अंतरंग – भगवद्गीता – विभूतियोग

शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।
मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं, काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं।
काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर, खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं।

संत नामदेव नित्य नेमाने विठ्ठलाशी संवाद करत असत. एकदा विठ्ठलाने त्यांना सांगितले की ‘जोपर्यंत तुझ्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तुला निर्गुण निराकार भगवंताच्या वास्तविक स्वरुपाचे ज्ञान होणार नाही. तेव्हा तू विसोबा खेचर नामक गृहस्थांना भेट. ते तुला उत्तम दृष्टांत देतील.’ नामदेव जेव्हा विसोबा खेचरांना भेटायला गेले तेव्हा त्यांना विलक्षण दृष्य दिसले. विसोबा निवांतपणे पहुडले होते आणि त्यांचे पाय महादेवाच्या पिंडीवर विसावले होते. ते पाहून नामदेवांना सहाजिकच राग आला. ते पाहून विसोबा म्हणाले, “बाबा रे, वार्धक्यामुळे मला पाय उचलणेही कठीण जाते. तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे टेकव” नामदेवांनी विसोबांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. परंतु तेथेही तेच झाले. पाय टेकताच त्याच्या खाली पुन्हा महादेवाची पिंड दिसायला लागली. नामदेवांना कळेना. हा जागा बदलण्याचा उद्योग चार पाच वेळा करुनही तोच परिणाम दिसायला लागल्यावर नामदेव विसोबांना शरण गेले. विसोबांनी त्यांना सांगितले की – ईश्वर हा सर्वव्यापी सर्वत्र आहे, मग पाय कोठेही ठेवल्याने काय फरक पडतो. फरक आपल्या दृष्टीचा आहे.

“चराचरातील भगवंताचे हे अधिष्ठान जाणणे म्हणजेच त्याच्या शक्तीचे/विभूतिचे स्वरुप जाणणे होय. ते जाणणारा भक्त भगवंताशी एकरुप होतो आणि भूतातेही भगवंताला प्राप्त करतो.”

विभूति हा शब्द पुरेसा जाणल्यास विभूतियोग जाणणे कठीण नाही. रुढार्थाने विभूति हा शब्द मोठ्या महान व्यक्तीसाठी वापरला जातो. परंतू विभूति शब्दाचा मूळ अर्थ विशेष शक्ती, सामर्थ्य किंवा तेज असा आहे. तेज जे सर्वकाही व्यापते.
अगदी साध्या शब्दात सांगायचे तर ‘वि म्हणजे विशेष’ आणि ‘भूत म्हणजे जीव, भूतमात्र किंवा आपण सारे’! त्यामुळे असा जीव ज्यात काही विशेष आहे त्याला विभूति असे म्हणायला हरकत नाही. असे काय आहे जे विशेष आहेच परंतू सर्व भूतमात्रात आहे? अर्थातच आत्मा, चैतन्य किंवा परमात्म्याचा अंश. म्हणूनच आपल्यातील परमात्म्याला जो जाणतो तोच चराचरातील भगवंतालाही जाणतो आणि म्हणूनच तर अशा ज्ञानी माणसाला वि-भूती म्हणले जाते. श्रीकृष्ण अर्जुनालाही हेच सांगतो की – जे जे उत्तम , उदात्त उन्नत आहे त्याच्या ठायी माझा भाव जाणणे म्हणजेच विभूति जाणणे. ते जे उन्नत उदात्त आहे ते स्वतः आणि ते जाणणारा व्यक्ती दोघेही विभूतिमत्वाला पोचतात.

(अशा उदात्ताच्या ध्यासातून मिळणारी मुक्ती किंवा मोक्ष हे प्रत्येक भूताचे ध्येय आहे. म्हणूनच तर सावरकरांनी मोक्ष आणि मुक्ती ही स्वातंत्र्यदेवतेची रुपे आहेत असे म्हटले आहे. केवळ इंग्रजांचे जोखड मानेवरून उखडून टाकणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे त्याचा ध्यास घेणे हे सावरकरांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य होते. विभूति कोणाला म्हणावे हे येथे स्पष्ट व्हावे!! असो)

मुण्डक उपनिषदापासून ते भागवतपुराणापर्यंत तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथात आणि अगदी किरातार्जुनीयासारख्या महाकाव्यातही ‘विभूति’ हा शब्द विशेष शक्ती, तेज किंवा परमात्म्याचा अंश याच अर्थाने वापरला आहे. श्रीकृष्णही अर्जुनाला आपल्या विभूतिंचा परिचय अनेक उदाहरणातून करून देतो.
येथे केवळ हे ध्यानात घ्यायचे आहे की ही उदाहरणे आहेत. याचा केवळ भगवंताने वर्णन केलेल्याच विभूतित त्याचे अस्तीत्व जाणवते आणि इतरात नाही असे नाही. विसोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्वाभूती सर्वव्यापी आहे केवळ साधकाला म्हणजे अर्जुनाला (आणि आपल्यालाही) समजण्यास सोपे जावे म्हणून वानगीदाखल घेतलेली नावे ही या अध्यायात येतात. भगवंताच्या विभूति योगाबद्दल पुढील भागात.
तळटीप
१. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूति जीवस्य मायारचितस्य नित्याः।
आविर्हिताः क्वापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे ह्यविशुद्धकर्तुः ॥ (भागवत – ५/१२)
२. यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् ।
तं तं लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत्भूतिकामः। (मुण्डकोपनिषद – ३.१.१०)
३. हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः। यस्याङ्‌घ्रिरेणुं जुषतेऽनभीप्सोः।(भागवत – ५/१२/२०)
४. त्रीनत्यरोच उपलभ्य ततोविभूतिं लोकान् स मां व्यसृजदुत्स्मयतीं तदन्ते। (भागवत – १/१६/३५)
५. इत्युक्तवन्तं परिरभ्य दोर्भ्यां तनूजं आविष्कृतदिव्यमूर्तिः।<>br अघोपघातं मघवा विभूत्यै भवोद्भवाराधनं आदिदेश । (किरातार्जुनीय ११.८०)

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥

प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन….
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे अर्जुना, या शरीरात मीच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

जर ब्रह्म अ-क्षर आहे तर जे क्षर आहे ते अधिभूत आहे.

तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां।
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक।

ज्ञानदेवांनी दोन ओळीत अधिभूताचे सुंदर वर्णन केलंय. पाच महाभूतांपासून जे बनते (पांच पांच मिळोनिया). जे दृष्य आहे. ज्याला आपण पाहतो आणि नावाने ओळखतो (नामरुपादिक) ते नाशवंत (वियोगवेळे भ्रंशे) भूतमात्र म्हणजे अधिभूत.

अधिदैवत म्हणजे काय?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा।
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे।

अधिदैवताला ज्ञानदेवांनी दुसरा परमात्माच म्हटले आहे. अधिदैव म्हणजे इंद्रियांना कार्यरत करणारी शक्ती. डोळ्यांना दृष्टी, त्वचेला स्पर्श किंवा नाकाला गंध देणारे तत्व म्हणजे अधिदैव.

अधियज्ञ
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः असे श्रीकृष्ण सांगतो.
येथे अधिभूत किंवा अधिदैव या कल्पना समजणे तितकेसे कठीण नाही. अधियज्ञ समजणे काहीसे अवघड आहे. मुळात त्यासाठी आधी ‘यज्ञ’ समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

यज्ञ
सर्वसाधारणपणे यज्ञ याचे आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे एक चौकोनी वेदी आहे ज्यात अग्नि तेवत आहे आणि ऋषीमुनी त्यात वरुन पळीने तुप ओतत आहेत. धार्मिक टिव्ही सिरियलमध्ये वगैरे याच कृतीला यज्ञ म्हणतात!! हल्ली अग्निहोत्र नावाचा एक घरगुती यज्ञाचा प्रकारही प्रसिद्ध (मराठीत पॉप्युलर) होत आहे. हा यज्ञ आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे. केवळ अग्निमध्ये आहुती देणे म्हणजे यज्ञ नव्हे. किंबहूना अग्नीमध्ये आहुती देणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे यज्ञ नाहीच. हे प्रतिक आले कुठुन मग?
यासाठी पुन्हा अक्षरब्रह्माकडे वळावे लागेल. अग्निला संस्कृतात ‘पावक’ असा शब्द आहे. पावक याचा अर्थ पावन किंवा शुद्ध करणारा. आपल्याला हे माहिती आहे की – सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्निमध्ये झाळतात. त्यामुळे त्यातील अशुद्ध तत्वे भस्मीभूत होऊन शुद्ध सोने प्राप्त होते. लोखंडही गाळून त्याचे पोलाद करताना शुद्धीकरणासाठी हाच अग्नि वापरतात. म्हणून कोणतीही गोष्ट शुद्ध करण्यासाठी, मग ते वातावरण का असेना, अग्निची योजना केली जाते. हे तथ्य आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. म्हणूनच अग्नि आणि शुद्धीकरण (आहुती) यांचा संबंध जोडून यज्ञाचे प्रतीक निर्माण करण्यात आले. यज्ञ हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मग ते वस्तु, वातावरण किंवा मनाचेही शुद्धीकरण असो. मन शुद्ध करणे किंवा शुद्ध मनाने किंवा उदात्त हेतूने केलेले कार्य म्हणजे यज्ञ….
म्हणूनच यज्ञाला यजुर्वेदात विश्वतोधार म्हटले आहे.

स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ आ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी । य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ सुवि॑द्वा सो वितेनि॒रे।

निघण्टुत यज्ञाची १५ अर्थपूर्ण नावे/प्रकार येतात.
यज्ञः, वेनः, अध्वरः, मेधः, विदर्थः, नार्यः, सवनम्, होत्रा, इष्टिः, देवताता, मखः, विष्णुः, इन्दुः, प्रजापतिः, धर्मः इति पञ्चदश यज्ञनामानि।।

(**जाता जाता हे सांगायला हरकत नाही की यातील ‘अध्वरः’ या शब्दाचा अर्थ तैत्तिरिय ब्राह्मणात अहिंसा असा दिलाय. यज्ञ हिंसेचे समर्थन करत नाही हे ध्यानात यावा हा हेतू)

कर्मयोगात म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम कर्माला यज्ञाची उपमा देतो किंबहुना कर्म हे यज्ञ समजून इदं न मम या भावनेने केल्यास त्याचे बंधन लागत नाही असे म्हणतो ते याच अर्थाने. सगळ्या निसर्गाच्या चक्राचा आधार हे असे यज्ञकर्म किंवा कर्मयज्ञ आहे हे ही तो सांगतो. (पहा कर्मयोग)

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।

आता अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हे समजणे कठीण जाणार नाही!
जीव आणि अजीव या दोन्हीच्याही द्वैतातून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. या दोन्हीच्याही सहाय्याने सृष्टीचे सर्जन करणारा मी या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व आहे. जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
साधे उदाहरण घेउ भक्त पायाने चालत देवदर्शनाला जातो. येथे भक्ताचे पाय हे ‘अधिभूत (जड तत्व)’ आहे. देऊळ जेथे देवाचे वास्तव्य (शक्ती/चैतन्य) आहे ते गन्तव्य स्थान हे ‘अधिदैव’ आहे. प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार हा ‘अधियज्ञ’ आहे. आता देवळात गेल्यावर आपल्याला जे पवित्र, शुद्ध आणि सात्विक वगैरे वाटते ते अव्यक्त असते. केवळ देवळात गेल्यावरच तसा अनुभव यावा का? देव तर सगळीकडे आहे. प्रत्यक्ष आपल्यातही आहे. मग पावित्र्य, सात्विक भाव हे आपल्याच अंतरी आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा जड आणि चैतन्य दोन्ही तत्वांच्या पार दिसायला लागते. जणु त्यांची आहुती पडते, बुद्धी शुद्ध होते आणि अधियज्ञ साकार होतो. म्हणजे आपल्याला आपल्यातीलच परब्रह्माची जाणीव होते.
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः हे श्रीकृष्ण म्हणतो ते या अर्थाने. अधि-आत्म (अध्यात्म) म्हणजे स्व-भाव जाणणे. अधियज्ञ म्हणजे स्वतःच स्वतःला पावन करणारा यज्ञ.
आता राहीला अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. प्रयाणकाली किंवा मरतेसमयी स्थिरमती व्यक्तीने काय जाणायचे आहे. उत्तर अगदी सोपे आहे. श्रीकृष्ण त्याला एक साधे तत्व सांगतो.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।
हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

मनुष्य अनन्यभावनेने ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तो अंतिमतः त्या अवस्थेला जाऊन मिळतो.
मराठीत एक छान म्हण आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस… ज्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्याला सतत त्याचेच प्रतिबिंब आजूबाजूला दिसते. वरवर धाडसीपणाचा आव आणणारे असे कितीतरी शूर वीर आपण आजूबाजूला पाहतो! ज्याच्या मनात शांत समाधानी भाव असतात त्याला आसमंतात त्याचाच प्रत्यय येतो. मग जो सातत्याने अनन्यभावाने परमात्म्याचे चिंतन करेल त्याला परमात्मा प्राप्त होणे सहाजिकच नाही का? तत्व साधे आहे. जसा भाव तसा देव! एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
भाव तोंचि देव ।ये अर्थी संदेह धरूं नका।
भाव भक्ति फळे भावें देव मिळे। निजभावें सोहाळे स्वानंदाचे।
भावचि कारण भावचि कारण ।यापरतें साधन नाहीं नाहीं।
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।मनोरथ कोडी पुरती तेथें।
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की,

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌।

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील.

(गंमतीचा भाग असा की या श्लोकांतील अनन्यभक्तीचा भाव वगळून केवळ ‘मामनुस्मर युध्य च’ हा भाग प्रसिद्ध करुन त्यायोगे गीतेत हिंसेचा प्रसार केला आहे असा भास करुन दिला जातो!! गीता किंवा एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या अयोग्य अन्वयार्थाबद्दल पुन्हा कधीतरी…..)

परमेश्वराच्या साक्षात्कार घडविणाऱ्या गीतेतील अध्यायांच्या गटातील अक्षरब्रह्मयोग येथेच संपन्न करुयात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

भगवद्गीता – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग

गीता शिकवत असताना हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की श्रीकृष्णाने गीता सांगायला १८ अध्याय का घेतले? जे काही सांगायचं ते श्रीकृष्णासारख्या विद्वानाला थोडक्यात सांगता आलं नसतं का? दोन चार अध्यायात आटपायचं ना! असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एखादे हसत खेळत गीता, किंवा सुलभ गीता गाईड वगैरे काहीतरी छापायला काय हरकत होती? आजच्या भाषेत सांगायचे तर एक छोटा युट्युब व्हिडीओ करायचा How to understand Gita in 5 minutes!!
सात आंधळ्यांची कथा आपल्यापैकी साधारण प्रत्येकाला माहिती आहे. जगभरातील जवळपास प्रत्येक संस्कृतीत ही कथा येते. कमी अधिक फरकाने या सर्व कथांचा मतितार्थही सारखाच आहे. हत्ती नक्की असतो कसा हे अनुभवण्यासाठी सात अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून आपले मत मांडतात. ज्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागतो त्याला हत्ती त्या आकाराचा असतो असे वाटते. कोणाला तो खांबासारखा तर कोणाला दोरी सारखा वाटतो इ. इ.
तात्पर्य काय की सातही आंधळ्यांना वाटलेले हत्तीचे स्वरुप हे अपूर्ण आहे. बरं सातही आकार जाणले म्हणजे हत्ती कळाला का? तर तसेही नाही. आकार हे केवळ एक परिमाण झाले. हत्ती जाणायाचा तर आकार, रंग, गंध, वृत्ती यासह सर्व बाजू जाणायला ह्व्यात. म्हणजेच माणसाला एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा घटनेचे खरे स्वरुप जाणून घ्यायचे असेल तर त्याला ते अनेक बाजूंनी समजून घ्यायला हवे. आपल्याला दिसणारी एकच एक बाजू म्हणजे सत्य नव्हे.
जैन दर्शनांतही ‘स्याद् वाद’ नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट तत्व आहे. त्याला ‘अनेकान्तवाद’ असेही म्हणतात. स्याद्वादी म्हणतात प्रत्येक वस्तुमध्ये (यात सगळे आले) असंख्य गुणावगुण असतात. ज्याला जे गुण अनुभवास येतात तो त्या गुणांच्या आधारे ती वस्तु जाणतो. याचा अर्थ त्याला केवळ व्यक्तीसापेक्ष ज्ञान प्राप्त होते. या असंख्य गुणावगुणांसकट जाणायचे तर त्या वस्तुला सात विविध आयामातून पाहणे आवश्यक आहे. हे सातही आयाम विभिन्न परीस्थितीतून वस्तुच्या गुणावगुणांचे ज्ञान करून देतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर कित्येकदा असा अनुभव येतो की आपण एखाद्या व्यक्तीला जसे समजत असतो त्याच्या अगदी विरुद्ध असे मत आपल्याला ऐकायला किंवा अनुभवायला मिळते. सार्वजनिक जीवनातल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण अनेक कथा, दंतकथा ऐकत असतो ज्यात एकात ती व्यक्ती नायक असते तर दुसऱ्यात खलनायक. वर्षानुवर्ष एखाद्याच्या संगतीत राहूनही ती व्यक्ती नक्की कशी आहे हे सांगणे कठीण जाते. कारण अनेकान्तवाद!!
संपूर्ण गुणावगुणांसकट एखादी व्यक्ती जाणणे इतके कठीण असेल तर मग प्रत्यक्ष गुणातीत परमेश्वराचे स्वरुप जाणणे किती कठीण असेल? गीता सांगायला श्रीकृष्णाने १८ अध्याय कशाला घेतले या प्रश्नाचे हे उत्तर आहे.
श्रीकृष्ण जसे सांगत जातो तसे अर्जुनाला त्या ज्ञानाचे वेगवेगळे आयाम दिसायला लागतात. त्यावर तो प्रश्न विचारतो आणि मग पुढील अध्यायात कृष्ण त्याचे निरसन करतो. विविध दृष्टिकोनांतून ज्ञान त्याच्यापुढे मांडतो. अशाप्रकारे अर्जुनाला ‘हत्ती’ सर्वबाजूंनी अगदी स्वभावासकट समजतो. आपल्यालाही ‘हत्ती’ जाणायचा तर अशाच प्रकारे प्रत्येक अध्यायातून तो वेगवेळ्या परिमाणातून जाणायला हवा.
गीतेच्या पहील्या सहा अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्व किंवा आत्मन् म्हणजे काय, तो कसा जाणायाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता कोणती याचे तत्वज्ञान सांगतो. पुढल्या सहा अध्यायातून ते ज्ञान कोणत्या स्वरूपात प्रकट होते याचे वर्णन श्रीकृष्ण करतो. अनेक अंगांनी श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या स्वरुपाचे तसेच स्व किंवा आत्मन् मधील त्या स्वरुपाचा साक्षात्कार घडवतो. ज्याला आपण मागील अध्यायात विज्ञान म्हणालो. सात निरनिराळ्या कल्पनांच्या अनेकान्तवादातून विज्ञान समजून घेणे म्हणजे अक्षरब्रह्मयोग….. ज्ञानविज्ञानयोगाच्या अंतिम श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः।।
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.

अर्जुनाला सहाजिक प्रश्न पडतो की अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतकाळी जाणणे म्हणजे काय?
अक्षरब्रह्मयोगाला याच प्रश्नांपासून सुरुवात होते. अर्जुन विचारतो की

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥

तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?
(किती प्रश्न झाले? सात!!! आंधळ्यांची संख्या किती सात…. अनेकान्तवादातील आयाम किती सात……. धर्म, भूगोल किंवा नाव बदलले तरी तत्वज्ञांचे विचार हे अंतिमतः एकाच सत्याच्या दिशेने जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.)
अर्जुनाच्या सात प्रश्नांची श्रीकृष्णानी दिलेली उत्तरे हा या अध्यायाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात श्रीकृष्ण, ज्ञानी भक्ताचे आपले निरुपण, जे मागील अध्यायात सुरु केले होते ते पुढे नेतो आणि अंतिम काही श्लोकात परमगती प्राप्त करण्याच्या दोन मार्गांची चर्चा श्रीकृष्ण करतो.

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या तीन संज्ञांचे अर्थ प्रथम श्रीकृष्ण सांगतो.
जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. क्षर आणि अक्षर असे दोन शब्द आहेत. यातला अक्षर आपल्याला माहिती आहे. मराठीत असे अनेक शब्द आहेत जे आपण बोलण्यात सहज वापरून जातो परंतु त्यांचे अर्थ खरोखर विलक्षण आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते! अक्षर हा असाच एक शब्द. क्षर याचा अर्थ नाशवंत किंवा ज्याला क्षय आहे असे. तर अक्षर याचा अर्थ ज्याचा नाश होत नाही किंवा जे शाश्वत आहे, अक्षय आहे.
आपल्याला माहित असलेले अक्षर तरी काय आहे. ज्याचा क्षर किंवा भाग पडत नाही ते. वर्णमालेतले कोणतेही अ-क्षर घ्या. जेव्हा आपण अक्षर म्हणतो तेव्हा त्याची अधिक फोड करता येत नाही. ते क्षर नसते म्हणून अक्षर…. म्हणूनच त्याचा उच्चार एका ध्वनीत होतो.
(येथे एक नवलाची गोष्ट सांगायला हरकत नाही. अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा सांगणारी ज्ञानेश्वरांची वाणी अजरामर झाली कारण ती ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणते. येथे अक्षर शब्दावरचा श्लेष हा भाषा आणि अक्षय तत्व या दोन्ही अर्थाने वापरला जातो. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानेश्वरीतील ज्ञान दोन्ही अक्षर आहे हेच तर ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक वापरलाय हे पाहिले की ज्ञानदेव योगीराज होते हे पटावे. असो)
सांख्ययोगात श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीव-अजीवातील अजीव म्हणजे ब्रह्म.. कारण ते अक्षर आहे. त्याचे विघटन होत नाही त्याची फोड करता येत नाही. त्याचे कितीही भाग केले तरी ते सर्व ब्रह्मच रहातात. अर्धे किंवा पाव ब्रह्म होत नाहीत. अंशात्मक असो की पूर्ण, ब्रह्म हे सर्वथा आणि सर्वत्र पूर्णच असते. बृहदारण्यक उपनिषदातील ॐ पूर्णमदः पूर्णमिदं ही प्रार्थनाही हेच सांगते.
हे झाले ब्रह्म मग अध्यात्म काय आहे?
एकदा ब्रह्म काय आहे हे समजले की अध्यात्म समजणे कठीण नाही. अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो स्व-भाव हा अजून एक वापरून बोथट झालेला शब्द….
स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे. वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो. श्रीकृष्ण सांगतो अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो असे श्रीकृष्ण सांगतो…..
अर्जुनाच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

(How to register a domain) डोमेन रजिस्ट्रेशन कसे करावे?

मागच्या भागात आपण मराठीत ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग लिहिण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? याची प्राथमिक माहिती घेतली. स्वतंत्र वेबसाईट तयार करणे ही व्यवसायिक ब्लॉगिंगची पहिली पायरी असते हे आपण शिकलो. अशी साईट तयार करण्यासाठची पहिली पायरी म्हणजेच डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration) आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी होस्टिंग प्लॅन Hosting Plan) कसा निवडायचा हे आपण या भागात पहाणार आहोत.
सर्वप्रथम येथे काही तांत्रिक (technical) शब्द सतत आपल्या कानावर येतील त्याची नीट माहिती घेऊ.

डोमेन (Domain) आणि होस्टिंग (hosting).

डोमेन (Domain) – कोणत्याही वेबसाईवर जाण्यासाठी जो पत्ता तुम्ही टाईप करता त्यातले त्या वेबसाईटचे जे अद्वितीय/वेगळे (Unique) नाव म्हणजे डोमेन (Domain) किंवा डोमेन नेम (Domain Name). उदा. तुम्ही फेसबुक उघडताना www.facebook.com टाईप करता. यातले www आणि .com हे शब्द इंटरनेटशी संबंधीत असतात तर facebook हे त्या वेबसाईटचे डोमेन (Domain) असते.
तुम्ही जेव्हा तुमची नवीन वेबसाईट तयार करणार असता तेव्हा त्याचे नाव किंवा डोमेन (Domain) हा अतिशय महत्वाचा भाग असतो. कारण ती तुमच्या ब्लॉगची ओळख असते. जसे माझ्या ब्लॉगचे नाव ‘शीतलउवाच’ आहे. त्यामुळे वेबसाईट उघडताना www.sheetaluwach.com टाईप करावे लागते. या डोमेन (Domain)वरून साईटचे नाव आणि त्याचा उद्देश लक्षात येतो. फेसबुक, ट्विटर किंवा इतर वेबसाईट्सचेही तसेच आहे.
तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम (Domain Name) नीट ठरवा ते इतरांपेक्षा वेगळे आणि आधीपासून वापरले गेलेले नसावे. या डोमेन नेम (Domain Name)वरून तुमची ओळख बनणार असल्याने ते काळजीपूर्वक आणि विषयाशी संबंधीत निवडा. डोमेन नेम निवडताना (Domain Name)काही संकेत पाळणे आवश्यक आहे.
ते –
१. कमीतकमी अक्षरांचे असावे. २. उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे ३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
हे नाव टाईप करून लोक तुमच्या ब्लॉगला भेट देणार, त्यामुळे वाचकांना ते सहज भावेल असे असावे. २. होस्टिंग (Hosting) – डोमेन (Domain) किंवा तुमच्या वेबसाईटसंबंधित माहिती फाईल्स जेथे स्टोअर होतात त्या जागेला किंवा प्रक्रियेला होस्टिंग (hosting) असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वेबसाईटचा डाटा (Data) ठेवलेला असतो. जसे आधार कार्ड काढून देणारी केंद्रे असतात तसेच तुमचे डोमेन (Domain) रजिस्टर करणाऱ्याही वेबसाईट्स असतात. जसे अनेक पर्यायातून आपण डिश टिव्हीचे पॅकेज निवडतो तसे होस्टिंगचेही अनेक पर्याय या वेबसाईटसवरून निवडता येतात.

डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration)

एकदा तुमच्या वेबसाईटचे बारसं झालं म्हणजे डोमेन नेम (Domain Name) तुम्ही ठरवलंत की मग तुम्ही होस्टिंग पुरवणाऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशनक करु शकता. उदाहरणार्थ . Go Daddy, Bluehost, Hostgator यासाठीचा खर्च हा तुम्ही घेत असलेल्या पॅकेजवर अवलंबून आहे. साधारण सर्वच वेबसाईटवर हे प्लॅन्स खाली दिलेल्या दोन चित्रात दाखवले आहेत त्याप्रमाणे दिसतात.

Hosting Plans
Hosting Plans

यातला इमेलचा पर्याय सोडला तर बाकीचे पर्याय हे ब्लॉगिंगसाठी किमान पहिल्या वर्षात तरी फारसे उपयोगाला येत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला जर स्वतंत्र इमेल नको असेल तर स्वस्तात स्वत प्लॅन निवडा. अधिक चिकित्सा करून हातात फारसं काही पडणार नाहीये!
एकदा प्ल्रॅन निवडल्यावर पुढे जा. आवश्यक माहिती भरताना तुम्हाला तुमच्या डोमेन (Domain) चे नाव रजिस्टर करायचा पर्याय उपलब्ध होईल. तुम्ही ठरवलेले डोमेन नेम (Domain Name) जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा ते नाव उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला कळेल. जर नाव उपलब्ध असेल तर प्रश्नच मिटला. परंतु जर नाव आधीच वापरले असेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता जसे .com ऐवजी .in किंवा co.in इ. डोमेन नेम (Domain Name) वापरात असल्याचा आणि इतर पर्यायांची सूचना खालीलप्रमाणे दिसते.

Domain Name Availability

त्यातील एक निवडून पुढील प्रक्रिया पार पाडली की झालं. जाता जाता काही अधिकच्या तांत्रिक संकल्पना पाहूयात. होस्टिंग प्लॅन निवडताना त्याची माहिती असल्यास मदत होईल.
Shared Hosting शेअर्ड होस्टिंग –
हे शेअर रिक्षासारखे प्रकरण आहे. जसे तुम्ही एका रिक्षातली जागा आणि भाडे दोन्ही शेअर करता तसे एकाच सर्व्हरवर जेव्हा तुमच्या वेबसाइटसह इतर वेबसाइटचाही डाटा (Data) म्हणजेच माहिती साठवली जाते त्याला शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting) म्हणतात. साधारणतः जेव्हा तुम्ही लहान व्यवसाय किवा ब्लॉग चालवता तेव्हा हा पर्याय उपयुक्त असतो कारण हा तुलनेत स्वस्त पर्याय आहे. तुमची वेबसाईट अन्य वेबसाइटसह सर्व्हर स्पेस, साधने इ. शेअर करत असल्याने त्याचा खर्चही वाटून घेतला जातो.
येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे की इतर वेबसाइट्स बरोबर जागेसह इतर साधनेही शेअर करत असल्याने सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर सगळ्यांचा एकत्रित परीणाम होतो. त्यामुळे इतर वेबसाईट्च्या ट्रॅफिकचा तुमच्या वेबसाईटच्या वेगावरही परीणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी होस्टींग प्लॅन (Hosting Plan) नामवंत आणि विश्वसनीय साईटवरूनच निवडा. अशा वेबसाईट एका सर्व्हवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेबसाइटस् लोड करत नाहीत जेणेकरून शेअर्ड होस्टींग असले तरी अडचण येत नाही.
Dedicated Server डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हर – येथे एक संपूर्ण सर्व्हर केवळ तुमची वेबसाईट होस्ट करण्यासाठी वापरला जातो. अर्थातच त्यामुळे हा अत्यंत खर्चिक पर्याय ठरतो. जेव्हा तुमची वेबसाईट उत्तम बिझनेस करत असेल आणि तुम्हाला विना अडथळा ट्रॅफिक हवे असेल तेव्हा हा पर्याय तुम्ही वापरु शकता. डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हरचे प्लॅन काहीसे खालीलप्रमाणे असतात.

Dedicated Hosting Plans

Uptime अपटाईम – वेबसाईट अपटाईम याचा अर्थ तुमच्या वाचकांना किंवा वापरकर्त्यांना ठरावीक काळात तुमची वेबसाईट वापरण्यासाठी किती वेळ उपलब्ध होती याचे गुणोत्तर.
म्हणजेच साध्या भाषेत दिवसभरातील दुकान चालू असण्याची वेळ आणि दिवसाचे एकूण तास याचे प्रमाण. वेबसाईट ऑनलाईन असल्याने ती सतत कार्यरत असणे अपेक्षित असते. म्हणजेच अपटाईम १००% असावा. परंतु हे लक्ष्य झाले. महिना किंवा वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण साधारण ९९% पर्यंत असले तरी चांगले मानले जाते.
बॅकअप (Back Up) – जसे तुम्ही तुमच्या संगणकाचा बॅकअप म्हणजे डाटा इतरत्र स्टोअर करून ठेवता तसेच तुमच्या वेबसाईटच्या संपूर्ण फाईल्स, माहिती इ. सुरक्षित करण्यासाठी त्याचा स्नॅपशॉट (Snap Shot)घेतला जातो याला बॅकअप असे म्हणतात.
यात वेबसाईटच्या प्रणाली (Coding)फाईल्स, माहितीसाठा (Database), चित्रे (Pictures) किंवा मिडीया (Media) आणि इतर तांत्रिक गोष्टी जसे की प्लगइन (Plugin), थिम्स (Themes) डिझाईन इ. गोष्टी साठवल्या जातात. दुर्दैवाने जर तुमची वेबसाईट क्रॅश झाली किंवा काही कारणाने केलेले बदल नको असतील तर तुम्ही जुना बॅकअप पुन्हा इंस्टॉल करू शकता आणि तुमची वेबसाईट पूर्ववत करु शकता.
होस्टिंग प्लॅन निवडताना बॅकअप ची सुविधा मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही. अर्थात यासाठी इतरही पर्याय असतात.
जाता जाता वेब होस्टिंग (Web Hosting) आणि डोमेन (Domain) रजिस्ट्रेशन करतानाच्या प्रमुख टिप्स नीट मनात ठसवा
१. डोमेन नेम (Domain Name) कमीतकमी अक्षरांचे असावे.
२. ते उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे.
३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
४. होस्टींग (Hosting) प्लॅन निवडताना तुमच्या गरजा ध्यानात घेऊन निवड करा.
५. वेबसाईटचा अपटाईम (Up Time) जास्तीत जास्त असावा.
६. होस्टिंग विक्रिपश्चात (Post Sales ), तांत्रिक सेवा (Technical Support) किंवा इतर अडचणी सोडवणारा कस्टमर केअर (Customer Care) विभाग चांगला असावा.
७. वेबसाईचा नियमित बॅकअप (Back Up) घेण्याची सुविधा असलेला प्लॅन निवडा.
८. होस्टिंग प्लॅनमध्येच सुरक्षा (Security), सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इ. सुविधा मिळत असल्यास उत्तमच.
९. या सर्व सूचनांसह तुमच्या बजेटमध्ये बसणारी आणि साधारण योग्य अशी किंमत देणारा प्लॅन निवडा.

एकदा डोमेन नेम (Domain Name) रजिस्टर झाले आणि होस्टिंग प्लॅन (Hosting Plan) निवडला की किमान वर्षभरासाठी तरी तुमची चिंता मिटली. आता तुम्ही वेबसाईटचे डिझाईन आणि लेखनावरती लक्ष केंद्रित करू शकता. वेबसाईट डिझाईनिंग आणि वापराबद्दल पुढील भागात.

ब्लॉग पहावा लिहून!

तुम्हाला लिहायची आवड आहे का? निरनिराळ्या विषयांवर आपले म्हणणे मुद्देसुदपणे मांडणे तुम्हाला जमते का? तसे असेल तर तुम्ही उत्तम ब्लॉग लिहू शकता. याचा अर्थ तुम्ही ब्लॉगर बनू शकता का ? तर त्याचे उत्तर मात्र नाही असे असेल!
केवळ खूप खाणाऱ्याला जसे खवय्या किंवा खूप गाणाऱ्याला गवई म्हणता येत नाही तसेच केवळ खूप लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणता येणार नाही. ब्लॉगर केवळ लिहित नाही. एखाद्या विषयावर उत्तम लेखन करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची कला साध्य करणे म्हणजे ब्लॉगर बनणे. जर सादरीकरण उत्तम नसेल तर ती कला लोकांपर्यंत पोचणे कठीण होते. ब्लॉगचेही तसेच आहे. अनेक उत्तम ब्लॉग्ज वाचकांपर्यंत नीट न पोचल्याने वाचलेच जात नाहीत! त्यासाठी काय करावे आणि कसे करावे हे आपण पाहणार आहोत. आज ब्लॉगिंग हा केवळ छंद राहिला नसून उत्तम लिखाण, माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा यशस्वी व्यवसाय म्हणून ब्लॉगिंगकडे पाहिले जाते.
तुम्ही केवळ छंद म्हणून ब्लॉग लिहित असाल आणि त्याचे वाचन तुमच्याशिवाय इतरांनी करावे किंवा करु नये असा तुमचा बाणा असेल तर तुम्हाला पुढे वाचायची आवश्यकता नाही!! तुमचा छंद हा तुमचा वैयक्तिक मामला आहे. लोकांना वाचायचे असल्यास वाचतील. अर्थात येथेही काही गोष्टी शिकणे क्रमप्राप्त आहे जसे की लेखनाचा मंच (ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) निवडणे, पानाचे सुशोभिकरण (पेज डिझाईन) करणे इ.इ. त्याबद्दल पुढे येईलच.
परंतु जर तुमचा ब्लॉग हा अधिकाधिक लोकांनी पहावा, वाचावा असे वाटत असेल तर त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागतील ज्याची आपण माहिती घेणार आहोत. ब्लॉग लिहायला सुरुवात करतानाच त्यातील खाचाखोचा नीट समजावून घेतल्या पाहिजेत नाही का?
ब्लॉगिंगची पहिली पायरी आहे ब्लॉग लिहिण्यासाठीचा मंच किंवा प्लॅटफॉर्म निवडणे. यात अनेक पर्याय आहेत. तुम्हाला ब्लॉगिंगमधून नक्की काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा हे ठरते.

Blogging Platforms – ऑनलाईन लेखन करण्याची जागा..

सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे लिखाण इंटरनेटवर जाऊन वाचता येईल अशी जागा म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म. यात अनेक पर्याय आहेत. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन फोरम्स (ऑनलाईन लिखाणाची व्यासपीठे, सोशल मिडीया इ.)
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स (खास ब्लॉगिंगसाठी बनवलेल्या वेबसाईट्स)
३) तुमची स्वतंत्र वेबसाईट
१) ऑनलाईन फोरम्स – वर्तमानपत्रात वाचकांनी लिहिलेल्या लेखांचा एक कॉलम येतो. त्यात लोक आपले विचार, अनुभव इ. मांडत असतात. ऑनलाईन फोरम्स तसेच असतात. इंटरनेटवरती अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या केवळ तुम्हाला लेखन करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर चर्चा करण्यासाठी, प्रश्न उत्तर आणि प्रत्युत्तरासाठी जागा उपलब्ध करून देतात. जसे मराठीत मायबोली, मिसळपाव किंवा कोरा यासारख्या वेबसाईटवरून तुम्ही हव्या त्या विषयांवर लिहू वाचू आणि चर्चा करू शकता. यात वेबसाईट्स तुम्हाला लेख लिहिण्यासाठी लागणारी सर्व प्राथमिक तयारी पुरवतात. तुमच्या लिखाणाला जागा पुरवणे, त्याची विषयवार क्रमवारी लावणे, लिखाणात चित्रे, व्हिडिओज, लिंक्स इ. टाकण्यासाठीची सोय करणे वाचकांच्या प्रतिसादाला जागा देणे इ.इ. याचे फायदे तोटे अनेक आहेत.
फायदे –
• अशा फोरम्सवर एकाचवेळी अनेक लोक लिहित आणि असंख्य लोक वाचत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लिखाणासाठी आपसूकच वाचक मिळतात.
• तुमचे लिखाण आवडल्यास लोक तुम्हाला फॉलो करू शकतात आणि तुमचा असा स्वतःचा एक वाचकवर्ग यातून तयार होऊ शकतो.
• हे फोरम्स विनामूल्य (फुकट) वापरता येतात.
तोटे –
• अशा फोरम्सवरील लेखन हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नसते. फोरमचे व्यवस्थापन ते फोरमवरून कधीही हटवू शकते.
• एकाच विषयावर अनेक लोक लिहित वाचत असल्याने तुमचे लिखाण चांगले असूनही गर्दीमुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
• वाचकांशी थेट संपर्क साधण्यावर फोरम्सचे नियंत्रण असते.
तुम्ही जर केवळ आवड म्हणूनच लिहित असाल तर असे फोरम्स उत्तम पर्याय आहेत. फक्त येथे तुम्ही ऑनलाईन लेखकांच्या गर्दीतले एक असल्याने तुम्हाला तुमची ओळख बनवायला बराच काळ जातो.
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स – तुम्हाला जर छंद म्हणून लिहायचे असेल परंतु ते फोरम्सवरच्या गर्दीपेक्षा अधिक स्वतंत्र हवे असल्यास हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही स्वतःचे पान/साईट तयार करू शकता आणि विविध विषयांवर लिहू शकता. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला लेखन, त्याचे व्यवस्थापन, पानाचे डिझाईन, इंटरनेटवर ते पान कसे दिसेल इ. सर्व सोयी पुरवतात. जसे तुम्ही फेसबुकवर लॉगीन करून स्वतःच्या पानावर जाता तसेच फकत खास लेखनासाठी वापरायचे म्हणून बनवलेले असे हे अनेक प्लॅटफॉर्म्स आजघडीला लाखो ब्लॉगर्स वापरतात. तुम्ही जर नव्यानेच ब्लॉगिंग करत असाल तर अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर फायदेशीर ठरतो कारण ब्लॉग तयार करणे, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग इ. साठी हे प्लॅटफॉर्म्स अनेक सुविधा पुरवतात. सध्या अनेक कंपन्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पुरवतात. उदा. वर्डप्रेस(WordPress), ब्लॉगर (Blogger), विक्स (Wix), टम्ब्लर (Tumblr), घोस्ट (Ghost) असे अनेक पर्याय आहेत. हा प्रत्येक पर्याय कमीजास्त प्रमाणात सारख्याच सुविधा पुरवतो. आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा. त्याबद्दल विस्ताराने नंतर लिहिनच.
फायदे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे फोरम्सवरील गर्दी टाळून तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख बनवता येते.
• तुमच्या लिखाणावर तुमचे अधिक नियंत्रण राहते. चित्र, व्हिडिओ इ. च्या वापरावर मर्यादा येत नाहीत.
• वाचक आणि तुम्ही एकमेकांशी थेट संपर्क साधू शकता.
तोटे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या विनामूल्य सुविधा मर्यादित असतात. अधिक सुविधा मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
• स्वातंत्र्य मर्यादित असते. उदा. तुमच्या वेबसाईटची लिंक किंवा इतर गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही.
• प्लॅटफॉर्मच्या फ्री अकाउंटवरून जाहिराती दाखवता येत नाहीत.
एकूणातच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हे हौशी परंतु व्यवासायिक इच्छा नसलेल्या लेखकांसाठी उत्तम पर्याय आहेत. अर्थातच यात पुढे लेखकाच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा फायदा लेखकापेक्षा फोरमप्रमाणेच प्लॅटफॉर्मला अधिक होतो. लिखाणाशिवाय इतर काही उद्देश नसल्यास ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हा एक उत्तम पर्याय आहे.
३. स्वतंत्र वेबसाईट – ब्लॉग लिहिण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट तयार करणे. हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्याचा गैरसमज उगाचच पसरल्याने अनेकजण याचा विचार करत नाहीत. वास्तविक आजकाल स्वतंत्र वेबसाईट रजिस्टर करणे आणि डिझाईन करणे अतिशय सुलभ झाले आहे. अर्ध्या तासाच्या अवधित या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. Go Daddy, Bluehost, Hostgator इ. अनेक वेबसाईटवरून तुम्हाला नवीन वेबसाईट नोंद करता येते. त्यासाठी खूप मोजके तांत्रिक ज्ञान लागते. स्वतंत्र वेबसाईट ही ब्लॉगिंग, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग, व्यवसाय अशी सर्व प्रकारची दारे खुली करते ते ही कोणत्याही बंधनांशिवाय. स्वतंत्र वेबसाईट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता किंवा येथेही तुम्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स वापरु शकता. ते तुम्हाला तुमची वेबसाईट मॅनेज करणे, डिझाईन, लेखन यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात. हा कमी खर्चिक आणि अधिक स्वतंत्र पर्याय आहे. यात वर्डप्रेस (WordPress) अग्रगण्य आहे जो जवळपास सर्वप्रकारची साधने विनामूल्य उपलब्ध करून देतो. त्याबद्दल अर्थातच पुढे स्वतंत्र लेख येईल.
फायदे – • कोणत्याही बंधनांशिवाय लेखन करता येते.
• वेबसाईट व्यवस्थापन, डिझाईन, जाहिराती, वाचकांशी संपर्क या गोष्टींवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण राहते.
• लिखाणाच्या लिंक्स, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन, स्वतंत्र इमेल, चॅट अशा अनेक सुविधा वापरता येतात.
तोटे – या पर्यायाचे कोणतेही दृष्य तोटे नाहीत.
• डिझाईन, व्यवस्थापन, सुरक्षा, अपडेट्स, ऑप्टिमायझेशन इ. तांत्रिक बाबी स्वतःच सांभाळाव्या लागतात. अर्थात यासाठी ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स आणि इतर अनेक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने चालवलेली स्वतंत्र वेबसाईट हा ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्ही लेखनासह डिझाईन, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या सर्व बाजू स्वतःच्या नियंत्रणात ठेऊ शकता आणि उत्तम ब्लॉगर बनू शकता. स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यासाठीचे पर्याय, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सची तुलना इ. विषयी पुढील भागात.

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

परामर्ष – Confab…

प्रश्न विचारा/Send Query or Feedback

परामर्ष Confab

नमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.
परामर्ष….
फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न  किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …

Hello Readers, Thanks a lot for the overwhelming response to the articles. I have received a lot of feedback including suggestions and queries. A bunch of them asked for more clarification regarding some terms, concepts or verses. This page is being prepared for resolving doubts from all these discussions.
Confab……
If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them through this link (Ask a Question). Click on the questions to read answers and discussions…

गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?
अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?
धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?
Does Lord Krishna in Bhagavad Gita ask us to stop enjoying worldly pleasures?
CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?
भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?
मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?
अध्यात्म म्हणजे काय?
‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?



गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?

मूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।१४।।
अन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व।
अर्थ – हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
तितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.
आदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.
सहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते।।२४।। विवेकचुडामणी
चिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा
विषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता।।७।। अपरोक्षानुभुति
विषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.
स्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.
ज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥
मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥

अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?

महाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.
अक्षौहिण्या: परीमाणं नराश्वरथदन्तिनाम्।यथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥
पायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे

  1. पत्ती    १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती
  2. सेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती
  3. गुल्म   (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती
  4. गण    (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती
  5. वाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती
  6. पृतना   (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती
  7. चमू    (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती
  8. अनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती
  9. अक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती
    साधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?

गीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.
उदाहरणादाखल काही श्लोक पाहू
१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।२-३८।।
३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८।।
४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

हे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात

५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२-२२।।
६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२ २३।।
७. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि।

हे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.

८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌। तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

हे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.

१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।    वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.

११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।

यासारखे गुढ श्लोक आहेत.

याव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
योगः कर्मसु कौशलम्।
योगक्षमेम् वहाम्यहम्।
नभः स्पृशं दीप्तम्।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही!

धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?

धर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.
शिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.
शेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.
परंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.
व्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.
भाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे

धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् । (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)
अहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः ।दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्। (याज्ञवल्क्यस्मृति १-१२२)

उत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.
त्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.
आश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.

DOES LORD KRISHNA IN BHAGAVAD GITA ASK US TO STOP ENJOYING WORLDLY PLEASURES?

Lord Krishna never asks you to stop enjoying worldly pleasures. He says we’ve to restrain the senses from temptations and expectations. It doesn’t mean not enjoying at all.

There is nothing wrong with enjoying material pleasures but it is inappropriate to fall prey to the senses for those pleasures. Senses are constantly pulling us towards pleasures, destabilizing strongest minds by creating expectations. Such Karma with an expectation towards its result, creates attachment and further drags us into joys or sorrows about the results.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

For example, Krishna would not say that one should not enjoy good food. He also approves working hard for earning that good food. But it is inappropriate to feel happy or disappointed if you succeed or fail within your efforts because that drags you to attachment, disturbs your mind. If the mind understands the inevitability of either success or failure, then the bond of Karma will not bind the soul. This is exactly what we forget while we strive to get what we like. If we don’t succeed, we get angry and then invite array of disorders from anger eventually losing our ultimate goal.

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

That is why Krishna says that it is not wrong to enjoy worldly pleasures, but it is wrong to be attached to them That attachment traps our soul in the bondage of bad Karma.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

But the self-controlled being, freed from attachment and aversion, who follows the conscious injunction despite being surrounded by the objects of the senses (material pleasure), with senses governed by the self; attains the precious union with the Ultimate Being.

So the gist is to enjoy the gifts of life without letting the gifts enjoy toying with your equanimity 🙂 Karma without expectations backed up by the intellect’ is what Chapter 2 and 3 explain.

CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?

Buddhism and Gita (Hinduism) share certain views and differ on certain. Both of them believe in the illusory state of existence i.e. the material world. To an extent both of them agree on sensory perceptions being the reason for suffering.

Buddhism believes in withdrawal from the material world and resorts to meditation leading to Nirvana. Which is kind of detachment from almost everything including self.

Gita, on the other hand promotes constant action (Karma) towards collective wellness backed up by the intellect (Sankhya). This is how a sole soul  self dissolves/unifies into the omnipresent. (Karma in Sankhya Yoga Chapter II)

Buddhism denounces everything as suffering while Gita upholds it as the beauty of the creator. Buddhism believes Salvation/Nirvana means Death since it frees one from suffering and pleasure. Wherein Gita makes Salvation achievable to a being by uniting Aatman (आत्मन् – Individual Self) with the Param Aatman (परम आत्मन् – The Ultimate) describing it as bliss which is eternal and above all material notions.

We have to understand why Buddhism tends to differ from the Gita. Buddhism emerged as a reaction to Hinduism (has its own reasons). Hence Buddha deliberately kept the theory of eternity away from his preaching while Gita preaches it.

Logically though, detachment from entire existence is not practical. Gita in the Chapter III describes it. Denouncing Karma isn’t possible since one at least has to pacify his bodily needs. He has to be a part of the material world to do that. Hence Gita’s view of appreciating the creation of the Ultimate and trying to be one with Him through Intellect (Sankhya) based Karma stands stronger.

I have already written about the greatness of Gita and why has it been relevant to generations after generations.

भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?

श्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। गीता २.४६।।
अन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)।

शब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥

हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.

सोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.

बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.

सलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति।। (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)

हे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)

अशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’। म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.

मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?

भारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.
प्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.
आता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू
१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.
वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥
मनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.
२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे.
अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् ।सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥
श्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥
असे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.
३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥
त्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.
हे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का? आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.
अशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.
प्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.

श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?

श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही शब्द कठोपनिषदाच्या प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतील दुसऱ्या श्लोकात येतात. या दोन्ही शब्दांचे व्यावहारीक आणि तात्विक असे दोन्ही अर्थ आपल्याला अनुभवास येतात. श्लोकाचा अन्वय, अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूयात
मूळ श्लोक

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते।।
अन्वयः – श्रेयः च प्रेयः च मनुष्यम् एतः । धीरः तौ सम्परीत्य विविनक्ति । प्रेयसः श्रेयः हि अभि वृणीते । मन्दः योगक्षेमात् प्रेयः वृणीते ।

श्रेयस आणि प्रेयस याचे येथे अभिप्रेत असणारे अर्थ हे कल्याणकारक आणि आनंददायक असे आहेत. माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते ज्यात काही सोपे आनंददायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडतो आणि सोपा व आनंददायक मार्ग डावलतो. असा साधारण अर्थ या श्लोकातून ध्वनीत होतो.
माणसाचे आयुष्य ही सुखदुःखांची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात ज्यात त्याला सोपा आणि अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गाप्रमाणेच त्यांचे फलित असते. वरकरणी सोप्या आणि कमी कष्टप्रद मार्गानी मिळणारे फलितही सीमीत असते तर अवघड आणि कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते.
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास विद्यार्थीदशेत किंवा उमेदवारीच्या काळात जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी व्यक्ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते आणि उर्वरीत काळ सुखाने घालवते. परंतु जी व्यक्ती हा काळ फार तोशीस न घेता माफक कष्टात घालवते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ घालवते आणि उर्वरीत आयुष्यही अधिक कष्टप्रद बनवते. कारण अर्थातच निवड…. योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. शिक्षण असो, गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती हेच तत्व सगळीकडे लागू पडते.
हे अर्थातच श्रेयस आणि प्रेयसाचे सर्वसामान्य अर्थविवेचन आहे. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा खुप गहन अर्थ अभिप्रेत आहे. प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सुख आहे.
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच सुखी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे?
प्रेयस हे ते क्षणिक सुख आहे जे भौतिक साधनांतून प्राप्त होते तर श्रेयस हे ते सुख आहे जे व्यक्ती समाधानातून आणि स्थितप्रज्ञ वृत्तीतून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे असे भारतीय तत्वज्ञान उपनिषदे आणि गीतेच्या माध्यमातून मांडते.

अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती समजून घेण्यात जितका स्पष्टीकरणाचा भाग आहे तितकाच अनुभूतीचाही आहे. कसे ते उत्तराच्या अंती स्पष्ट होईलच.

अध्यात्म शब्दाची साधारण फोड अधि + आत्म अशी होते. यात अधि हे अव्यय विशेषत्वाने किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने येते. आत्म याचा अर्थ आत्मन् म्हणजे आत्मा किंवा स्व.
त्यामुळे अध्यात्माचा शब्दशः अर्थ – प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने स्वतःला जाणणे. कसे जाणणे.
भगवद्गीतेच्या आठव्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अध्यात्म या संज्ञेचा अर्थ सांगतो. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुना प्र्श्न करतो की –

तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?

श्रीकृष्ण सांगतो –

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो

मग आता स्व-भाव म्हणजे काय हे नीट समजून घेऊ यात.
कारण आपल्या रोजच्या वापरातला शब्द असल्याने त्याच्या अर्थाकडे नीटसे लक्ष जात नाही. स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे.
वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो.
श्रीकृष्ण सांगतो.
अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रकर्षाने स्वतःला जाणायचे तर त्यासाठी स्वतःशिवाय इतर कोणतेही बाह्य साधन उपयुक्त ठरणार नाही. स्वतः प्रयत्न करून स्वतःला जाणणे भाग आहे. स्वतः च स्वतःवर प्रयोग करुन स्वतःच त्याचे निष्कर्ष तपासून पहायचे म्हणूनच अध्यात्मात अनुभूतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
अधिक वाचनासाठी –‘अंतरंग – भगवद्गीता’

‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?

उपनिषदे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत. परब्रह्म किंवा आत्मतत्त्वाचा अभ्यास हा उपनिषदांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. अहं ब्रह्मास्मि । हे बृहदारण्यक (१/२/४/१०) उपनिषदातील असून मूळ श्लोक असा आहे तद्धैतत्पश्यन्नृषिर्वामदेवः प्रतिपेदेऽहं मनुरभवं सूर्यश्चेति ।
तदिदमप्येतर्हि य एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इदं सर्वं भवति ।

उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक. अहम् म्हणजे मी आणि ब्रह्म अस्मि म्हणजे ब्रह्म आहे. अहम् ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा शब्दशः अर्थ होतो.
वास्तविक अर्थ काय –
आत्मज्ञान किंवा आत्मतत्त्व जाणणा-या व्यक्तीला झालेली ही उपरती आहे की सृष्टीचे कारक जे ब्रह्म तत्त्व, मी त्याचाच अंश किंवा आहे किंवा तत्त्वतः मी आणि तो कोणी निराळे नसून एकच आहोत. शारीर देह नश्वर तत्त्व असून आत्मा हे अविनाशी अविकारी आणि अनंत तत्त्व असून ते, मी, ब्रह्म आणि परब्रह्म हे एकस्वरूप आहेत. ज्याप्रकारे सर्व जलस्त्रोत जसे शेवटी समुद्रात एकरुप होतात तसेच हा अंश परमात्म्याशी तद्रुप होतो.
तत् त्वम् असि । (छान्दोग्य उपनिषद ६/८/१६) म्हणजेच ते (ब्रह्म) तू आहेस हे महावाक्यही याच अर्थाने येते.
जीवात्म्यात परमात्म्याचा अंश असतो या व्यापक अर्थाने ही महावाक्ये येतात.
वेदातही परब्रह्म हे एक तत्त्व असून त्याला ज्ञाते अनेक नावांनी ओळखतात असे म्हटले आहे एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:। – ऋग्वेद १/१६४/४६
गीतेतही भगवंत आपला अंश प्रत्येकात आहे हे सांगतो.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।१५.१५।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन (दोषनाश) ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.

Quest – Bhagavad Gita – Part 2

Questions … Arjuna .. then .. even today!

I am sure most of us have seen a movie called ‘Kung Fu Panda’ (All parts of course!) Master Shifu, the Kung Fu tutor, takes us through wonderful insights into human behaviour. After blaming almost everyone for his failure to build an unbeatable Supreme Warrior, he finally realizes that the biggest fault rested within him and not amongst any external factor. With painstaking efforts he wins over self-doubt and creates a Dragon Warrior out of a novice! The recognition of actual problem dawns upon him at the end – lack of Inner Peace!

From the Stone Age to the present day, man has made great progress with the strength of his unwavering intelligence. Created a number of tools of material convenience. Overcame many difficulties. But some questions still remain unanswered, even today.

Are humans really satisfied with so much material progress? If so, why is it that there is a constant search for new comforts? Each individual is struggling to be happy and satisfied. But to our surprise each one’s happiness, each one’s satisfaction lies in different things. So what exactly is happiness? Just getting what you demand is not happiness, because the list of demand never ends. We are constantly sourcing/demanding something or the other. We are sad if we don’t get it, we are sad if we get it later than expected. If we get it on time we are happy…. momentarily…..….. we want something else the next moment!! The list just never ends.

The question haunting human mind for ages is.. What exactly is happiness and sorrow? How do we find the key to unending happiness? A way to satisfied mind without any regrets…….. Inner Peace!!

Majority of readers study Gita in anticipation of an instant remedy. They don’t make a conscious effort to assimilate the knowledge in it. Cracking code of mankind’s oldest puzzle can’t be as easy as a Sudoku riddle in a newspaper where the solution is published the next day!! Just as everyone’s happiness and sorrows are different, their queries are different too and so is the key to fathom remedies.

Here surfaces the real greatness of Gita. It is a book that brings together solutions to the problems of human beings with different temperaments, intellects and situations. For ages Gita provides solutions to mankind, based on each one’s intellect, passion and efforts. With a thoughtfully bound, step by step series of 18 chapters Gita opens the door to a meaningful life.

The first chapter of the Gita ……….‘Arjuna Vishada Yoga’. The subject of each chapter is evident from its name. Vishada literally means lamenting, here it denotes reflection of self and surrounding. We’ll call it Predicament of Arjuna.

The total number of verses (shloka) is 47. This chapter falls into two parts. First part describes the as is situation on the battlefield. It begins with a rollcall. Taking names of the top Generals1 in the Kaurava and the Pandava troops, the descriptions of their conch shells, and Arjuna’s observation of the army. Arjuna’s melancholy begins from verse (shloka) 28 onward ….

Arjuna asks Lord Krishna to position his chariot between the two armies. He wants to observe the armies on both sides. He scans the Kaurava troops carefully. To his horror Arjuna sees thousands of elephants, horses, chariots and soldiers. Against him are standing his beloved elders like Bhishma & Shalya, sagacious teachers like Drona & Kripa, cousins like Duryodhana & Vikarna and a whole lot of the extended family. All primed to kill each other….

Seeing his own people in the army on both sides, Arjuna’s mind is ravished with thoughts.

Is this genocide really inevitable? Does winning kingdom justify slaying our own brothers? Is this going to bring satisfaction/happiness for us Pandavas?

If this is following my designated Self, occupational and religious duties then what does denouncing them mean? Is avoiding violence here unrighteous? What is the meaning of happiness if it comes through extermination of our own clan? If there is a sin in killing, then how can this crusade lead to satisfaction?

From 28 onwards for 20 verses, Arjuna describes the terrible consequences of war. The gist comes in below 3 verses (shloka):-

निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव ।न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।१-३१।।

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ।।१-३६।।

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।१-४४।।

Slaying one’s kinsmen will only lead to evil. The value system will be degraded, the clan will disappear and we will get hell.

One after the other, Arjuna presents Krishna with the disastrous aftereffects of this war. Eighteen Akshauhini2 army used to destroy their own clan. Would such a massacre really bring happiness? Isn’t it better to not fight at all? He believes he’s committing an awful sin. He feels that happiness even momentary, if achieved after the war is not worth.

Arjuna, caught in the chaotic battle of many such questions, puts down the bow. He tells Krishna, “I am so confused that it is impossible for me to wield a weapon….” The first chapter ends.

Arjuna Vishada … This first chapter of the Bhagavad Gita is of vital importance. One would naturally think that there is nothing special about this chapter when viewed from a philosophical point of view. This chapter deals with military census and Arjuna’s grief or fear. So does its greatness only rest on it being the first chapter of the Gita? Of course not.

What is the significance of Arjuna Vishada Yoga ………. in the next part

Footnotes: –

  1. The names of the following Knights appear in the first chapter …
  • Yuyudhana: – Brother of Satyaki. Present on all the 18 days of the war.
  • Dhrishtaketu: – King of Chedi kingdom
  • Chekitan: – Warrior king from the clan of Vrushni Yadava. Killed by Duryodhana in the war
  • Yudhamanyu and Uttamauja: – Warrior brothers from
  • Draupadeya (Sons of Draupadi) :- Shrutasoma, Shrutakarma, Shatanika and Shrutasena
  • Vikarna: – Good natured brother from 100 Kaurava siblings
  • Soumadatti: – Son of SomadattaBhurishrava

Apart from this, of course, famous Generals like Dronacharya, Bhishma, Virata, Drupada, Bhima, Arjuna, King of Kashi, Purujit, Kuntibhoja, Shaibya, Abhimanyu, Karna, Ashwatthama, are also mentioned.

  1. Akshauhini:– The total number of troops in the Mahabharata war was 18 Akshauhini. The Kauravas had 11 and the Pandavas had 7 Akshauhini. There were multiple ascending dimensions for counting troops – Patti, Senamukha, Gulma, Gana, Vahini, Prutana, Chamu, Anikini and Akshauhini. One Akshauhini is about 218,700 troops and the 18 Akshauhini totals to approximately 3,936,600. (See – Akshauhini)

Previous – Quest – Bhagavad Gita – Part 1 Next – Quest – Bhagavad Gita – Part 3

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग २

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही!

अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.

इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच. हवं ते नाही मिळालं की दुःख होतं, हवं ते संपलं की दुःख होतं, आज हवं असलेलं उद्या मिळालं तरी दुःख होतंच की!

वरवर पाहता प्रश्न सोपा आहे, परंतु वर्षानुवर्ष हा प्रश्न माणसापुढे उभाच आहे. सुख, दुःख म्हणजे नक्की काय? कायम सुखी आणि समाधानी केव्हा आणि कसं वाटेल?

बहुसंख्य वाचक गीतेचा (Instant Remedy) तयार उत्तराच्या अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. मानवजातीला पडलेले सर्वात प्राचीन कोडं म्हणजे वर्तमानपत्रातलं शब्दकोडं नव्हे, ज्याचं उत्तर दुस-या दिवशी छापून येईल! जसं प्रत्येकाचं सुख, दुःख वेगळं तसेच त्याचे प्रश्नही वेगळे आणि प्रश्न वेगळे म्हणून उत्तराचा मार्गही निराळा.

गीतेचे मोठेपण यातच दडलेले आहे. भिन्न स्वभाव, बुद्धी आणि परिस्थिती असणा-या मानवांच्या समस्येवर एकत्र उपाय देणारे ते पुस्तक आहे. ज्याची जशी कुवत आणि साधना त्याला तसे उत्तर गीतेत सापडत जाते, म्हणूनच पुरातन कालापासून ते आजपर्यंतच्या मानवाला गीता मार्गदर्शक ठरते. एक एक अध्यायाची पायरी रचत गीता अठरा अध्यायातून आपल्याला सार्थ जीवन जगण्याचे द्वारच उघडून देते.

प्रत्येक अध्यायाचा विषय हा त्याच्या नावावरून स्पष्ट होतो. ‘अर्जुनविषादयोग’ हा गीतेतील पहीला अध्याय आहे. एकूण श्लोकसंख्या ४७ आहे. या अध्यायाचे दोन भाग पडतात. पहिल्या भागात युद्धभूमीवरील स्थितीचे वर्णन आहे. यात सुरुवातीला कौरव आणि पांडव पक्षातील शूरवीरांची नावे, त्यांच्या शंखध्वनींचे वर्णन आणि अर्जुनाने केलेले सैन्याचे निरीक्षण आहे. २८ व्या श्लोकापासून पुढे अर्जुनाचा विषाद….

दोनहीकडचे अफाट सैन्य पाहून युद्धामुळे होणा-या भयानक संहाराची कल्पना अर्जुनाला येते. तेव्हा त्याला जे वाटते ते तो श्रीकृष्णाला सांगतो. तो सर्व अर्जुनविषाद आहे.

अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मधोमध आपला रथ उभा करावयास श्रीकृष्णाला सांगतो.दोनही बाजूच्या सैन्याचे निरीक्षण करण्याची त्याची इच्छा असते. कौरवांच्या बाजूचे सैन्य पाहील्यावर भीष्म, शल्य यांसारखे ज्येष्ठ नातेवाईक, द्रोणचार्य, कृपाचार्यांसारखे गुरु, दुर्योधन विकर्णासारखी भावंडं आणि त्यांची मुले यांच्यासह लक्षावधी हत्ती, घोडे, रथ आणि सैनिक अर्जुनाला युद्धासाठी उभे असलेले दिसतात. दोन्ही बाजूच्या सैन्यात आपलेच लोक पाहून अर्जुनाच्या मनात विचारांचे काहूर माजते.

इतका संहार खरोखर अपरीहार्य आहे का? हे युद्ध खरोखर कशासाठी लढलं जातंय? राज्य मिळविण्यासाठी आपल्याच बांधवांना मारणे हा धर्म आहे का? जर असेल तर मग अधर्म म्हणजे काय? येथे हिंसा टाळणे हा धर्म की अधर्म? मी कोणता धर्म पाळायचा? हिंसा केल्याने राज्याचे सुखही मिळणार आणि बांधवांच्या संहाराचे दुःखही तर मग सुख आणि दुःखाची व्याख्या काय? संहार करण्यात पाप असेल तर हे धर्मयुद्ध कसे?

२८ पासून सुमारे २० श्लोकातून युद्धाच्या भयानक परीणामांचे वर्णन अर्जुन करतो.

निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव ।न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।१-३१।।

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ।।१-३६।।

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।१-४४।।

स्वजनांची हिंसा करण्याने केवळ अमंगल असे पाप वाट्याला येईल. कुळ नष्ट होईल, कुलधर्म लोप पावेलआणि आम्हाला नरक प्राप्त होईल.

एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून आपल्याच कुळाचा नाश करायचा. अशा महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?

अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेला अर्जुन धनुष्य खाली ठेवतो. आपण इतके गोंधळून गेलो आहोत की शस्त्र चालवणे आपल्याला अशक्य झालं आहे असं तो कृष्णाला सांगतो आणि पहिला अध्याय संपतो.

अर्जुनविषाद… भगवद्गीतेचा हा प्रथम अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. कोणालाही सहाजिकच असे वाटेल की तत्त्वज्ञानाच्या संदर्भातून पाहील्यास या अध्यायात काहीच विशेष दिसत नाही. सैन्यगणना आणि शोक किंवा भयाने ग्रासलेले अर्जुनाचे प्रश्न इतकंच काय ते या अध्यायात पहायला मिळतं. मग केवळ गीतेतला पहिला अध्याय म्हणून महत्त्वाचा समजायचा का? तर तसं नक्कीच नाही.

काय आहे अर्जुनविषादयोगाचे महत्त्व………. पुढील भागात……..

तळटिपः-

१) पहील्या अध्यायात खालील शुरवीरांची नावे येतात…

  • युयुधानः– हा सात्यकीचा भाउ, युद्धाचे सर्व १८ दिवस हा उपस्थित असतो.
  • धृष्टकेतूः– चेदीनरेश
  • चेकीतानः– वृष्णिवंशीय क्षत्रिय राजा, भारतीययुद्धात दुर्योधन कडून मारला जातो
  • युधामन्यु आणि उत्तमौजाः- पांचालातील वीर बंधु
  • द्रौपदेयः– यात द्रौपदीचे सर्व पुत्र प्रतिविंध्य. श्रुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक, श्रुतसेन
  • विकर्णः– १०० कौरव भावंडातील
  • सौमदत्तिः– सोमदत्ताचा पूत्र – भूरिश्रवा

याशिवाय अर्थातच द्रोणाचार्य, भीष्म, विराट, द्रुपद, भीम, अर्जुन, काशीनरेश, पुरुजित, कुन्तिभोज, शिबी राजाचा पुत्र शैब्य, अभिमन्यु, कर्ण, अश्वत्थामा या प्रसिद्ध योद्ध्यांचाही उल्लेख होतो.

२) महाभारतीय युद्धातील एकुण सैन्यसंख्या १८ अक्षौहीणी होती. कौरवांची सैन्यसंख्या ११ तर पांडवांची ७ अक्षौहीणी होती. सैन्यसंख्या मोजण्याची परीमाणे – पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहीनी, पृतना, चमू, अनीकिनी आणि अक्षौहिणी अशी होती. एक अक्षौहीणी म्हणजे साधारण २,१८,७०० सैन्यसंख्या तर एकूण १८ अक्षौहीणी म्हणजे ३९,३६,६०० (पहा – अक्षौहीणी).

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग १ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 1

Welcome Friends!
Our First Series of articles will be about Bhagavad Gita.
On this forum we are going to discuss knowledge, philosophy and culture. Sounds a bit too comprehensive isn’t it? But it helps. When your subject matter covers almost everything; you tend to avoid futile discussions like why something is or isn’t a topic being discussed here, you’d rather focus on the discussion!!
Alright then let’s begin. World over, amongst the forums of philosophical discussions Gita has always been a hot cake of all the scriptures. Since childhood we have been hearing about this book in various contexts. As a child, some (Indians especially) may have memorized at least one of these chapters (often by force!). We move ahead with our life but the curiosity persists. Very few rarely try and pursue the book. Surprisingly Gita keeps knocking our door along the way, through trainings, TV serials, management presentations, online content, etc. The book keeps coming back to us rekindling our curiosity.
We know about Gita as a book of wisdom that solves most common but unusual questions the mankind faces. Gita crosses our path every now and then but does not grip our attention. Perhaps because philosophy and the Sanskrit language are the two seemingly dry and often avoided mediums!
First of all, let us learn some basic facts about Gita.
Gita is built in the form of verses. The total number of verses (shloka) is 700 enunciated by 4 talking personas.
Dhritarashtra – Father of the Kauravas and Emperor of Hastinapura. He is blind by birth. The only verse (shloka) he owns in the Gita is the first verse of the book. He ignites the engine. Like a child seeking a story from his Grandpa…..! He simply asks a question ‘O Sanjaya, what is going on at Kurukshetra, the battlefield of Kurus’ and the Gita begins. The character of Dhritarashtra ends here.
Sanjaya – The charioteer of Dhritarashtra and the temporary war correspondent during that time. He delivers live commentary on Kurukshetra war for Dhritarashtra. He has 41 verses (shloka) in the Gita.
Arjuna – The archer brother amongst the Pandavas. He has 84 verses to his name in the Gita. Majority of these appear in the first chapter.
Lord Krishna (Krsna) – Almighty! Who preaches Gita to Arjuna on the battlefield. The highest number of verses in the Gita i.e. 574 verses are, of course delivered by Lord Krishna. He’s the orator rather author of the Philosophy.
The Gita is divided into a total of 18 chapters. The name of each of these is suffixed as ‘Yoga’. i.e. Arjuna Vishada Yoga, Sankhya Yoga, Karma Yoga etc. Every Yoga is prefixed by the main topic of that chapter. For example, the name of the 14th chapter is ‘Gunatraya Vibhaga Yoga’. It, as the name suggests has the characteristics of ‘the three qualities’ and their symptoms.
Volumes of content is published every day across multiple media platforms, pushing back the old ones into oblivion. Assuming a bunch of 10 verses (shloka) printed on each page, making a total of 70 pages; I mean, Gita is as short as a kids story book! Then what is it about the Gita that keeps going for thousands of years? What is in it that keeps appealing to generations of mankind? The answer is pretty simple.
In fact, the answer lies in the question itself. What has been the rarest and most valued gift to mankind amongst all species? An inquisitive and curious mind! Since the beginning of civilization or rather the beginning of the beginning itself, human being has always been on a quest. A quest about Life. A quest about existence, emotions, purpose and everything about these that is unfathomable or unknown. The questions Arjuna had before the war began is what shadows the human mind even today, despite achieving so much of material progress. Gita provides answers……solutions….to the eternal queries of mankind.
What are these queries……. What did Arjuna seek?
Questions …………. Arjunavishada ……………. in the next part.

Next Part – Quest- Bhagavad Gita – Part 2

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact