अंतरंग – भगवद्गीता – विभूतियोग

शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।
मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं, काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं।
काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर, खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं।

संत नामदेव नित्य नेमाने विठ्ठलाशी संवाद करत असत. एकदा विठ्ठलाने त्यांना सांगितले की ‘जोपर्यंत तुझ्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तुला निर्गुण निराकार भगवंताच्या वास्तविक स्वरुपाचे ज्ञान होणार नाही. तेव्हा तू विसोबा खेचर नामक गृहस्थांना भेट. ते तुला उत्तम दृष्टांत देतील.’ नामदेव जेव्हा विसोबा खेचरांना भेटायला गेले तेव्हा त्यांना विलक्षण दृष्य दिसले. विसोबा निवांतपणे पहुडले होते आणि त्यांचे पाय महादेवाच्या पिंडीवर विसावले होते. ते पाहून नामदेवांना सहाजिकच राग आला. ते पाहून विसोबा म्हणाले, “बाबा रे, वार्धक्यामुळे मला पाय उचलणेही कठीण जाते. तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे टेकव” नामदेवांनी विसोबांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. परंतु तेथेही तेच झाले. पाय टेकताच त्याच्या खाली पुन्हा महादेवाची पिंड दिसायला लागली. नामदेवांना कळेना. हा जागा बदलण्याचा उद्योग चार पाच वेळा करुनही तोच परिणाम दिसायला लागल्यावर नामदेव विसोबांना शरण गेले. विसोबांनी त्यांना सांगितले की – ईश्वर हा सर्वव्यापी सर्वत्र आहे, मग पाय कोठेही ठेवल्याने काय फरक पडतो. फरक आपल्या दृष्टीचा आहे.

“चराचरातील भगवंताचे हे अधिष्ठान जाणणे म्हणजेच त्याच्या शक्तीचे/विभूतिचे स्वरुप जाणणे होय. ते जाणणारा भक्त भगवंताशी एकरुप होतो आणि भूतातेही भगवंताला प्राप्त करतो.”

विभूति हा शब्द पुरेसा जाणल्यास विभूतियोग जाणणे कठीण नाही. रुढार्थाने विभूति हा शब्द मोठ्या महान व्यक्तीसाठी वापरला जातो. परंतू विभूति शब्दाचा मूळ अर्थ विशेष शक्ती, सामर्थ्य किंवा तेज असा आहे. तेज जे सर्वकाही व्यापते.
अगदी साध्या शब्दात सांगायचे तर ‘वि म्हणजे विशेष’ आणि ‘भूत म्हणजे जीव, भूतमात्र किंवा आपण सारे’! त्यामुळे असा जीव ज्यात काही विशेष आहे त्याला विभूति असे म्हणायला हरकत नाही. असे काय आहे जे विशेष आहेच परंतू सर्व भूतमात्रात आहे? अर्थातच आत्मा, चैतन्य किंवा परमात्म्याचा अंश. म्हणूनच आपल्यातील परमात्म्याला जो जाणतो तोच चराचरातील भगवंतालाही जाणतो आणि म्हणूनच तर अशा ज्ञानी माणसाला वि-भूती म्हणले जाते. श्रीकृष्ण अर्जुनालाही हेच सांगतो की – जे जे उत्तम , उदात्त उन्नत आहे त्याच्या ठायी माझा भाव जाणणे म्हणजेच विभूति जाणणे. ते जे उन्नत उदात्त आहे ते स्वतः आणि ते जाणणारा व्यक्ती दोघेही विभूतिमत्वाला पोचतात.

(अशा उदात्ताच्या ध्यासातून मिळणारी मुक्ती किंवा मोक्ष हे प्रत्येक भूताचे ध्येय आहे. म्हणूनच तर सावरकरांनी मोक्ष आणि मुक्ती ही स्वातंत्र्यदेवतेची रुपे आहेत असे म्हटले आहे. केवळ इंग्रजांचे जोखड मानेवरून उखडून टाकणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे त्याचा ध्यास घेणे हे सावरकरांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य होते. विभूति कोणाला म्हणावे हे येथे स्पष्ट व्हावे!! असो)

मुण्डक उपनिषदापासून ते भागवतपुराणापर्यंत तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथात आणि अगदी किरातार्जुनीयासारख्या महाकाव्यातही ‘विभूति’ हा शब्द विशेष शक्ती, तेज किंवा परमात्म्याचा अंश याच अर्थाने वापरला आहे. श्रीकृष्णही अर्जुनाला आपल्या विभूतिंचा परिचय अनेक उदाहरणातून करून देतो.
येथे केवळ हे ध्यानात घ्यायचे आहे की ही उदाहरणे आहेत. याचा केवळ भगवंताने वर्णन केलेल्याच विभूतित त्याचे अस्तीत्व जाणवते आणि इतरात नाही असे नाही. विसोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्वाभूती सर्वव्यापी आहे केवळ साधकाला म्हणजे अर्जुनाला (आणि आपल्यालाही) समजण्यास सोपे जावे म्हणून वानगीदाखल घेतलेली नावे ही या अध्यायात येतात. भगवंताच्या विभूति योगाबद्दल पुढील भागात.
तळटीप
१. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूति जीवस्य मायारचितस्य नित्याः।
आविर्हिताः क्वापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे ह्यविशुद्धकर्तुः ॥ (भागवत – ५/१२)
२. यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् ।
तं तं लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत्भूतिकामः। (मुण्डकोपनिषद – ३.१.१०)
३. हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः। यस्याङ्‌घ्रिरेणुं जुषतेऽनभीप्सोः।(भागवत – ५/१२/२०)
४. त्रीनत्यरोच उपलभ्य ततोविभूतिं लोकान् स मां व्यसृजदुत्स्मयतीं तदन्ते। (भागवत – १/१६/३५)
५. इत्युक्तवन्तं परिरभ्य दोर्भ्यां तनूजं आविष्कृतदिव्यमूर्तिः।<>br अघोपघातं मघवा विभूत्यै भवोद्भवाराधनं आदिदेश । (किरातार्जुनीय ११.८०)

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग (अंतिम)

सातव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात, भक्तीचे आणि भगवंताच्या साक्षात्काराचे स्वरुप सांगत असताना, श्रीकृष्ण ‘अधिभूत’, ‘अधिदैव’ आणि ‘अधियज्ञ’ अशा संज्ञा वापरतो. त्यांचे अर्थ पुरसे न समजल्याने अर्जुन त्याला अध्यात्मासह सर्व संज्ञांचा अर्थ विचारतो. त्यामुळे आठव्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला या सर्व संकल्पना विस्ताराने समजावून सांगतो. त्यानंतर अर्थातच तो आपली वि-ज्ञानाची चर्चा पुढे चालू ठेवतो. म्हणूनच ‘राजविद्याराजगुह्ययोग’ हा अध्याय खरंतर ज्ञानविज्ञानयोगाचा पुढील भागच म्हणायला हवा. या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतो.

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌॥
दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू अ-शुभापासून मुक्त होशील.

ज्ञानविज्ञानात सांगितलेले विशेष ज्ञान असो किंवा त्याही आधी विषद केलेले ज्ञान आणि कर्मयोग, श्रीकृष्ण वारंवार त्याच तत्वांचा पुनरुच्चार करतो, उदाहरणे देतो. त्यामुळे अर्जुनाच्या मनातील शंका दूर होतात आणि आपल्याही!
नवव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो की –
‘प्रत्येक युगाच्या अंती सर्व भूतमात्र मला येऊन मिळतात आणि नवीन युगाच्या आरंभी मी त्यांचे पुनः सर्जन करतो.’
येथे हे ध्यानात घेतले पाहीजे की – या श्लोकातील ‘मी’ हा सृष्टीकर्ता परमात्मा आहे. श्रीकृष्ण हे त्या परमात्म्याने धारण केलेले एक मूर्त रूप (अवतार) आहे.
येथे अवतार या शब्दाचा नीट अर्थ समजून घेणे उचित ठरेल. अव + तृ याचा अर्थ (खाली) उतरणे असा होतो. परमात्मा जेव्हा मूर्त रुपाने खाली (येथे भूलोकात) उतरतो तेव्हा त्यास अवतार असे म्हणतात. एका अर्थाने परमात्म्याच्या अंशरुपाने अवतीर्ण झालेले मूर्त रुप (अवतार) हे आपल्यासारखेच भूतमात्र आहे. कारण आपल्यातही त्याच परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच राम काय किंवा कृष्ण काय हे भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करतात, सुखदुःख भोगतात. आपल्यात आणि त्यांच्यात फरक इतकाच की जे तत्व जाणायला आपल्याला अनेक जन्म लागतात ते तत्व त्यांना याच जन्मी उमगते. त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करून ते पुन्हा परमात्म्यात विलिन होतात.
श्रीकृष्णही अर्जुनाला हेच सांगतोय.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌॥
हे कौन्तेया (कुंतीपुत्रा), कल्पाच्या (युगाच्या) शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो.

मी जरी त्यांना उत्पन्न करत असलो तरी या कर्माचे फल मला बाधत नाही. कारण हे सर्जन अत्यंत निष्काम वृत्तीनेच मी करतो. कर्मसिद्धांतानुसार फळाच्या अपेक्षेशिवाय, निष्काम वृत्तीने केलेल्या कर्माचे बंधन बाधत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण पुढे म्हणतो की प्रत्येक भूतमात्र हे कर्माच्या फलस्वरुप माझ्यापासून उत्पन्न होतात. परंतु मी त्यांच्यात नसतो. कारण प्रत्येकाच्या कर्मफलानुसार त्याचे सर्जन होते आणि हे कर्म मी निष्काम भावनेने करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥
अव्यक्त (अशा) मी (परमात्म्याने) हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.

म्हणूनच जसा मी, कर्माच्या ठायी उदासीन असतो तसे उदासीन राहणारा व्यक्तीही जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होऊन मला येऊन मिळतो.परंतु याउलट हा भाव न जाणणारे मूढ लोक, अवतार घेऊन कर्म करणाऱ्या मला सामान्य मनुष्य समजतात. सकाम भक्ती करणारे लोकही याच प्रकारे कर्मबंधनाने बाधित होतात, असे श्रीकृष्ण म्हणतो.
ज्ञानविज्ञानयोगात श्रीकृष्णाने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी. यातील सकाम भक्ती करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासु भक्त परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत. ते काही एक उद्दीष्ट्य समोर ठेवून भक्ती/उपासना करतात. म्हणूनच मग आपल्या कर्मासंबंधी उदासीनता प्राप्त होत नसल्याने जन्ममृत्युच्या चक्रात अडकतात. आपल्या कर्माच्या फलस्वरुप पुण्य प्राप्त करुन स्वर्गात जातात. पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा मृत्युलोकात येतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते।
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. (अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.)

अतिशय साधे परंतु परिणामकारक तत्व येथे श्रीकृष्ण सांगतो. जो ज्याची इच्छा, कामना किंवा भक्ती करतो तो त्या गतीला प्राप्त होतो.

(आपला शाहरुख ते …कायनात वगैरे वाल्या शेरात तरी दुसरे काय सांगतो म्हणा :P)

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌।
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

अशाप्रकारे जे ज्याचे उपास्य दैवत तो त्या गतीला पोचतो. भौतिक सुख हवे तर त्याची उपासना करा, वस्तु किंवा पद हवे तर त्याची. व्यक्ती जसे आणि जितके प्रयत्न करेल त्यानुसार फळ त्याला मिळेल यात शंका नाही.
मग जर परमात्म्याला प्राप्त करायचे तर भक्तीही परमात्म्याचीच करायला हवी!

तानसेनाची एक सुंदर कथा आहे.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने तानसेन दरबाराला मोहून टाकत असतो. अकबराला असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन त्या तुलनेत काहीच नाही. माझ्या गुरुंचे गाणे हे अलौकीक असा साक्षात्कार देणारे गाणे असते. मी त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. अकबराच्या हट्टापायी दोघेही तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेत गुरुदेवांची भेट घडते. एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय आणि निसर्गासह आपल्या शरीरातील कणन् कण केवळ गाणं ऐकतोय असा अलौकिक अनुभव अकबराला येतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव निघुन गेलेले असतात. सहाजिकच अकबर तानसेनाला विचारतो की अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो, “मी भूतलावरील अनेकांपैकी एका राजाला प्रसन्न करण्यासाठी गातो तर माझे गुरुदेव हे एकमेवाद्वितीय अशा अनन्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! जो ज्याची उपासना करतो त्याला तशी गती प्राप्त होते.

येथे शेवटचे वाक्य नीट समजून घेतले पाहीजे. अनेकदा असे सांगितले जाते की खुप पुण्य केले की मोक्ष प्राप्ती होते. हे अर्धसत्य आहे. पुण्याची प्राप्त केल्याने उत्तम गती प्राप्त होते कारण ते एक चांगले कर्म आहे. चांगले कर्म चांगली गती असे साधे सूत्र आहे. म्हणून मग पुण्यात्मा स्वर्गस्थ होईल आणि पुण्यक्षय झाला की पुन्हा भूलोकी जन्म घेईल. पाप पुण्य, सुखदुःख किंवा चांगले वाईट हे परस्परविरोधी अवस्था दाखविणारे हे भोग आहेत. पाप केलं दुःख प्राप्त होते, पुण्य केले सुख प्राप्त होते. मोक्ष याच्या पलिकडे आहे. मोक्ष म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्हीच्याही पुढची अवस्था आहे. म्हणून त्याच्या विरुद्धार्थी अवस्थाच नसते! परमात्म्याची प्राप्ती ही अनन्यसाधारण अवस्था आहे म्हणूनच त्याची भक्ती ही अनन्यभावनेनेच केली पाहीजे.
हे झाले सकाम भक्तीबद्दल…
श्रीकृष्णाला आवडणारा ज्ञानी भक्त मात्र भगवंताचे अनन्य स्वरुप जाणतो आणि त्याची निष्काम उपासना करतो. त्यामुळे कर्माची बंधने टाळून परमगती प्राप्त करतो.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌।
परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतो की जे अशा प्रकारे अनन्यभावाने माझी भक्ती करतात त्यांना त्यांची योग्य गती मी प्राप्त करून देतो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

योगक्षेमम् वहाम्यहम्। या उक्तीचा असा अर्थ घ्यायचा आहे.
अशाप्रकारे ज्ञानविज्ञानयोगात प्रारंभ केलेले परमात्म्याच्या साक्षात्काराचे विवेचन येथे नवव्या अध्यायात श्रीकृष्ण पूर्ण करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।

परस्परविरोधी वाटणारे परंतु कर्मसिद्धांताचे समर्थन करणारे हे तत्व जाणणे ही खरी श्रेष्ठ विद्या आहे म्हणून याला राजविद्या असे म्हटले आहे. पाप पुण्याच्या कोष्टकातील सकाम भक्तीच्याही पुढे जाऊन निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती केल्यासच त्याची प्राप्ती होते हे खरे गुह्य (गुपित किंवा गुढ तत्व) म्हणूनच या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असे ठेवले आहे.

**गंमतीचा भाग असा की राजगुह्य या शब्दाचे दोन्ही भाग हे एकमेकांचे हिंदी आणि मराठी प्रतिशब्दच आहेत.

असो भगवंताच्या साक्षात्काराबद्दल पुढील भागात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

अध्याय नववा

बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) ‘राजविद्याराजगुह्ययोग’ असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत – लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली! पण मग लोक केवळ या अध्यायाचेच भाषांतर किंवा निरुपण वाचून गीतेत ‘…असे म्हटले आहे’ किंवा ‘…तसे म्हटले आहे’ असे सांगायला लागले. गंमतीचा भाग असा की बाकीचे अध्याय सोडून एकदम नवव्या अध्यायात जे म्हटले आहे त्याचा अर्थ लावल्याने समजापेक्षा गैरसमज अधिक फोफावले!

जिना चढताना एकदम नववी पायरी घ्यावी आणि पाय अवास्तव ताणल्याने पडावे किंवा अवघडावे तशी अनेकांची अवस्था झाली! आपण आधी पाहिल्याप्रमाणे गीतेच्या १८ अध्यायांचा सोपान ही अतिशय जाणीवपूर्वक रचलेली विचारांची साखळी आहे. कोणत्याची श्लोकाचा त्याच्या आधीच्या आणि चालू अध्यायाच्या योग्य संदर्भाशिवाय उल्लेख केल्यास त्याच्या अर्थाचा विपर्यास होण्याचा धोका असतो. हे आपण मागच्या अध्यायात पाहिलेच आहे. (पहा – अक्षरब्रह्मयोग). या अध्यायातही अशी उदाहरणे मिळतील. वानगीदाखल नवव्या अध्यायातले एक उदाहरण घेऊ.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला एलआयसी (LIC) चे बोधवाक्य ठाऊक आहे.
योगक्षेमं वहाम्यहम्।।
या उद्गारांचा शब्दशः अर्थ –
‘मी (अहम्) उपजिविकेचा भार (योगक्षमम्) वहन करेन (वहामि)’
असा होतो.याचा अर्थ तुमच्या उपजिविकेचा भार एलआयसी वाहणार आहे. आता हे बोधवाक्य वाचून जर प्रत्येकजण एलआयसीच्या दारात उभा रहायला लागला तर त्याला काय म्हणावे!!?
हे बोधवाक्य आहे. त्यातून बोध घ्यायचा आहे गैरसमज नव्हे. बोध घ्यायचा तर त्या वाक्याचा ससंदर्भ अर्थ ध्यानात घ्यायला हवा.
पूर्ण श्लोक असा आहे

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त माझे (परमेश्वराचे) निरंतर चिंतन करीत (मला) निष्काम भावाने भजतात, त्या नित्य चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

म्हणजे काय, तर जे लोक नित्यनियमितपणे एलआयसीची भक्ती करतात (पॉलिसीचे हप्ते भरतात) त्यांच्या उपजिविकेची काळजी एलआयसी करेल. जे अर्थातच खरे आहे. पण केवळ अर्धेच वचन वाचून त्याचा अर्थ घ्यायला जाणाऱ्याची फजिती होणे सहाजिकच नाही का?
(पुलंना घर दाखवणारा कुळकर्णी जेव्हा ‘हा वर जायचा रस्ता! ’ असे म्हणतो तेव्हा घर दाखविण्याचा संदर्भ लक्षात न घेता अर्थ घेतला तर भलताच समज व्हायचा… (पहा – मी आणि माझा शत्रुपक्ष)

आता सिनेमातल्या श्लोकाकडे पहा

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्।
आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार उत्पन्न करतो.

येथे ‘मी उत्पन्न करतो’ इतकाच अर्थ घेऊन ‘सृष्टीची उत्पत्ती आणि नाश भगवंताच्या इच्छेने होतो’ असे म्हणणे हे केवळ अर्धसत्य झाले. व्यक्तीच्या कर्मानुरुप गती त्याला प्राप्त होते हे श्रीकृष्णाने आधीच्या अध्यायात सांगून ठेवले आहे. तसेच या आधीच्या सातव्या श्लोकात (९-७)

‘कल्पाच्या किंवा युगाच्या आरंभी संपूर्ण भूतमात्र माझ्यात विलिन होते आणि मी त्याचे पुनः सर्जन करतो’

असेही श्रीकृष्ण सांगतो. याचा अर्थ व्यक्ती जसे कर्म करेल तसे फळ त्याला मिळेल.
संपूर्ण सृष्टीचक्राला हा नियम लागू पडतो. जरूरीपेक्षा जास्त वाढलेली वृक्षाची फांदी बुंध्याला वजन न पेलल्यामुळे तुटुन पडते. आवश्यकतेपेक्षा जास्तीचे अतिक्रमणाने निसर्गाचा समतोल ढळतो व त्याच्या परिणामस्वरुप नैसर्गिक आपत्ती येते. म्हणूनच बेसुमार वृक्षतोड, खाणकाम किंवा प्रदुषण करणाऱ्या माणसांच्या समुहाला पूर, ज्वालामुखी, भूकंप किंवा त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते हे त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ नव्हे काय? तेथे ईश्वराच्या शक्तीला दोष देणे, तेही एका वेगळ्या काढलेल्या श्लोकाच्या संदर्भाने, हे अयोग्य आहे.
मौजेचा भाग म्हणजे सिनेमाच्या अंतिम भागात प्रत्यक्ष देवच माणसाच्या मूर्खपणाचे वाभाडे काढतो. श्रीकृष्ण (कुमार अक्षय!) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सांगतो. धर्माच्या नावाखाली मानवाने देवावर कसे अतिक्रमण केले हे तो दाखवून देतो. म्हणूनच मग सृष्टीच्या सर्जनामागचे मूळ तत्व एकच आहे हे विसरून अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक देव(!) कसे निर्माण केले जातात, याच निर्मात्यांचे भाऊबंद असणारे उरलेले मानव याला कसे बळी पडतात हेही तो सांगतो! जे श्लोकाचा, धर्मग्रंथाचा आणि पर्यायाने ईश तत्वाचा विपरीत अर्थ खरा समजून अंधश्रद्धेत गुरफटून जातात. त्यांच्या विनाशाला ते स्वतः च कारणीभूत ठरतात देव नाही.
सिनेमात शेवटी श्रीकृष्ण जे सांगतो ते गुपित म्हणजेच राजविद्या-राजगुह्य-योग. त्याबद्दल अधिकचे पुढील भागात…

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

(How to register a domain) डोमेन रजिस्ट्रेशन कसे करावे?

मागच्या भागात आपण मराठीत ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग लिहिण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? याची प्राथमिक माहिती घेतली. स्वतंत्र वेबसाईट तयार करणे ही व्यवसायिक ब्लॉगिंगची पहिली पायरी असते हे आपण शिकलो. अशी साईट तयार करण्यासाठची पहिली पायरी म्हणजेच डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration) आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी होस्टिंग प्लॅन Hosting Plan) कसा निवडायचा हे आपण या भागात पहाणार आहोत.
सर्वप्रथम येथे काही तांत्रिक (technical) शब्द सतत आपल्या कानावर येतील त्याची नीट माहिती घेऊ.

डोमेन (Domain) आणि होस्टिंग (hosting).

डोमेन (Domain) – कोणत्याही वेबसाईवर जाण्यासाठी जो पत्ता तुम्ही टाईप करता त्यातले त्या वेबसाईटचे जे अद्वितीय/वेगळे (Unique) नाव म्हणजे डोमेन (Domain) किंवा डोमेन नेम (Domain Name). उदा. तुम्ही फेसबुक उघडताना www.facebook.com टाईप करता. यातले www आणि .com हे शब्द इंटरनेटशी संबंधीत असतात तर facebook हे त्या वेबसाईटचे डोमेन (Domain) असते.
तुम्ही जेव्हा तुमची नवीन वेबसाईट तयार करणार असता तेव्हा त्याचे नाव किंवा डोमेन (Domain) हा अतिशय महत्वाचा भाग असतो. कारण ती तुमच्या ब्लॉगची ओळख असते. जसे माझ्या ब्लॉगचे नाव ‘शीतलउवाच’ आहे. त्यामुळे वेबसाईट उघडताना www.sheetaluwach.com टाईप करावे लागते. या डोमेन (Domain)वरून साईटचे नाव आणि त्याचा उद्देश लक्षात येतो. फेसबुक, ट्विटर किंवा इतर वेबसाईट्सचेही तसेच आहे.
तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम (Domain Name) नीट ठरवा ते इतरांपेक्षा वेगळे आणि आधीपासून वापरले गेलेले नसावे. या डोमेन नेम (Domain Name)वरून तुमची ओळख बनणार असल्याने ते काळजीपूर्वक आणि विषयाशी संबंधीत निवडा. डोमेन नेम निवडताना (Domain Name)काही संकेत पाळणे आवश्यक आहे.
ते –
१. कमीतकमी अक्षरांचे असावे. २. उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे ३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
हे नाव टाईप करून लोक तुमच्या ब्लॉगला भेट देणार, त्यामुळे वाचकांना ते सहज भावेल असे असावे. २. होस्टिंग (Hosting) – डोमेन (Domain) किंवा तुमच्या वेबसाईटसंबंधित माहिती फाईल्स जेथे स्टोअर होतात त्या जागेला किंवा प्रक्रियेला होस्टिंग (hosting) असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वेबसाईटचा डाटा (Data) ठेवलेला असतो. जसे आधार कार्ड काढून देणारी केंद्रे असतात तसेच तुमचे डोमेन (Domain) रजिस्टर करणाऱ्याही वेबसाईट्स असतात. जसे अनेक पर्यायातून आपण डिश टिव्हीचे पॅकेज निवडतो तसे होस्टिंगचेही अनेक पर्याय या वेबसाईटसवरून निवडता येतात.

डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration)

एकदा तुमच्या वेबसाईटचे बारसं झालं म्हणजे डोमेन नेम (Domain Name) तुम्ही ठरवलंत की मग तुम्ही होस्टिंग पुरवणाऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशनक करु शकता. उदाहरणार्थ . Go Daddy, Bluehost, Hostgator यासाठीचा खर्च हा तुम्ही घेत असलेल्या पॅकेजवर अवलंबून आहे. साधारण सर्वच वेबसाईटवर हे प्लॅन्स खाली दिलेल्या दोन चित्रात दाखवले आहेत त्याप्रमाणे दिसतात.

Hosting Plans
Hosting Plans

यातला इमेलचा पर्याय सोडला तर बाकीचे पर्याय हे ब्लॉगिंगसाठी किमान पहिल्या वर्षात तरी फारसे उपयोगाला येत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला जर स्वतंत्र इमेल नको असेल तर स्वस्तात स्वत प्लॅन निवडा. अधिक चिकित्सा करून हातात फारसं काही पडणार नाहीये!
एकदा प्ल्रॅन निवडल्यावर पुढे जा. आवश्यक माहिती भरताना तुम्हाला तुमच्या डोमेन (Domain) चे नाव रजिस्टर करायचा पर्याय उपलब्ध होईल. तुम्ही ठरवलेले डोमेन नेम (Domain Name) जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा ते नाव उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला कळेल. जर नाव उपलब्ध असेल तर प्रश्नच मिटला. परंतु जर नाव आधीच वापरले असेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता जसे .com ऐवजी .in किंवा co.in इ. डोमेन नेम (Domain Name) वापरात असल्याचा आणि इतर पर्यायांची सूचना खालीलप्रमाणे दिसते.

Domain Name Availability

त्यातील एक निवडून पुढील प्रक्रिया पार पाडली की झालं. जाता जाता काही अधिकच्या तांत्रिक संकल्पना पाहूयात. होस्टिंग प्लॅन निवडताना त्याची माहिती असल्यास मदत होईल.
Shared Hosting शेअर्ड होस्टिंग –
हे शेअर रिक्षासारखे प्रकरण आहे. जसे तुम्ही एका रिक्षातली जागा आणि भाडे दोन्ही शेअर करता तसे एकाच सर्व्हरवर जेव्हा तुमच्या वेबसाइटसह इतर वेबसाइटचाही डाटा (Data) म्हणजेच माहिती साठवली जाते त्याला शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting) म्हणतात. साधारणतः जेव्हा तुम्ही लहान व्यवसाय किवा ब्लॉग चालवता तेव्हा हा पर्याय उपयुक्त असतो कारण हा तुलनेत स्वस्त पर्याय आहे. तुमची वेबसाईट अन्य वेबसाइटसह सर्व्हर स्पेस, साधने इ. शेअर करत असल्याने त्याचा खर्चही वाटून घेतला जातो.
येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे की इतर वेबसाइट्स बरोबर जागेसह इतर साधनेही शेअर करत असल्याने सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर सगळ्यांचा एकत्रित परीणाम होतो. त्यामुळे इतर वेबसाईट्च्या ट्रॅफिकचा तुमच्या वेबसाईटच्या वेगावरही परीणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी होस्टींग प्लॅन (Hosting Plan) नामवंत आणि विश्वसनीय साईटवरूनच निवडा. अशा वेबसाईट एका सर्व्हवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेबसाइटस् लोड करत नाहीत जेणेकरून शेअर्ड होस्टींग असले तरी अडचण येत नाही.
Dedicated Server डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हर – येथे एक संपूर्ण सर्व्हर केवळ तुमची वेबसाईट होस्ट करण्यासाठी वापरला जातो. अर्थातच त्यामुळे हा अत्यंत खर्चिक पर्याय ठरतो. जेव्हा तुमची वेबसाईट उत्तम बिझनेस करत असेल आणि तुम्हाला विना अडथळा ट्रॅफिक हवे असेल तेव्हा हा पर्याय तुम्ही वापरु शकता. डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हरचे प्लॅन काहीसे खालीलप्रमाणे असतात.

Dedicated Hosting Plans

Uptime अपटाईम – वेबसाईट अपटाईम याचा अर्थ तुमच्या वाचकांना किंवा वापरकर्त्यांना ठरावीक काळात तुमची वेबसाईट वापरण्यासाठी किती वेळ उपलब्ध होती याचे गुणोत्तर.
म्हणजेच साध्या भाषेत दिवसभरातील दुकान चालू असण्याची वेळ आणि दिवसाचे एकूण तास याचे प्रमाण. वेबसाईट ऑनलाईन असल्याने ती सतत कार्यरत असणे अपेक्षित असते. म्हणजेच अपटाईम १००% असावा. परंतु हे लक्ष्य झाले. महिना किंवा वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण साधारण ९९% पर्यंत असले तरी चांगले मानले जाते.
बॅकअप (Back Up) – जसे तुम्ही तुमच्या संगणकाचा बॅकअप म्हणजे डाटा इतरत्र स्टोअर करून ठेवता तसेच तुमच्या वेबसाईटच्या संपूर्ण फाईल्स, माहिती इ. सुरक्षित करण्यासाठी त्याचा स्नॅपशॉट (Snap Shot)घेतला जातो याला बॅकअप असे म्हणतात.
यात वेबसाईटच्या प्रणाली (Coding)फाईल्स, माहितीसाठा (Database), चित्रे (Pictures) किंवा मिडीया (Media) आणि इतर तांत्रिक गोष्टी जसे की प्लगइन (Plugin), थिम्स (Themes) डिझाईन इ. गोष्टी साठवल्या जातात. दुर्दैवाने जर तुमची वेबसाईट क्रॅश झाली किंवा काही कारणाने केलेले बदल नको असतील तर तुम्ही जुना बॅकअप पुन्हा इंस्टॉल करू शकता आणि तुमची वेबसाईट पूर्ववत करु शकता.
होस्टिंग प्लॅन निवडताना बॅकअप ची सुविधा मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही. अर्थात यासाठी इतरही पर्याय असतात.
जाता जाता वेब होस्टिंग (Web Hosting) आणि डोमेन (Domain) रजिस्ट्रेशन करतानाच्या प्रमुख टिप्स नीट मनात ठसवा
१. डोमेन नेम (Domain Name) कमीतकमी अक्षरांचे असावे.
२. ते उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे.
३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
४. होस्टींग (Hosting) प्लॅन निवडताना तुमच्या गरजा ध्यानात घेऊन निवड करा.
५. वेबसाईटचा अपटाईम (Up Time) जास्तीत जास्त असावा.
६. होस्टिंग विक्रिपश्चात (Post Sales ), तांत्रिक सेवा (Technical Support) किंवा इतर अडचणी सोडवणारा कस्टमर केअर (Customer Care) विभाग चांगला असावा.
७. वेबसाईचा नियमित बॅकअप (Back Up) घेण्याची सुविधा असलेला प्लॅन निवडा.
८. होस्टिंग प्लॅनमध्येच सुरक्षा (Security), सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इ. सुविधा मिळत असल्यास उत्तमच.
९. या सर्व सूचनांसह तुमच्या बजेटमध्ये बसणारी आणि साधारण योग्य अशी किंमत देणारा प्लॅन निवडा.

एकदा डोमेन नेम (Domain Name) रजिस्टर झाले आणि होस्टिंग प्लॅन (Hosting Plan) निवडला की किमान वर्षभरासाठी तरी तुमची चिंता मिटली. आता तुम्ही वेबसाईटचे डिझाईन आणि लेखनावरती लक्ष केंद्रित करू शकता. वेबसाईट डिझाईनिंग आणि वापराबद्दल पुढील भागात.

ब्लॉग पहावा लिहून!

तुम्हाला लिहायची आवड आहे का? निरनिराळ्या विषयांवर आपले म्हणणे मुद्देसुदपणे मांडणे तुम्हाला जमते का? तसे असेल तर तुम्ही उत्तम ब्लॉग लिहू शकता. याचा अर्थ तुम्ही ब्लॉगर बनू शकता का ? तर त्याचे उत्तर मात्र नाही असे असेल!
केवळ खूप खाणाऱ्याला जसे खवय्या किंवा खूप गाणाऱ्याला गवई म्हणता येत नाही तसेच केवळ खूप लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणता येणार नाही. ब्लॉगर केवळ लिहित नाही. एखाद्या विषयावर उत्तम लेखन करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची कला साध्य करणे म्हणजे ब्लॉगर बनणे. जर सादरीकरण उत्तम नसेल तर ती कला लोकांपर्यंत पोचणे कठीण होते. ब्लॉगचेही तसेच आहे. अनेक उत्तम ब्लॉग्ज वाचकांपर्यंत नीट न पोचल्याने वाचलेच जात नाहीत! त्यासाठी काय करावे आणि कसे करावे हे आपण पाहणार आहोत. आज ब्लॉगिंग हा केवळ छंद राहिला नसून उत्तम लिखाण, माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा यशस्वी व्यवसाय म्हणून ब्लॉगिंगकडे पाहिले जाते.
तुम्ही केवळ छंद म्हणून ब्लॉग लिहित असाल आणि त्याचे वाचन तुमच्याशिवाय इतरांनी करावे किंवा करु नये असा तुमचा बाणा असेल तर तुम्हाला पुढे वाचायची आवश्यकता नाही!! तुमचा छंद हा तुमचा वैयक्तिक मामला आहे. लोकांना वाचायचे असल्यास वाचतील. अर्थात येथेही काही गोष्टी शिकणे क्रमप्राप्त आहे जसे की लेखनाचा मंच (ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) निवडणे, पानाचे सुशोभिकरण (पेज डिझाईन) करणे इ.इ. त्याबद्दल पुढे येईलच.
परंतु जर तुमचा ब्लॉग हा अधिकाधिक लोकांनी पहावा, वाचावा असे वाटत असेल तर त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागतील ज्याची आपण माहिती घेणार आहोत. ब्लॉग लिहायला सुरुवात करतानाच त्यातील खाचाखोचा नीट समजावून घेतल्या पाहिजेत नाही का?
ब्लॉगिंगची पहिली पायरी आहे ब्लॉग लिहिण्यासाठीचा मंच किंवा प्लॅटफॉर्म निवडणे. यात अनेक पर्याय आहेत. तुम्हाला ब्लॉगिंगमधून नक्की काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा हे ठरते.

Blogging Platforms – ऑनलाईन लेखन करण्याची जागा..

सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे लिखाण इंटरनेटवर जाऊन वाचता येईल अशी जागा म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म. यात अनेक पर्याय आहेत. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन फोरम्स (ऑनलाईन लिखाणाची व्यासपीठे, सोशल मिडीया इ.)
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स (खास ब्लॉगिंगसाठी बनवलेल्या वेबसाईट्स)
३) तुमची स्वतंत्र वेबसाईट
१) ऑनलाईन फोरम्स – वर्तमानपत्रात वाचकांनी लिहिलेल्या लेखांचा एक कॉलम येतो. त्यात लोक आपले विचार, अनुभव इ. मांडत असतात. ऑनलाईन फोरम्स तसेच असतात. इंटरनेटवरती अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या केवळ तुम्हाला लेखन करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर चर्चा करण्यासाठी, प्रश्न उत्तर आणि प्रत्युत्तरासाठी जागा उपलब्ध करून देतात. जसे मराठीत मायबोली, मिसळपाव किंवा कोरा यासारख्या वेबसाईटवरून तुम्ही हव्या त्या विषयांवर लिहू वाचू आणि चर्चा करू शकता. यात वेबसाईट्स तुम्हाला लेख लिहिण्यासाठी लागणारी सर्व प्राथमिक तयारी पुरवतात. तुमच्या लिखाणाला जागा पुरवणे, त्याची विषयवार क्रमवारी लावणे, लिखाणात चित्रे, व्हिडिओज, लिंक्स इ. टाकण्यासाठीची सोय करणे वाचकांच्या प्रतिसादाला जागा देणे इ.इ. याचे फायदे तोटे अनेक आहेत.
फायदे –
• अशा फोरम्सवर एकाचवेळी अनेक लोक लिहित आणि असंख्य लोक वाचत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लिखाणासाठी आपसूकच वाचक मिळतात.
• तुमचे लिखाण आवडल्यास लोक तुम्हाला फॉलो करू शकतात आणि तुमचा असा स्वतःचा एक वाचकवर्ग यातून तयार होऊ शकतो.
• हे फोरम्स विनामूल्य (फुकट) वापरता येतात.
तोटे –
• अशा फोरम्सवरील लेखन हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नसते. फोरमचे व्यवस्थापन ते फोरमवरून कधीही हटवू शकते.
• एकाच विषयावर अनेक लोक लिहित वाचत असल्याने तुमचे लिखाण चांगले असूनही गर्दीमुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
• वाचकांशी थेट संपर्क साधण्यावर फोरम्सचे नियंत्रण असते.
तुम्ही जर केवळ आवड म्हणूनच लिहित असाल तर असे फोरम्स उत्तम पर्याय आहेत. फक्त येथे तुम्ही ऑनलाईन लेखकांच्या गर्दीतले एक असल्याने तुम्हाला तुमची ओळख बनवायला बराच काळ जातो.
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स – तुम्हाला जर छंद म्हणून लिहायचे असेल परंतु ते फोरम्सवरच्या गर्दीपेक्षा अधिक स्वतंत्र हवे असल्यास हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही स्वतःचे पान/साईट तयार करू शकता आणि विविध विषयांवर लिहू शकता. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला लेखन, त्याचे व्यवस्थापन, पानाचे डिझाईन, इंटरनेटवर ते पान कसे दिसेल इ. सर्व सोयी पुरवतात. जसे तुम्ही फेसबुकवर लॉगीन करून स्वतःच्या पानावर जाता तसेच फकत खास लेखनासाठी वापरायचे म्हणून बनवलेले असे हे अनेक प्लॅटफॉर्म्स आजघडीला लाखो ब्लॉगर्स वापरतात. तुम्ही जर नव्यानेच ब्लॉगिंग करत असाल तर अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर फायदेशीर ठरतो कारण ब्लॉग तयार करणे, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग इ. साठी हे प्लॅटफॉर्म्स अनेक सुविधा पुरवतात. सध्या अनेक कंपन्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पुरवतात. उदा. वर्डप्रेस(WordPress), ब्लॉगर (Blogger), विक्स (Wix), टम्ब्लर (Tumblr), घोस्ट (Ghost) असे अनेक पर्याय आहेत. हा प्रत्येक पर्याय कमीजास्त प्रमाणात सारख्याच सुविधा पुरवतो. आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा. त्याबद्दल विस्ताराने नंतर लिहिनच.
फायदे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे फोरम्सवरील गर्दी टाळून तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख बनवता येते.
• तुमच्या लिखाणावर तुमचे अधिक नियंत्रण राहते. चित्र, व्हिडिओ इ. च्या वापरावर मर्यादा येत नाहीत.
• वाचक आणि तुम्ही एकमेकांशी थेट संपर्क साधू शकता.
तोटे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या विनामूल्य सुविधा मर्यादित असतात. अधिक सुविधा मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
• स्वातंत्र्य मर्यादित असते. उदा. तुमच्या वेबसाईटची लिंक किंवा इतर गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही.
• प्लॅटफॉर्मच्या फ्री अकाउंटवरून जाहिराती दाखवता येत नाहीत.
एकूणातच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हे हौशी परंतु व्यवासायिक इच्छा नसलेल्या लेखकांसाठी उत्तम पर्याय आहेत. अर्थातच यात पुढे लेखकाच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा फायदा लेखकापेक्षा फोरमप्रमाणेच प्लॅटफॉर्मला अधिक होतो. लिखाणाशिवाय इतर काही उद्देश नसल्यास ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हा एक उत्तम पर्याय आहे.
३. स्वतंत्र वेबसाईट – ब्लॉग लिहिण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट तयार करणे. हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्याचा गैरसमज उगाचच पसरल्याने अनेकजण याचा विचार करत नाहीत. वास्तविक आजकाल स्वतंत्र वेबसाईट रजिस्टर करणे आणि डिझाईन करणे अतिशय सुलभ झाले आहे. अर्ध्या तासाच्या अवधित या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. Go Daddy, Bluehost, Hostgator इ. अनेक वेबसाईटवरून तुम्हाला नवीन वेबसाईट नोंद करता येते. त्यासाठी खूप मोजके तांत्रिक ज्ञान लागते. स्वतंत्र वेबसाईट ही ब्लॉगिंग, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग, व्यवसाय अशी सर्व प्रकारची दारे खुली करते ते ही कोणत्याही बंधनांशिवाय. स्वतंत्र वेबसाईट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता किंवा येथेही तुम्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स वापरु शकता. ते तुम्हाला तुमची वेबसाईट मॅनेज करणे, डिझाईन, लेखन यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात. हा कमी खर्चिक आणि अधिक स्वतंत्र पर्याय आहे. यात वर्डप्रेस (WordPress) अग्रगण्य आहे जो जवळपास सर्वप्रकारची साधने विनामूल्य उपलब्ध करून देतो. त्याबद्दल अर्थातच पुढे स्वतंत्र लेख येईल.
फायदे – • कोणत्याही बंधनांशिवाय लेखन करता येते.
• वेबसाईट व्यवस्थापन, डिझाईन, जाहिराती, वाचकांशी संपर्क या गोष्टींवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण राहते.
• लिखाणाच्या लिंक्स, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन, स्वतंत्र इमेल, चॅट अशा अनेक सुविधा वापरता येतात.
तोटे – या पर्यायाचे कोणतेही दृष्य तोटे नाहीत.
• डिझाईन, व्यवस्थापन, सुरक्षा, अपडेट्स, ऑप्टिमायझेशन इ. तांत्रिक बाबी स्वतःच सांभाळाव्या लागतात. अर्थात यासाठी ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स आणि इतर अनेक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने चालवलेली स्वतंत्र वेबसाईट हा ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्ही लेखनासह डिझाईन, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या सर्व बाजू स्वतःच्या नियंत्रणात ठेऊ शकता आणि उत्तम ब्लॉगर बनू शकता. स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यासाठीचे पर्याय, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सची तुलना इ. विषयी पुढील भागात.

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact