अनेक अवशेष, वास्तू आणि वस्तू सापडल्या. साधारण इ.स.पू. ३००० पासून ते इ.स. १५०० पर्यंतच्या अशा अनेक वस्तूंचे एक संग्रहालय अगोराच्याच परिसरात उभे आहे. पर्गमॉन (Pergamon) चा राजा अटोलास (Attalos) याने इ.स.पू. १५० च्या आसपास बांधून दिलेल्या बाजारपेठेच्या जागेची पुनर्बांधणी करून त्यात हे म्युझियम (museum) वसवले आहे. जवळपास १५०० च्या आसपास वस्तुंचा संग्रह येथे आहे त्यातील केवळ प्राचीन अथेन्सच्या मोजक्या खुणा पाहू…

Kleroterion क्लॅरोटेरिअन – प्राचीन ग्रीक निवडणूक यंत्र.
ॲरिस्टॉटलच्या Constitution of the Athenians या ग्रंथात वर्णन केलेल्या  निवडणूकीच्या यंत्राचे उत्खननात मिळालेले अवशेष. संपूर्ण उभ्या आयताकृती यंत्रात जवळपास ५०० खाचा आणि एक नलिका असून त्याला लाकडी चौकटही असे. एकाच वेळी ५०० इच्छुक सदस्य किंवा नागरीकांमधून न्याय, अर्थ, प्रशासन वगैरे निरनिराळ्या समित्यांचे अधिकारी निष्पक्षपणे निवडण्याचे काम या यंत्रातून केले जाई. बाजूला ठेवलेल्या चकत्यांवर इच्छुक आपले नाव लिहून चकती यंत्रात खोचून ठेवत असे. नंतर फासे किंवा दोन रंगातील गोळे वापरून यंत्रातील चकत्या यादृच्छिकपणे (Randomly) निवडल्या जात असत.
वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे प्राचीन घटिकापात्र. इ.स.पू. ५वे शतक वरच्या पात्रातील सगळं पाणी खाल्यच्या पात्रात पडलं की वेळ संपली. चित्रातील पात्रात ६.४ ली पाणी मावते म्हणजे साधारण सहा मिनिटांसाठी वापरत असत. शेवटचा थेंब पडला की वक्त्याची किंवा भाषणाची वेळ संपली…
स्वयंपाकाची प्राचीन साधने (आधुनिक साधने तरी काय वेगळी असतात म्हणा!) इ.स.पू. ६वे शतक
प्राचीन भट्टी (Barbecue ?!) आणि ट्रे. इ.स.पू. ६वे शतक धातूच्या सळ्या आधुनिक आहेत, उपयोग समजण्यासाठी
हे काय आहे हे सांगण्याची गरज नाही, बाजूचे चित्र पुरेसे बोलके आहे… इ.स.पू ६५०

अथेन्समधील अशीच इतर म्युझियम्स अंतिम भागात पाहू……

मागील भाग – संस्कृतीचे स्तंभ – अथेन्स

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ

अथेन्समध्ये (Athens) वावरताना ग्रीसला पाश्चात्यांच्या संस्कृतीचा पाया का म्हणतात, याची सतत प्रचीती येते. धर्म, शिक्षण, कला आणि क्रीडा या संस्कृतीच्या प्रत्येक अंगाची पाश्चात्य घडण ग्रीकांच्या भूमीत झाली हे पटवणारी अनेक प्राचीन स्मारकं अथेन्समध्येच पहायला मिळतात. प्राचीन मंदिरं, उत्कृष्ट वाचनालयं, प्लेटोच्या – ॲरिस्टॉटलच्या शाळा, स्टेडियम आणि नाट्यगृहं याचा आढावा घेता घेता दिवसच्या दिवस जातात. त्यातलीच काही खास ठिकाणं..

पोसायडनचे देऊळ – केप सुन्यो (Temple of Poseidon, Cape Sounion)
अथेन्सवासीयांनी बांधलेले एक नितांत सुंदर मंदिर म्हणजे पोसायडनचे केप सुन्यो येथील मंदिर. पोसायडन (Poseidon) हा ग्रीकांचा समुद्र, वादळ, भूकंप आणि घोड्यांचा देव. आपल्या शंकरासारखं याच्याही हातात त्रिशुळ असतं. अथेन्सच्या ईशान्येला साधाराण ७० किमी अंतरावर समुद्रकिनाऱ्यावरील एका टेकाडावर हे मंदिर उभे आहे. पर्शियन आक्रमकांनी इ.स.पू. ४८० मध्ये उध्वस्त केलेल्या प्राचीन (इ.स.पू ४८० त प्राचीन!!) मंदिराच्या जागेवरच इ.स.पू ४४० मध्ये अथेन्सवासीयांनी नवीन मंदिर बांधले. तेही पर्शियनांचा पराभव करूनच! आपल्या विजयाची खूण म्हणून शत्रुची लुटलेली एक नौकाही तिथेच समुद्रात उभी केली.
२० फुट उंच आणि पायाशी ३ फुट रुंद अशा जवळपास ४० (अर्थात संगमरवरी) डोरीक स्तंभांवर उभे असलेले आणि पोसायडनची भव्य मूर्ती मिरवणारे हे मंदिर समुद्राच्या पार्श्वभूमीवर अतिशय खुलुन दिसते. आशियातून ग्रीसच्या आसपास समुद्रातून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस हे मंदिर पडल्याचे उल्लेख आहेत.
या मंदिराच्या सौंदर्याचा मोह इतका मोठा आहे की लॉर्ड बायरन (Lord Byron) सारख्या थोर कवीने येथील वास्तव्यात या मंदिराच्या अवशेषातील एका स्तंभावर चक्क आपलं नाव कोरलंय!! ही जागा प्राचीन इतिहासाचा ठेवा आहे हे माहिती असूनही!!! (असले उद्योग करणारे फक्त भारतातच असतात असे नाही हो, या क्षेत्रातही इंग्लंडनेच बाजी मारली आहे!!)

केप सुन्योचा रम्य परिसर
पोसायडनचे मंदिर… शब्दातीत…
केप सुन्योच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा देखावा.
मंदिराच्या स्तंभाची रचना
संगमरवरी कोरीव दगडांचे स्तंभ
खुणेच्या लाल रेषेचा भाग झूम केल्यास उचापती बायरनचे नाव दिसेल!!!

झ्यूसचं देऊळ (Temple of Olympian Zeus)
काहीएक हेतू मनात ठेऊन एखादा उपक्रम उभा करावा आणि तो चांगला हेतू बाजूला राहून भलत्याच कारणासाठी त्या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली तर कसे वाटेल? उदाहरणार्थ, आपली बिर्ला मंदिरंच घ्या, चांगल्या हेतूने बांधलेली देवाची देवळं. पण लोकांनी त्याला आतल्या देवाच्या नावाऐवजी बांधणाऱ्या बिर्लांचं नाव दिलं. पर्यटकांना काय सांगणार बिर्ला मंदिर म्हणजे काय?! आता कोणाची मूर्ती असायला हवी?.. दुर्दैव त्या बिर्लांचं आणि देवाचंही!
असंच, म्हणजे खरंतर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून उभं करण्यात आलेलं पण रखडलेल्या बांधकामासाठी जास्त प्रसिद्ध झालेले दुर्दैवी मंदिर म्हणजे झ्यूसचे मंदिर. गंमतीचा भाग म्हणजे झ्यूस (Zeus) हा ग्रीकांचा सगळ्यात मोठा देव, त्याच्याच मंदिराची अशी अवस्था व्हावी हे ही नवलच.
इ.स.पू ६ व्या शतकात अथेनीयन आक्रमकांनी या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली, तेव्हा अथेन्सच्या मधोमध उभे असणारे हे मंदिर त्याकाळचे सगळ्यात भव्य मंदिर असणार होते. पण मंदिराचे बांधकाम रखडत राहिले आणि पूर्ण कधी झाले तर फक्त ६३८ वर्षांनी!! इ.स. २ ऱ्या शतकात रोमन काळात सम्राट हेड्रियनने हे काम पूर्ण करवले. जवळपास १०४ स्तंभांवार उभे असलेले हे मंदिर तेव्हाही त्याकाळातले सगळ्यात मोठेच होते. पार्थेनॉनच्या (Parthenon) जवळपास दुप्पट.. (वाचा – पार्थेनॉन). पण बांधून झाल्यावरही या मंदिराचे दुर्दैव संपले नाही. काही वर्षातच अथेन्सवरच्या आक्रमणात टोळ्यांनी मंदिराची लूट आणि नासधूस केली. त्यानंतर एखाद्या पडक्या वाड्याप्रमाणे हे मंदिर ओस पडलं. मंदिराचे कोरीव पाषाण लोकांनी इतर बांधकामासाठी वापरले. रोमच्या ज्युपीटरच्या मंदिरासाठी वापरलेले काही दगड येथूनच नेले गेले. १४ व्या शतकापर्यंत मंदिराचे केवळ २१ स्तंभ शिल्लक राहिले होते. नंतर ऑटोमन तुर्कांनी (Ottomon) त्यातले काही स्तंभ स्फोटके वापरून पाडले आणि मशिदींच्या बांधकामात वापरले. आज दिसतात ते एकूण १६ स्तंभ ज्यातला एक स्तंभ १८५२ सालच्या वादळात कोसळला. तो पडलेल्या स्थितीतच जतन करून ठेवण्यात आला आहे. याही अवस्थेत मंदिराचे आवार आणि स्तंभ पाहून त्याच्या भव्यतेची कल्पना येते.

१०४ स्तंभापैकी आज उभ्या असलेले १५ स्तंभही मंदिराच्या भव्य आकाराची कल्पना करून द्यायला पुरेसे आहेत.
वादळात कोसळलेला १६ वा स्तंभ. यातही संगमरवारच्या कोरीव दगडांची रास किती कौशल्याने रचली जात असे हे कळून येते.
मंदिराच्या दर्शनी भागातील आणि गर्भगृहातील स्तंभ

पॅन-अथेनिक स्टेडियम (Panathenaic Stadium) – (आधुनिक ऑलिंपिकचे जन्मस्थान)
इ.स.पू. ३३० मध्ये लायकर्गसने (Lycurgus) हे स्टेडियम अथेन्सवासीयांसाठी बांधले ऑलिंपिया किंवा डेल्फीप्रमाणे येथेही निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा होत असत. इ.स. ११४ मध्ये हिरोडस ॲट्टीकस (Herodes Atticus) याने त्याची संपूर्ण संगमरवरात पुनर्बांधणी केली. त्या काळात (आणि आजही) ५०,००० लोक मावतील इतकी या स्टेडियमची क्षमता आहे. जे झ्यूसच्या देवळाच्याही नशीबात नव्हतं ते या स्टेडियमच्या नशीबात होतं. ख्रिश्चन धर्माचा वाढत्या प्रभावाच्या काळात ओस पडलेलं हे स्टेडियम पुन्हा समोर आलं ते थेट १८६९ च्या उत्खननानंतर… त्या काळात ऑलिंपिक चे आधुनिक पुनरुज्जीवन करण्याचे घाटत होते. ६ एप्रिल १८९६ रोजी याच स्टेडियमवर आधुनिक ऑलिंपिकचे (Modern Olympic) उद्घाटन झाले. स्टेडियमला पुन्हा आपल्या गतकाळाचं वैभव प्राप्त झालं. ऑलिंपिकची परंपरा, जी आज इतकी मोठी चळवळ बनलीय त्याची सुरुवात याच स्टेडियमवर झाली. आजही ज्या देशात ऑलिंपिक होणार आहे त्या देशाच्या प्रतिनिधींकडे ऑलिंपिक ज्योत हस्तांतरण करण्याचा सोहळा याच स्टेडियमवर होतो.

आजही वापरात असणाऱ्या २००० वर्ष जुन्या स्टेडियमचा विहंगम देखावा
स्टेडियमच्या ट्रॅकजवळ उभे केलेले Herm – दोन्ही बाजूला चेहरा कोरलेले शिल्प, हे उत्खननात सापडले.
पहिल्या रांगेत खास आसनव्यवस्था..
खेळाडूंनी प्रवेश करण्याचा बोगदा, हा व्हीआयपी आसनांच्या बरोबर समोरच्या बाजूस आहे.
या पात्रातून घेतलेली ज्योत समारंभपूर्वक ऑलिंपिक भरवणाऱ्या देशाला दिली जाते.

ॲरीस्टॉटलची शाळा ( Lyceum of Aristotle)
अथेन्ससारख्या अतिप्राचीन नगरांची एक अडचण असते. आजच्या नागरीकांनी वसाहतीसाठी जिथे कुठे खोदकाम करायला सुरुवात करावी तिथे त्यांच्याच थोर पूर्वजांच्या खुणा सापडायला लागतात. साध्या बस स्टॉपपासून ते सरकारी इमारतींपर्यंत सगळ्याच बांधकामांच्या जागी काही ना काही सापडलंय आणि आजही सापडतंय. मग नव्या बांधकामाची पुनर्रचना करायची आणि जुनं अभिमानाने जतन करायचं ही ग्रीकांची पद्धत. अख्खं अथेन्स नगर असं प्राचीन अवशेषांच्या खुणा आंगाखांद्यावरच नाही तर पायाखालीही बाळगून जगतं!
त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ॲरीस्टॉटलची शाळा ( Lyceum of Aristotle). अथेन्सच्या मॉडर्न आर्ट म्युझियमसाठी (Modern Art Museum) पाया खोदताना तेथे अवशेष सापडायला लागले ते ॲरीस्टॉटलच्या शाळेचे आहेत लक्षात आलं. खरंतर या जागी कोणतेही बांधकामाचे अवशेष आता उरलेले नाहीत पण प्राचीन संदर्भावरून आणि जागेच्या अभ्यासावरुन जिमखाना आणि ॲरिस्टॉटलची शाळा येथे होती याची खात्री पटली आणि मग उत्खनन करून ॲरिस्टॉटलच्या शाळेची जागा जतन केली गेली. म्युझियम अर्थातच थोड्या दुरवर बांधलं. ही घटना आहे १९९६ सालची.
अलेक्झांडर आशियात युद्ध करत असताना ॲरिस्टॉटल (Aristotle) येथे शिकवत होता. फेरफटका मारत विद्यार्थ्यांच्या घोळक्याला शिकवण्याची ॲरिस्टॉटलची पद्धत येथलीच. असे म्हणतात की अलेक्झांडर स्वारीसाठी ज्या ज्या भागात जात असे त्या त्या भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने आपल्या या गुरुंच्या अभ्यासासाठी पाठवत असे. त्याचे एक संग्रहालय पण या शाळेत बांधले होते. सुसज्ज अशी तालीम आणि जिमखानाही (Gym) येथे होता. आज येथे केवळ जमीनीचा तुकडाच दिसतो पण याच भूमीवर विख्यात ॲरिस्टॉटल (Aristotle) शिकवत असल्याने त्याचे महत्व (माझ्यासाठी तरी) एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.
(जाता हे ही सांगायला हरकत नाही, की अथेन्स राज्याचा नागरीक नसल्याने ॲरिस्टॉटलला अथेन्समध्ये जागा विकत घ्यायला परवानगी नव्हती!! अलेक्झांडर मरण पावल्यानंतर मॅसेडोनीयन्स (Macedonians) बरोबर ॲरिस्टॉटलाही अथेन्स सोडावे लागले.)

उत्खननात गवसलेले विद्यापीठ
ॲरिस्टॉटलच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी

प्लेटोची अकॅडमी (Platonic Academy)
प्लेटोची जगप्रसिद्ध अकॅडमी जेथे होती ती जागाच आता केवळ उरली आहे. त्यावर छोटेखानी दृक् श्राव्य म्युझियम आणि प्लेटोचा पुतळा इतकेच काय ते उभे आहे. दुर्दैवाने अथेन्समध्ये या ठिकाणाची माहिती खुप कमी लोकांना आहे. टॅक्सीवाल्यालाही गूगल मॅप्स वापरून तिकडे न्यावे लागले.

म्युझियमचेे प्रवेशद्वार
प्लेटोचा पुतळा आणि संस्करण

हेड्रियनचे वाचनालय (Hadrian’s Library)
सम्राट हेड्रियनने (Hadrian) रोमन फोरमच्या धर्तीवर बांधलेली एक अप्रतिम इमारत. काळ इ.स. १३२. भव्य पण शांत आणि धीरगंभीर अशी ही जागा. वाचनालय, पपायरस (Papyrus) म्हणजे जुन्या कागदाच्या पुस्तकांची दालने, चर्चेसाठीची छोटी सभागृहे आणि एक सुंदर तरण तलाव (मराठीत स्विमिंग पूल!). आजकालच्या लायब्ररी आणि अभ्यासिकांच्या एकत्रित रचनेला मिळती जुळती अशी ही रचना ग्रीकांच्या अभ्यासू वृत्तीची झलक दाखवते. नंतर अर्थातच इमारतीची पडझड झाली, काही भागात चर्च बांधली गेली. आज केवळ प्रवेशद्वाराचा भाग आणि आतल्या काही बांधकामाचे अवशेष शिल्लक आहेत. त्यातूनही या जुन्या अभ्यासवास्तूच्या थोरवीचा अंदाज येतो.

भव्य प्रवेशद्वार
लायब्ररीचा आराखडा डावीकडे… इमारतीच्या आकाराची कल्पना बाहेरील खांबांची उंची पाहून येते.
लायब्ररीच्या आतील रचना दर्शवणारे अवशेष
जमिनीवर संगमरवराचे तुकडे वापरून केलेले सुंदर नक्षीकाम (Mosaic)

ज्ञान, कला आणि क्रीडा… प्राचीन ग्रीकांची संस्कृती सर्वार्थाने समृद्ध होती. आजच्याही ग्रीसला आपल्या दैदिप्यमान परंपरेचा अभिमान तर आहेच तसेच या संस्कृतीच्या खुणा जतन करुन ठेवण्यात आणि अभ्यासण्यातही तितकाच रस आहे. डॉ. अल्किस राफ्टीस (Alkis Raftis)1 हा असाच एक अवलिया. इन्व्हेस्टमेंट बॅंकिंगमधील उच्च पगाराची नोकरी सोडून उर्वरीत आयुष्य ग्रीक नृत्यकलेला समर्पित करणारा संशोधक. त्याच्या अकस्मात भेटीमुळे, अथेन्समध्ये केवळ नृत्यकलेसाठी कार्य करणारी कंपनी आणि त्यांचे याच कार्यासाठी वाहिलेले थिएटर पाहण्याचा योग आला. डोरा स्ट्राटेऊ ग्रीक डान्स थिएटर (Dora Stratou Greek Dance Theatre) ही संस्था ॲक्रॉप्लिसच्या (Acropolis) परिसरातच ग्रीक अर्वाचीन लोकनृत्ये जतन करण्याचे आणि प्रसार करण्याचे कार्य करते. (हो… जुन्या लोककलांना तुच्छ/त्याज्य मानण्याची पद्धत अजून ग्रीक लोकात आलेले नाहीत!!) अनेक स्थानिक आणि जगभर पसरलेले ग्रीक तसेच इतरही लोक येथे येऊन, राहून पारंपारीक ग्रीक नृत्ये शिकतात. अशा विद्यार्थ्यांचे एक वर्कशॉप नुकतेच संपले होते. डॉ. राफ्टीस यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्याचा आणि अर्थातच नृत्याचा कार्यक्रम पहायचा योग डॉ. राफ्टीस यांच्याच निमंत्रणामुळे आला. विविध नृत्यप्रकार, बहुरंगी पोषाख आणि बहुढंगी वाद्यवृंद आणि त्यावर थिरकणारा नवीन पण उत्साही नर्तकांचा संच. जवळपास प्रत्येकजण वेगवेगळ्या देशातून केवळ आपली पारंपारीक नृत्ये शिकण्यासाठी आणि जतन करण्यासाठी आला होता. नृत्याबरोबरच त्यांच्या या भावनेलाही दाद द्यावीशी वाटली…..

कार्यक्रमाची सुरुवात…. वादक आणि गायक प्रवेश करताना. पार्श्वभूमीवर घनदाट झाडी..
संपूर्ण वाद्यवृंद आणि गायिका
वाद्यमेळ आणि कर्णमधूर लोकसंगीत
पारंपारिक रंगीबेरंगी पोषाखातील नर्तक
पारंपारिक रंगीबेरंगी पोषाखातील नर्तक
समूहनृत्य
समूह नृत्यात साखळीतील अग्रणी नर्तक वेगवेगळ्या करामती करतो…
मुख्य नर्तकाचा असाच एक मनोहर नृत्याविष्कार
लाकडी चमचे वाजवत केलेले नृत्य
एक युगल समूहनृत्य
कार्यक्रम संपल्यावरची आपलेपणाची छोटेखानी मैफल… वेश बदलून कलाकारही यात सामील होतात…..

भव्य नाट्यगृहे, उत्कृष्ट वाचनालये, सुसज्ज क्रीडांगणे, विद्यापीठांची मालिका, उत्तुंग देवस्थाने आणि त्यांच्याही आश्रयाने होणारा नाट्य, नृत्य आणि खेळांचा आविष्कार… संस्कृतीचे स्तंभ असणारी ही संकुले. ग्रीकांच्या अष्टपैलुत्वाची झलक या वेगवेगळ्या संकुलांमधून येते. एकट्या अथेन्समध्ये (Athens) अशा अनेक वास्तूंची रचना हजारो वर्षांच्या काळात होत राहिली. यावरूनच विविध अंगानी आयुष्याचा आनंद घेण्याची ग्रीकांची चतुरस्त्र वृत्ती प्रकट होत राहते. ज्या उमेदीने ग्रीकांनी हे सगळे जतन करून ठेवले आहे त्याला खरोखर तोड नाही. उत्खननात सापडलेला खापराचा तुकडा असो की मोठ्या इमारतीचे अवशेष, त्याची संगतवार जपणूक ग्रीकांनी केलीय ती त्याच जागी किंवा अथेन्सभर पसरलेल्या म्युझियम्समध्ये. अशाच काही संग्रहालयांची आणि वास्तूंची सफर पुढील भागात…

तळटीप-
1. Dr. Alkis Raftis – https://www.instagram.com/alkis.raftis/, #alkisraftis

मागील भाग – गुढरम्य डेल्फी पुढील भाग – लोक आणि लोकशाही – अथेन्स

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी

डेल्फी (Delphi)…….

जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा ग्रीसचा नवा तरुण सत्ताधीश अलेक्झांडर (Alexander the Great) डेल्फीच्या (Delphi) देवळाच्या दारात उभा होता. डेल्फीच्या महान पुजारीणीने (ओरॅकल) (Oracle) आपले भविष्य वर्तवावे या इच्छेने. जग जिंकण्यासाठी अपोलोच्या (Apollo) देवळाचा कौल त्याला आवश्यक वाटत होता. ओरॅकलच्या केवळ एका शब्दावर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा जोम कैकपटीने वाढला असता!! आजवर कित्येक महान सम्राटांनी या देवळाच्या पायरीवर आपली डोकी टेकवली होती. डेल्फीच्या शब्दाचं महत्व आणि सामर्थ्य साऱ्या जगानं अनुभवलं होतं. अलेक्झांडरला याची जाणीव होती म्हणून तर तो या देवळाच्या चौथऱ्यावर तिष्ठत होता.
“नाही……!!ओरॅकल (Oracle) आज होणार नाही………….!!!!” आतून निरोप आला…
वर्षातून केवळ काही दिवसच भविष्यवाणी वर्तवण्याची परंपरा होती ओरॅकलची. त्यातही देवाचा कौल घेणं न घेणं, भविष्य वर्तवणं न वर्तवणं हा पुजारीणींच्या लहरीचा भाग होता. दारात कोण उभा आहे याची फिकीर करण्याची त्यांची पद्धत नव्हती. गेली ५०० वर्ष लायकर्गससारख्या (Lycurgus) थोर राजापासून ते अगदी अलेक्झांडरच्या वडलांपर्यंत सगळ्यांनी याच लहरी स्वभावापुढे मान तुकवून भविष्यं ऐकली होती.
नाही……….??
असं काही ऐकायची अलेक्झांडरलाही सवय नव्हती… त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ओरॅकलइतकाच तोही लहरी आणि माथेफिरू होता. जग जिंकायचं तर सत्ता गाजवण्याची उर्मी किती प्रबळ असावी लागते हे त्याने दाखवूनच दिलं. केसाला धरून पुजारीणीला फरफटत मंदिराच्या आवारात त्याने आणलं आणि बळजबरीने भविष्य तिच्या तोंडून बाहेर पडलं……

“ἀνίκητος εἶ ὦ παῖ. (बाळा तू अजिंक्य आहेस)”

ओरॅकलने बळजबरीने वर्तवलेलं भविष्यही खरं ठरलं आणि अलेक्झांडर, ‘द ग्रेट’ झाला.
अशा खिळवून ठेवणाऱ्या अनेक कथा दंतकथांचं डेल्फी (Delphi)…….. भविष्याचा वेध घेणारं. गुढ, दुर्बोध, लहरी आणि तरीही आकर्षक…… ग्रीकांच्या अपोलोचं देवस्थान! अपोलो (Apollo) हा ग्रीकांचा कला, ज्ञान, सूर्यप्रकाश, भविष्यकथन, पशुपक्ष्यांचे कळप आणि थवे यांचा देव.
अथेन्सपासून साधारण २०० कि.मी. अंतरावर असणाऱ्या पार्नासस ( Mount Parnassus) डोंगरांवर डेल्फीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या परिसराबद्दल ग्रीक पुराणांत अनेक गोष्टी आहेत. देवांचा राजा झ्यूसने पृथ्वीचा मध्यभाग शोधण्यासाठी दोन गरुड सोडले. पृथ्वीच्या दोन टोकांकडून एकाच वेळी एकाच वेगाने जाणारे हे गरुड ज्या ठिकाणी एकमेकांला भेटतील तो पृथ्वीचा मध्य किंवा नाभी असे त्याने ठरवले. ते गरुड डेल्फीच्या डोंगरावर समोरासमोर आले. म्हणूनच हा भाग संपुर्ण जगाचा मध्यभाग (नाभी) आहे असे म्हटले गेले. अशी एक कथा आहे. या भागाच्या संरक्षणासाठी असलेल्या सापावरून (Python) या भागाला पायथो (Pytho) असे नाव पडले आणि म्हणून डेल्फीच्या प्रसिद्ध पुजारीणीला पिथिया (Pythia) म्हणतात. अशीही एक कथा आहे.
इ.स.पू ८ व्या शतकापासून डेल्फी (Deplhi) आणि ओरॅकलच्या (Oracle) अस्तीत्वाबद्दल उल्लेख सापडतात. म्हणजे अलेक्झांडरच्याही आधी जवळपास ५०० वर्ष….!! आणि तेव्हापासून अनेक थोर ग्रीक, रोमन,इतर सम्राट, राज्यकर्ते आणि प्रशासक डेल्फीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आले. यात प्राचीन स्पार्टाच्या लायकर्ग (Lycurgus) पासून ते पार रोमच्या निरोपर्यंत (फिडलवाला!) बऱ्यावाईट अनेक सम्राटांचा समावेश होतो. साहित्यिकांनाही डेल्फीचं आकर्षण होतंच. असिक्लिस (Aeschylus), ॲरिस्टॉटलपासून (Aristotle) ते पार शेक्सपिअरपर्यंत (Shakeshpeare) अनेकांनी आपल्या ग्रंथात, नाटकात डेल्फीचा उल्लेख केलाय. थेमिस्टोक्लेआ (Themistoclea) ही पुजारीण तर आपल्या प्रमेयवाल्या पायथॅगोरसची (Pythagoras) गुरु होती असे म्हणतात. सॉक्रेटिस (Socrates) हा जगातला सगळ्यात बुद्धीमान/शहाणा व्यक्ती असल्याची आकाशवाणीही अशाच एका पुजारीणीने केली होती. प्राचीन जगतात इतकी प्रसिद्ध असणारी दुसरी जागा क्वचितच आढळते.
डेल्फीला येऊन ओरॅकल ऐकणे हा एक पारंपारीक सोहळाच होता. जातकांची क्रमवारी लावणे, त्यांना प्रश्न नीट तयार करून देणे, त्यांना शुचिर्भूत करणे, ओरॅकलसमोर वागायचे तसेच नजराणा अर्पण करण्याचे शिष्टाचार शिकवणे, ओरॅकलच्या काव्यात्म भविष्याचा अर्थ लावणे ही सर्व कामे करणारी व्यवस्थाच अस्तीत्त्वात होती. भेटी आणि नजरण्यांच्या राशीच्या राशी डेल्फीत येऊन पडायच्या. अथेनियन्स, स्पार्टन्स, आर्केडियन्स, मॅसेडोनियन्स – प्रत्येक ग्रीक राज्यांमध्ये डेल्फीवर आपली छाप पाडण्याची स्पर्धाच असायची. भव्य पुतळे, सभागृहं, स्तंभ अशा अनेक डोळे दिपवणाऱ्या भेटींचा वर्षाव डेल्फीवर व्हायचा. युद्धातले विजय, नवीन राज्यारोहण, डेल्फीतील खेळांच्या स्पर्धा, अपोलोचा उत्सव अशा प्रत्येक प्रसंगाची आठवण म्हणून देवस्थानाला भेटी दिल्या जात असत. एका राज्याने मोठी भेट दिली की दुसऱ्याने त्यापेक्षा काहीतरी आगळेवेगळे करायचा प्रयत्न केलाच म्हणून समजा. डेल्फीचा डोंगर चढताना प्रत्येक वळणावर असलेले खजिन्यांची (treasury) बांधकामं देवस्थान किती संपन्न होते हे दर्शवते. इतकं करूनही आपलं भविष्य ऐकण्याची संधी मिळण्याची खात्री नाही ती नाहीच!!!
प्रत्यक्ष भविष्यकथनाच्या दिवशी व्रतस्थ पिथिया देवळातल्या एका विशिष्ट गाभाऱ्यात एका तिपईवर बसून काव्यात्म वाणीत भविष्य सांगत असे. असं म्हणतात की या गाभाऱ्यात एक विवर होते ज्यातील वाफ किंवा धुरामुळे ओरॅकल संमोहीत होत असे आणि तिच्याकरवी देव अपोलो स्वतः भविष्य वर्तवत असे. त्या काव्याचा अर्थ लावण्याचे काम तिच्या इतर सहकाऱ्यांकडे असे.
मंदिराच्या दर्शनी भागात ही वाक्यं कोरलेली होती……
γνῶθι σεαυτόν – Know Thyself – स्वतःला ओळखा
Μηδὲν ἄγαν – Nothing in Excess – (गरजेपेक्षा) जास्त नाही.
डेल्फी (Delphi) मोठं का होतं याची खूण ही वाक्यं पटवून देतात. महत्वाकांक्षेपायी डेल्फीच्या पायरीवर येणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तीला त्याच्या क्षणिक अस्तीत्वाची जाणीव करुन देणारी वाक्यं………..
डेल्फी केवळ गुढ भविष्य सांगणारी जादूची गुहा नव्हती तर ज्ञानाचा प्रकाश देणारी अपोलोची शाळा होती. डेल्फीच्या पुजारीणी जितक्या लहरी तितक्याच बुद्धीमान आणि द्रष्ट्या होत्या. निर्भिडपणे सत्य सांगणाऱ्या होत्या. स्वतःच्या आईला ठार मारणाऱ्या रोमन सम्राट नीरोला ‘तुझं येणं मंदिराला लांच्छनास्पद आहे, चालता हो’ असं स्पष्टपणे सांगण्याची धमक त्यांच्या अंगी होती. निरोने त्याच पुजारीणीला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली. याची पुरेपुर जाणीव असूनही मंदिराच्या लौकीकाला बाधा येईल असं वर्तन त्यांनी केलं नाही.

डोंगरमाथ्यावर वसलेले हेच ते अपोलोचे मंदीर आणि जगाचा मध्यभाग (नाभी)
पायथ्याशी आलेल्या जातकांचा पहिला स्टॉप…
पायथ्याशी असणाऱ्या याच खोल्यांमध्ये (Chambers) जातकांची वर्गवारी, प्राथमिक शिक्षण आणि प्रश्न लिहून देणाऱ्या पाट्या (Tablet!!) इ. कार्ये होत. व्हीआयपी भक्तांची रांग निराळी असे!!!!
मुख्य देवळाकडे जाणारी चढण, याच्या प्रत्येक वळणावर एक किंवा अधिक खजिने (Treasury) बांधलेले असत. बांधणाऱ्या राज्याच्या किंवा राजाच्या नावाने हे खजिने ओळखले जात.
भविष्याचा प्राचीन मार्ग चढताना आधुनिक भाविक. वळणावर खजिन्याचे बांधकाम दिसतंय
ही अथेन्सवासीयांच्या खजिन्याची इमारत (Treasury of Athenians)
असे अनेक शिलालेख वाटेत उभे असत. डेल्फीची वारी केलेल्यांची, तत्कालीन व्यवस्थेची माहीती यातून मिळते. काही शिलालेखात गुलामांंना स्वातंत्र्य दिल्याचेही उल्लेख आहेत, अगदी गुलामांच्या आणि मालकांच्या नावासकट
सर्पस्तंभ – २७ फूट उंचीचा, ३ सापांच्या वेटोळ्याचा विजयस्तंभ. प्लॅटीया (Plataea) येथल्या पर्शियन युद्धातील विजयाची खूण. या स्तंभावर युद्धात मदत केलेल्या गावांची नावे कोरली आहेत. मूळ स्तंभ रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने उखडून नेला जो आताच्या इस्तंबूलमध्ये आहे. स्तंभाच्या टोकावर ३ सापांनी उचलून धरलेले त्रिकोणी पात्र होते. पिथिया बसायला वापरत असे त्या प्रकारचे
अपोलोच्या मंदिराचा दर्शनी भाग!! यात्रेचा अंतिम टप्पा….
भवितव्याचं गुढ उकलण्याचं प्रवेशद्वार….. यावरूनच मुख्य मंदिरात प्रवेश केला जाई… अनेक थोर सम्राट, विद्वान आणि प्रशासकांना खुणावणारी वाट.
मुख्य मंदिराचे स्तंभ. याच परीसरात डेल्फीची प्रसिद्ध वाक्यं कोरलेली होती..
गर्भगृहाच्या बाजूने प्रवेशद्वाराचे दृष्य….
देवस्थान म्हटलं की उत्सव आलाच…. नाट्य, नृत्य आणि खेळही आलेच…. डेल्फीचं थिएटर
पाच हजार प्रेक्षकांना सामावून घेणारं थिएटर, येथे बसल्यावर पुढील मंदिराचं आणि डोंगराचंही दर्शन होतं.
डेल्फीच्या थिएटरपासून दिसणारा संपूर्ण मंदिराचा विहंगम देखावा…
डेल्फीतल्या उत्खननात सापडलेले पृथ्वीच्या मध्यभागाचे – नाभीचे संगमरवरी शिल्प. काळ अज्ञात
असं मानतात की नाभीचं शिल्प या अप्सरांच्या डोक्यावर उभं असावं काळ इ.स.पु. ३७३
उत्खननात मिळालेले अपोलो आणि अर्टेमिस (चंद्र, शिकार इ. ची ग्रीक देवता) यांच्या पुतळ्यांचे अलंकृत अवशेष
बैलाच्या चांदीच्या पुतळ्याचे अवशेष……
सहा फूट उंचीचा, रथांची शर्यत जिंकलेल्या सारथ्याचा ब्रॉन्झचा पुतळा. इ.स.पू. ४७५ डेल्फीतल्या उत्खननाच्या पहिल्या काही प्रयत्नातले यश… त्याच्या डोळ्याचा, दातांचा आणि शिरपेचाचा भाग चांदीचा आहे. त्याचा रथ आणि घोडे मिळाले नाहीत पण लगाम आणि त्याची पकड कलेचा अप्रतिम नमुना आहेत.
स्फिंक्स – हो, आपली इजिप्तवालीच …. पण स्त्रीचं मुख, पक्षाचे उभे पंख आणि सिंहाचे धड…. डेल्फीच्या देवळाच्या जवळ उभ्या केलेल्या १० मीटर उंच स्तंभावर हे २.२ मीटर उंचीचं शिल्प उभं होतं. इ.स.पू ५६० … पायाखाली स्तंभाचा अवशिष्ट भाग….
प्लुटार्क की प्लेटो!? इ.स.पू. १९०
डेल्फीच्या देवस्थानाचा संपूर्ण आराखडा (दोन भागात मिळून) . पायथा आणि मुख्य मंदिर लाल रेघेने अधोरेखित केले आहे. मार्गावरील लहान लहान चौकोनी इमारती या खजिन्याच्या (Treasury) आहेत.

मागील भाग – ॲक्रॉप्लिस – अथेन्स पुढील भाग – संस्कृतीचे स्तंभ – अथेन्स

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

ज्ञानपीठ अथेन्स – भाग १

ग्रीस…. शालेय अभ्यासातील जवळपास प्रत्येक विषयाचा किंवा विषयाच्या नावाचा उगम ज्या देशात झाला असे आपण वाचतो असा देश म्हणजे ग्रीस (Greece). युरोपीय आणि पर्यायाने जगाच्या संस्कृतीवर ज्याची छाप आहे असा देश. गंमतीचा भाग म्हणजे, युरोप हिंडवणाऱ्या एकाच छापाच्या जवळपास सर्व टुरांमधील शेकडा दहा टुर्समध्येही ग्रीसचा समावेशच नसतो किंवा असलाच तर अतिशय त्रोटक असतो. युरोप टुर म्हणजे लंडन, पॅरीस, रोम, व्हेनिस, फारतर प्राग आणि व्हिएन्ना इ. असे साधारणपणे मानले जाते. या सर्व शहरांना पुरुन उरेल इतकी माया केवळ एकट्या ग्रीसमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
थक्क करून टाकतील इतक्या प्रेक्षणीय, वाचनीय, श्रवणीय आणि अर्थातच वंदनीय (अभ्यासकांसाठी) गोष्टींचं आगार म्हणजे ग्रीस. पाश्चात्य साहित्य, संगीत, कला, राजकारण, विज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान सगळ्यांचे उगमस्थान… तात्पर्य, शास्त्रापासून शस्त्रापर्यंत पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रत्येक अंगाचा उगम आणि विकास ग्रीकांपासून झाला. सॉक्रेटीस (Socrates), प्लेटो (Plato), ॲरिस्टॉटल (Aristotle), सोफोक्लिस (Sophocles), युरिपिडिस (Euripides), अरिस्टोफेनस (Aristophanes), पायथागोरस (Pythagoras), हेराक्लिटस् (Heraclitus), डेमॉक्रेटस (Democritus)…….. नुसती नावं जरी घेतली तरी ग्रीसच्या भव्य परंपरेची दबदबा जाणवायला लागतो.
अथेन्स (Athens) या ग्रीसच्या मानबिंदुची ही १० दिवसांची भेट. १० दिवसात अथेन्स (Athens) पाहणे म्हणजे पाच ओळीत महाभारत बसविण्याइतकं सोपं!!! ३० च्या आसपास तर नुसती खरोखर बघण्यासारखी म्युझियम्स आहेत. प्रत्यक्ष पुरातन अवशेष मोजायचे झाले तर त्यातच दहा दिवस जातील. असो….
चतुरंग अथेन्स पाहण्याचा निदान प्रयत्न केला हे त्यातल्या त्यात समाधान.पाहुयात हे १० दिवस नीट मांडता येतात का ते.

ॲक्रॉप्लिस (Acropolis)

ग्रीक भाषेत गावातील सगळ्यात उंच भागाला ॲक्रॉप्लिस म्हणतात. त्यातली प्रसिद्ध म्हणजे अथेन्सची टेकडी कारण अर्थातच त्यावरचे पार्थेनॉन…(Parthenon) म्हणजे अथेन्स च्या ग्रामदेवतेचे अथेना/अथिना (Athena) चे मंदिर.
(हो ग्रीकही भारतीयांसारखे देऊळवाले होते. देवपूजा, नैवेद्य, नवस करण्यापासून ते पार बळी देण्यापर्यंत सगळं सेम!!!)

दुरुन (आणि जवळूनही) साजरा डोंगर – ॲक्रॉप्लिस अथेन्स

पार्थेनॉन (Parthenon)

इ.स.पु ४८० च्या आसपास पर्शियन (आजचे इराणी) आक्रमकांच्या स्वारीत जुने पार्थेनॉन मंदीर ध्वस्त झाले. तेव्हा त्याच जागी नवे आणि अधिक भव्य मंदिर बांधायचे अथेन्सवासीयांनी ठरवले.
साधारण २२८ फूट लांब आणि १०१ फूट रुंद अशा आयताकृती चौथऱ्यावर ६ फूट व्यासाचे आणि ३४ फूट उंचीचे ४६ खांब हे भव्य मंदिर घेऊन उभे आहेत. असेच काही खांब आतल्या भागातही होते. कठीण असा संगमरवरी दगड कातून अजोड वाटावेत असे मजबूत स्तंभ रचणं हा एक चमत्कारच वाटतो. असे तब्बल १३,४०० दगड वापरून हे मंदिर उभं केलं आहे. असं म्हणतात की संपूर्ण संगमरवरात बांधलेल्या या मंदिरात मंदिराइतकीच उत्तुंग अशी देवी अथेनाची सोन्याची(?) मुर्ती होती.
कठीण दगड आणि भक्कम बांधकामामुळे युद्धजन्य परीस्थिती असूनही अनेक वर्ष पार्थेनॉन टिकून राहीलं. थोडीफार पडझड आणि बदल होत राहिले. रोमन लोकांनी काही काळ त्याचं चर्चमध्ये रुपांतर केलं तर ऑटोमॉन तुर्कांनी त्यांच्या काळात मशिद केली!! १६८७ मध्ये एका युद्धात याच तुर्कांनी देवळाचा उपयोग दारूगोळ्याचं कोठार म्हणून केला. शत्रुचा एक तोफगोळा याच कोठारावर नेमका पडला आणि पार्थेनॉनचं छत आणि बऱ्याचशा भागाच्या ठिकऱ्या उडाल्या. त्यातूनही उरलेला भाग उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून टिकून होता.

खेदाची गोष्ट म्हणजे त्यातील काही अत्यंत मौल्यवान व दुर्मिळ शिल्पे इ.स. १८०३ च्या आसपास एल्जिन (Elgin) नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने खोटी कागदपत्रे सादर करून, चक्क खोदून इंग्लंडला नेली आणि आपली वैयक्तिक मालमत्ता म्हणून घरी ठेवली!! नंतर काही कारणास्तव त्याला म्हणे ती विकावी लागली. म्हणून मग इंग्रज सरकारने ती विकत घेतली आणि लंडनच्या म्युझियमध्ये ठेवली!! आजही एल्जिन मार्बल्स (Elgin Marbles) म्हणून ही शिल्पे प्रसिद्ध आहेत. जगभरातून लुटुन आणलेल्या मालाचं प्रदर्शन भरवायचं आणि ती लुट तिकिट लावून मूळ मालकांनाच दाखवायची याला म्हणतात व्यवसायिक चातूर्य (मराठीत बिझनेस सेन्स)!! अर्थात भारतीयांसाठी यात नवल ते काय?!! अर्ध ब्रिटिश म्युझियम आणि लुव्र अशाच वस्तूंनी तर भरलंय!!!) असो….

ग्रीकांनी स्वातंत्र्योत्तर काळात पार्थेनॉनमधील सगळे नवे बदल चर्च, मशिद वगैरे हटवून त्याचं मूळ स्वरूप उभं केलं, तेही वास्तूला कोणताही धोका न पोचवता. आज आपल्याला दिसतं ते मंदिर हे कोणतेही बदल नसलेलं आणि फरक न केलेलं अवशिष्ट मुळ बांधकाम आहे.

पार्थेनॉन…. पाहताच क्षणी भुरळ पाडणारं पहिलंच भव्य दर्शन
मंदिराचा पूर्वेकडील त्रिकोणी दर्शनी भाग आणि शिल्लक राहीलेले शिल्प. मूळ शिल्पसमूह खालील चित्रात.
डावीकडील बसलेला पुतळा सोडला तर बाकी शिल्प खोदून नेले. ही प्रतिकृती आहे. मूळ शिल्प आता ब्रिटिश म्युझियमध्ये आहे.
भव्यता अधोरेखित करणारे खांब डोरिक (Doric) शैली
देवळाच्या बाह्य आणि गर्भगृहातील खांब
निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर पार्थनॉनचे संगमरवरी खांब अधिक खुलुन दिसतात!
पार्थेनॉनची म्युझियममधली प्रतिकृती

ॲक्रोपोलिस ही अथेन्सवासीयांची केवळ उपासनेची नव्हे तर उत्सवाचीही जागा होती. त्यामुळे केवळ पार्थनॉनच नव्हे तर इतर काही मंदिरे आणि मनोरंजनाची ठिकाणेही या परीसरात उभी केली गेली.

एरेक्थिऑन (Erechtheion)

ॲक्रॉप्लिसच्या उत्तरेला अथेना (Athena) आणि पोसायडन (Poseidon) या देवांना समर्पित केलेले हे मंदिर आहे. रचना पार्थेनॉनशी मिळती जुळती असली तरी याचे एक प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे अप्सरांचे स्तंभ (Porch of the Caryatids). मंदिराच्या दक्षिणेकडचा भार सांभाळणारे खांब हे सहा वस्त्रांकित अप्सरांच्या प्रतिमा आहेत. जणूकाही त्या अप्सरांनी हा भाग डोक्यावर पेलला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अप्सरा एक शिल्प म्हणून वेगळी आहे. प्रत्येकीची चेहेरपट्टी,वस्त्र,केशभूषा इतरांपेक्षा आगळी आहे.
मूळ आराखड्यात एकूण सहा अप्सरा असल्याचे स्पष्ट दिसते. त्यातील सहाही अप्सरांच्या प्रतिकृती सध्याच्या मंदिरात जोडलेल्या आहेत.ॲक्रॉप्लिसच्या म्युझियममध्ये मूळ पाच अप्सरास्तंभ पहायला मिळतात. सहावा स्तंभ एल्जिनने (Elgin) इंग्लंडला नेला, तो आता ब्रिटिश म्युझियमध्ये आहे. त्याचा रिकामा पाया ॲक्रॉप्लिसच्या म्यझियममध्येच आहे!

एरेक्थिऑन (Erechtheion) आणि पार्थेनॉन (Parthenon) दोन्ही मंदिरांचे एकत्रित दृष्य दाखवणाऱ्या या भागातही देवी अथेनाचा एक पुतळा होता असे म्हणतात.

डिओनिसिसचे सभागृह ( Theatre of Dionysus )

ॲक्रॉप्लिसच्या दक्षिणेकडील उताराच्या शेवटी एक उघडे नाट्यगृह आहे. डिओनिसिस (Dionysus) हा ग्रीकांचा द्राक्ष आणि वाईनचा देव. याच सभागृहात त्याचा उत्सव अथेन्सवासी साजरा करत असत. त्यात अनेक नाटकांचे आणि नृत्यांचे प्रयोग होत आणि विजेत्यांना पारितोषकेही दिली जात. सोफोक्लिस (Sophocles), अरिस्टोफेनस (Aristophanes), युरिपिडिस (Euripides) यांची गाजलेली नाटकं येथे प्रदर्शित केली गेली. असं म्हणतात की सोफोक्लिसने जवळपास १८ वेळा येथे स्पर्धा जिंकल्या होत्या. इ.स.पू ६ व्या शतकापासून हे नाट्यगृह उभे आहे. त्यानंतर जवळजवळ इ.स. १ ल्या शतकापर्यंत प्रत्येक सत्ताकाळात त्यात कमीजास्त बदल केले गेले. आजचे स्वरूप हे रोमन कालापासूनचे आहे.

ॲक्रॉप्लिसवरून दिसणारे डिओनिसिसचे सभागृह ( Theatre of Dionysus )
सोफोक्लिसच्या इडिपस रेक्स चा प्रिमीयर याच रंगमंचावरून झाला
व्हीव्हीआयपी बैठक!!
सिनेटर्स आणि इतर मान्यवराची विशेष आसनव्यवस्था असणारी पहीली रांग

Odeon of Herodes Atticus (हिरोडस ॲट्टिकसचे प्रेक्षागार)

ॲक्रॉप्लिस संकुलातील सर्वात नवीन, म्हणजेच फक्त १८०० वर्षांपुर्वी बांधलेले हे प्रेक्षागार! ग्रीक राजकारणी हिरोडस ॲट्टिकसने (Herodes Atticus) आपल्या बायकोच्या स्मरणार्थ ही वास्तू इ.स. १६१ बांधली. जवळपास ५००० प्रेक्षक समावून घेणारे हे भव्य प्रेक्षागृह बांधताना आवाज आणि प्रतिध्वनीसाठी ॲक्रॉप्लिसचा उत्तम वापर करण्यात आला. नाट्यगृहाला समोरून तीन मजली भिंत आणि अत्यंत मौल्यवान लाकडाचे छतही होते जे आज नाही. हे नाट्यगृह आजही वापरात असून अनेक ऑपेरा आणि महोत्सव याच्या रंगमंचावर होतात.

ॲक्रॉप्लिसवरून दिसणारे हिरोडसचे थिएटर आणि दर्शनी भिंत
५००० लोक कवेत घेणारे मुग्धागार! टेकडीच्या वक्राकार भाग Echo Effect साठी वापरला आहे.
ऑपेराची तयारी चालू आहे!!
रंगमंचाच्या मागील संगमरवरी भिंत. ही ३ मजली होती. पोकळ कमानी अर्थातच ध्वनीप्रभावासाठी उपयुक्त
ऑपेराची तयारी होतेय!!
स्वर्गीय…..२००० वर्ष जुन्या थिएटरात प्रत्यक्ष ऑपेरा अनुभवताना!!!

अथेन्समध्ये कुठेही असलात तरी ॲक्रॉप्लिस (Acropolis) सहसा नजरेतून सुटत नाही. एका टेकडीवर संस्कृतीच्या इतक्या जिवंत पाऊलखुणा एकत्र क्वचितच पहायला मिळतात. पायथ्याशी अर्थातच ॲक्रॉप्लिसचं म्युझियम आहे ज्यात त्याचा पूर्ण आराखडा असलेले मॉडेल, अथेनाचे पुतळा (प्रतिकृती) आणि इतर अनेक वस्तु आणि अवशेष पहायला मिळतात. म्युझियम जेथे उभं केलंय त्या भागात पार्थेनॉनपूर्व आणि त्यापेक्षाही जुन्या काळाचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ते उत्खनन वरून पाहता यावं म्हणून त्या साईटच्या काही भागावर काचेचं छत टाकलंय. त्यातून पुरातन अवशेष प्रत्यक्ष पहायला मिळतात.
इतिहास अथेन्सच्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी !!.. सर्वत्र दडलेला आहे!!!! उर्वरीत अथेन्स आणि डेल्फी पुढील भागात…….

अक्रॉप्लिसचं मॉडेल. यातलं समोरचं छत असलेलं थिएटर हिरोडसचं आहे तर मागे डिओनिसिसचे. पार्थेनॉन, एरेक्थिऑन आणि सुरुवातीचे भव्य प्रवेशद्वार नजरेत सहज भरतात.
इ.स.२ ऱ्या शतकातला देवी अथेनाचा छोटा पुतळा. पार्थेनॉनमधील भव्य पुतळ्यातील जवळपास सगळी वैशिष्ट्ये या मूर्तीत आढळतात.
उत्खननात मिळालेले अवशेष, जमिनीत पाणी किंवा धान्य साठविण्यासाठी केलेेला खड्डा दिसत आहे.
घराची रचना

तळटीप –
१. सोफोक्लिस, अरिस्टोफेनस, युरिपिडिस – प्राचीन ग्रीक नाटककार. ॲरीस्टॉटलच्या Tragedy वरच्या प्रसिद्ध संस्करणात सोफोक्लिसच्या इडिपस रेक्स (Oedipus Rex) चे नाव प्राधान्याने येते.

पुढील भाग – गुढरम्य डेल्फी

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

वेदवाङ्मयाची थोरवी

If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.
And if I were to ask myself from what literature we, here in Europe, we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans, and of one Semitic race, the Jewish, may draw that corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal, in fact more truly human, a life, not for this life only, but a transfigured and eternal life—again I should point to India.1 ………..Friedrich Max Müller

मॅक्सम्युल्लर ने केम्ब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानातील या एका वाक्यातूनच वेद, वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती क्षितिजांवर विस्तारला होता हे लख्खपणे दिसते. केवळ तत्वज्ञानच नव्हे तर साहित्य, संगीत, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विद्याशाखांत मानवाने साधलेला समतोल पहायचा तर भारताकडे पहा असे तो म्हणतो. सर्वार्थाने पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा भारतीय भूमीला तो देतो.
एक पाश्चात्य विद्वान प्राचीन भारतीय भाषा आणि वाङ्मयाची बाजू इतकी पोटतिडकीने मांडतो हे विस्मयकारक आहे. त्याहीपेक्षा ज्या अर्थी तो ही बाजू मांडतोय त्या अर्थी आपण जुनं म्हणून दुर्लक्षित केलेल्या वाङ्मय तितकं टाकाऊ नक्कीच नसणार. बरं ही भाषणं तो पुराणातल्या गोष्टी ऐकायला आलेल्या भजनी मंडळातल्या बायकांसमोर देत नाहीये. केम्ब्रिज सारख्या मान्यवर विद्यापीठाने इ.स. १८८० च्या दशकात खास आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील भाषणांत त्याने हे उद्गार काढलेत. व्याख्यान ऐकणारे श्रोते केवळ पुस्तकी प्राध्यापक नव्हते. भारतात नुकतीच स्थिरावलेली इंग्रजी सत्ता राबवणारे मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी (Civil Servants) असे भारताशी प्रत्यक्ष संबंध येणारे आणि भारतात काम करणारे इंग्लिश लोकही त्यात होते.
भाषणात अनेक विषयांचा उल्लेख मॅक्सम्युल्लर करतो. जसे भूशास्त्र? (Geology), वनस्पतीशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology), मानवंशशास्त्र (Ethnology), पुरातत्वशास्त्र (Archaeology), नाणकशास्त्र (Numismatics), न्यायशास्त्र (Jurisprudence) आणि अर्थातच तत्वज्ञान (Philosophy). या आणि अशा अऩेक विद्यांच्या अभ्यासासाठी भारत ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे. केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे तर अनेक मार्गदर्शक तत्वांचा उगम या भूमीत होतो म्हणून भारताकडे पहावे असे तो सांगतो. इतकेच काय पण पाश्चात्य जगताच्या ज्ञानाचा उगम मानल्या जाणाऱ्या ग्रीसमधील्या अनेक बोधकथा, दंतकथा मूळच्या भारतीय बौद्ध आणि इतर संप्रदायातील असू शकतात असा तर्क तो मांडतो.
गेल्या आठ लेखात आपण वेद आणि वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. आपण हेही पाहिलं की केवळ अध्यात्म नव्हे तर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक विद्या शाखांचा विचार आणि अभ्यास प्राचीन भारतीय ऋषीमुनी करत होते हे ही वेदवाङ्मयात दिसून येते. वेदकालीन ऋषींनी मानव जीवनाशी संबंधीत जवळपास सर्व विषयांवर भाष्य केलेले आहे. यात शिकारीपासून ते शेतीपर्यंत, युद्धापासून ते वैद्यकापर्यंत आणि यज्ञापासून ते ज्योतिषापर्यंत अनेकविध विषय कौशल्याने हाताळले गेले आहेत. इतके की त्या विषयांचे सखोल ज्ञान या ऋषींना होते हे सहज कळून येते.
पण मग वैद्यक, ज्योतिष, तत्त्वज्ञान वगैरे विषयांवरील ग्रंथ पाश्चात्य संस्कृतीतही आहेतच की! आजच्या लेखात आपण इतकंच पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञानानी समृद्ध होणाऱ्या पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत असा काय फरक आहे की ज्यायोगे आज हजारो वर्षानंतरही जगभरातील विद्वान त्या वाङ्मयाचा अभ्यास करतात? केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकासारख्या अत्याधुनिक ज्ञानशाखातील संशोधकही कमी अधिक प्रमाणात वेदवाङ्मयाचा अभ्यास करतात. त्यांना मार्गदर्शक असे कोणते ज्ञान किंवा विचार वेदवाङ्मय पुरवते?
दृष्टिकोन……..
एखाद्या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून त्याची वेगळी विद्याशाखा बनवणे आणि त्याचा काटेकोर अभ्यास करणे ही तर पाश्चात्यांची देणगी आहे. अगदी उदाहरण द्यायचे तर आधुनिक विज्ञानाची कोणतीही शाखा घ्या, जसे जीवशास्त्र (Biology) या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून वनस्पतीशास्त्र(Botany), सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology), जनुकिय विज्ञान(Genetics) वगैरे विद्याशाखा पाश्चात्यांनी बनवल्या, त्याचे अभ्यासक्रम बनवले, पदव्या (मराठीत डिग्र्या!) निर्माण केल्या. वैद्यकातही डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची वेगळी शाखा बनवली. अगदी चव आणि गंध निर्माण करणारी शास्त्रेही विकसित केली गेली. वैज्ञानिक प्रगती हे ध्येय समोर ठेऊन विभागशः अनेक विद्याशाखा पाश्चात्यांनी दिल्या. अशा वैज्ञानिक प्रगतीचा मुख्य उद्देश अर्थातच मानव जातीचे कल्याण हा होता. मग तो उद्देश साधला गेला का? खरंतर नाही.
विज्ञान जितके अधिक प्रगल्भ आणि प्रगत झाले तितकेच ते संहारकही झाले. मानवजातीचे कल्याण हा मूळ उद्देश बाजूला पडला आणि मानवजात किंवा विशिष्ट मानव समुदायाला इतर समुदाय आणि जीवजंतूंपेक्षा अधिक शक्तीमान बनवणे हा स्वार्थी उद्देश प्रबळ झाला. वर्चस्वाच्या हव्यासापोटी विज्ञानाच्या शाखांची इतकी अजस्त्र वाढ झाली की प्रत्येक शाखा मानवाच्याच नव्हे संपूर्ण जीवसृष्टीच्या मुळावर उठावी इतकी संहारक होऊ लागली. आधी अण्वस्त्रे, मग रासायनिक अस्त्रे(Chemical Weapons), जैविक अस्त्रे(Biological Weapons) आणि आता तर जनुकिय तंत्रज्ञान (Genetics) यासारख्या अत्याधुनिक आयुधांनी मानवाच्या सुखापेक्षा चिंताच अधिक वाढवल्या. निसर्गाचा घटक म्हणून जन्माला आलेला मानव निसर्गावरच विजय मिळविण्याच्या अघोरी मार्गाला लागला आणि आता ते थांबवणे त्याच्या स्वतःच्याही हातात राहिले नाही. वैज्ञानिक प्रगती हा देशागणिक मानवी संस्कृतींच्या स्पर्धेचा विषय बनला. या स्पर्धेत टिकण्याची आणि जिंकण्याची इर्षा इतकी पराकोटीला गेली की मानवानेच त्याच्या आणि पर्यायाने पृथ्वीच्याही संहाराची बीजे पेरली. परीणामी आज आपण प्रदूषण(ध्वनी, वायु, पाणी आणि विचारसुद्धा), अस्त्र-शस्त्र, रोगराई, विकृत-दहशतवाद अशा अनेक समस्यांनी घेरलो गेलो आहोत.
समतोल…….
वैदिक ऋषीमुनी हे जसे तत्त्ववेत्ते होते तसेच शास्त्रवेत्तेही होते. वैज्ञानिक प्रगती वेदकाळातही होत होतीच. परंतु भारतीय शास्त्रवेत्त्यांचे मोठेपण यात आहे की त्यांनी या प्रगतीचा आणि निसर्गाचा योग्य समतोल राखणे महत्वाचे आहे हे जाणले आणि प्रत्येक शास्त्र हे विकसित होताना त्यातून निसर्ग, पर्यावरण आणि व्यापक सृष्टीशी माणसाची नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली. त्यांनी वैद्यक विकसित केले पण औषधांनी होणारे अनुषंगिक परीणाम (Side Effects) टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूनच. औषधी विकसित केल्या पण त्या नैसर्गिक तत्त्वांशी तादात्म्य बाळगून. त्यांनी आयुर्वेद हा निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे शास्त्र म्हणून विकसित केला. रोगांवर इलाज करण्याची पॅथी म्हणून नव्हे. त्यामुळे आहार(Diet), व्यायाम(Exercise), साधना (Meditation) आणि औषधी(Medicine) अशा सर्व अंगांनी समतोल साधणारी ज्ञानशाखा म्हणून आयुर्वेदाकडे पाहीले जाते. याच प्रकारे योग असो ज्योतिष असो किंवा अध्यात्म…..
प्रगती साधताना तिची दिशा आणि ध्येय हे एका सूत्रात बांधून निसर्गाच्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उद्दीष्ट्य साध्य करणे ही वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय शास्त्रांची देणगी आहे. विद्या, कला आणि तंत्र अतिरेकी अनियंत्रित आणि संहारक न होता विकसित करण्याचे तारतम्य वेदवाङ्मयाने जगाला शिकवले.
त्यामुळेच रसायनशास्त्र (Chemistry), पदार्थविज्ञान(Physics), वैद्यक(Medicine), जीवशास्त्र(Biology), वनस्पतीशास्त्र(Botany), धातुशास्त्र (Metallurgy) असो किंवा अगदी अणुविज्ञान (Automic Science), या सर्व शास्त्रांचा भारतीय भूमीतील उगम आणि विकास हा याच तत्त्वांना अनुसरुन झाला. तुकड्या तुकड्यात वेगवेगळी शास्त्रे म्हणून विकसित न होता ती कल्याणकारक आणि सर्वसमावेशक जीवनवेद म्हणून विकसित झाली. आपल्याला वेदांसह अनेक ग्रंथात हे सर्वच विषय कमीअधीक प्रमाणात आढळतात ते यामुळेच. जीवनाशी संबंधीत असे ज्ञान असल्याने त्याचा केवळ वेगळी विद्याशाखा म्हणून अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच ते ज्ञान सृष्टीचा समतोल राखण्यात किती यशस्वी ठरते हेही काटेकोरपणे अभ्यासणे गरजेचे मानले गेले. त्यामुळे शास्त्रे विकसितही झाली आणि त्यांची अनुषंगिक संहारकताही सीमीत केली गेली. वैज्ञानिक प्रगती आणि विवेकी तत्वज्ञान यांचा हा समतोल…..
आधुनिक जगात सातत्याने नवनवीन शोध लागत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे पण ते विवेकाने वापरण्याचे किंवा त्याचा गैरवापर टाळण्याचे शिक्षण देणारी मुल्यव्यवस्थाच अस्तीत्व हरवून बसली आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायरीगणीक आपण विनाशाच्या चिंतेने अधिकाधिक ग्रासले गेलो आहोत. हा विवेक जागवणारी आणि प्रसृत करणारी तत्वप्रणाली वेदवाङ्मयाने दिली.
सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भवेत्। किंवा
……सह नौ भुनक्तु।
किंवा
..वसुधैव कुटुम्बकम्। असो

यासारख्या प्रार्थनातून साधकाच्या मनावर हे तत्त्व कायम बिंबवले गेले की प्रत्येक कार्य, प्रत्येक पाऊल हे विश्वकल्याणाच्या हेतूतून उचलायचे आहे. संपुर्ण वसुधा (पृथ्वी) हे एकच कुटुंब आहे. यातील भूतमात्रांसह आपण सर्वजण एकाच साखळीतील कड्या आहोत. एक जरी कडी कमकुवत झाली तरी ही संपूर्ण साखळी दुर्बल होणार आहे. त्यामुळे प्रगती मग ती वैज्ञानिक असो तांत्रिक असो किंवा तात्त्विक तिच्यातून ही साखळी अधिक मजबूतच झाली पाहीजे. भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती, मानवी जीवन आणि निसर्ग तसेच पर्यायाने मन आणि शरीर यांचा समतोल साधला तरच ज्या सुखाच्या अपेक्षेने अधिकाधिक विकासाची ईर्षा आपण बाळगतो ते चिरंतन सुख प्राप्त होईल. हा विचार निःसंशयपणे प्राचीन भारतीय वेदवाङ्मयाने जगाला दिला.
तात्पर्य काय तर आज विकसनशील वगैरे शिक्का असलेल्या भारताने स्वतःच जगाला दिलेल्या विवेकी अभ्यासकाच्या भूमिकेत परत शिरुन आपल्याच प्राचीन वाङ्मयाचा आणि आधुनिक विद्यांचा तारतम्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. धर्मग्रंथ म्हणून नुसते अंधश्रद्धेने कवटाळून बसणे हे जसे चुकीचे आहे तसेच ते जुने कालबाह्य वाङ्मय म्हणून झिडकारणेही तितकेच चुकीचे आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिकेपेक्षा विवेकी वृत्तीने चतुरस्त्र अभ्यास करून वेद आणि वैदिक साहित्यातून मिळणारे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समारोपापुर्वी मॅक्सम्युल्लरच्या भाषणातील काही उतारे जसेच्या तसे वानगीदाखल देत आहे. त्याच्या भाषांतराची गरज पडू नये कारण अर्थातच आपल्याकडे इंग्रजी मराठीपेक्षा अधिक अभ्यासली जाते!!

If you care for geology, there is work for you from the Himalayas to Ceylon.
If you are a zoologist, think of Haeckel, who is just now rushing through Indian forests and dredging in Indian seas, and to whom his stay in India is like the realization of the brightest dream of his life.
The study of Mythology has assumed an entirely new character, chiefly owing to the light that has been thrown on it by the ancient Vedic Mythology of India. But though the foundation of a true Science of Mythology has been laid, all the detail has still to be worked out, and could be worked out nowhere better than in India.
Again, if you are a student of Jurisprudence, there is a history of law to be explored in India, very different from what is known of the history of law in Greece, in Rome, and in Germany, yet both by its contrasts and by its similarities full of suggestions to the student of Comparative Jurisprudence.
You know how some of the best talent and the noblest genius of our age has been devoted to the study of the development of the outward or material world, the growth of the earth, the first appearance of living cells, their combination and differentiation, leading up to the beginning of organic life, and its steady progress from the lowest to the highest stages. Is there not an inward and intellectual world also which has to be studied in its historical development, from the first appearance of predicative and demonstrative roots, their combination and differentiation, leading up to the beginning of rational thought in its steady progress from the lowest to the highest stages? And in that study of the history of the human mind, in that study of ourselves, of our true selves, India occupies a place second to no other country. Whatever sphere of the human mind you may select for your special study, whether it be language, or religion, or mythology, or philosophy, whether it be laws or customs, primitive art or primitive science, everywhere, you have to go to India, whether you like it or not, because some of the most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India, and in India only.

तळटीप:

1. INDIA: WHAT CAN IT TEACH US? (A Course of Lectures – DELIVERED BEFORE THE UNIVERSITY OF CAMBRIDGE BY – F. MAX MÜLLER, K.M.)

मागील भाग – ओळख वेदांची – आरण्यक ओळख वेदांची – समग्र लेखमाला

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

ओळख वेदांची – आरण्यक

आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.
पहिला अर्थ – अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘
दुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे – वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.

आरण्याध्ययनादेतद् आरण्यकमितिर्यते। अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते।
(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)

हे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ. अरण्यात माणूस कशासाठी जातो? शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके! हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.
आधीच्या भागात (वाचा – ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात.
(**जाता जाता हे ही सांगायला हवे की भाषिकदृष्ट्या पाहिल्यास आरण्यके ही वैदिक आणि लौकिक संस्कृत भाषेतीला दुवा मानली जातात)

रचना/स्वरूप

सर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे.
ऋग्वेद – ऐतरेय आरण्यक, शांखायन आरण्यक
शुक्लयजुर्वेद – माध्यंदिन बृहदारण्यक, काण्व बृहदारण्यक
(बृहदारण्यक हे वास्तविक आरण्यक आहे. परंतु त्याचा आकार, विषयव्याप्ती इ. अनेक कारणांमुळे त्याची गणना उपनिषदांमध्ये होते.)
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक
सामवेद – तवलाकर(तवल्कर?) (जैमिनीय) आरण्यक, छान्दोग्य आरण्यक
अथर्ववेदाची आरण्यके उपलब्ध नाहीत किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही नाही.

विषय

नवनीतं यथा दध्नो मलयाच्चंदनं यथा, आरण्यकं च वेदेभ्य ओषधिभ्योsमृतं यथा।
(साधारण अर्थ) – दह्याचे (सार) जसे लोणी, मलयवृक्षाचे (सार) जसे चंदन किंवा औषधी(वनस्पतीं)चे (सार) जसे अमृत तसे वेदांचे (सार) आरण्यकांमध्ये आहे.

महाभारतातील या श्लोकातील उक्ती योग्य की अतिशयोक्ती, यात न पडता जर अर्थ पाहिला तर आरण्यकांचा विषय आणि त्याचे महत्व दोन्ही लक्षात येते. वर सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्म आणि तत्वज्ञान हे आरण्यकांचे प्रमुख विषय आहेत. यज्ञातील विधी, त्यातील वैदिक मंत्र आणि त्यांचे तत्त्वज्ञान असा एक विषय आहे. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञ हे अनेक विधी, समारंभ इ. नी परीपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. आरण्यकातील यज्ञ मात्र अतिशय साधे व सोपे असून अरण्यवासी ऋषीमुनी किंवा सामान्य माणसालाही सहज साध्य आहेत.
सृष्टीची उत्पत्ती या विषयावर विस्तृत मंथन आरण्यकात आढळते. वेदांप्रमाणेच आरण्यकातही ‘प्राण’ याच तत्त्वाला दृष्य अदृष्य सृष्टी आणि महाभूतांचे मूळ मानले गेले आहे. ऐतरेय आरण्यकात –
स्थूल आणि सूक्ष्म सर्वकाही प्राण तत्वातून उगम पावते, अंतरीक्ष आणि वायुचेही सर्जन प्राणातूनच होते असे वर्णन आहे.

प्राणेन सृष्टावन्तरिक्षं च वायुच्क्षान्तरिक्षं वा……….। 2

मैत्रायणी संहितेत प्राण तत्वालाच सर्व तत्वांचा जनक म्हणले आहे.

त्वं ब्रह्म त्वं च वै विष्णुः, त्वं रुद्रस्त्वं प्रजापति। त्वमाग्नि वरुणो वायुः, त्वार्मन्द्रस्त्वं निशाकरः।

मनुष्यासह संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी प्राण हे एकच तत्व आहे. त्यामुळेच सृष्टीतील या सर्व घटकांशी सहभावनेने राहणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे हा विचार ऐतरेय आरण्यकात येतो. केवळ माणसा माणसात नव्हे तर सृष्टीच्या प्रत्येक दृष्य अदृष्य घटकातील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांच्यासह कृतज्ञभावनेने राहण्याचा आग्रह आरण्यके करतात. याच कर्तव्याचा विसर पडल्याने मनुष्याला आज पर्यावरण आणि निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागतोय. आजकाल पर्यावरण, प्रदुषण, वायु उत्सर्जन, कार्बन न्युट्रल वगैरे शब्द वापरून सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेल्या चळवळी ज्या गोष्टी घसा फोडून सांगत आहेत त्याचे मूळ तत्व आरण्यकात अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात उभं केलंय. आरण्यकात याच तत्वाला अनुसरुन पंचमहाभूत यज्ञाची कल्पना मांडली आहे. हे पाच यज्ञ किंवा त्याला अनुसरुन नेहमी वागले पाहिजे असे आरण्यकात आवर्जून सांगितले आहे

पंच वा एते महायज्ञः सतति प्रजायन्ते।3

हे यज्ञ म्हणजे केवळ हवन नसून वर सांगितल्याप्रमाणे चराचर सृष्टीशी बांधिलकी जपण्याचे कार्य आहे. ब्रह्मयज्ञ – ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
पितृयज्ञ – पूर्वज/पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
देवयज्ञ – देवतांबद्दल यज्ञाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
भूतयज्ञ – प्राणीमात्र आणि वनस्पतींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
अतिथियज्ञ – अभ्यागतांचा आदर करणे.

या यज्ञांच्या माध्यमातून भोवतालच्या परिसरासह पर्यावरणाशी एकरूप राहणे महत्वाचे आहे हे आज भयानक वास्तव म्हणून समोर आलेले ज्ञान आरण्यकांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. सृष्टीतील प्रत्येक तत्व जसे वायु, पाणी, अग्नि आणि वनस्पती यांचे महत्व जवळपास सर्व आरण्यकांमध्ये येते. वायुचे महत्व सांगताना अशुद्ध वायुमुळे आजारपण येते हे ऐतरेय आरण्यक सांगते. इतकेच नव्हे तर यज्ञातील समिधा निवडताना भोवतालचा वायु शुद्ध करणाऱ्या औदुंबर किंवा पळसासारख्या वनस्पती वापराव्यात असे सांगून यज्ञकर्माचेही महत्व स्पष्ट करते. यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.
अशाप्रकारे वेदवाङ्मय ही केवळ कोणत्याही एका धर्मासाठी किंवा विशिष्ट पंथासाठी रचलेली धार्मिक ग्रंथसंपदा नसून विश्वकल्याणाच्या उदात्त हेतून प्रेरित झालेल्या तत्कालिन ऋषीमुनीनी उभे केलेले जीवनकोश आहेत. वेदवाङ्मयाच्या महत्वाविषयी पुढील भागात……

तळटीप
१. महाभारत, शांतिपर्व ३३१-३
२. ऐतरेय आरण्यक २/१/७
३. तैत्तिरिय आरण्यक

मागील भाग – ओळख वेदांची – उपनिषद पुढील भाग – वेदवाङ्मयाची थोरवी

Copyright sheetaluwach.com 2020 #sheetaluwach

ओळख वेदांची – अथर्ववेद

हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।

सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.

पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात.

अथर्ववेद….

चार वेदातील अंतिम परंतु विषयांच्या विविधतेत ऋग्वेदाच्या तोडीचा वेद म्हणजे अथर्ववेद. रचनेच्या दृष्टीकोनातून आणि भाषिक वैशिष्ट्यांवरून अथर्ववेदाचा काळ आणि स्थान याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते अथर्ववेदाचे संकलन जरी ऋग्वेदोत्तर काळातील वाटले तरी त्यातली मंत्र ऋग्वेद काळापासून रचनेत होते असेही मानले जाते.

असाही एक विचारप्रवाह आहे जो असे मानतो की अथर्ववेद हा वेदच नाही. कारण अथर्ववेदातील यज्ञ सोडून इतर अनेक विषय जसे यातु विद्या किंवा अभिचार मंत्र हे वैदिक धर्म, परंपरा किंवा संस्कारांचा भाग नाहीत. यासाठी इतर काही ग्रंथातील दाखले दिले जातात जसे ‘त्रयोवेदा अजायन्त’ (ऐतरेय ब्राह्मण) , ‘वेद शून्यैस्त्रिभिरेति सूर्यः’ (तैत्तिरिय ब्राह्मण) किंवा ‘यम् ऋषयस्त्रयी विदो विदुः ऋचः सामानि यजुष’ (तैत्तिरिय ब्राह्मण). आपण अर्थातच त्या वादात पडण्याचे कारण नाही कारण त्याचे खंडन अनेक थोर विद्वानांनी केले आहे. आज अथर्ववेदाचे स्वरुप आणि त्याचे भारतीय ज्ञानशाखातील योगदान पाहता अथर्ववेद हा वेदच होता यात शंकाच उरत नाही.

अथर्व …..

‘थर्व’ या धातूपासून ‘थर्वन्’ हा शब्द तयार होतो. निरुक्तात याचा अर्थ गतीशील असा होतो. म्हणून अथर्वन् म्हणजेच – गतिहीन, निश्चल किंवा स्थिर. अथर्ववेद म्हणजे अढळ ज्ञान देणारा अशा अर्थाने हा शब्द येतो. अथर्वन् आणि अंगिरस ऋषींनी रचलेला म्हणून ‘अथर्वांगिरस’ असेही या वेदाचे नाव आहे. अथर्वन् ऋषीकुलाने यज्ञादी कर्मे तर अगिरसांनी अभिचारादि मंत्राची रचना केली असे मानतात. याशिवाय ब्रह्मवेद, छन्दोवेद, भैषज्यवेद, क्षत्रवेद अशी अनेक नावे अथर्ववेदाला दिली जातात.

एकाच वेदाची इतकी नावे येण्याचे मुख्य कारण म्हणजे या वेदात अंतर्भूत असलेले विषय. चारही वेदात सर्वात जास्त विविधता असलेला वेद म्हणजे अथर्ववेद. ब्रह्मज्ञानापासून ते शापापर्यंत, आयुष्यवर्धक मंत्रांपासून ते शत्रुनाशक सूक्तांपर्यंत, औषधी उपचारांपासून ते जादुटोण्यापर्यंत, शेती पासून ते राज्यकर्मापर्यंतचे आणि भूगोलापासून ते खगोलापर्यंत अनेकविध विषय अथर्ववेदात येतात. म्हणूनच तर एकाच वेळी आयुर्वेद, अर्थशास्त्र (राजनीती) आणि शिल्पशास्त्र असे तीन सर्वस्वी भिन्न विषय अथर्ववेदाला आपले उगमस्थान मानतात.

रचना….

अथर्ववेद हा वेदवाङ्मयातील एक असला तरी त्याची रचना ऋग्वेदाइतकी काटेकोर नाही. अथर्ववेदात अध्यायाऐवजी रामायणासारखा कांड हा शब्द वापरलाय. एकूण २० कांडे मिळून ७३१ सूक्ते आहेत, ज्यात साधारण ५९८७ मंत्र आहेत. यातील जवळपास १२०० मंत्र ऋग्वेदातले आहेत. अथर्ववेदात काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपात विवेचन आढळते हे त्याचे अजून वैशिष्ट्य आहे.

काय आहे अथर्ववेदात…

एकदा अथर्ववेदातील विषयांची नुसती सुची पाहिली तरी अथर्ववेदात काय नाही असे म्हणावे लागेल! वैदिक कालखंडातील जनजीवनाचा विश्वकोश म्हणजे अथर्ववेद आहे. त्याकाळातील तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, राज्यतंत्र, शेती, तंत्रज्ञान आणि वैद्यक या सर्वविषयांवर सविस्तर भाष्य अथर्ववेदात येते. अथर्ववेदातील विषयांची सूक्तवार लहानशी सूची पाहूयात म्हणजे अथर्ववेदाची व्याप्ती समजून येईल.

भैषज्यसूक्ते – अथर्ववेदातील या सूक्तात निरनिराळ्या ८९ रोगांची माहिती आणि त्यांची चिकित्सा सांगितली आहे. या मंत्रात औषधे, औषधी वनस्पती आणि पाण्याचे वर्णन आणि प्रशंसा आढळते. कौशिक सूक्तात या मंत्रांच्या सहाय्याने केल्या जाणा-या जादूटोण्याचे वर्णन आहे. दन्तपीडा (दातदुखी), अतिसार, कुष्ठरोग, यक्ष्मा (क्षय) असे असंख्य आणि आजही आपल्याला माहिती असणारे रोग यात येतात. भैषज्यसूक्तात अनेक किटक, किटाणु, भूत, राक्षस यांचीही वर्णने आहेत.

आपल्या माहितीतले सांगायचे तर आजच्या भाषेत ज्याला ‘ओपन फ्रॅक्चर’ (Open Fracture) म्हणतात त्याचीही चिकित्सा अथर्ववेदात आढळते. रोहीणी वनस्पतीच्या सहाय्याने ती जखम कशी बांधावी याचे साद्यंत वर्णन त्या सूक्तात आढळते.

आयुर्वेदाचे मुळ अथर्ववेदात आहे असे का म्हणतात ते आपल्याला यातून उमगते. केवळ उपचारच नव्हेत तर अनेक वनस्पतींचे औषधी उपयोग आणि त्यावरील मंत्रांवरून त्याकाळी वनस्पतीशास्त्र(Botany) हे ही अभ्यासाचा भाग होते हे लक्षात येते.

पौष्टिक सूक्त – सुखसमृद्धिसाठी करण्यात येणा-या प्रार्थना या सूक्तातून व्यक्त होतात. घर बांधताना, हंगामाच्या सरुवातीला शेतात नांगर धरताना, पेरणीच्या वेळी तसेच उत्तम पीक आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या समृद्धीसाठीच्या प्रार्थना या सूक्तात येतात.

आयुष्य सूक्त – स्वास्थ्य आणि दीर्घायुषी जीवनासंबंधित अनेक सूक्ते अथर्ववेदात येतात. या मंत्रातून निरोगी आणि शतायुषी जीवनाची प्रार्थना केली जात असे.

प्रायश्चित्त सूक्त – पाप किंवा अपराधाच्या क्षमापनार्थ करण्यात येणा-या प्रायश्चित्तांशी संबंधित मंत्र या सूक्तात येतात. केवळ पापच नव्हे तर यज्ञ करताना जर चूक झाली तर त्यावरील प्रायश्चित्त विधानेही या मंत्रात येतात. ग्रह किंवा नक्षत्रांना शांत करण्याचे मंत्रही या सूक्तात येतात.

स्त्रीकर्माणि सूक्त – विवाह संस्कार, त्याचे विधी तसेच पती पत्नीच्या परस्परप्रेमाची वाढ या विषयांवरील सूक्ताना स्त्रीकर्माणि सूक्ते म्हणता येईल. या मंत्राद्वारे वर किंवा वधू प्राप्त करता येईल असा विचार असे. याच सूक्तात असे अनेक मंत्र आहेत जे इन्द्रजाल, शाप, अभिशाप किंवा वशीकरण अशा विषयांशी संबंधित आहेत.

**(एकता कपूर किंवा झी मराठीच्या टि.व्ही सिरियलना उपयोगी पडतील असे पुरुष वशीकरण, सवतीचा नाश करणे, स्त्री-दुर्लक्षण निवारण अशा विषयांवरचे मंत्रही या सूक्तात येतात!)

राजकर्माणि सूक्ते – राजाच्या आणि राज्याच्या व्यवहारासंबंधी मंत्र या सूक्तात येतात. शत्रुवर विजय मिळविण्याची प्रार्थना करणारे, अस्त्र आणि शस्त्रांची माहिती देणारे मंत्रही यात आहेत.

अभिचारात्मक सूक्ते– अभिचार म्हणजे जादू. शत्रुचा नाश करणे, शत्रुने केलेली जादू परतावून लावणे, शत्रुच्या जादूटोण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, शत्रुपक्षात रोगाच्या साथी पसरवणे अशा अनेक विषयांवरचे मंत्र या सूक्तात येतात.

याच बरोबर पृथ्वीसूक्तासारखे मातृभूमीचे प्रेम दर्शवणारे नितांतसुंदर सूक्तही यात येते.

यज्ञिक सूक्त – दैनंदिन जीवनात केल्या जाणऱ्या पूजाअर्चा, उत्सवात केले जाणारे होम आणि इतर काही यज्ञांचे विधी या सूक्तांत येतात.

कुंताप सूक्त – अथर्ववेदाच्या २० व्या कांडात अनेक कूट आणि गूढ सूक्ते आहेत. अनेक कोडी आणि त्यांची उत्तरे, गूढ अर्थाचे मंत्र या सूक्तात येतात. ऋग्वेदातील अस्यवामीय किंवा नासदीयसूक्ताच्या तोडीची काही सूक्ते येथे आढळतात.

दार्शनिक सूक्त – ईश्वर, प्रजापति, ब्रह्म, मन, प्राण इ. वर भाष्य असणारे मंत्र या सूक्तांत येतात. गायीच्या रुपात केलेले ईश्वराचे वर्णनही या सूक्तात येते.

अशा प्रकारे अनेक रंजक, गुढ आणि अभ्यासपूर्ण विषयांचे उगमस्थान असणारा अथर्ववेद हा तत्कालिन समाजाचे चित्रण आणि आजच्या समाजाला मार्गदर्शन असे दोन्ही हेतू साध्य करतो.

उपसंहार

चारही वेदांच्या ओळख करून घेतल्यावर आपल्या लक्षात येते की केवळ चार धार्मिक पुस्तके इतकी संकुचित ओळख वेदांची नाही. समृद्ध, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी भारताची ओळख वेदांतूनच जगाला होते. वेद हे भारतीय संस्कृती आणि उपखंडतील ज्ञानाचे उगमस्थान आहेत. परमात्म्याचे तत्त्वज्ञान असो की आयुर्वेदाचे विज्ञान…… लौकीक आणि पारलौकीक जीवनाकडे अत्यंत जिज्ञासु वृत्तीने पहायला वेद शिकवतात. आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, शिल्प, पानक अशा अनेक शास्त्रांचा पाया वेदच रचतात. ऋग्वेदातले ऋषी आयुष्य निखळ आनंदाने जगतात, त्याचबरोबर त्याचे रहस्यही मांडतात. तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आपल्यालाही ते आयुष्य कसे जगता येईल ते समजावून सांगतात. रंग, रस, गंध, नाद आणि स्पर्श या सर्व अनुभुतीतून आयुष्याला आकार द्यायला वेद शिकवतात. जीवनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पहात त्याचा आनंद घेण्याचे तात्त्विक आणि शास्त्रीय ज्ञान वेदातून प्राप्त होते म्हणूनच हजारो वर्षानंतरही आज अनेक भारतीय आणि अभारतीय विद्वान वेदांचा अभ्यास करतात. वेदांच्या या ज्ञानशाखांबद्दल पुढील भागात……..

तळटिप

१. “अथर्वाणोsथर्वणवन्तः। थर्वतिश्चरतिकर्मा, तत्प्रतिषेधः।” (निरुक्तः–११.१८)
२. सं मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते पुरुषा परुः। अथर्ववेद पै. – ४/१५

मागील भाग – ओळख वेदांची -सामवेद पुढील भाग – ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – यजुर्वेद

ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.

यजुर्वेदातील मंत्रांना ‘यजु’ असे म्हणतात हे मंत्र गद्यात्मक आहेत. यजुर्वेदातले पद्यात्मक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. यज् या संस्कृत धातूपासून यजु शब्द तयार होते. यज् याचे तीन अर्थ पाणिनी सांगतो. देवाची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी व यजुंनी यज्ञ अशा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात आढळते.
यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक/ पुरोहीत असतो त्याला ऋत्विज असे म्हणतात. ऋत्विजांची वेदानुसार नावे अशी –
ऋग्वेद – होता (हे नाव आहे), यजुर्वेद – अध्वर्यु, सामवेद – उद्गाता, अथर्ववेद – ब्रह्मा. अध्वर्यु ज्या वेद मंत्रांचा प्रयोग करतात तोच यजुर्वेद म्हणून यजुर्वेदाला ‘अध्वर्युवेद’ असेही म्हणतात.

शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात. शुक्लयजुर्वेदात केवळ मंत्र आहेत तर कृष्णयजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहीती आहे.
कृष्णयजुर्वेदाच्या निर्मितीची एक कथा आहे. वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना वेदाचे शिक्षण दिले. परंतु दोघांमध्ये वेदार्थनिर्णयावरून काही वाद निर्माण झाला. वाद वाढल्यावर संतप्त झालेल्या वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवलक्यांनी ते ज्ञान ओकून टाकले. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी तित्तिर पक्षाचे रुप घेऊन ते ज्ञान ग्रहण केले. वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना जे ज्ञान दिले ती मूळ संहिता म्हणजे शुक्लयजुर्वेद तर तित्तिर पक्षांनी ग्रहण करून जे स्वीकारले ते ज्ञान म्हणजे कृष्ण यजुर्वेद असे मानतात. नवे व जुने ज्ञान आणि त्यांचे संपादन यामुळे यजुर्वेदाच्या काही शाखा आणि त्यांच्या संहिता निर्माण झाल्या जसे वाजसनेयी, तैत्तिरीय इ. याच्या अधिक तपशीलात न जाता आपण दोन्ही मिळून यजुर्वेदाची ओळख करून घेउ यात.

काय आहे यजुर्वेदात?…..
यजुर्वेदाची रचना अध्यायात केली आहे. एकूण ४० अध्याय आहेत. त्यात मुख्यत्वेकरून यज्ञासंबंधी माहिती आहे.

यज्ञ– यज्ञासाठी वेदी, कुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवन, हवनसामग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. गाईचे दूध काढणे, पाणी आणणे येथपासून ते यज्ञकुंडाची जागा, वेदी उभी करणे, यज्ञसाहित्य निवडणे, वेगवेगळ्या आहुति देणे येथपर्यंत प्रत्येक बारीक सारीक कृतींची माहीती यजुर्वेदात येते.
आपल्या ऐकण्यात विशेषकरून येणारे ‘अश्वमेध’ आणि ‘राजसूय’ (युधिष्ठिराने महाभारतात केलेला) हे यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. याखेरीज दर्श पूर्णमास (अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे याग/यज्ञ), अग्निष्टोम (पाच दिवसांचा मिनि यज्ञ), चातुर्मास्य, काम्येष्टी, वाजपेय, नक्षत्रेष्टि अशा अनेक छोट्या मोठ्या यज्ञांचा अंतर्भाव यजुर्वेदात होतो.

यजुर्वेदातील माहितीचा परीघ किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी यज्ञ ही काय संस्था होती हे पाहिले पाहिजे. त्याकाळातील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘यज’ याचा एक अर्थ एकत्र येणे असाही होतो. त्यामुळेच यज्ञ हा एक प्रकारचे सामाजिक समारंभ (मराठीत सोशल गॅदरींग) असे. यात विविध विधींसह अनेक मनोरंजक खेळ किंवा स्पर्धाही असत. जसे सामगायन असेल, रथांची शर्यत असेल, वाद्य वादन असेल अगदी पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींच्या नृत्यापासून ते रस्सीखेच सारख्या खेळांपर्यंत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम यज्ञात होत. यज्ञ हे संपुर्ण समाजाचे एकत्रिकरण करणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्यात एकी आणि समभाव वाढवणे आणि त्यांचे सर्वांगिण कल्याण साधणे अशी उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे साधन होते. हिलेब्रॅन्ट (Hillebrandt) सारखा विद्वान या खेळांची तुलना थेट ऑलिम्पिकशी (प्राचीन) करतो .

अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ करणारा राजा आहुति देताना म्हणत असे
आ ब्रह्म॑न् ब्राह्म॒णो ब्र॑ह्मवर्च॒सी जा॑यता॒मा रा॒ष्ट्रे रा॑ज॒न्यः शूर॑ इष॒व्योऽतिव्या॒धी म॑हार॒थो जा॑यतां॒ योगक्षे॒मो न॑: कल्पताम् ।।यजुर्वेद मा.वा संहिता अ २२.२२ ।।
संपूर्ण मंत्र मोठा आहे पण याचा अर्थ असा की – ‘ब्रह्मतेजाने संपन्न आणि शूर असे वीर आमच्या राष्ट्रात उत्पन्न होवोत, आमचा योगक्षेम (निर्वाह) उत्तम चालो.’

गोष्टी – यजुर्वेदाचा प्रमुख विषय यज्ञ असल्याने ऋग्वेदाइतक्या गोष्टी यजुर्वेदात नाहीत. पण निरनिराळ्या विषयांवरील काही आख्यायिका यजुर्वेदाच्या चर्चेत येतात. इंद्राने वायुदेवतेच्या मदतीने देवांच्या भाषेचे व्याकरण लिहिले अशी एक आख्यायिका यजुर्वेदात आहे. पुर्वी देव जी भाषा बोलत असत ती काहीशी नियमविरहीत किंवा व्याकरणरहीत होती. देवांच्या विनंतीवरून इंद्राने वायुदेवतेच्या सहाय्याने त्या भाषेला नियमबद्ध व व्याकृत केले असा उल्लेख यजुर्वेदात आहे.यजुर्वेदात मांडलेल्या विषयांचा विस्तारही यातून लक्षात येतो.

यजुर्वेदात आपल्या परीचयाचे काय आहे?…..

खुप काही…
आपण निरनिराळ्या वेळी ऐकलेला आणि वापरलेला –
भूर्भुव॒: स्व॒: तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।धियो॒ यो न॑: प्रचो॒दया॑त्। हा गायत्री मंत्र यजुर्वेदातला आहे. (अध्याय ३६, मंत्र ३)

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑ति हवामहे। हा अजून एक माहितीतला मंत्र यजुर्वेदातीलच आहे. (अध्याय२३-मंत्र १९)

आपण घरी किंवा महादेवाच्या देवळात ऐकलेले ‘रुद्र पठण’ हे यजुर्वेदातील आहे. (अध्याय १६)

भाषेतील चमत्कृती म्हणून सांगायचे तर वाजपेय या यज्ञात सहभागी असणारे किंवा तो यज्ञ करणारे म्हणून ‘वाजपेयी’ हे नाव रुढ झाले.

हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला हे ही जाता जाता सांगायला हरकत नाही.

तत्त्वज्ञान –
वैदिकांच्या कर्मकांडाचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि त्याचे व्यापक तत्त्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व म्हणजे ४० अध्यायात येतेच. विशेषतः आपल्याला माहिती असलेला भाग म्हणजे ‘ईशावास्योपनिषद’ जे यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा ४० वा अध्याय आहे.
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।
या प्रसिद्ध मंत्रातून परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने संग्रह न करता आवश्यकतेनुसार पदार्थांचा उपभोग घ्यावा असा उपदेश केला आहे.

अशाप्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद… अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली (मराठीत वर्क लाईफ बॅलन्स) शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे.

तळटीप
१. यज देवपूजा – संगतिकरण – दानेषु (अष्टाध्यायी ३.३.९०)
२. यजुर्भिः सामभिः यत् एनम् ऋग्भिः शंसन्ति यजुर्भिः यजन्ति सामभिः स्तुवन्ति ।निरुक्त १३.७।
३. Alfred Hillebrandt एक जर्मन विद्वान त्याच्या Vedische Mythologie (१, २४७) या पुस्तकात हा उल्लेख आढळतो.
४. तैत्तिरिय संहिता ७/४

मागील भाग – ओळख वेदांची – ऋग्वेद                                                        पुढील भाग – ओळख वेदांची – सामवेद 

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – ऋग्वेद

ऋग्वेद – वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!

वेद खरोखर इतके अगम्य आणि अवघड आहेत का? नक्कीच नाहीत. एकाच वेळी अत्युच्च दर्जाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदांसारखे दुसरे ग्रंथ सापडणे खरोखर कठीण आहे. केवळ अगम्य धार्मिक पुस्तके इतके तोकडे स्वरूप वेदांचे नक्की नाही.अत्यंत सुंदर प्रार्थना, रसाळ कथा, मजेदार वर्णने, कलाकुसर, तत्कालीन तंत्रज्ञान, चालीरिती, समारंभ आणि अर्थातच गहन तत्त्वज्ञान हे सर्वकाही वेदात आढळते. या लेखमालेत सर्वप्रथम वेद आणि वेदवाङ्मयाची प्राथमिक माहिती करून देणे हा उद्देश आहे.

आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला असा वाक्प्रचार खुपदा ऐकण्यात येतो. या चौदा विद्या कोणत्या?

४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्रे अशा एकूण चौदा विद्या किंवा विद्याशाखा होत. यातील वेद सोडून इतर ग्रंथ तूर्तास दूर ठेऊयात.

संस्कृतात विद् म्हणजे जाणणे, वेद हा शब्द येथून उगम पावला. वेद ४ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.

ऋग्वेद

ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद किंवा ऋचांनी बनलेला वेद. देवतांना आवाहन करण्यासाठीच्या मंत्रांना (आजच्या भाषेत श्लोकांना) ऋक् किंवा ऋचा असे म्हणता येईल.

ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे ज्या मंत्रातून ऋषींची कामना पूर्णपणे व्यक्त होते असा ऋचांचा समूह (आजच्या भाषेत स्तोत्र). ऋषीसूक्त, देवतासूक्त, अर्थसूक्त आणि छंदसूक्त असे सूक्तांचे प्रकार आहेत. ऋग्वेदात जवळजवळ अशी १०२८ सूक्ते (स्तोत्रे) आहेत एकूण ऋचांची संख्या ही १०५८० इतकी भरते.

हे सर्व मंत्र एकाच ऋषींनी रचले का? अर्थातच नाही. असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले आणि त्यांनी ते परंपरेने जपले. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हणजेच पुरुषाने (माणसाने) न रचलेले असेही म्हणतात.

आजच्या व्हॉटसॅप आणि फेसबुकच्या युगात एखादी माहिती किंवा बातमी जर सकाळी सांगितली तर संध्याकाळपर्यंत त्याला इतके फाटे फुटतात की खरं खोटं तर दूर मूळ बातमी काय होती हे ही विसरायला होतं! अशा वेळी ऋग्वेदासारखा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी जसा रचला गेला तसाचा तसा बदल न होता आपल्यापर्यंत पोचलाच कसा? याचे उत्तर ऋग्वेदाच्या रचनेत आहे. असे म्हणतात की ऋग्वेदाच्या रचनेच्या काळात लेखनकलाच अस्तीत्त्वात नव्हती. शाकल (शाकाल नव्हे!) सारख्या ऋषींनी ऋग्वेदाची रचना आणि पठणाच्या पद्धतींची मांडणी अशा पद्धतीने केली की त्यात कोणताही पाठभेदच होणार नाहीत.

आता ऋग्वेदाची रचना थोडी समजाऊन घेऊ. ऋग्वेदात १० मंडले आहेत. मंडल म्हणजे अध्यायासारखे विभाग. प्रत्येक मंडलाला नाव आहे. २ ते ८ ही मंडले ऋषींच्या नावाने आहेत. यात त्या त्या ऋषीकुलातील ऋषींचे मंत्र आहेत. १ले आणि १० वे मंडल संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या ऋषींच्या मंत्रांचे आहे. ९ व्या मंडलात केवळ सोमरसावरची निरनिराळ्या ऋषींची सूक्ते येतात. ही दहा मंडले खालील प्रमाणे. १) संमिश्र २) गृत्समद ३) विश्वामित्र ४) वामदेव ५) अत्रि ६) भरद्वाज ७)वसिष्ठ ८) कण्व व अंगिरस(?) ९) पवमानसोम (संमिश्र) १०) संमिश्र

प्रत्येक मंडलातील सूक्ते ही देवता, शब्दसंख्या इ च्या पूर्वनिश्चित क्रमाने येतात त्यामुळे त्यातही मागेपुढे होण्याचा संभव नाही.

काय आहे या सूक्तात?…….

गोष्टी! चांदोबातसुद्धा नसतील इतक्या रंजक कथा ऋग्वेदात आहेत. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापसातल्या संवादाच्या, सण समारंभांच्या, भक्तीच्या, युद्धांच्या, धर्माच्या अगदी लग्न, शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात आढळतात.

तत्त्वज्ञान…. ऋग्वेदात जितके तत्कालिन समाजजीवनाचे प्रतिबिंब आढळते तितकेच तत्कालिन मानवाच्या प्रगल्भ तत्वचिंतनाचेही. सृष्टीची उत्पत्ती, जडणघडण, चलनवलन, देवतांचे स्वरूप, नश्वर तसेच शाश्वत तत्त्वे, परमात्मा अशा अनेक गुढ विषयांवरचे चिंतनही ऋग्वेदातील सूक्तांत आढळते.

देवता
उषा, अश्विनौ, भग, पूषन्, अर्यमा, सोमरस, सूर्य, सविता, रुद्र, सोम (ग्रह), ब्रह्मणस्पती, अदिती, इंद्र, मरुत्, मित्रावरुण अशा अनेक देवतांची स्तुती ऋग्वेदातले मंत्र करतात. त्याकाळी देवतास्वरुपात प्रामुख्याने निसर्गाच्या विविध रुपांची पुजा केली जात असे. अशा देवतांना आवाहन करणारी, त्यांची स्तुती करणारी अनेक सूक्ते ऋग्वेदात आहेत. एकाच देवतेच्या संदर्भात येणा-या मंत्रांच्या गटाला देवतासूक्त म्हणतात.

ऋग्वेदातील अनेक मंत्र आपल्या परिचयाचे आहेत पण ते ऋग्वेदातले आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो. उदाहरणार्थ

आपल्याकडे हिंदी किंवा मराठी मालिकांमध्ये बारशापासून ते अंत्येष्टीपर्यंत काहीही मंगल अमंगल कार्य असले की ते भटजी एक मंत्र म्हणताना दाखवतात, ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः….’ हा ऋग्वेदातला मंत्र आहे. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणा-या ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या १० मंत्रांचा तो समूह आहे.

पुर्वी दुरदर्शनवर लागणा-या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत (मराठीत टायटल सॉंग!) आठवतंय का? ‘पृथ्वीसे पहीले सत नही था……’ ऋग्वेदातल्या नासदीयसूक्ताचे ते भाषांतरीत गाणं होतं. ऋग्वेदातल्या काही गोष्टीही या मालिकेत दाखवल्या होत्या… सृष्टीच्या उत्पत्तीविषयक गुढ चर्चा करणारे हे सूक्त आहे.

याचप्रकारे पुरुषसूक्तासारखे आपल्या ऐकण्यातले सूक्त हे ही ऋग्वेदातलेच आहे.भारतीय नौदलाचे ‘शं नो वरूणः’ हे बोधवाक्यही ऋग्वेदातलेच आहे.

एकुण काय तर वेद हे अपौरुषेय आहेत की नाहीत हा मुद्दा वादाचा असला तरी ते अगम्य आणि अज्ञेय नक्कीत नाहीत.. यजुर्वेदासह इतर वेदांबद्दल पुढील भागात……

तळटिप

१. ऋचां समूहो ऋग्वेदः। २. ऋच्यते – स्तूयते प्रतिपाद्यः अर्थः यथा या ऋक् ३. अपौरुषेयम् वाक्यं वेद। – सायण

पुढील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद ओळख वेदांची – समग्र लेखमाला

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

परामर्ष – Confab…

प्रश्न विचारा/Send Query or Feedback

परामर्ष Confab

नमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.
परामर्ष….
फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न  किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …

Hello Readers, Thanks a lot for the overwhelming response to the articles. I have received a lot of feedback including suggestions and queries. A bunch of them asked for more clarification regarding some terms, concepts or verses. This page is being prepared for resolving doubts from all these discussions.
Confab……
If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them through this link (Ask a Question). Click on the questions to read answers and discussions…

गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?
अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?
धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?
Does Lord Krishna in Bhagavad Gita ask us to stop enjoying worldly pleasures?
CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?
भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?
मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?
अध्यात्म म्हणजे काय?
‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?



गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?

मूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।१४।।
अन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व।
अर्थ – हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
तितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.
आदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.
सहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते।।२४।। विवेकचुडामणी
चिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा
विषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता।।७।। अपरोक्षानुभुति
विषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.
स्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.
ज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥
मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥

अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?

महाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.
अक्षौहिण्या: परीमाणं नराश्वरथदन्तिनाम्।यथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥
पायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे

  1. पत्ती    १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती
  2. सेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती
  3. गुल्म   (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती
  4. गण    (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती
  5. वाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती
  6. पृतना   (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती
  7. चमू    (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती
  8. अनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती
  9. अक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती
    साधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?

गीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.
उदाहरणादाखल काही श्लोक पाहू
१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।२-३८।।
३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८।।
४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

हे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात

५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२-२२।।
६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२ २३।।
७. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि।

हे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.

८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌। तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

हे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.

१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।    वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.

११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।

यासारखे गुढ श्लोक आहेत.

याव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
योगः कर्मसु कौशलम्।
योगक्षमेम् वहाम्यहम्।
नभः स्पृशं दीप्तम्।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही!

धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?

धर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.
शिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.
शेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.
परंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.
व्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.
भाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे

धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् । (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)
अहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः ।दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्। (याज्ञवल्क्यस्मृति १-१२२)

उत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.
त्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.
आश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.

DOES LORD KRISHNA IN BHAGAVAD GITA ASK US TO STOP ENJOYING WORLDLY PLEASURES?

Lord Krishna never asks you to stop enjoying worldly pleasures. He says we’ve to restrain the senses from temptations and expectations. It doesn’t mean not enjoying at all.

There is nothing wrong with enjoying material pleasures but it is inappropriate to fall prey to the senses for those pleasures. Senses are constantly pulling us towards pleasures, destabilizing strongest minds by creating expectations. Such Karma with an expectation towards its result, creates attachment and further drags us into joys or sorrows about the results.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

For example, Krishna would not say that one should not enjoy good food. He also approves working hard for earning that good food. But it is inappropriate to feel happy or disappointed if you succeed or fail within your efforts because that drags you to attachment, disturbs your mind. If the mind understands the inevitability of either success or failure, then the bond of Karma will not bind the soul. This is exactly what we forget while we strive to get what we like. If we don’t succeed, we get angry and then invite array of disorders from anger eventually losing our ultimate goal.

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

That is why Krishna says that it is not wrong to enjoy worldly pleasures, but it is wrong to be attached to them That attachment traps our soul in the bondage of bad Karma.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

But the self-controlled being, freed from attachment and aversion, who follows the conscious injunction despite being surrounded by the objects of the senses (material pleasure), with senses governed by the self; attains the precious union with the Ultimate Being.

So the gist is to enjoy the gifts of life without letting the gifts enjoy toying with your equanimity 🙂 Karma without expectations backed up by the intellect’ is what Chapter 2 and 3 explain.

CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?

Buddhism and Gita (Hinduism) share certain views and differ on certain. Both of them believe in the illusory state of existence i.e. the material world. To an extent both of them agree on sensory perceptions being the reason for suffering.

Buddhism believes in withdrawal from the material world and resorts to meditation leading to Nirvana. Which is kind of detachment from almost everything including self.

Gita, on the other hand promotes constant action (Karma) towards collective wellness backed up by the intellect (Sankhya). This is how a sole soul  self dissolves/unifies into the omnipresent. (Karma in Sankhya Yoga Chapter II)

Buddhism denounces everything as suffering while Gita upholds it as the beauty of the creator. Buddhism believes Salvation/Nirvana means Death since it frees one from suffering and pleasure. Wherein Gita makes Salvation achievable to a being by uniting Aatman (आत्मन् – Individual Self) with the Param Aatman (परम आत्मन् – The Ultimate) describing it as bliss which is eternal and above all material notions.

We have to understand why Buddhism tends to differ from the Gita. Buddhism emerged as a reaction to Hinduism (has its own reasons). Hence Buddha deliberately kept the theory of eternity away from his preaching while Gita preaches it.

Logically though, detachment from entire existence is not practical. Gita in the Chapter III describes it. Denouncing Karma isn’t possible since one at least has to pacify his bodily needs. He has to be a part of the material world to do that. Hence Gita’s view of appreciating the creation of the Ultimate and trying to be one with Him through Intellect (Sankhya) based Karma stands stronger.

I have already written about the greatness of Gita and why has it been relevant to generations after generations.

भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?

श्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। गीता २.४६।।
अन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)।

शब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥

हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.

सोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.

बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.

सलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति।। (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)

हे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)

अशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’। म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.

मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?

भारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.
प्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.
आता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू
१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.
वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥
मनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.
२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे.
अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् ।सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥
श्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥
असे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.
३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥
त्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.
हे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का? आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.
अशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.
प्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.

श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?

श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही शब्द कठोपनिषदाच्या प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतील दुसऱ्या श्लोकात येतात. या दोन्ही शब्दांचे व्यावहारीक आणि तात्विक असे दोन्ही अर्थ आपल्याला अनुभवास येतात. श्लोकाचा अन्वय, अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूयात
मूळ श्लोक

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते।।
अन्वयः – श्रेयः च प्रेयः च मनुष्यम् एतः । धीरः तौ सम्परीत्य विविनक्ति । प्रेयसः श्रेयः हि अभि वृणीते । मन्दः योगक्षेमात् प्रेयः वृणीते ।

श्रेयस आणि प्रेयस याचे येथे अभिप्रेत असणारे अर्थ हे कल्याणकारक आणि आनंददायक असे आहेत. माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते ज्यात काही सोपे आनंददायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडतो आणि सोपा व आनंददायक मार्ग डावलतो. असा साधारण अर्थ या श्लोकातून ध्वनीत होतो.
माणसाचे आयुष्य ही सुखदुःखांची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात ज्यात त्याला सोपा आणि अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गाप्रमाणेच त्यांचे फलित असते. वरकरणी सोप्या आणि कमी कष्टप्रद मार्गानी मिळणारे फलितही सीमीत असते तर अवघड आणि कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते.
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास विद्यार्थीदशेत किंवा उमेदवारीच्या काळात जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी व्यक्ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते आणि उर्वरीत काळ सुखाने घालवते. परंतु जी व्यक्ती हा काळ फार तोशीस न घेता माफक कष्टात घालवते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ घालवते आणि उर्वरीत आयुष्यही अधिक कष्टप्रद बनवते. कारण अर्थातच निवड…. योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. शिक्षण असो, गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती हेच तत्व सगळीकडे लागू पडते.
हे अर्थातच श्रेयस आणि प्रेयसाचे सर्वसामान्य अर्थविवेचन आहे. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा खुप गहन अर्थ अभिप्रेत आहे. प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सुख आहे.
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच सुखी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे?
प्रेयस हे ते क्षणिक सुख आहे जे भौतिक साधनांतून प्राप्त होते तर श्रेयस हे ते सुख आहे जे व्यक्ती समाधानातून आणि स्थितप्रज्ञ वृत्तीतून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे असे भारतीय तत्वज्ञान उपनिषदे आणि गीतेच्या माध्यमातून मांडते.

अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती समजून घेण्यात जितका स्पष्टीकरणाचा भाग आहे तितकाच अनुभूतीचाही आहे. कसे ते उत्तराच्या अंती स्पष्ट होईलच.

अध्यात्म शब्दाची साधारण फोड अधि + आत्म अशी होते. यात अधि हे अव्यय विशेषत्वाने किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने येते. आत्म याचा अर्थ आत्मन् म्हणजे आत्मा किंवा स्व.
त्यामुळे अध्यात्माचा शब्दशः अर्थ – प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने स्वतःला जाणणे. कसे जाणणे.
भगवद्गीतेच्या आठव्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अध्यात्म या संज्ञेचा अर्थ सांगतो. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुना प्र्श्न करतो की –

तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?

श्रीकृष्ण सांगतो –

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥ ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो

मग आता स्व-भाव म्हणजे काय हे नीट समजून घेऊ यात.
कारण आपल्या रोजच्या वापरातला शब्द असल्याने त्याच्या अर्थाकडे नीटसे लक्ष जात नाही. स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे.
वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो.
श्रीकृष्ण सांगतो.
अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रकर्षाने स्वतःला जाणायचे तर त्यासाठी स्वतःशिवाय इतर कोणतेही बाह्य साधन उपयुक्त ठरणार नाही. स्वतः प्रयत्न करून स्वतःला जाणणे भाग आहे. स्वतः च स्वतःवर प्रयोग करुन स्वतःच त्याचे निष्कर्ष तपासून पहायचे म्हणूनच अध्यात्मात अनुभूतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
अधिक वाचनासाठी –‘अंतरंग – भगवद्गीता’

‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?

उपनिषदे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत. परब्रह्म किंवा आत्मतत्त्वाचा अभ्यास हा उपनिषदांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. अहं ब्रह्मास्मि । हे बृहदारण्यक (१/२/४/१०) उपनिषदातील असून मूळ श्लोक असा आहे तद्धैतत्पश्यन्नृषिर्वामदेवः प्रतिपेदेऽहं मनुरभवं सूर्यश्चेति ।
तदिदमप्येतर्हि य एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इदं सर्वं भवति ।

उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक. अहम् म्हणजे मी आणि ब्रह्म अस्मि म्हणजे ब्रह्म आहे. अहम् ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा शब्दशः अर्थ होतो.
वास्तविक अर्थ काय –
आत्मज्ञान किंवा आत्मतत्त्व जाणणा-या व्यक्तीला झालेली ही उपरती आहे की सृष्टीचे कारक जे ब्रह्म तत्त्व, मी त्याचाच अंश किंवा आहे किंवा तत्त्वतः मी आणि तो कोणी निराळे नसून एकच आहोत. शारीर देह नश्वर तत्त्व असून आत्मा हे अविनाशी अविकारी आणि अनंत तत्त्व असून ते, मी, ब्रह्म आणि परब्रह्म हे एकस्वरूप आहेत. ज्याप्रकारे सर्व जलस्त्रोत जसे शेवटी समुद्रात एकरुप होतात तसेच हा अंश परमात्म्याशी तद्रुप होतो.
तत् त्वम् असि । (छान्दोग्य उपनिषद ६/८/१६) म्हणजेच ते (ब्रह्म) तू आहेस हे महावाक्यही याच अर्थाने येते.
जीवात्म्यात परमात्म्याचा अंश असतो या व्यापक अर्थाने ही महावाक्ये येतात.
वेदातही परब्रह्म हे एक तत्त्व असून त्याला ज्ञाते अनेक नावांनी ओळखतात असे म्हटले आहे एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:। – ऋग्वेद १/१६४/४६
गीतेतही भगवंत आपला अंश प्रत्येकात आहे हे सांगतो.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।१५.१५।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन (दोषनाश) ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे!) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***

सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….

या एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.
विहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.

ज्ञानकर्मसंन्यास……
‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.
१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे

पहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.

पहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.
अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो? तर –

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥
जेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.

भगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

म्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥

हे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.

मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.

अशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.
असे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.
मग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का? तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.

शरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.

जैसा जो जलापासिं उभा ठाके । तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे । तऱ्हीं निभ्रांत ओळखे । म्हणे मीं वेगळा आहें॥

जसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.
मग विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.

म्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥

असा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.

ज्ञानदेव म्हणतात

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें। जैसे न चलतां सूर्याचे चालणे। तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे। कर्मीचि असे ।
तो मनुष्यासारिखां त-हैं आवडे। परि मनुष्यत्व तेयांसि न घडें।।जैसे जली जलामाजिं न बुडे। भानुबिंब।।

सूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.

अशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.

निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.
श्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.

ज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥

या सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.
कर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
कारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.

उपसंहार
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
परित्राणाय साधूनां….।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
चौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते!

कर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो! विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –

एकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.

त्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.
कुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो ।

हिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरना।।तीजे बन पग नहीं धरना ||
तीजे बन में पंछ पारधी।।उन के नजर नहीं पड़ना ||
पांच हीरन पच्चीस हिरनी।।उन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे। खलका करेंगे बिछोना ||
कहे कबीर जो सुनो भाई साधो।।गुरु के चरन चित धरना||

पाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील!

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ६                                             पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

The explored & unexplored – Siem Reap – Land of Temples

Cambodia … Siem Reap …. the words remind us of magnificent temple of Angkor Wat. One of the unique sculptures built by Hindu Kings outside India.

Did you know that there are at least 10 temples around Siem Reap village that are equally beautiful, unique but relatively smaller in size?! Craftsmanship in these temples is as splendid as Angkor, perhaps even better at some places! Incidents from Hindu scriptures (Purana) are engraved everywhere. They are equally rich in intricate carvings like images of deities, characters and inscriptions.

Siem Reap (defeat of Siam1) is literally a living exposition of world class temples. These temples have been constructed during the reign of Hindu Kings like Rajendravarman, Jayavarman and others. Let’s explore a few masterpieces out of them.

Banteay Srei (Read about it in a separate article here)

Banteay Kdei

Banteay Kdei (A citadel of chambers). A mid-12th century temple with its name originating from ‘Kuti’ (abode). It’s a relatively new temple built by Jayavarman VII occupied by Buddhist monks till late 1950s. The style resembles Bayon architecture with the famous face tower featured at the entrance. The temple has been under restoration through different institutions.

Face Tower Avalokiteshvara, Banteay Kdei #siemreap #cambodia
Façade Banteay Kdei #siemreap #cambodia
Walkway, Banteay Kdei #siemreap #cambodia
Lions, Symbol of Royalty, Banteay Kdei #siemreap #cambodia
Chambers, a view from outside.. Banteay Kdei #siemreap #cambodia
Chambers, perspective.. Banteay Kdei #siemreap #cambodia
Scale.. view left exit…. Banteay Kdei #siemreap #cambodia
Dancing celestial beauties (Apsaras), Banteay Kdei #siemreap #cambodia
Dwarpala (Guard), Banteay Kdei #siemreap #cambodia

Pre Rup

Pre Rup ( turn the body2 ) is a Hindu temple built by Khmer king Rajendravarman during early 962. It’s a combination of mounted bricks, laterite and sandstone. These provide an amazingly roseate glow to the temple during sunrise and sunset. The ruins itself are so stunning, you can just imagine the divine feeling of witnessing the sunshine during the actual days of its glory! The square shape structure includes towers at 4 corners and centre as well. Each tower bears a statue of a deity it is dedicated to – Lakshmi, Vishnu, Shiva and Uma (Parvati). Tourists flock this place during early morning and evening hours to enjoy the bliss of sunshine. Truly an exquisite site to be!

The Magnificent, awaiting light! Pre Rup #siemreap #cambodia
Intricate carving, Pre Rup #siemreap #cambodia
Sunshine illuminating the bricks, Pre Rup #siemreap #cambodia
Spectrum from Pink to Red Pre Rup #siemreap #cambodia
The numinous luminous! Pre Rup #siemreap #cambodia

Prasat Kravan

A less known, less visited miniscule 10th century wonder dedicated to Lord Vishnu. A simple but graceful structure with five towers on a common terrace, built in reddish bricks. 5 beautiful bas-reliefs make this a delightful experience with an inscription on the frame.

The bas-reliefs depict Lord Vishnu with multiple incarnations.
Riding his Garuda
Four Armed Lord Vishnu
Eight Armed Lord Vishnu
Additionally
A Goddess holding weaponry identity of Lord Shiva (Trident) and Vishnu (Discus)
Goddess Lakshmi (Kamala) holding Lotuses.

A minuscule grandeur… Prasat Kravan #siemreap #cambodia
Front View… Prasat Kravan #siemreap #cambodia
Bas-relief, Lord Vishnu.. Prasat Kravan.. #siemreap #cambodia
Lord Vishnu on Garuda…. Prasat Kravan #siemreap #cambodia
Majestic Him with 8 hands… Prasat Kravan #siemreap #cambodia
Deity with both discus and trident?.. Prasat Kravan.. #siemreap #cambodia
Inscription dedicating temple to Lord Vishnu… Prasat Kravan #siemreap #cambodia

Ta Prohm

Ta Prohm (Ancestor Brahma) a monastery far more majestic and revered than its contemporary identity as a location in the movie Tomb Raider! Its originally known as Raj Vihara (Royal Monastery). Constructed in the Bayon style during the reign of Jayavarman VII in 12th century. It is said that this monastery and university used to be home to around 12500 people including 18 high priests and over 600 dancers. Today trees engulfing these ruins have become a unique identity of the temple. However, it is creating issues in restoring the heritage. Majority of its restoration is conducted by Archaeological Survey of India! Ta Prohm today is one of the most visited temples in the region.

Walkway towards harmony.. Ta Prohm.. #siemreap #cambodia
Where nature blends with the human creation! Ta Prohm #siemreap #cambodia
A beautiful figure with intricate work on headgear… Ta Prohm #siemreap #cambodia
Trees engulfing the ruins.. Ta Prohm… #siemreap #cambodia
Popular photography point …. Ta Prohm…#siemreap #cambodia #tombraider
The Rajvihara… Ta Prohm… #siemreap #cambodia
#ASI #india… Ta Prohm… #siemreap #cambodia

Footnotes

1) Defeat of Siam – Legends say that the name was given by Khmer King Ang Chan after he defeated Thai Army sent to invade Cambodia in 1549. There is a difference of opinion about this amongst scholars.

2) Turn the Body – It is said that this refers to rotating ashes while performing post funeral rites at a temple in Cambodian culture.

Copyright sheetaluwach.com 2020 ©

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version