अध्याय – ३ – कर्मयोग

अर्जुन उवाच
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥
अन्वय

अर्जुन= अर्जुन, उवाच = म्हणाला, जनार्दन = हे जनार्दन श्रीकृष्णा, चेत्‌ = जर, कर्मणः = कर्माच्या अपेक्षेने, बुद्धिः = ज्ञान, ज्यायसी = श्रेष्ठ (आहे), ते मता = असे तुम्हाला मान्य असेल, तत्‌ = तर मग, केशव = हे केशवा (श्रीकृष्णा), माम्‌ = माझी, घोरे = भयंकर, कर्मणि = कर्म करण्यात, किम्‌ = का बरे, नियोजयसि = तुम्ही योजना करीत आहात
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा (श्रीकृष्णा), मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात?
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ ३-२ ॥
अन्वय

व्यामिश्रेण इव = जणू मिश्रित अशा, वाक्येन = वाक्यांनी, मे = माझ्या, बुद्धिम्‌ = बुद्धीला, मोहयसि इव = तुम्ही जणू मोहित करीत आहात, (अतः) = म्हणून, येन = ज्यामुळे, अहम्‌ = मी, श्रेयः = कल्याण, आप्नुयाम्‌ = प्राप्त करून घेईन, तत्‌ एकम्‌ = अशी ती एक गोष्ट, निश्चित्य = निश्चित करून, वद = सांगा
अर्थ
तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल.
श्रीभगवानुवाच
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अनघ = हे निष्पापा, अस्मिन्‌ लोके = या जगात, मया = मी, द्विविधा = दोन प्रकारची, निष्ठा = निष्ठा, पुरा = पूर्वी, प्रोक्ता = सांगितली आहे, साङ्ख्यानाम्‌ = सांख्ययोग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, ज्ञानयोगेन = ज्ञानयोगाद्वारे (होते), (च) = आणि, योगिनाम्‌ = योग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, कर्मयोगेन = कर्मयोगाद्वारे होते
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते.
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥
अन्वय

कर्मणाम्‌ = कर्मांचे, अनारम्भात्‌ = आचरण केल्याशिवाय, पुरुषः = मनुष्य, नैष्कर्म्यम्‌ = निष्कर्मता म्हणजे योगनिष्ठा, न अश्नुते = प्राप्त करून घेत नाही, च = तसेच, संन्यसनात्‌ एव = कर्मांचा केवळ त्याग केल्यामुळे, सिद्धिम्‌ = सिद्धी म्हणजे सांख्यनिष्ठा, न समधिगच्छति = प्राप्त करून घेत नाही
अर्थ
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥
अन्वय

कश्चित्‌ = कोणीही मनुष्य, जातु = कोणत्याही वेळी, हि = निःसंदेहपणे, क्षणम्‌ अपि = क्षणमात्र सुद्धा, अकर्मकृत्‌ = कर्म न करता, न तिष्ठति = राहात नाही, हि = कारण, प्रकृतिजैः = प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, गुणैः = गुणांनी, अवशः = परतंत्र झालेला, सर्वः = सर्व मनुष्यसमुदाय हा, कर्म कार्यते = कर्म करण्यास भाग पाडला जातो
अर्थ
निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो.
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥
अन्वय

विमूढात्मा = मूढ बुद्धीचा मनुष्य, कर्मेन्द्रियाणि = सर्व इंद्रियांना, संयम्य = जबरदस्तीने वरवर रोखून, यः = जो, मनसा = मनाने, इन्द्रियार्थान्‌ = त्या इंद्रियांच्या विषयांचे, स्मरन्‌ आस्ते = चिंतन करीत असतो, सः = तो, मिथ्याचारः = मिथ्याचारी म्हणजे दांभिक, उच्यते = म्हटला जातो
अर्थ
जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो.
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥
अन्वय

तु = परंतु, अर्जुन = हे अर्जुना, यः = जो मनुष्य, मनसा = मनाच्या योगे, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, असक्तः = अनासक्त होऊन, कर्मेन्द्रियैः = सर्व इंद्रियांच्या द्वारा, कर्मयोगम्‌ = कर्मयोगाचे, आरभते = आचरण करतो, सः = तो मनुष्य, विशिष्यते = श्रेष्ठ होय
अर्थ
परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय.
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥
अन्वय

त्वम्‌ = तू, नियतम्‌ = शास्त्रविहित, कर्म = कर्तव्यकर्म, कुरु = कर, हि = कारण, अकर्मणः = कर्म न करण्याच्या अपेक्षेने, कर्म = कर्म करणे, ज्यायः = श्रेष्ठ आहे, च = तसेच, अकर्मणः = कर्म न केल्यास, ते = तुझा, शरीरयात्रा अपि = शरीरनिर्वाहसुद्धा, न प्रसिद्ध्येत्‌ = सिद्ध होणार नाही
अर्थ
तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत.
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥
अन्वय

यज्ञार्थात्‌ = यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या, कर्मणः = कर्मांव्यतिरिक्त, अन्यत्र = दुसऱ्या कर्मांमध्ये (गुंतलेला), अयम्‌ = हा, लोकः = मनुष्यांचा समुदाय, कर्मबन्धनः = कर्मांनी बांधला जातो, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (त्वम्‌) = तू, मुक्तसङ्गः = आसक्तिरहित होऊन म्हणजे फळाची अपेक्षा सोडून, तदर्थम्‌ = त्या यज्ञासाठी, कर्म समाचर = कर्तव्यकर्म चांगल्याप्रकारे कर
अर्थ
यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर.
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ ३-१० ॥
अन्वय

पुरा = कल्पाच्या पूर्वी, सहयज्ञाः = यज्ञाच्या बरोबर, प्रजाः = प्रजा, सृष्ट्वा = निर्माण करून, प्रजापतिः = प्रजापती ब्रह्मदेव, उवाच = (त्यांना) म्हणाले, (यूयम्‌) = तुम्ही लोक, अनेन = या यज्ञाच्या द्वारे, प्रसविष्यध्वम्‌ = उत्कर्ष प्राप्त करून घ्या, (च) = आणि, एषः = हा यज्ञ, वः = तुम्हा लोकांचे, इष्टकामधुक्‌ = इष्ट भोग देणारा, अस्तु = होवो
अर्थ
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो.
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ३-११ ॥
अन्वय

अनेन = या यज्ञाच्या द्वारे, देवान्‌ = देवतांना, भावयत = तुम्ही उन्नत करा, (च) = आणि, ते देवाः = त्या देवता, वः = तुम्हा लोकांना, भावयन्तु = उन्नत करोत, (एवम्‌) = अशाप्रकारे निःस्वार्थ भावनेने, परस्परम्‌ = एकमेकांना, भावयन्तः = उन्नत करीत, परम्‌ = परम, श्रेयः = कल्याण, अवाप्स्यथ = तुम्ही प्राप्त करून घ्याल
अर्थ
तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ३-१२ ॥
अन्वय

यज्ञभाविताः = यज्ञाने पुष्ट झालेल्या, देवाः = देवता, वः = तुम्हा लोकांना (न मागता), इष्टान्‌ = इष्ट, भोगान्‌ = भोग, हि दास्यन्ते = निश्चितपणे देत राहातील (अशाप्रकारे), तैः = त्या देवतांनी, दत्तान्‌ = दिलेले भोग, यः = जो मनुष्य, एभ्यः = त्यांना, अप्रदाय = न देता (स्वतःच), भुङ्क्ते = भोगतो, सः = तो, स्तेनः एव = चोरच आहे
अर्थ
यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहातील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, तो चोरच आहे.
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ ३-१३ ॥
अन्वय

यज्ञशिष्टाशिनः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे, सन्तः = श्रेष्ठ मनुष्य, सर्वकिल्बिषैः = सर्व पापांतून, मुच्यन्ते = मुक्त होऊन जातात (परंतु), ये पापाः = जे पापी लोक, आत्मकारणात्‌ = स्वतःच्या शरीर पोषणासाठीच (अन्न), पचन्ति = शिजवितात, ते तु = ते तर, अघम्‌ = पापच, भुञ्जते = खातात
अर्थ
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीरपोषणासाठी अन्न शिजवितात, ते तर पापच खातात.
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥
अन्वय

अन्नात्‌ = अन्नापासून, भूतानि = संपूर्ण प्राणी, भवन्ति = उत्पन्न होतात, पर्जन्यात्‌ = पर्जन्यवृष्टीपासून, अन्नसम्भवः = अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञात्‌ = यज्ञापासून, पर्जन्यः = पर्जन्यवृष्टी, भवति = होते, यज्ञः = यज्ञ, कर्मसमुद्भवः = विहित कर्मांपासून उत्पन्न होणारा आहे, कर्म = कर्मसमुदाय हा, ब्रह्मोद्भवम्‌ = वेदांपासून उत्पन्न होणारा (आणि), ब्रह्म = वेद हे, अक्षरसमुद्भवम्‌ = अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे आहेत (असे), विद्धि = तू जाण, तस्मात्‌ = म्हणून (यावरून सिद्ध होते की), सर्वगतम्‌ = सर्वव्यापी, ब्रह्म = परम अक्षर परमात्मा, नित्यम्‌ = नेहमीच, यज्ञे = यज्ञामध्ये, प्रतिष्ठितम्‌ = प्रतिष्ठित आहे
अर्थ
सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो. आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ ३-१६ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), इह = या जगामध्ये, एवम्‌ = अशा प्रकारे, प्रवर्तितम्‌ = परंपरेने प्रचलित असणाऱ्या, चक्रम्‌ = सृष्टिचक्राला अनुकूल, यः = जो मनुष्य, न अनुवर्तयति = असे वर्तन करीत नाही म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, सः = तो मनुष्य, इन्द्रियारामः = इंद्रियांच्या द्वारे भोगांमध्ये रमणारा, अघायुः = पापी आयुष्याचा (असून), मोघम्‌ = व्यर्थच, जीवति = जिवंत राहातो
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥
अन्वय

तु = परंतु, यः = जो, मानवः = मनुष्य, आत्मरतिः एव = आत्म्यामध्येच रमणारा, च = आणि, आत्मतृप्तः = आत्म्यामध्येच तृप्त, च = तसेच, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, सन्तुष्टः = संतुष्ट, स्यात्‌ = असतो, तस्य = त्याच्यासाठी, कार्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न विद्यते = नसते
अर्थ
परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥
अन्वय

तस्य = त्या महामनुष्याचे, इह = या विश्वामध्ये, कृतेन = कर्म करण्यात, कश्चन = कोणतेही, अर्थः न = प्रयोजन असत नाही, (च) = तसेच, अकृतेन एव च = कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही, च = तसेच, सर्वभूतेषु = संपूर्ण प्राणिमात्रात सुद्धा, अस्य = याचा, कश्चित्‌ = किंचितही, अर्थव्यपाश्रयः = स्वार्थाचा संबंध, न = राहात नाही
अर्थ
त्या महामनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही.
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, सततम्‌ = निरंतरपणे, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कार्यम्‌ कर्म = कर्तव्य कर्म, समाचर = नीटपणे तू करीत राहा, हि = कारण, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कर्म = कर्म, आचरन्‌ = करणारा, पूरुषः = मनुष्य, परम्‌ = परमात्म्याला, आप्नोति = प्राप्त करून घेतो
अर्थ
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३-२० ॥
अन्वय

कर्मणा एव = (आसक्तिरहित) कर्माचरणाद्वारेच, जनकादयः = जनक इत्यादी ज्ञानीजन सुद्धा, संसिद्धिम्‌ = परमसिद्धीला, आस्थिताः = प्राप्त झाले होते, हि = म्हणून, (तथा) = तसेच, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रहाकडे, सम्पश्यन्‌ अपि = दृष्टी ठेवून सुद्धा, कर्तुम्‌ एव = कर्म करण्यासच, अर्हसि = तू योग्य आहेस म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित आहे
अर्थ
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य आहे.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥
अन्वय

श्रेष्ठः = श्रेष्ठ मनुष्य, यत्‌ यत्‌ = जे जे, आचरति = आचरण करतो, इतरः जनः = अन्य लोकसुद्धा, तत्‌ तत्‌ एव = त्या त्या प्रमाणे (आचरण करतात), सः = तो, यत्‌ = ज्या गोष्टी, प्रमाणम्‌ = प्रमाण (म्हणून मान्य), कुरुते = करतो, लोकः = सर्व मनुष्यसमुदाय, तत्‌ = त्यालाच, अनुवर्तते = अनुसरून वागतो
अर्थ
श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्रिषु लोकेषु = तिन्ही लोकांत, मे = मला, किञ्चन कर्तव्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न अस्ति = नाही, च = तसेच, अवाप्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू, अनवाप्तम्‌ न = मिळालेली नाही असेही नाही, (तथापि) = तरीसुद्धा, कर्मणि एव = कर्मांचे आचरण, वर्ते = मी करीतच आहे
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ३-२३ ॥
अन्वय

हि = कारण, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदि = जर, जातु = कदाचित, अहम्‌ = मी, अतन्द्रितः = सावध राहून, कर्मणि = कर्मे, न वर्तेयम्‌ = केली नाहीत (तर मोठी हानी होईल, कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुकरण करतात
अर्थ
कारण हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ ३-२४ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, चेत्‌ = जर, अहम्‌ = मी, कर्म = कर्मे, न कुर्याम्‌ = केली नाहीत (तर), इमे = ही, लोकाः = सर्व माणसे, उत्सीदेयुः = नष्ट-भ्रष्ट होऊन जातील, च = आणि, सङ्करस्य = संकराचा, कर्ता = कर्ता, स्याम्‌ = मी होईन, (तथा) = तसेच, इमाः = या, प्रजाः = सर्व प्रजांचा, उपहन्याम्‌ = मी घात करणारा होईन
अर्थ
म्हणून जर मी कर्मे केली नाहीत, तर ही सर्व माणसे नष्ट-भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥
अन्वय

भारत = हे भारता (भरतवंशी अर्जुना), कर्मणि = कर्मांमध्ये, सक्ताः = आसक्त असणारे, अविद्वांसः = अज्ञानी लोक, यथा = ज्याप्रमाणे, (कर्म) = कर्मे, कुर्वन्ति = करतात, तथा = त्याचप्रमाणे, असक्तः = आसक्तिरहित (अशा), विद्वान्‌ = विद्वानाने सुद्धा, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रह, चिकीर्षुः = करण्याच्या इच्छेने, (कर्म) = कर्मे, कुर्यात = करावीत
अर्थ
हे भारता(भरतवंशी अर्जुना), कर्मांत आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ ३-२६ ॥
अन्वय

युक्तः = परमात्म्याच्या स्वरूपात अढळपणे स्थित असणाऱ्या, विद्वान्‌ = ज्ञानी मनुष्याने, कर्मसङ्गिनाम्‌ = शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ती असणाऱ्या, अज्ञानाम्‌ = अज्ञानी मनुष्यांचा, बुद्धिभेदम्‌ = बुद्धिभ्रम म्हणजेच कर्मांमध्ये अश्रद्धा, न जनयेत्‌ = उत्पन्न करू नये (या उलट), सर्वकर्माणि = शास्त्रविहित सर्व कर्मे, समाचरन्‌ = नीटपणे (स्वतःच) आचरण करावीत (तशीच त्यांच्याकडूनही कर्मे), जोषयेत्‌ = करवून घ्यावीत
अर्थ
परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मांत आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्मांविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तमप्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥
अन्वय

कर्माणि = सर्व कर्मे (खरे पाहाता), सर्वशः = सर्व प्रकारांनी, प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणैः = गुणांच्या द्वारे, क्रियमाणानि = केली जातात, (तथापि) = तरीसुद्धा, अहङ्कारविमूढात्मा = अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य, अहम्‌ कर्ता = मी कर्ता आहे, इति = असे, मन्यते = मानतो
अर्थ
वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे, असे मानतो.
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ ३-२८ ॥
अन्वय

तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो(अर्जुना), गुणकर्मविभागयोः = गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी हा, गुणाः = सर्व गुण हेच, गुणेषु = गुणांमध्ये, वर्तन्ते = वावरतात, इति = असे, मत्वा = जाणून (त्यामध्ये), न सज्जते = अडकत नाही
अर्थ
पण हे महाबाहो (अर्जुना), गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही.
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ ३-२९ ॥
अन्वय

प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणसम्मूढाः = गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे, गुणकर्मसु = गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये, सज्जन्ते = आसक्त होतात, अकृत्स्नविदः = पूर्णपणे न जाणणाऱ्या, मन्दान्‌ = मंदबुद्धी अज्ञानी अशा, तान्‌ = त्या माणसांना, कृत्स्नवित्‌ = संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने, न विचालयेत्‌ = विचलित करू नये
अर्थ
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥
अन्वय

अध्यात्मचेतसा = अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे, सर्वाणि = सर्व, कर्माणि = कर्मे, मयि = मला, सन्यस्य = अर्पण करून, निराशीः = आशारहित, निर्ममः = ममतारहित, (च) = आणि, विगतज्वरः = संतापरहित, भूत्वा = होऊन, युध्यस्व = तू युद्ध कर
अर्थ
अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३-३१ ॥
अन्वय

ये = जे कोणी, मानवाः = मानव, अनसूयन्तः = दोषदृष्टीने रहित, (च) = आणि, श्रद्धावन्तः = श्रद्धायुक्त होऊन, मे = माझ्या, इदम्‌ = या, मतम्‌ = मताचे, नित्यम्‌ = नेहमी, अनुतिष्ठन्ति = अनुसरण करतात, ते अपि = तेसुद्धा, कर्मभिः = संपूर्ण कर्मांतून, मुच्यन्ते = सुटून जातात
अर्थ
जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात.
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥
अन्वय

तु = परंतु, ये = जे मानव, अभ्यसूयन्तः = माझ्यावर दोषारोपण करीत, मे = माझ्या, एतत्‌ = या, मतम्‌ = मताला, न अनुतिष्ठन्ति = अनुसरून आचरण करीत नाहीत, सर्वज्ञानविमूढान्‌ = संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेल्या अशा, तान्‌ = त्या, अचेतसः = मूर्खांना, नष्टान्‌ = नष्ट झालेले असेच, विद्धि = समज
अर्थ
परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज.
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३-३३ ॥
अन्वय

भूतानि = सर्वच प्राणी, प्रकृतिम्‌ यान्ति = प्रकृतीप्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्मे करतात, ज्ञानवान्‌, अपि = ज्ञानी माणूस सुद्धा, स्वस्याः = आपल्या, प्रकृतेः = प्रकृतीला, सदृशम्‌ = अनुसरून, चेष्टते = क्रिया करीत राहातो (मग अशा स्थितीत स्वभावापुढे), निग्रहः = हट्ट, किम्‌ = काय, करिष्यति = करणार
अर्थ
सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील?
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३-३४ ॥
अन्वय

इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे = इंद्रिय-इंद्रियाच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये, रागद्वेषौ = राग आणि द्वेष, व्यवस्थितौ = लपून राहिलेले असतात, तयोः = त्या दोघांच्या, वशम्‌ = ताब्यात, (मनुष्यः) = माणसाने, न आगच्छेत्‌ = येता कामा नये, हि = कारण, तौ = ते दोघेही, अस्य = या(माणसा)चे, परिपन्थिनौ = (कल्याणमार्गात) विघ्न करणारे महान शत्रू आहेत
अर्थ
प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत.
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥
अन्वय

स्वनुष्ठितात्‌ = चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या, परधर्मात्‌ = दुसऱ्याच्या धर्मापेक्षा, विगुणः = गुणरहित असासुद्धा, स्वधर्मः = स्वतःचा धर्म, श्रेयान्‌ = अति उत्तम आहे, स्वधर्मे = आपल्या धर्मात, निधनम्‌ = मरणे हे सुद्धा, श्रेयः = कल्याणकारक आहे, (च) = आणि, परधर्मः = दुसऱ्याचा धर्म, भयावहः = भय निर्माण करणारा आहे
अर्थ
चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे.
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, वार्ष्णेय = हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), अथ = तर मग, अयम्‌ = हा, पूरुषः = मनुष्य, अनिच्छन्‌ अपि = स्वतःची इच्छा नसताना सुद्धा, बलात्‌ = बळजबरीने, नियोजितः इव = जणू भाग पाडल्यामुळे, केन = कोणाकडून, प्रयुक्तः = प्रेरित होऊन, पापम्‌ = पापाचे, चरति = आचरण करतो
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो?
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ ३-३७ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, रजोगुणसमुद्भवः = रजोगुणापासून उत्पन्न झालेला, एषः = हा, कामः = कामच, क्रोधः = क्रोध आहे, एषः = हा, महाशनः = पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, (च) = तसेच, महापाप्मा = महापापी आहे, इह = या विषयात, एनम्‌ वैरिणम्‌ विद्धि = काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण.
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ ३-३८ ॥
अन्वय

यथा = ज्या प्रकारे, धूमेन = धुराने, वह्निः = अग्नी, च = आणि, मलेन = धुळीने, आदर्शः = आरसा, आव्रियते = झाकला जातो, (तथा) = तसेच, यथा = ज्या प्रकारे, उल्बेन = वारेने, गर्भः = गर्भ, आवृतः = झाकलेला असतो, तथा = त्या प्रकारे, तेन = त्या कामाचे द्वारा, इदम्‌ = हे ज्ञान, आवृतम्‌ = झाकले जाते
अर्थ
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३-३९ ॥
अन्वय

च = आणि, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अनलेन = अग्नीप्रमाणे, दुष्पूरेण = कधीही पूर्ण न होणाऱ्या, (च) = आणि, एतेन = या, कामरूपेण = कामरूपी, ज्ञानिनः = ज्ञानी लोकांच्या, नित्यवैरिणा = नित्य शत्रूच्या द्वारा, ज्ञानम्‌ = (मनुष्याचे) ज्ञान, आवृतम्‌ = झाकून टाकलेले असते
अर्थ
आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे.
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्‌ ॥ ३-४० ॥
अन्वय

इन्द्रियाणि = इंद्रिये, मनः = मन, (च) = आणि, बुद्धिः = बुद्धी (हे सर्व), अस्य = या कामाचे, अधिष्ठानम्‌ = निवासस्थान, उच्यते = म्हटले जातात, एषः = हा काम, एतैः = या मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या द्वारेच, ज्ञानम्‌ = ज्ञानाला, आवृत्य = झाकून टाकून, देहिनम्‌ = जीवात्म्याला, विमोहयति = मोहित करतो
अर्थ
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो.
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ३-४१ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, भरतर्षभ = हे अर्जुना, त्वम्‌ = तू, आदौ = प्रथम, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, ज्ञानविज्ञाननाशनम्‌ = ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, एनम्‌ = या, पाप्मानम्‌ = महान पापी अशा कामाला, हि = निश्चितपणे, प्रजहि = बळ वापरून मारून टाक
अर्थ
म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून, या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक.
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥
अन्वय

इन्द्रियाणि = इंद्रिये ही (स्थूलशरीरापेक्षा), पराणि = पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहेत, आहुः = असे म्हणतात, इन्द्रियेभ्यः = इंद्रियांपेक्षा, मनः = मन हे, परम्‌ = पर आहे, मनसः तु = मनापेक्षा, बुद्धिः = बुद्धी ही, परा = पर आहे, तु = आणि, यः = जो, बुद्धेः = बुद्धीच्यासुद्धा, परतः = अत्यंत पर, सः = तो (आत्मा) आहे
अर्थ
इंद्रियांना स्थूलशरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे. आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे, तो आत्मा होय.
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ३-४३ ॥
अन्वय

एवम्‌ = अशा प्रकारे, बुद्धेः = बुद्धीपेक्षा, परम्‌ = पर म्हणजे सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला, बुद्ध्वा = जाणून, (च) = आणि, आत्मना = बुद्धीच्या द्वारा, आत्मानम्‌ = मनाला, संस्तभ्य = वश करून घेऊन, महाबाहो = हे महाबाहो, कामरूपम्‌ = (या) कामरूपी, दुरासदम्‌ = दुर्जय, शत्रुम्‌ = शत्रूला, जहि = तू ठार कर
अर्थ
अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक.

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

भगवद्गीता – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग

गीता शिकवत असताना हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की श्रीकृष्णाने गीता सांगायला १८ अध्याय का घेतले? जे काही सांगायचं ते श्रीकृष्णासारख्या विद्वानाला थोडक्यात सांगता आलं नसतं का? दोन चार अध्यायात आटपायचं ना! असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एखादे हसत खेळत गीता, किंवा सुलभ गीता गाईड वगैरे काहीतरी छापायला काय हरकत होती? आजच्या भाषेत सांगायचे तर एक छोटा युट्युब व्हिडीओ करायचा How to understand Gita in 5 minutes!!
सात आंधळ्यांची कथा आपल्यापैकी साधारण प्रत्येकाला माहिती आहे. जगभरातील जवळपास प्रत्येक संस्कृतीत ही कथा येते. कमी अधिक फरकाने या सर्व कथांचा मतितार्थही सारखाच आहे. हत्ती नक्की असतो कसा हे अनुभवण्यासाठी सात अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून आपले मत मांडतात. ज्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागतो त्याला हत्ती त्या आकाराचा असतो असे वाटते. कोणाला तो खांबासारखा तर कोणाला दोरी सारखा वाटतो इ. इ.
तात्पर्य काय की सातही आंधळ्यांना वाटलेले हत्तीचे स्वरुप हे अपूर्ण आहे. बरं सातही आकार जाणले म्हणजे हत्ती कळाला का? तर तसेही नाही. आकार हे केवळ एक परिमाण झाले. हत्ती जाणायाचा तर आकार, रंग, गंध, वृत्ती यासह सर्व बाजू जाणायला ह्व्यात. म्हणजेच माणसाला एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा घटनेचे खरे स्वरुप जाणून घ्यायचे असेल तर त्याला ते अनेक बाजूंनी समजून घ्यायला हवे. आपल्याला दिसणारी एकच एक बाजू म्हणजे सत्य नव्हे.
जैन दर्शनांतही ‘स्याद् वाद’ नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट तत्व आहे. त्याला ‘अनेकान्तवाद’ असेही म्हणतात. स्याद्वादी म्हणतात प्रत्येक वस्तुमध्ये (यात सगळे आले) असंख्य गुणावगुण असतात. ज्याला जे गुण अनुभवास येतात तो त्या गुणांच्या आधारे ती वस्तु जाणतो. याचा अर्थ त्याला केवळ व्यक्तीसापेक्ष ज्ञान प्राप्त होते. या असंख्य गुणावगुणांसकट जाणायचे तर त्या वस्तुला सात विविध आयामातून पाहणे आवश्यक आहे. हे सातही आयाम विभिन्न परीस्थितीतून वस्तुच्या गुणावगुणांचे ज्ञान करून देतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर कित्येकदा असा अनुभव येतो की आपण एखाद्या व्यक्तीला जसे समजत असतो त्याच्या अगदी विरुद्ध असे मत आपल्याला ऐकायला किंवा अनुभवायला मिळते. सार्वजनिक जीवनातल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण अनेक कथा, दंतकथा ऐकत असतो ज्यात एकात ती व्यक्ती नायक असते तर दुसऱ्यात खलनायक. वर्षानुवर्ष एखाद्याच्या संगतीत राहूनही ती व्यक्ती नक्की कशी आहे हे सांगणे कठीण जाते. कारण अनेकान्तवाद!!
संपूर्ण गुणावगुणांसकट एखादी व्यक्ती जाणणे इतके कठीण असेल तर मग प्रत्यक्ष गुणातीत परमेश्वराचे स्वरुप जाणणे किती कठीण असेल? गीता सांगायला श्रीकृष्णाने १८ अध्याय कशाला घेतले या प्रश्नाचे हे उत्तर आहे.
श्रीकृष्ण जसे सांगत जातो तसे अर्जुनाला त्या ज्ञानाचे वेगवेगळे आयाम दिसायला लागतात. त्यावर तो प्रश्न विचारतो आणि मग पुढील अध्यायात कृष्ण त्याचे निरसन करतो. विविध दृष्टिकोनांतून ज्ञान त्याच्यापुढे मांडतो. अशाप्रकारे अर्जुनाला ‘हत्ती’ सर्वबाजूंनी अगदी स्वभावासकट समजतो. आपल्यालाही ‘हत्ती’ जाणायचा तर अशाच प्रकारे प्रत्येक अध्यायातून तो वेगवेळ्या परिमाणातून जाणायला हवा.
गीतेच्या पहील्या सहा अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्व किंवा आत्मन् म्हणजे काय, तो कसा जाणायाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता कोणती याचे तत्वज्ञान सांगतो. पुढल्या सहा अध्यायातून ते ज्ञान कोणत्या स्वरूपात प्रकट होते याचे वर्णन श्रीकृष्ण करतो. अनेक अंगांनी श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या स्वरुपाचे तसेच स्व किंवा आत्मन् मधील त्या स्वरुपाचा साक्षात्कार घडवतो. ज्याला आपण मागील अध्यायात विज्ञान म्हणालो. सात निरनिराळ्या कल्पनांच्या अनेकान्तवादातून विज्ञान समजून घेणे म्हणजे अक्षरब्रह्मयोग….. ज्ञानविज्ञानयोगाच्या अंतिम श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः।।
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.

अर्जुनाला सहाजिक प्रश्न पडतो की अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतकाळी जाणणे म्हणजे काय?
अक्षरब्रह्मयोगाला याच प्रश्नांपासून सुरुवात होते. अर्जुन विचारतो की

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥

तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?
(किती प्रश्न झाले? सात!!! आंधळ्यांची संख्या किती सात…. अनेकान्तवादातील आयाम किती सात……. धर्म, भूगोल किंवा नाव बदलले तरी तत्वज्ञांचे विचार हे अंतिमतः एकाच सत्याच्या दिशेने जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.)
अर्जुनाच्या सात प्रश्नांची श्रीकृष्णानी दिलेली उत्तरे हा या अध्यायाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात श्रीकृष्ण, ज्ञानी भक्ताचे आपले निरुपण, जे मागील अध्यायात सुरु केले होते ते पुढे नेतो आणि अंतिम काही श्लोकात परमगती प्राप्त करण्याच्या दोन मार्गांची चर्चा श्रीकृष्ण करतो.

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या तीन संज्ञांचे अर्थ प्रथम श्रीकृष्ण सांगतो.
जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. क्षर आणि अक्षर असे दोन शब्द आहेत. यातला अक्षर आपल्याला माहिती आहे. मराठीत असे अनेक शब्द आहेत जे आपण बोलण्यात सहज वापरून जातो परंतु त्यांचे अर्थ खरोखर विलक्षण आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते! अक्षर हा असाच एक शब्द. क्षर याचा अर्थ नाशवंत किंवा ज्याला क्षय आहे असे. तर अक्षर याचा अर्थ ज्याचा नाश होत नाही किंवा जे शाश्वत आहे, अक्षय आहे.
आपल्याला माहित असलेले अक्षर तरी काय आहे. ज्याचा क्षर किंवा भाग पडत नाही ते. वर्णमालेतले कोणतेही अ-क्षर घ्या. जेव्हा आपण अक्षर म्हणतो तेव्हा त्याची अधिक फोड करता येत नाही. ते क्षर नसते म्हणून अक्षर…. म्हणूनच त्याचा उच्चार एका ध्वनीत होतो.
(येथे एक नवलाची गोष्ट सांगायला हरकत नाही. अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा सांगणारी ज्ञानेश्वरांची वाणी अजरामर झाली कारण ती ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणते. येथे अक्षर शब्दावरचा श्लेष हा भाषा आणि अक्षय तत्व या दोन्ही अर्थाने वापरला जातो. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानेश्वरीतील ज्ञान दोन्ही अक्षर आहे हेच तर ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक वापरलाय हे पाहिले की ज्ञानदेव योगीराज होते हे पटावे. असो)
सांख्ययोगात श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीव-अजीवातील अजीव म्हणजे ब्रह्म.. कारण ते अक्षर आहे. त्याचे विघटन होत नाही त्याची फोड करता येत नाही. त्याचे कितीही भाग केले तरी ते सर्व ब्रह्मच रहातात. अर्धे किंवा पाव ब्रह्म होत नाहीत. अंशात्मक असो की पूर्ण, ब्रह्म हे सर्वथा आणि सर्वत्र पूर्णच असते. बृहदारण्यक उपनिषदातील ॐ पूर्णमदः पूर्णमिदं ही प्रार्थनाही हेच सांगते.
हे झाले ब्रह्म मग अध्यात्म काय आहे?
एकदा ब्रह्म काय आहे हे समजले की अध्यात्म समजणे कठीण नाही. अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो स्व-भाव हा अजून एक वापरून बोथट झालेला शब्द….
स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे. वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो. श्रीकृष्ण सांगतो अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो असे श्रीकृष्ण सांगतो…..
अर्जुनाच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

(How to register a domain) डोमेन रजिस्ट्रेशन कसे करावे?

मागच्या भागात आपण मराठीत ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग लिहिण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? याची प्राथमिक माहिती घेतली. स्वतंत्र वेबसाईट तयार करणे ही व्यवसायिक ब्लॉगिंगची पहिली पायरी असते हे आपण शिकलो. अशी साईट तयार करण्यासाठची पहिली पायरी म्हणजेच डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration) आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी होस्टिंग प्लॅन Hosting Plan) कसा निवडायचा हे आपण या भागात पहाणार आहोत.
सर्वप्रथम येथे काही तांत्रिक (technical) शब्द सतत आपल्या कानावर येतील त्याची नीट माहिती घेऊ.

डोमेन (Domain) आणि होस्टिंग (hosting).

डोमेन (Domain) – कोणत्याही वेबसाईवर जाण्यासाठी जो पत्ता तुम्ही टाईप करता त्यातले त्या वेबसाईटचे जे अद्वितीय/वेगळे (Unique) नाव म्हणजे डोमेन (Domain) किंवा डोमेन नेम (Domain Name). उदा. तुम्ही फेसबुक उघडताना www.facebook.com टाईप करता. यातले www आणि .com हे शब्द इंटरनेटशी संबंधीत असतात तर facebook हे त्या वेबसाईटचे डोमेन (Domain) असते.
तुम्ही जेव्हा तुमची नवीन वेबसाईट तयार करणार असता तेव्हा त्याचे नाव किंवा डोमेन (Domain) हा अतिशय महत्वाचा भाग असतो. कारण ती तुमच्या ब्लॉगची ओळख असते. जसे माझ्या ब्लॉगचे नाव ‘शीतलउवाच’ आहे. त्यामुळे वेबसाईट उघडताना www.sheetaluwach.com टाईप करावे लागते. या डोमेन (Domain)वरून साईटचे नाव आणि त्याचा उद्देश लक्षात येतो. फेसबुक, ट्विटर किंवा इतर वेबसाईट्सचेही तसेच आहे.
तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम (Domain Name) नीट ठरवा ते इतरांपेक्षा वेगळे आणि आधीपासून वापरले गेलेले नसावे. या डोमेन नेम (Domain Name)वरून तुमची ओळख बनणार असल्याने ते काळजीपूर्वक आणि विषयाशी संबंधीत निवडा. डोमेन नेम निवडताना (Domain Name)काही संकेत पाळणे आवश्यक आहे.
ते –
१. कमीतकमी अक्षरांचे असावे. २. उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे ३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
हे नाव टाईप करून लोक तुमच्या ब्लॉगला भेट देणार, त्यामुळे वाचकांना ते सहज भावेल असे असावे. २. होस्टिंग (Hosting) – डोमेन (Domain) किंवा तुमच्या वेबसाईटसंबंधित माहिती फाईल्स जेथे स्टोअर होतात त्या जागेला किंवा प्रक्रियेला होस्टिंग (hosting) असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वेबसाईटचा डाटा (Data) ठेवलेला असतो. जसे आधार कार्ड काढून देणारी केंद्रे असतात तसेच तुमचे डोमेन (Domain) रजिस्टर करणाऱ्याही वेबसाईट्स असतात. जसे अनेक पर्यायातून आपण डिश टिव्हीचे पॅकेज निवडतो तसे होस्टिंगचेही अनेक पर्याय या वेबसाईटसवरून निवडता येतात.

डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration)

एकदा तुमच्या वेबसाईटचे बारसं झालं म्हणजे डोमेन नेम (Domain Name) तुम्ही ठरवलंत की मग तुम्ही होस्टिंग पुरवणाऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशनक करु शकता. उदाहरणार्थ . Go Daddy, Bluehost, Hostgator यासाठीचा खर्च हा तुम्ही घेत असलेल्या पॅकेजवर अवलंबून आहे. साधारण सर्वच वेबसाईटवर हे प्लॅन्स खाली दिलेल्या दोन चित्रात दाखवले आहेत त्याप्रमाणे दिसतात.

Hosting Plans
Hosting Plans

यातला इमेलचा पर्याय सोडला तर बाकीचे पर्याय हे ब्लॉगिंगसाठी किमान पहिल्या वर्षात तरी फारसे उपयोगाला येत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला जर स्वतंत्र इमेल नको असेल तर स्वस्तात स्वत प्लॅन निवडा. अधिक चिकित्सा करून हातात फारसं काही पडणार नाहीये!
एकदा प्ल्रॅन निवडल्यावर पुढे जा. आवश्यक माहिती भरताना तुम्हाला तुमच्या डोमेन (Domain) चे नाव रजिस्टर करायचा पर्याय उपलब्ध होईल. तुम्ही ठरवलेले डोमेन नेम (Domain Name) जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा ते नाव उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला कळेल. जर नाव उपलब्ध असेल तर प्रश्नच मिटला. परंतु जर नाव आधीच वापरले असेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता जसे .com ऐवजी .in किंवा co.in इ. डोमेन नेम (Domain Name) वापरात असल्याचा आणि इतर पर्यायांची सूचना खालीलप्रमाणे दिसते.

Domain Name Availability

त्यातील एक निवडून पुढील प्रक्रिया पार पाडली की झालं. जाता जाता काही अधिकच्या तांत्रिक संकल्पना पाहूयात. होस्टिंग प्लॅन निवडताना त्याची माहिती असल्यास मदत होईल.
Shared Hosting शेअर्ड होस्टिंग –
हे शेअर रिक्षासारखे प्रकरण आहे. जसे तुम्ही एका रिक्षातली जागा आणि भाडे दोन्ही शेअर करता तसे एकाच सर्व्हरवर जेव्हा तुमच्या वेबसाइटसह इतर वेबसाइटचाही डाटा (Data) म्हणजेच माहिती साठवली जाते त्याला शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting) म्हणतात. साधारणतः जेव्हा तुम्ही लहान व्यवसाय किवा ब्लॉग चालवता तेव्हा हा पर्याय उपयुक्त असतो कारण हा तुलनेत स्वस्त पर्याय आहे. तुमची वेबसाईट अन्य वेबसाइटसह सर्व्हर स्पेस, साधने इ. शेअर करत असल्याने त्याचा खर्चही वाटून घेतला जातो.
येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे की इतर वेबसाइट्स बरोबर जागेसह इतर साधनेही शेअर करत असल्याने सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर सगळ्यांचा एकत्रित परीणाम होतो. त्यामुळे इतर वेबसाईट्च्या ट्रॅफिकचा तुमच्या वेबसाईटच्या वेगावरही परीणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी होस्टींग प्लॅन (Hosting Plan) नामवंत आणि विश्वसनीय साईटवरूनच निवडा. अशा वेबसाईट एका सर्व्हवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेबसाइटस् लोड करत नाहीत जेणेकरून शेअर्ड होस्टींग असले तरी अडचण येत नाही.
Dedicated Server डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हर – येथे एक संपूर्ण सर्व्हर केवळ तुमची वेबसाईट होस्ट करण्यासाठी वापरला जातो. अर्थातच त्यामुळे हा अत्यंत खर्चिक पर्याय ठरतो. जेव्हा तुमची वेबसाईट उत्तम बिझनेस करत असेल आणि तुम्हाला विना अडथळा ट्रॅफिक हवे असेल तेव्हा हा पर्याय तुम्ही वापरु शकता. डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हरचे प्लॅन काहीसे खालीलप्रमाणे असतात.

Dedicated Hosting Plans

Uptime अपटाईम – वेबसाईट अपटाईम याचा अर्थ तुमच्या वाचकांना किंवा वापरकर्त्यांना ठरावीक काळात तुमची वेबसाईट वापरण्यासाठी किती वेळ उपलब्ध होती याचे गुणोत्तर.
म्हणजेच साध्या भाषेत दिवसभरातील दुकान चालू असण्याची वेळ आणि दिवसाचे एकूण तास याचे प्रमाण. वेबसाईट ऑनलाईन असल्याने ती सतत कार्यरत असणे अपेक्षित असते. म्हणजेच अपटाईम १००% असावा. परंतु हे लक्ष्य झाले. महिना किंवा वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण साधारण ९९% पर्यंत असले तरी चांगले मानले जाते.
बॅकअप (Back Up) – जसे तुम्ही तुमच्या संगणकाचा बॅकअप म्हणजे डाटा इतरत्र स्टोअर करून ठेवता तसेच तुमच्या वेबसाईटच्या संपूर्ण फाईल्स, माहिती इ. सुरक्षित करण्यासाठी त्याचा स्नॅपशॉट (Snap Shot)घेतला जातो याला बॅकअप असे म्हणतात.
यात वेबसाईटच्या प्रणाली (Coding)फाईल्स, माहितीसाठा (Database), चित्रे (Pictures) किंवा मिडीया (Media) आणि इतर तांत्रिक गोष्टी जसे की प्लगइन (Plugin), थिम्स (Themes) डिझाईन इ. गोष्टी साठवल्या जातात. दुर्दैवाने जर तुमची वेबसाईट क्रॅश झाली किंवा काही कारणाने केलेले बदल नको असतील तर तुम्ही जुना बॅकअप पुन्हा इंस्टॉल करू शकता आणि तुमची वेबसाईट पूर्ववत करु शकता.
होस्टिंग प्लॅन निवडताना बॅकअप ची सुविधा मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही. अर्थात यासाठी इतरही पर्याय असतात.
जाता जाता वेब होस्टिंग (Web Hosting) आणि डोमेन (Domain) रजिस्ट्रेशन करतानाच्या प्रमुख टिप्स नीट मनात ठसवा
१. डोमेन नेम (Domain Name) कमीतकमी अक्षरांचे असावे.
२. ते उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे.
३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
४. होस्टींग (Hosting) प्लॅन निवडताना तुमच्या गरजा ध्यानात घेऊन निवड करा.
५. वेबसाईटचा अपटाईम (Up Time) जास्तीत जास्त असावा.
६. होस्टिंग विक्रिपश्चात (Post Sales ), तांत्रिक सेवा (Technical Support) किंवा इतर अडचणी सोडवणारा कस्टमर केअर (Customer Care) विभाग चांगला असावा.
७. वेबसाईचा नियमित बॅकअप (Back Up) घेण्याची सुविधा असलेला प्लॅन निवडा.
८. होस्टिंग प्लॅनमध्येच सुरक्षा (Security), सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इ. सुविधा मिळत असल्यास उत्तमच.
९. या सर्व सूचनांसह तुमच्या बजेटमध्ये बसणारी आणि साधारण योग्य अशी किंमत देणारा प्लॅन निवडा.

एकदा डोमेन नेम (Domain Name) रजिस्टर झाले आणि होस्टिंग प्लॅन (Hosting Plan) निवडला की किमान वर्षभरासाठी तरी तुमची चिंता मिटली. आता तुम्ही वेबसाईटचे डिझाईन आणि लेखनावरती लक्ष केंद्रित करू शकता. वेबसाईट डिझाईनिंग आणि वापराबद्दल पुढील भागात.

ब्लॉग पहावा लिहून!

तुम्हाला लिहायची आवड आहे का? निरनिराळ्या विषयांवर आपले म्हणणे मुद्देसुदपणे मांडणे तुम्हाला जमते का? तसे असेल तर तुम्ही उत्तम ब्लॉग लिहू शकता. याचा अर्थ तुम्ही ब्लॉगर बनू शकता का ? तर त्याचे उत्तर मात्र नाही असे असेल!
केवळ खूप खाणाऱ्याला जसे खवय्या किंवा खूप गाणाऱ्याला गवई म्हणता येत नाही तसेच केवळ खूप लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणता येणार नाही. ब्लॉगर केवळ लिहित नाही. एखाद्या विषयावर उत्तम लेखन करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची कला साध्य करणे म्हणजे ब्लॉगर बनणे. जर सादरीकरण उत्तम नसेल तर ती कला लोकांपर्यंत पोचणे कठीण होते. ब्लॉगचेही तसेच आहे. अनेक उत्तम ब्लॉग्ज वाचकांपर्यंत नीट न पोचल्याने वाचलेच जात नाहीत! त्यासाठी काय करावे आणि कसे करावे हे आपण पाहणार आहोत. आज ब्लॉगिंग हा केवळ छंद राहिला नसून उत्तम लिखाण, माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा यशस्वी व्यवसाय म्हणून ब्लॉगिंगकडे पाहिले जाते.
तुम्ही केवळ छंद म्हणून ब्लॉग लिहित असाल आणि त्याचे वाचन तुमच्याशिवाय इतरांनी करावे किंवा करु नये असा तुमचा बाणा असेल तर तुम्हाला पुढे वाचायची आवश्यकता नाही!! तुमचा छंद हा तुमचा वैयक्तिक मामला आहे. लोकांना वाचायचे असल्यास वाचतील. अर्थात येथेही काही गोष्टी शिकणे क्रमप्राप्त आहे जसे की लेखनाचा मंच (ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) निवडणे, पानाचे सुशोभिकरण (पेज डिझाईन) करणे इ.इ. त्याबद्दल पुढे येईलच.
परंतु जर तुमचा ब्लॉग हा अधिकाधिक लोकांनी पहावा, वाचावा असे वाटत असेल तर त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागतील ज्याची आपण माहिती घेणार आहोत. ब्लॉग लिहायला सुरुवात करतानाच त्यातील खाचाखोचा नीट समजावून घेतल्या पाहिजेत नाही का?
ब्लॉगिंगची पहिली पायरी आहे ब्लॉग लिहिण्यासाठीचा मंच किंवा प्लॅटफॉर्म निवडणे. यात अनेक पर्याय आहेत. तुम्हाला ब्लॉगिंगमधून नक्की काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा हे ठरते.

Blogging Platforms – ऑनलाईन लेखन करण्याची जागा..

सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे लिखाण इंटरनेटवर जाऊन वाचता येईल अशी जागा म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म. यात अनेक पर्याय आहेत. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन फोरम्स (ऑनलाईन लिखाणाची व्यासपीठे, सोशल मिडीया इ.)
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स (खास ब्लॉगिंगसाठी बनवलेल्या वेबसाईट्स)
३) तुमची स्वतंत्र वेबसाईट
१) ऑनलाईन फोरम्स – वर्तमानपत्रात वाचकांनी लिहिलेल्या लेखांचा एक कॉलम येतो. त्यात लोक आपले विचार, अनुभव इ. मांडत असतात. ऑनलाईन फोरम्स तसेच असतात. इंटरनेटवरती अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या केवळ तुम्हाला लेखन करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर चर्चा करण्यासाठी, प्रश्न उत्तर आणि प्रत्युत्तरासाठी जागा उपलब्ध करून देतात. जसे मराठीत मायबोली, मिसळपाव किंवा कोरा यासारख्या वेबसाईटवरून तुम्ही हव्या त्या विषयांवर लिहू वाचू आणि चर्चा करू शकता. यात वेबसाईट्स तुम्हाला लेख लिहिण्यासाठी लागणारी सर्व प्राथमिक तयारी पुरवतात. तुमच्या लिखाणाला जागा पुरवणे, त्याची विषयवार क्रमवारी लावणे, लिखाणात चित्रे, व्हिडिओज, लिंक्स इ. टाकण्यासाठीची सोय करणे वाचकांच्या प्रतिसादाला जागा देणे इ.इ. याचे फायदे तोटे अनेक आहेत.
फायदे –
• अशा फोरम्सवर एकाचवेळी अनेक लोक लिहित आणि असंख्य लोक वाचत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लिखाणासाठी आपसूकच वाचक मिळतात.
• तुमचे लिखाण आवडल्यास लोक तुम्हाला फॉलो करू शकतात आणि तुमचा असा स्वतःचा एक वाचकवर्ग यातून तयार होऊ शकतो.
• हे फोरम्स विनामूल्य (फुकट) वापरता येतात.
तोटे –
• अशा फोरम्सवरील लेखन हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नसते. फोरमचे व्यवस्थापन ते फोरमवरून कधीही हटवू शकते.
• एकाच विषयावर अनेक लोक लिहित वाचत असल्याने तुमचे लिखाण चांगले असूनही गर्दीमुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
• वाचकांशी थेट संपर्क साधण्यावर फोरम्सचे नियंत्रण असते.
तुम्ही जर केवळ आवड म्हणूनच लिहित असाल तर असे फोरम्स उत्तम पर्याय आहेत. फक्त येथे तुम्ही ऑनलाईन लेखकांच्या गर्दीतले एक असल्याने तुम्हाला तुमची ओळख बनवायला बराच काळ जातो.
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स – तुम्हाला जर छंद म्हणून लिहायचे असेल परंतु ते फोरम्सवरच्या गर्दीपेक्षा अधिक स्वतंत्र हवे असल्यास हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही स्वतःचे पान/साईट तयार करू शकता आणि विविध विषयांवर लिहू शकता. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला लेखन, त्याचे व्यवस्थापन, पानाचे डिझाईन, इंटरनेटवर ते पान कसे दिसेल इ. सर्व सोयी पुरवतात. जसे तुम्ही फेसबुकवर लॉगीन करून स्वतःच्या पानावर जाता तसेच फकत खास लेखनासाठी वापरायचे म्हणून बनवलेले असे हे अनेक प्लॅटफॉर्म्स आजघडीला लाखो ब्लॉगर्स वापरतात. तुम्ही जर नव्यानेच ब्लॉगिंग करत असाल तर अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर फायदेशीर ठरतो कारण ब्लॉग तयार करणे, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग इ. साठी हे प्लॅटफॉर्म्स अनेक सुविधा पुरवतात. सध्या अनेक कंपन्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पुरवतात. उदा. वर्डप्रेस(WordPress), ब्लॉगर (Blogger), विक्स (Wix), टम्ब्लर (Tumblr), घोस्ट (Ghost) असे अनेक पर्याय आहेत. हा प्रत्येक पर्याय कमीजास्त प्रमाणात सारख्याच सुविधा पुरवतो. आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा. त्याबद्दल विस्ताराने नंतर लिहिनच.
फायदे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे फोरम्सवरील गर्दी टाळून तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख बनवता येते.
• तुमच्या लिखाणावर तुमचे अधिक नियंत्रण राहते. चित्र, व्हिडिओ इ. च्या वापरावर मर्यादा येत नाहीत.
• वाचक आणि तुम्ही एकमेकांशी थेट संपर्क साधू शकता.
तोटे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या विनामूल्य सुविधा मर्यादित असतात. अधिक सुविधा मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
• स्वातंत्र्य मर्यादित असते. उदा. तुमच्या वेबसाईटची लिंक किंवा इतर गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही.
• प्लॅटफॉर्मच्या फ्री अकाउंटवरून जाहिराती दाखवता येत नाहीत.
एकूणातच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हे हौशी परंतु व्यवासायिक इच्छा नसलेल्या लेखकांसाठी उत्तम पर्याय आहेत. अर्थातच यात पुढे लेखकाच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा फायदा लेखकापेक्षा फोरमप्रमाणेच प्लॅटफॉर्मला अधिक होतो. लिखाणाशिवाय इतर काही उद्देश नसल्यास ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हा एक उत्तम पर्याय आहे.
३. स्वतंत्र वेबसाईट – ब्लॉग लिहिण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट तयार करणे. हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्याचा गैरसमज उगाचच पसरल्याने अनेकजण याचा विचार करत नाहीत. वास्तविक आजकाल स्वतंत्र वेबसाईट रजिस्टर करणे आणि डिझाईन करणे अतिशय सुलभ झाले आहे. अर्ध्या तासाच्या अवधित या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. Go Daddy, Bluehost, Hostgator इ. अनेक वेबसाईटवरून तुम्हाला नवीन वेबसाईट नोंद करता येते. त्यासाठी खूप मोजके तांत्रिक ज्ञान लागते. स्वतंत्र वेबसाईट ही ब्लॉगिंग, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग, व्यवसाय अशी सर्व प्रकारची दारे खुली करते ते ही कोणत्याही बंधनांशिवाय. स्वतंत्र वेबसाईट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता किंवा येथेही तुम्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स वापरु शकता. ते तुम्हाला तुमची वेबसाईट मॅनेज करणे, डिझाईन, लेखन यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात. हा कमी खर्चिक आणि अधिक स्वतंत्र पर्याय आहे. यात वर्डप्रेस (WordPress) अग्रगण्य आहे जो जवळपास सर्वप्रकारची साधने विनामूल्य उपलब्ध करून देतो. त्याबद्दल अर्थातच पुढे स्वतंत्र लेख येईल.
फायदे – • कोणत्याही बंधनांशिवाय लेखन करता येते.
• वेबसाईट व्यवस्थापन, डिझाईन, जाहिराती, वाचकांशी संपर्क या गोष्टींवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण राहते.
• लिखाणाच्या लिंक्स, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन, स्वतंत्र इमेल, चॅट अशा अनेक सुविधा वापरता येतात.
तोटे – या पर्यायाचे कोणतेही दृष्य तोटे नाहीत.
• डिझाईन, व्यवस्थापन, सुरक्षा, अपडेट्स, ऑप्टिमायझेशन इ. तांत्रिक बाबी स्वतःच सांभाळाव्या लागतात. अर्थात यासाठी ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स आणि इतर अनेक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने चालवलेली स्वतंत्र वेबसाईट हा ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्ही लेखनासह डिझाईन, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या सर्व बाजू स्वतःच्या नियंत्रणात ठेऊ शकता आणि उत्तम ब्लॉगर बनू शकता. स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यासाठीचे पर्याय, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सची तुलना इ. विषयी पुढील भागात.

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact